Saturday, May 16, 2015

'गांधी मला भेटला' च्या वादात भूमिका काय घ्यायची?

गुर्जरांचे मित्र त्यांच्या कवितांविषयी:
त्यांची सर्वांत गाजलेली सर्वश्रेष्ठ कविता म्हणजे अशोक शहाणे यांनी छापलेली, आणि तिच्यावर झालेल्या खटल्यामुळे प्रसिद्धी पावलेली ‘गांधी मला भेटला’. - राजा ढाले (खेळ, 2011)
समकालीन मराठी कवितेत वसंतचं वैशिष्ट्य त्याची भाषा आहे. ती सांकेतिक, रूढ भाषेविरुद्ध जाऊन सभोवारची सर्वसामान्यांची, वरवर सपाट वाटणारी पण खोलवर दडलेल्या दुःखांकडे घेऊन जाण्याचा निर्देश करणारी आहे. ती जेव्हा सामाजिक-राजकीय विसंगतीकडे बोट दाखवते तेव्हाही विद्रोहाची आक्रमकता दूर ठेवून सर्वसामान्यांच्या कवेत असलेला उपहास वापरते. आणि या उपहासाला फक्त स्वगताचंच, स्वतःशी संवाद करण्याचंच रूप असतं. यामुळे ती नारेबाजी- शेरेबाजीतून स्वतःला वाचवते. वसंतची कविता भारतीय लोकशाहीचा गाभा असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेचाच सर्जनशील वापर करते. -चंद्रकांत पाटील (‘पाटीवरच्या टीपा’, साकेत प्रकाशन)
मी:
ढाले-ढसाळ-गुर्जर या वातावरणातच आम्ही घडलो. हे little magazine वाले आमचे त्या काळी हिरो होते. पुढे त्यांची घसरण सुरु झाली. त्याच्याशी मी सहमत नसलो तरी साचलेल्या-सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारलेल्या या मंडळींनी आम्हाला विलक्षण ताकद दिली, हे त्यांचे आमच्या पिढीवरील ऋण मोठे आहे.
मग मी काय भूमिका घ्यायची?
माझी 'बाजू' गुर्जरांची आहे. या कवितेने गांधीजींचा अवमान होतो म्हणून कोर्टात गेलेल्या पतितपावन संघटनेचे गांधीजींविषयीचे प्रेम हे पुतनामाशीचे प्रेम आहे, हेही मला ठाऊक आहे. पण तरीही मला सुस्पष्ट भूमिका घेता येत नाही. यात अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. त्यातील काही असे:
विचार स्वातंत्र्य व कलात्मक स्वातंत्र्य एकच समजायचे का? समाज संकेत व समाजाच्या प्रगल्भतेची अवस्था कलावंताने लक्षात घ्यायची की नाही? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी आज ढोंगबाजी चालू आहे, त्याबद्दल 'आंबेडकर मला भेटला' अशी कविता कोणी लिहिली तर काय होईल? गांधीजींबद्दल हे चालू शकते. कारण त्यांच्या मागे फक्त सरकारी भिंत आहे. खुद्द राजा ढालेंची प्रतिक्रिया काय राहील? नामदेव ढसाळांनी एका कवितेत बाबासाहेबांविषयी गुर्जरांच्या तुलनेत अत्यंत मामुली उल्लेख केले होते. त्यावरुनही गदारोळ झाला होता. कलात्मकता समजण्यासाठीची प्रगल्भता समाजात यावी यासाठी साहित्यिक-कलावंतांचे कला प्रसवण्याव्यतिरिक्त काही प्रयत्न-कार्यक्रम राहणार आहेत का?
...I'm confused.मला भूमिका ठरवायला मदत हवी आहे.
- सुरेश सावंत

No comments: