Tuesday, April 2, 2024

मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट

मानवाच्या पुढील प्रगतीत विज्ञान वा निरीश्वरवादाचं स्थान काय असेल, याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'प्रेरक ललकारी' च्या मार्च-एप्रिल २०२४ च्या विशेषांकात करण्यात आला आहे. या चर्चेत ‘बुद्ध, निरीश्वरवाद, आजचे बौद्ध व मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट’ या मुद्द्यांच्या अनुषंगाने भाग घेणारा हा एक लेख.
ईश्वर आहे की नाही, याचे हो किंवा नाही असे थेट उत्तर बुद्धाने दिलेले नाही. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील मानवी जीवन सुखी कसे करायचे, यावरच त्याने आपले लक्ष केंद्रित केले आहे. या अर्थाने बुद्ध अज्ञेयवादी ठरु शकतो. ईश्वर आहे किंवा नाही याचा काहीच पुरावा नसताना, तो संदर्भ ठेवून काही करु नये, म्हणजे अज्ञेयवाद. ईश्वर, आत्मा, ब्रम्ह या संकल्पनांच्या अस्तित्वाचा काहीच पुरावा नाही. म्हणून ज्याचे प्रमाण आहे, त्या मनुष्य जीवनाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करणे, हे बुद्धाचे जीवितकार्य होते.
यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाकडे आकर्षित झाले. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार नागपूरच्या दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केला आणि भारतातून जवळपास परागंदा झालेल्या बौद्ध धर्माचे जोरदार पुनरागमन झाले. बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ लिहून आपल्या नवदीक्षित बौद्ध अनुयायांना आणि जगालाही बुद्धाच्या विचारांचे नवे निरुपण दिले. तोच बुद्धाचा मूळ विचार आहे, असे बाबासाहेबांचे प्रतिपादन आहे. त्यांच्या काळात बुद्ध धम्माच्या ज्या आवृत्त्या जगभर प्रचलित होत्या, त्यावर अलौकिक शक्तीवरच्या तर्कहिन विश्वासाची आवरणे होती. महायान, हिनयान, वज्रयान असे पंथही होते. या सगळ्यास बाजूला सारुन बुद्धाचा मूळ विचार उजागर करणारे आमचे हे ‘नवयान’ आहे, असे बाबासाहेब म्हणत.
‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात बुद्धाचे उपदेश, प्रवचने, संवाद देताना त्यांनी जी चर्चा केली आहे, त्यात ईश्वर, ब्रम्हादी कल्पनांचीही चर्चा आहे. एरवी ईश्वर आहे की नाही या चर्चेत न पडणारे, मौन बाळगणारे तथागत बुद्ध काही चिकाटीच्या प्रश्नकर्त्यांना प्रतिप्रश्न करुन आपले मत थेट उत्तर न देताही स्पष्ट करतात. याचे अनेक दाखले बाबासाहेब या ग्रंथात देतात. उदाहरणादाखल वासेट्ठ आणि भारद्वाज यांनी बुद्धाला विचारलेल्या प्रश्नांवर ते काय म्हणतात, ते पाहू.
“पण वासेट्ठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांपैकी एकाने ब्रम्ह्याचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय?"
"नाही, गौतमा नाही."
"ह्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांच्या गुरुने तरी ब्रम्ह्याला समोरासमोर पाहिले आहे काय?"
"नाही, गौतमा नाही."
"कोणीही ब्रम्ह पाहिलेले नाही, कोणालाही ब्रम्हसाक्षात्कार झाला नाही." वासेट्ठ बोलला, "होय, असे आहे."
"तर मग तू असे कसे मानतोस की, हे जग ब्राम्हण सांगतात त्या सत्यावर आधारलेले आहे?"
...पुढे तथागत विचारतात, "ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय?"
सृष्टी कशी निर्माण झाली, या प्रश्नाच्या चर्चेत तथागतांची भूमिका काय होती हे सांगताना बाबासाहेब म्हणतात- 'महत्वाचा प्रश्न हा आहे की, ईश्वराने सृष्टी भाव (काही पदार्थ) यातून उत्पन्न केली की अभाव (शून्य) यातून निर्माण केली? 'काही तरी' हे 'काहीच नाही'मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने 'काही तरी' हे 'काही तरी' मधून निर्मिले असे म्हटले तर, ज्या 'काही तरी' तून जे नवे 'काही तरी' निर्मिले ते निर्मितीपूर्वीच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या 'काही तरी' चा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी 'कोणी तरी' 'काही तरी' निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येत नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा शेवटचा असा हा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो.'
हे विवेचन पाहता बुद्ध अज्ञेयवादापुरता सीमित करता येत नाही. ईश्वराच्या अस्तित्वाला जवळ जवळ स्पष्ट नकारच त्याने दिलेला आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचे तो कारण नाही, हेही तथागतांनी इथे ठळक केलेले आहे.
तथागत स्वतः ज्या धम्माचे संस्थापक आहेत, त्यातही स्वतःला मध्यवर्ती स्थान देत नाहीत. आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी तथागत त्यांचा जवळचा शिष्य आनंद याला म्हणाले होते - "हे आनंद! तुमच्यापैकी काहींच्या मनात असा विचार आला असेल की शास्त्याचे प्रवचन भूतकाळ आहे, आता आमच्याकडे शास्ता नाही. पण, असा विचार करणे योग्य नाही. हे आनंद! तुम्ही स्वतःसाठी दिवा व्हा, धम्माचा आश्रय घ्या, इतर कोणाचाही आश्रय घेऊ नका.”
व्यक्तीऐवजी धम्म म्हणजेच विचार हा मध्यवर्ती आहे हे ते सांगतात. विभूतिपूजेला नकार देऊन केवळ विचारांवर विसंबण्याचे, आपल्या अनुयायांना स्वावलंबी बनवणारे तत्त्वज्ञान तथागतांचे आहे.
आजच्या विज्ञान आणि लोकशाही शासनप्रणालीशी सुसंगत आणि त्यांस बळकट करणारा बुद्धाचा धम्मविचार आहे.
प्रत्यक्षात बाबासाहेबांनी घासून पासून त्याच्यावरील पारंपरिक वारुळे दूर करुन दिलेला लखलखीत बुद्धविचार आजच्या नवदीक्षित बौद्धांत रुजला आहे काय?
याचे उत्तर ‘नगण्य’ किंवा ‘अगदी अत्यल्प’ असेच द्यावे लागेल.
विषमतावादी व्यवस्थेला नकार देऊन तिच्याविरोधात उभ्या ठाकलेल्या जाणत्या आंबेडकरी अनुयायांनी हा विचार जरुर स्वीकारला. किंबहुना ती त्यांच्या लढ्याची ऊर्जा आणि सुकाणू बनली. मात्र सर्वसामान्य बौद्धांमध्ये ईश्वरी शक्तीला नकार देण्याचे सामर्थ्य तयार झाले नाही. त्यातले काही बुद्धातच ईश्वरी अंश शोधू लागले. बुद्धाने धम्मामध्ये स्वतःला मध्यवर्ती स्थान दिले नाही. मात्र आज बुद्धविहारांत बुद्धमूर्ती मध्यवर्ती असते. तिला हात जोडणाऱ्या, विहारात वंदना करणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या मनात ईश्वराप्रमाणे बुद्धाची करुणा भाकणे हेच असते. बुद्धमूर्ती विहारात असणे ही बाबासाहेबांची तडजोड होती असे दिसते. शेंदूर फासलेल्या, फुले वाहिलेल्या प्रत्येक दगडाला हात जोडण्याच्या मानसिकतेचा समाज बाबासाहेबांच्या हाकेसरशी बौद्ध बनला म्हणून त्याच्या मनातले विश्वास थोडेच लगेच दूर होणार होते! ती यथावकाश संस्कारांनी, प्रबोधनाने येणारी अवस्था होती. ती अवस्था येईपर्यंतच्या संक्रमण काळात देवाऐवजी हात जोडायला मानव असलेल्या बुद्धाची मूर्ती गरजेची होती. अन्यथा तो समाज सैरभैर झाला असता. एक सोडायचे तर दुसरे त्या जागी काहीतरी हवेच होते. महायान पंथाने बुद्धमूर्ती असलेली विहारे आणि तिची पूजा आधी प्रचलित केली होतीच. त्यामुळे बाबासाहेबांनी विहार व मूर्ती स्वीकारणे हे खास वेगळे असे काही वाटण्याचा प्रश्न नव्हता. हिंदू देवतेला नवस करण्याऐवजी, तिच्याकडे सुखाची कामना करण्याऐवजी नवे बौद्ध बुद्धमूर्तीकडून तिच्या विचारांची प्रेरणा घेतील, बुद्धाच्या विचारांचे जागरण विहारात होईल, बुद्धविहार हे चळवळीला प्रेरणा देणारे सांस्कृतिक केंद्र होईल हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते.
दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब दीड-पावणेदोन महिन्यात गेले. साहजिकच बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध धम्म प्रचार-प्रसारणे व समाजाच्या मनात रुजवणे यासाठीचे नियोजन करणे हे त्यांच्या सहकाऱ्यांचे काम होते. ते तसे झाले नाही. पुढे त्यांच्यातच फूट पडत गेली. ज्या धार्मिक संघटना उभ्या राहिल्या, त्या बुद्ध धम्माचा बाबासाहेबांना अपेक्षित तत्त्वविचार पोहोचविण्यात कमी पडल्या. विधी-पठन यांवरच त्यांचा जोर राहिला. बुद्धाने संस्कृतला नकार देऊन आपला विचार लोकभाषेत-त्यावेळच्या पाली भाषेत प्रचारला. पाली महत्वाची आणि समृद्ध साहित्य असलेली भाषा असली तरी आज ती लोकभाषा नाही. पालीतली सूक्ते आजच्या लोकभाषेत, म्हणजे महाराष्ट्रात मराठीत आणायला हवीत. हवे तर दोन्ही भाषांत ठेवता येतील. पण केवळ पालीत म्हटली जाणारी ही सूक्ते मंत्रपठण केल्यासारखी लोकांना पवित्र वाटतात, पण अर्थ न कळता डोक्यावरुन जातात. न कळणारे मंत्र म्हणणाऱ्या पुरोहितांवर आमची टीका असते. त्याहून वेगळे बौद्ध विधी लावणारे काय करतात? हळू हळू मंगळसूत्रालाच नकार द्यायला हवा; त्याऐवजी पांढरी मंगळसूत्रे घालण्याचा प्रघात सुरु झाला आहे. हिंदू धर्माला नकार म्हणजे काळ्याऐवजी पांढरे असा समज व्हायला लागला तर बुद्ध धम्माचा आशयच धोक्यात येणार. दिशा तीच आहे. धम्म आणि धर्म हे दोन भाषांतले समानार्थी शब्द असले तरी आशयाच्या बाबतीत बाबासाहेब त्यांच्यात मूलभूत फरक करतात. आज तो फरकच धूसर होतो आहे. धम्माचा धर्म होतो आहे. याबद्दल आणखी सविस्तर लिहिता येईल. पण या लेखाचा मुख्य मुद्दा तो नव्हे.
हे सर्व असले तरी एकेकाळच्या बहिष्कृत समाजाला जुन्या जातीची ओळख संपून ‘बौद्ध’ हे नवे संबोधन मिळणे हे प्रचंड क्रांतिकारक परिवर्तन आहे. अन्य समाज त्याला काय समजतो हे अलाहिदा. स्वतःची ओळख स्वतःच्या नजरेत, स्वतःच्या मनात अभिमानाची होणे हे विलक्षण मानसिक शक्ती प्रदान करणारे आहे. बौद्ध ही नवी अस्मिता माणसाला अंतर्बाह्य बदलणारी आहे. हा समाज बुद्धाला ईश्वरस्थानी ठेवो वा पाली त्याला ना कळो, ही अस्मिता दुर्दम्य आहे. तिला अजिबात तडा गेलेला नाही.
माझ्या आईने बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून उच्चवर्णीय महिला नेसतात तसे पायाच्या घोट्यापर्यंत नऊवारी लुगडं नेसायला सुरुवात केली. आमच्याकडे गुडघ्यापर्यंतच लुगडं नेसायची प्रथा होती. हिंदू धर्माची चिन्हे त्यागायची म्हणून वाख्या वगैरे चांदीचे दागिने वापरणे बंद केले. मेलेली ढोरं ओढू नयेत सांगतानाच मृत मांस खाऊ नये असे बाबासाहेबांनी आवाहन केले होते. आमच्या घरातल्यांनी तर मोठ्याचे मांसच सोडले. सगळे जुने देव नदीत विसर्जित केले. आमच्या घरात केवळ बुद्ध आणि बाबासाहेब यांच्याच प्रतिमा मी लहानपणापासून पाहतो आहे. या प्रतिमांना आठवड्यातून एकदा हार, मात्र रोज अगरबत्ती-मेणबत्ती आणि त्रिसरण पंचशील भक्तिभावाने होई. हो भक्तिभावाने. आधीच्या देवांबद्दल असेल तसाच भक्तिभाव. पण नव्या अस्मितेचा. नव्या ओळखीचा. नवी ताकद देणारा. नवजीवन देणारा.
बुद्ध-बाबासाहेब माझ्या आईसाठी ईश्वर होते. मी आजारी पडलो तर बुद्ध-बाबासाहेबांच्या फोटोसमोरील अगरबत्तीचा अंगारा आई माझ्या कपाळावर लावी. एरवीही वंदना झाली की लावत असूच. आजारी पडल्यावर आवर्जून लावला जाई. मीही याच संस्कारात वाढलो. आई-वडील दोघेही निरक्षर. पण मी साक्षर झाल्याने पाचवी-सहावीलाच मला बाबासाहेब, बुद्ध यांचे साहित्य वाचता आले. त्यातून मला त्यांचे इहवादी असणे, ईश्वरादी बाबींना नकार या गोष्टी कळल्या. नव्या प्रगतीशील आंबेडकरी जाणिवा माझ्यात निर्माण झाल्या. त्यापोटी गावातले दगडाचे देव आपटणे, देवांना जाहीर शिव्या घालणे हे अतिविद्रोही प्रकार सुरु झाले. देवाला मानणे हेच प्रतिगामी. जे हे करतात त्यांना ठोकणे हेच समाजपरिवर्तन असा ग्रह माझा आणि माझ्या सोबत्यांचा झाला. मैत्री, करुणा वगैरे बुद्धाच्या उपदेशातील बाबींच्या कक्षेत देवावर विश्वास ठेवणारे लोक आम्ही वर्ज्य मानत असू. यातून खूप भांडणे होत. त्यातून आमचा हुरूप आणखी वाढे. व्यक्तीला पटून तिचे मनपरिवर्तन होणे हे आम्हाला अमान्य होते.
यातून यथावकाश मी बाहेर पडलो. कोकणात होळी हा मोठा सण. सगळा गाव तिथे एकत्र येई. प्रत्येक वाडीचा त्यात वाटा, मान असे. एकीकडे अस्पृश्यता पाळली जाई. पण त्याचवेळी होळीत महारांचा म्हणून एक मान असे. हिंदू धर्म सोडण्याच्या क्रमात तोही आम्ही सोडला. एकूण होळीत सहभागी होणे हाच आम्ही अधर्म मानला. आजही पालखी जुन्या नेमाप्रमाणे आमच्या घरासमोर थांबते. पण आम्ही तिला सामोरे जात नाही. जुने अस्पृश्यतेचे संदर्भ बदलले. गावातली तरुण मुले परस्परांकडे मोकळेपणी जाऊ लागली. जेवू-खाऊ लागली. पण आमची होळीत न जाण्याची भूमिका ठाम होती. हळू हळू मीच पुढाकार घेऊन आपण केलेल्या नियमाचा पुनर्विचार करावा, असे बोलू लागलो. ज्यामुळे प्रेम, सद्भाव, मैत्री वाढते अशा बाबींना आपण प्रतिसाद द्यायला हवा. लोकांनी गणपतीला प्रेमाने निमंत्रण दिले तर त्या बोलावणाऱ्याच्या भावना लक्षात घ्याव्या. गणपतीच्या मूर्तीला नव्हे, तर ती बसवणाऱ्याच्या आपल्याबद्दलच्या भावनांना मान द्यायला हवा. होळी गावाचा आनंदाचा सण. सगळे चाकरमानी, गावाकडचे त्यावेळी भेटतात. त्यात जाणे वावगे समजायचे कारण नाही. आपण गपपती बसवू नये किंवा होळी करु नये, पण जे करतात आणि आपल्याला प्रेमाने त्यासाठी निमंत्रित करतात, त्यावेळी जरुर जावे, असे मी आमच्या लोकांना समजावू लागलो. मीच एकदा होळी गाठून गावी गेलो. रात्रभर चालणाऱ्या त्या सोहळ्यात सहभागी झालो. खूप लोक भेटले. माझ्या वडिलांचे जुने सोबतीही त्यात होते. त्यांनी जुन्या आठवणी जागवून ममतेने आमची चौकशी केली.
बाबासाहेब आंबेडकर ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात ‘माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय’ असे म्हणतात. हे नाते जपणे, ते अधिक समृद्ध करणे हा धम्म समजायचा की देवाच्या अस्तित्वाला संपूर्ण नकार देताना त्यावर विश्वास असणाऱ्यांनाही निषिद्ध मानायचे? ...ही गफलत मला कळली आणि माझा व्यवहार आणि भाषाही बदलू लागली.
बाबासाहेबांनी दिलेला इहवादी बुद्ध माझ्या आईने स्वीकारला नाही. तिला इहवाद कळलाच नाही. (कळला असता तरी पटण्याची शक्यता कमीच होती.) पण तिला नव्या जीवनाचा अर्थ उमगला. तिने तिचे व्यक्तित्व बदलले. आमचेही बदलवले. माझ्या इहवादाच्या समजुतीने मी माणसे तोडली. जे बुद्धाच्या मैत्री-करुणेत बसत नाही.
आता मला कळते त्याप्रमाणे निरीश्वरवादी असणे ही मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट अजिबात नाही. टक्क्यांच्या भाषेत १ टक्काही निरीश्वरवादी जगात नाहीत. आपल्या आसपास अगदी अपवादानेच ईश्वरावर विश्वास नसणारी व्यक्ती सापडते. निरीश्वरवादी अत्यंत नगण्य असतानाही मानवता पुढे गेलेली आहे. त्याचे कारण बुद्धासारख्या ईश्वराचा संदर्भ न मानणाऱ्या महामानवाने मैत्री, करुणा, वैराचा निरास वैराने न करण्याचा उपदेश आहे. ईश्वराचा पुत्र मानणाऱ्या येशूने स्वतःवर करतो त्याप्रमाणे शेजाऱ्यावर प्रेम करण्याची दिलेली शिकवण कारण आहे. पैगंबर तर ईश्वराचा प्रेषित. आपापल्या टोळीच्या गर्वापोटी परस्परांचा संहार करणाऱ्यांना एकत्र करुन शांततेने नांदण्याचा, गुलाम-मालक ईश्वराच्या दरबारी समान लेखण्याचा संस्कार पैगंबरांनी केल्याने अरबस्तानातली मानवता टिकली. भारतात मध्ययुगात झालेल्या संतांनी - मग ते भागवत असोत, महानुभाव असोत अथवा सुफी असोत – ईश्वर आणि भक्त यातील मध्यस्थ नाकारले. ईश्वर आणि त्याचा उपासक यांचे नाते वैयक्तिक मानले. ईश्वर आपल्या भक्ताचा सखा, प्रियतम किंवा माऊली असू शकतो. तो देवळात-मशिदीत असायचे कारण नाही. तो चराचरात असतो. ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो, पर प्यार भरा दिल ना तोडो’ म्हणणारा १७ व्या शतकातला बुल्लेशहा पंजाबातल्या हिंदू-मुसलमान कुटुंबांच्या अंतःकरणात आजही विराजमान आहे.
धर्माचा फुका अभिमान बाळगणारी आणि आपल्या स्वार्थासाठी भिन्न धर्मीयांना आपसात लढवणारी प्रवृत्ती जुनी आहे. बदललेल्या काळात हानिकारक ठरत असतानाही जुन्या तत्त्वाला शाश्वत धर्मतत्त्व मानणारा मूलतत्त्ववाद राजकारणासाठी साधन ठरतो तेव्हा तो भयानक बनतो. मतदानाने सरकार निवडण्याच्या आधुनिक काळात एकगठ्ठा मतांसाठी धार्मिक ध्रुवीकरण केले जाते तेव्हा त्याचा ईश्वरावर विश्वास ठेवण्या न ठेवण्याशी संबंध नसतो.
म्हणजेच निरीश्वरवादी मानवतेला पुढे नेतो आणि ईश्वरावर विश्वास असलेला मानवतेला मागे खेचतो असे दिसत नाही. या दोहोंत मानवतेबद्दल प्रेम, सद्भावना, परस्परांच्या आस्थांबद्दल आदर वा सहिष्णुता, वैविध्याला कवेत घेणारी सर्वसमावेशकता असली तरच मानवता टिकू शकते. पुढे जाऊ शकते. विश्वाचा सूत्रधार म्हणून ईश्वराला मानणारे ‘सर्वेपि सुखि न सन्तु..’ ची आराधना करतात आणि ईश्वराचा संदर्भच न घेणारा बुद्ध ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ असा घोष करतो. दोहोंत मानवाच्या निरामय सुखाची कामना आहे. ही कामनाच मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(प्रेरक ललकारी, मार्च-एप्रिल २०२४)

No comments: