Tuesday, January 9, 2018

जिग्नेश मेवाणीच्या विजयाचा बोध


गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी भरघोस मताधिक्याने निवडून आला. जिग्नेशचे या नेत्रदीपक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. देशातील अनेकांचे लक्ष या मतदारसंघाकडे होते. गाईंना मारुन वाहून नेत आहेत या संशयावरुन वर्षभरापूर्वी तथाकथित गोरक्षकांनी दलित तरुणांना उनात अमानुष मारहाण केली होती. त्यातून जो दलितांचा उद्रेक झाला त्याचे नेतृत्व जिग्नेश मेवाणी या ३५ वर्षांच्या डाव्या-पुरोगामी चळवळीशी संबंधित कायद्याचा पदवीधर असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने केले होते. त्यातूनच तो प्रकाशझोतात आला. कन्हैयावरचे सरकारी दमनचक्र, रोहित वेमुलाची आत्महत्या यांनी गरम झालेल्या माहोलात जिग्नेश नव्या दलित उठावाचा चेहरा झाला. त्याच्या या आंदोलनाला एकूणच संघपरिवाराच्या कारवायांनी अस्वस्थ असलेल्या देशभरच्या पुरोगामी, डाव्या व आंबेडकरी विचारांच्या बुद्धिजीवी-कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्याच्या निवडणुकीच्या प्रचारातही केरळ, दिल्ली, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अशा अनेक राज्यातून पुरोगामी विद्यार्थी, कार्यकर्ते, अभ्यासक सामील झाले होते. देशातील संघपरिवाराच्या उन्मादाला व मोदींच्या चढाईला अटकाव करण्यासाठीच्या राजकीय लढ्याचा एक भाग या प्रेरणेने व जिद्दीने ही मंडळी जिग्नेशला त्याच्या प्रचारात साथ करत होती.

जिग्नेशच्या यशाने या सर्व पुरोगामी वर्तुळात जल्लोष होणे अगदी स्वाभाविक होते. आंबेडकरी चळवळीची जन्मभूमी व एकेकाळची आधारभूमी असलेल्या महाराष्ट्रातील आंबेडकरी विभागाला तर याचे विशेष अप्रूप आहे. आज आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील शतखंडिततेने राजकीयदृष्ट्या दुबळेपणा अनुभवणाऱ्या युवकांना मेवाणीचे हे यश ऊर्जा देणारे वाटते. अर्थात, मेवाणीची डाव्या-पुरोगाम्यांसोबतची सलगी व त्याचे ‘जयभीम’सोबत ‘लाल सलाम’ म्हणणे न रुचणारेही अजून आहेत. त्यांच्या निकषांप्रमाणे तो ‘शुद्ध आंबेडकरवादी’ नसल्याने त्यांनी या यशाबद्दल थोडे आखडते घेत अभिनंदन केले आहे. डाव्या-पुरोगामी वर्तुळातील काहींना त्याच्या या यशात अखिल भारतीय दलितांचा नेता उदयाला येत असल्याचे दिसू लागले आहे.

जिग्नेश मेवाणीमध्ये असा दलितांचा राष्ट्रीय पातळीवरील नेता होण्याची नक्कीच क्षमता आहे. एवढेच नाही, तर दलितांमध्ये आपला आधार तयार करुन त्यांच्यासहित अन्य कष्टकरी, शोषित, पीडित समूहांना तो एकवटू शकतो अशी ताकदही त्याच्यात आहे. तळच्या विभागांतला वावर, त्यांच्या प्रश्नाची जाण, ती मांडण्याचे व त्याभोवती जनमत संघटित करण्याचे कौशल्य, केवळ ‘दलितां’विषयी बोलतो तोच दलितांचा खरा कैवारी या घेऱ्यात अडकून न राहता समग्र व्यवस्था परिवर्तनाबाबतची समज हे सगळे काही जिग्नेशमध्ये आहे. (अर्थात, अभिनिवेशी टाळ्याखाऊ भाषणांच्या सापळ्यात न अडकता आपल्या ताकदीचे योग्य मापन करुन पाय जमिनीवर ठाम राहतील याची दक्षता ही पूर्वअट मात्र त्यासाठी नक्की आहे.) ...आणि असा कार्यकर्ता आता विधानसभेत आमदार असणार आहे. रस्त्यावरच्या आंदोलनात सक्रिय राहून त्याबाबतचा आवाज तो आता विधानसभेत उठवत राहणार आहे. त्याची विरोधकांना धारेवर धरण्याची शैली लक्षात घेता तो विधानसभा गाजवणार हे नक्की. मतदारसंघातील विकासाच्या कामांतून पैसा गोळा करणे हा लोकप्रतिनिधींचा तसा प्रचलित व्यवहार असतो. याबाबत मनस्वी चीड व त्या विरोधात असलेला जिग्नेश आहे. तो आपल्या मतदारसंघात विकासाची उत्तम कामे करेल. एक आदर्श आमदार म्हणून तो काही काळातच नावाजला जाईल, याबद्दल मला खात्री आहे.

हे सगळे लक्षात घेत असताना या मापनाला वस्तुनिष्ठता यायची असली तर किंवा थोडे सावधान राहायचे असले तर किंवा पुढील दिशा अथवा रणनीती अधिक स्पष्ट व्हायची असेल तर जिग्नेशच्या विजयाच्या प्रक्रियेतील काही बाबींची नीट नोंद घेणे गरजेचे आहे. जिग्नेशच्या निवडणुकीतील यशाच्या स्वरुपाबद्दल बोलताना, लिहिताना आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी मंडळींकडून त्या बाबी नोंदवायच्या राहून गेल्या आहेत किंवा पुरेशा अधोरेखित केल्या गेल्या नाहीत असे मला वाटते.

जिग्नेशच्या उमेदवारीने आनंद झालेल्या व त्याला आपल्याकडून शक्य ती मदत-किमान नैतिक पाठिंबा द्यावा म्हणून देशभरातून गेलेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांत आम्हा मुंबईहून गेलेल्या काहींचा समावेश होता. आम्ही तिथे आठ दिवस होतो. या काळात जे प्रत्यक्ष पाहून-ऐकून ध्यानात आले त्याची नोंद पुढे करत आहे.

जिग्नेश मेवाणीचे या मतदारसंघात संघटन असावे, म्हणूनच त्याने या मतदारसंघाची निवड केली असणार व राज्य तसेच देश पातळीवरील दलितांना सकारात्मक संदेश जावा म्हणून काँग्रेसने ही जागा त्याला सोडली असणार असा या मतदारसंघात जाण्यापूर्वी व गेल्यानंतर पुढचे काही दिवस माझा समज होता. हळूहळू हा समज दुरुस्त होत गेला. काँग्रेसने ही जागा जिग्नेशला सोडली त्याचे कारण एकूण दलितांमध्ये अनुकूल संदेश जावा, हे बरोबर होते. पण जिग्नेशचे त्या भागात संघटन असणार हा माझा समज बरोबर नव्हता. त्याचे कर्तृत्व ज्या उना घटनेमुळे समाजासमोर आले ते उना वडगामपासून ३०० किलोमीटर दूर आहे. त्याचा परिणाम इथे झालेला नाही. त्याचे कोणतेही संघटन इथे नाही. तो या मतदारसंघाला अपरिचित होता. राहुल गांधींच्या नजीक असलेल्या त्याच्या मित्रांच्या सहाय्याने ही जागा जिग्नेशला सुटली. जिग्नेश अपक्ष म्हणून उभा राहिला. काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तो सुरक्षित मतदारसंघ आहे. एक अपवाद वगळता आतापर्यंत तिथे कायम काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे. तिथले काँग्रेसचे समर्थक ही बाब आम्हाला अभिमानाने सांगत होते. जो एक अपवाद झाला, तोही आम्ही आमच्या उमेदवाराला धडा शिकवायला म्हणून तसे केले असेही ते म्हणाले. हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. त्यांच्यानंतर दलितांची संख्या. मग राजपूत, ठाकोर, चौधरी या जाती. मुस्लिम-दलित, मुख्यतः मुस्लिम ज्याला मते देतील तो निवडून येतो.

काँग्रेसने ही जागा जिग्नेशचा त्या मतदारसंघात स्वतःचा काहीही आधार नसताना सोडली त्यामागे त्यांचे हिशेब नक्की होते. पण ती सोडताना तू आमच्या पंजा निशाणीवर उभा राहा, असा आग्रह धरल्याचे दिसत नाही. दुसरा युवा नेता ठाकोर समाजाचा अल्पेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सामील झाला व पंजा निशाणीवर उभा राहिला. जिग्नेश अपक्ष होता. त्याची निशाणी होती शिलाई मशीन. पंजा ऐवजी शिलाई मशीन हे लोकांपर्यंत पोहोचवणे जिकिरीचे होते. ते काँग्रेसने केले.

दलित नेत्याला जागा सोडायची व नंतर त्याला वाऱ्यावर सोडायचे, काँग्रेसच्या आधीच्या लोकप्रतिनिधीने किंवा अन्य निष्ठावंताने बंड करायचे व ती जागा येनकेनप्रकारेण जिंकून स्वतःकडे ठेवायची, असा अनुभव इथे आला नाही. जिग्नेशसाठी मणिलाल वाघेला या आपल्या तेथील आमदाराला काँग्रेसने तेथून हलवला व त्याला दुसऱ्या मतदारसंघातून उभे केले. वाघेला त्या मतदारसंघात पडले व तेथून भाजपचा उमेदवार विजयी झाला. रुढ भाषेत बोलायचे तर जिग्नेशच्या विजयासाठी आपल्या एका आमदाराचा काँग्रेसने बळी दिला. नाही म्हणायला काँग्रेसच्या एका जुन्या मंत्र्याचा मुलगा बंडखोर म्हणून अपक्ष उभा होता. जिग्नेशची दलित मते खाण्यासाठी त्याला भाजपनेच करोडो रुपये देऊन उभे राहायला प्रवृत्त केले होते, असा तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप होता. अजूनही काहीजण उभे होते. ते सगळे जोरात आपटले. एकदा भाजप कार्यालयातील मंडळींशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्या दृष्टीनेही हा काँग्रेसचाच मतदारसंघ होता. परंतु, जिग्नेशचे या मतदारसंघाबाहेरचे असणे, पंजा निशाणी नसणे व स्थानिक दलित अपक्षांच्यातील मतविभागणी यांमुळे आम्ही विजयी होऊ असे त्यांचे मापन होते. तथापि, तसे झाले नाही. काँग्रेसने मनापासून जिग्नेशची साथ केली. त्याच्या शिलाई मशीनवर पंजाचे वर्चस्व न लादता ही साथ केली. त्याच्या स्वतंत्रपणाची बूज राखली.

गोध्राच्या पार्श्वभूमीवर झालेल्या २००२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही असेच काँग्रेसच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये गेलो होतो. अहमदाबादमधील मोदींच्या मणिनगर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करत होतो. त्यावेळी तिथे व अन्यत्रही प्रचारासाठी पैसे देऊन रोजाने माणसे आणली जात होती, असे चित्र होते. हे चित्र आपल्याकडेही आहे. ते तसे सार्वत्रिक आहे. जिग्नेशच्या मतदारसंघात असे अजिबात दिसले नाही. एकतर जिग्नेश फाटका माणूस. त्याच्याकडे द्यायला काही नाही. बाहेरून आलेले पुरोगामी मित्र आपापल्या खर्चाने आलेले. त्यांपैकी काहींनी मदत गोळा करुन दिली. पण ती लाक्षणिक होती. निवडणुका लढवण्याचा अनुभव असलेल्या वा त्या प्रक्रियेत जवळून सहभागी झालेल्यांना अशी निडवणूक लढवण्याचा किती खर्च येतो याची कल्पना असेल. हा प्रचंड खर्च उभा करणे हे जिग्नेशच्या व त्याच्या मित्रांच्या अर्थातच आवाक्यातले नव्हते. स्थानिक लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे जिग्नेशला मदत करत होते. कोणी गाडी दिली. कोणी अन्य स्वरुपात मदत केली. स्थानिक सभा तर तिथले लोकच लावत होते. खुद्द राहुल गांधी यांनी खास जिग्नेशसाठी त्याच्या मतदारसंघात सभा घेतली.

जिग्नेशच्या सभांना लोक उत्स्फूर्तपणे जमत. आरोळ्या, घोषणा, टाळ्यांनी सभा दणाणून टाकत. अनेक ठिकाणी जिग्नेशला खांद्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणुकीने सभास्थळी नेत. ज्याचा आधी काहीही परिचय नाही, ज्या माणसाने याआधी त्यांच्या मतदारसंघात काही काम केलेले नाही अशावर लोक एवढे फिदा का होतात, हे मला कळत नव्हते. अंदाज लावला तो एवढाच. एकतर हा काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ. बहुसंख्य काँग्रेसला मानणारे. शिवाय मुस्लिम जास्त. या मुस्लिमांमध्ये मोदींना तीव्र विरोध. भाजपला हरवणे ही त्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई मानली होती. शिवाय उमेदवार लाखात एक होता. एखाद्या यशस्वी आंतरजातीय लग्नात जसे ‘असा वर आपल्या जातीत शोधून सापडला नसता’ असे नवऱ्या मुलाचे कौतुक करतात, तसे काहीसे इथे होते. काँग्रेसने दिलेले उमेदवार या लोकांनी अनुभवले होते. त्यांच्या तुलनेत जिग्नेश हा शंभर नंबरी सरस होता. असा माणूस काँग्रेसने दिला यावर ते खूप खूष होते. जिग्नेशला सर्वार्थाने उचलून धरणाऱ्या गटाशी याबाबत एकदा बोलताना आम्ही विचारले, ‘असा उत्तम क्वालिटीचा जिग्नेश स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उभा राहिला असता व त्याला काँग्रेसने पाठिंबा नसता दिला तर..?’ त्यावर क्षणाचीही उसंत न घेता त्यांचे उत्तर होते- ‘जिग्नेशचे डिपॉझिट गेले असते.’

जिग्नेशचा विजय काँग्रेसच्या खांद्यावर झाला आहे. त्याच्या व्यक्तित्वाने या विजयाला शोभा आणली आहे. मात्र आपल्या आंबेडकरी, पुरोगामी, डाव्यांच्या ताकदीवर तो निवडून आलेला नाही. तेव्हा त्याचा विजय हा आपला विजय असे मानताना आपण डाव्या-पुरोगामी-आंबेडकरी मंडळींनी हे वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे. या वास्तवात न रुजणाऱ्या अजून काही बाबी आहेत. त्या तडजोडी आहेत. त्या मूलभूत नाहीत. पण त्या मर्यादा आहेत हेही ध्यानात घ्यायला हवे. ज्या उनामुळे जिग्नेश उदयाला आला त्या उनाचा तो आपल्या प्रचारात उल्लेख करत नव्हता. कारण सवर्ण समाजात अॅट्रॉसिटी अॅक्टची भीती. जशी आपल्याकडे आहे तशी. त्याचा दुरुपयोग होतो वगैरे. राजपूत वगैरे मंडळींशी बोलताना ती आम्हालाही जाणवली. त्यामुळे त्यांना आश्वस्त करण्यासाठी ‘मी भाजपच्या २२ वर्षांच्या गुजरातवरील अॅट्रॉसिटीच्या विरोधात लढायला आलो आहे’ असे जिग्नेश वारंवार भाषणातून बोलायचा. ‘जयभीम-लाल सलाम’ या त्याच्या आवडत्या व अभिमानाच्या अभिवादनाला तो इथे कटाक्षाने टाळायचा. दलित विभागांतील सभेत व राहुल गांधींच्या सभेतच त्याने जयभीम म्हटल्याचे मला आढळले. लाल सलाम तर अजिबातच नाही. जयभीम म्हटले की सवर्ण दुखावणार व लाल सलाम तर राष्ट्रदोहाच्या आरोपाला आमंत्रण ठरणार. त्यामुळे ही तडजोड त्याला करावी लागत होती. कन्हैयाला प्रचाराला येऊ नको हे सांगण्यामागेही ही भीती होती. कन्हैया तर राष्ट्रद्रोहाचा जिताजागता नमुना. भाजपच्या हातात कोलित नको, ही दक्षता त्यामागे होती.

पण अशा दक्षता, अशा तडजोडी आपल्याला कराव्या लागतात याचाच अर्थ ज्या विभागांनी आपल्याला निवडून द्यावे असे आपल्याला वाटते त्यांची तशी वैचारिक तयारी आपण केलेली नाही. ज्या विभागाची ती आहे (समजा दलित विभाग..तेही मर्यादित अर्थाने. कारण त्यांतही भाजपला मोठा आधार आहे.) त्याच्या ताकदीवर फक्त आपण निवडून येणार नाही. शेतमजूर, अंगणवाडी सेविका वा अन्य असंघटित कामगार यांच्या युनियन्स केल्याने समजा त्यांनी मिठाला जागून आपली सर्वच्या सर्व मते (वास्तवात त्यातही मोठी मतविभागणी होते. पण समजा..) आपल्या नेत्याला द्यायची ठरवले तरी अन्य विभागांची साथ मिळाल्याशिवाय निवडून येणे कठीण असते. त्यासाठी मतदारसंघातील विविध समाजविभागांच्या भावनिक तसेच अन्य हितसंबंधांचा मेळ घालावा लागतो. काँग्रेसची मंडळी तत्त्वाचा पीळ दाखवत नाहीत. त्यांना ती अडचण नाही. पण ज्या पुरोगाम्यांना-आंबेडकरवाद्यांना तो पीळ आहे, तो तसाच ठेवून सर्व विभागांच्या हितसंबंधांचा मेळ घालता येणे शक्य नाही का? ते शक्य केल्याशिवाय संसदीय निवडणुकांत आपण तगू शकणार नाही. इतर वेळी ज्या दिमाखात जिग्नेश जयभीम-लाल सलाम म्हणतो तसे म्हणत आणि उनाच्या दलितांचा आक्रोश संयतपणे मांडत, आपली संघटनात्मक ताकद विविध समाजविभागांत तयार करत हा तसेच अन्य जिग्नेश पुढची निवडणूक मोकळेपणाने व स्वबळावर लढतील यासाठी आपण काय करु शकतो?

जिग्नेशचे दिल खोलकर अभिनंदन करत असताना हा प्रश्न विसरु नको हा बोध जिग्नेशच्या विजयानेच मला दिला आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

__________________________________

आंदोलन, जानेवारी २०१८

No comments: