Wednesday, December 9, 2015

प्रतिक्रांती उंबरठ्यावर!

'भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.' - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
___________________

आज बाबासाहेबच विभूती झाले आहेत. चैत्यभूमी, दीक्षाभूमी ही तीर्थस्थळे झाली आहेत. बाबासाहेबांबद्दलचा आंबेडकरी समुदायाच्या मनातील अपरंपार आदर व कृतज्ञता यांचा हितसंबंधीयांनी आपल्या स्वार्थासाठी वापर केला. करत आहेत. ह्या सरकारचे तर ते मिशनच आहे. बाबासाहेबांच्या स्मारकांत-उत्सवांत त्यांचे विचार दफन करण्याची मोहीम जोरात चालू आहे. समाज त्यास बळी पडतो आहे. ...आणि सजग कार्यकर्ते-बुद्धिवंत हातावर हात धरुन हे पतन निष्क्रीयपणे पाहत आहेत किंवा त्यात चूपचाप सामील होत आहेत. अशा पतनाच्या काळात तडफडून उठत प्रस्थापिताच्या विरोधात विद्रोहाचा एल्गार पुकारणारा आंबेडकरी युवक आता जणू इतिहाजमा झाला आहे. नाही म्हणायला फेसबुक-व्हाॅट्सअपवर तो आरोळ्या देताना कधीकधी दिसतो. आपले कंपूही करतो. या कंपूंत ते परस्परांना आपली भडास ऐकवतात, पुढा-यांना-सरकारला-व्यवस्थेला शिव्या घालतात. अशारीतीने आपल्या रागाचे विरेचन झाले की शांत होतात. पण आपल्या 'कंफर्ट झोन' मधून बाहेर पडून रस्त्यावर उतरत नाहीत. वस्त्यांत जात नाहीत. प्रासंगिक आंदोलने करणारे काही सन्मान्य अपवाद आहेत. तथापि, नियोजनपूर्वक, सातत्याने करावयाच्या संघर्षाची, त्यासाठीच्या संघटनेची पूर्ण वानवा आहे. या स्थितीची एकत्र बसून चिकित्सा करण्याचीही निकड कोणाला भासत नाही.

...रात्र वै-याची-आम्ही निद्रिस्त; प्रतिक्रांती उंबरठ्यावर!

- सुरेश सावंत

No comments: