Wednesday, June 28, 2017

'माझ्या देशात' किती सुरक्षित आहे मी!

अखलाक, जाहीद, पेहलू खान...असे बरेच आणि आताचा कोवळा जुनैद यांची गत पाहता मी मुसलमान नाही ही किती भाग्याची गोष्ट आहे असे वाटते. मला घर भाड्याने किंवा विकत घेताना, देताना काहीही त्रास होत नाही. माझे आईवडील पुरोगामी नसल्याने (ते निरक्षर असल्याने त्यांना पुरोगामी म्हणजे काय हेही ठाऊक नव्हते) त्यांनी धर्म आणि नावाचा संबंध असता नये या उदात्त हेतूने किंवा मुस्लिम सुधारकांचे स्मरण म्हणून माझे नाव 'हमीद' वगैरे ठेवले नाही, हेही किती बरे झाले.

माझ्या आडनावावरुन मी बौद्ध (पूर्वाश्रमीच्या महारांतून बौद्ध झालेल्यांच्या पोटचा म्हणजे दलित) आहे हे कळत नाही, त्यामुळे माझ्याकडे बघणाऱ्या सवर्णांच्या नजरेत मला अजिबात काही 'वेगळेपणा' जाणवत नाही. किती हायसं वाटतं याने!

मुख्य म्हणजे मी कुठेही खेड्यातल्या अल्पसंख्य दलित वस्तीत राहत नाही. त्यामुळे मानहानी, असुरक्षितता मला कधी जाणवलीच नाही. मी इथे शहरात जिथे आमचा समाज लक्षणीय संख्येने राहतो अशा सुरक्षित ठिकाणी जन्मलो, वाढलो. आता वस्तीत राहत नाही. आमची चळवळही मजबूत नाही. पण तरीही गरज पडली की समाज धावत येतो याचा अनुभव आहे व पुढेही येईल याची खात्री आहे.

पुन्हा मी मराठी. म्हणजे परप्रांतीय नाही. त्यातही कोकणी. (मुंबई हा कोकणाचाच भाग असल्याने) मुंबई माझी हक्काची. त्यामुळे 'खळ्ळ खट्याक'ची भीती स्वप्नातही अनुभवता येत नाही.

शिवाय मी 'पुरुष' असल्याने 'बाई'पणाचे भोग माझ्या वाट्याला येणेच अशक्य!

मी फॅसिझमविरोधात बोलतो, लिहितो, चळवळीत सहभागीही होतो. पण मी इतका दखलपात्र वा प्रसिद्धही नाही की माझा खून होईल.

...खरंच 'माझ्या देशात' किती सुरक्षित आहे मी!

- सुरेश सावंत


______________________________________

कालच्या indian express मध्ये जुनेदच्या गावातील भयभीत लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर मला हे तीव्रतेने जाणवले. माझ्याच देशात माझे देशबांधव मला शत्रू समजतात ही त्यांची भावना, युध्द वा दंगलकाळात मुलाबाळांना सावधगिरीच्या ज्या सूचना द्याव्या लागतात, ती बाहेरून येइपर्यंत जी हुरहूर लागते ते वातावरण आज दैनंदिन आहे.

'भारत खरेच माझा देश आहे का?' हा प्रश्न या मुस्लिम मुलांच्या मनात तयार झाला व त्याला अतिरेकी प्रवृत्तींनी हवा दिली तर नवे अतिरेकी यातूनच तयार होणार आहेत. म्हणजे त्यांना आपण जन्म देणार आहोत. पर्यायाने आपणही असुरक्षित होणार आहोत.
 
९२- ९३ च्या दंगलीत धारावी व शिवाजी नगरमध्ये ही भावना मूळ धरताना आम्ही अनुभवली व त्याच वर्षीच्या १२ मार्चला झालेल्या बॉम्बस्फोटांनी त्याचे प्रत्यंतरही दिले. आज जे दोषी म्हणून सिद्ध झाले आहेत, ते कायद्याने योग्यच आहे. पण ज्यांनी 'मंदिर वही बनायेंगे' च्या रणभेरी फुंकत काढलेल्या रथयात्रेने देशभर उन्माद तयार केला, ज्यांनी 'एक धक्का और दो' चा आदेश देऊन मशीद पाडली, ज्यांनी सामना आणि नवाकाळमधून रोज गरळ ओकली ते या अतिरेक्यांचे खरे जन्मदाते आज मोकळे व प्रतिष्ठित आहेत. एव्हढेच नव्हे तर राज्य व देशाचे सत्ताधारी आहेत.

No comments: