Wednesday, September 23, 2009

आघाडीचे सूत्र


कम्‍युनिस्‍ट विचारप्रणाली व कम्‍युनिस्‍ट पक्ष संघटना ही समाजातील अन्‍य पुरोगामी विचारप्रणालींची व त्‍यावर आधारुन समाजकार्य करणा-या संघटनांची व व्‍यक्‍तींची स्‍पर्धक नाही. ती त्‍यांची मित्रशक्‍ती आहे. जेथे जेथे असे क्रम, मग ते समाज विभागाच्‍या रुपाने असो, संघटनेच्‍या वा संघटनेतील एखाद्या प्रवाहाच्‍या रुपाने असो, दृगोचर होऊ लागतात, तेथे तेथे ते हेरुन त्‍यांच्‍याशी त्‍यांच्‍याशी आपल्‍या स्‍वतःच्‍या विचारसरणीच्‍या, धोरणाच्‍या व वर्गनिष्‍ठेच्‍या आत्‍मविश्‍वासाने तसेच आपापल्‍या परिस्थितीत आपापल्‍या जाणीवेच्‍या पातळीप्रमाणे इतर जे पुरोगामी दिशेने धडपडत असतील त्‍यांच्‍या प्रयत्‍नांबद्दल आदरभाव बाळगून त्‍यांच्‍याशी क्रांतिकारक नम्रतेने संबंध जोडण्‍याचे आणि क्रांतिकारक शक्‍ती संघटितपणे उभ्‍या करण्‍याच्‍या महान कार्यात त्‍यांचे जे काही सहाय्य होऊ शकत असेल ते घेण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याची व त्‍याचवेळी त्‍यांच्‍या पाठीमागील समुदायांशी प्रत्‍यक्ष चळवळीचे तसेच वैचारिक संबंध बांधण्‍याचे बाबतीत कुठलाही संकोच न करण्‍याची अथवा बंधन न स्‍वीकारण्‍याची नवजीवन संघटनेची भूमिका राहिली आहे. या भूमिकेमुळेच निरनिराळ्या चळवळींतील अनेक कार्यकर्ते आज आपल्‍या पक्षात आहेत. अशा प्रकारच्‍या शक्‍तींशी मध्‍यमवर्गीय स्‍पर्धेच्‍या पद्धतीने वागण्‍याची, त्‍यांच्‍या उणिवांवर भर देऊन त्‍यांचा पाणउतारा करण्‍याची व त्‍यांचा वैचारिक संघटनात्‍मक मोड करुन अथवा आमिष देऊन त्‍यांना आपल्‍या वर्चस्‍वाखाली आणण्‍याची जी संयुक्‍त आघाडीच्‍या व्‍यवहाराला घातक ठरणारी रीत कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या पुढारी कार्यकर्त्‍यांनी रुढ केली होती, त्‍यापासून वेगळी, आंतरराष्‍ट्रीय कम्‍युनिस्‍ट चळवळीची खरीखुरी संयुक्‍त आघाडी बांधण्‍याची रीत ही कॉ. एस. कें. ची या भूमीतील कम्‍युनिस्‍ट चळवळीला खास वैयक्तिक देणगी आहे, असे म्‍हटले तर अति‍शयोक्‍ती होणार नाही. हिंदुस्‍तानसारख्‍या परतंत्र मागास देशात पुरोगामित्‍वाचा मक्‍ता फक्‍त कम्‍युनिस्‍टांकडे नाही. देशातील सर्व पुरोगामित्‍वाचे संकलन करण्‍याची जबाबदारी कम्‍युनिस्‍टांची आहे. कम्‍युनिस्‍ट विचारसरणीचे जे शास्‍त्रीयत्‍व व जी मौलिकता आहे, त्‍यामुळे सर्व पुरोगामित्‍वाचा पुढाकार कम्‍युनिस्‍ट आंदोलनाकडे येणे अपरिहार्य आहे. परं‍तु, तो त्‍यांनी आपल्‍या कार्याने व सर्वांच्‍या मान्‍यतेने मिळवला पाहिजे. संघटनात्‍मक अथवा अन्‍य क्‍लृप्‍त्‍या करुन बळकावता कामा नये. तसा तो कधीच बळकावता येत नाही. याबाबतीत घाई करुन चालत नाही. धिमेपणाने व्‍यवहार करावा लागतो, ही व्‍यावहारिक शिकवणसुद्धा व्‍यक्तिशः कॉ. एस. कें.चीच आहे. नवजीवन संघटनेच्‍या व नंतर लाल निशाण कार्यकर्त्‍यांच्‍या व्‍यवहारात इतर सर्वांच्‍या स्‍पर्धाशील व्‍यवहाराच्‍या पार्श्‍वभूमीवर उठावाने दिसणा-या पद्धती आजसुद्धा उपयुक्‍त आहेत आणि त्‍या काटेकोरपणे अवलंबल्‍या पाहिजेत. नवीन येणा-या कार्यकर्त्‍याला जुन्‍यांनी शिकविल्‍या पाहिजेत. म्‍हणून हा खास उल्‍लेख आहे.

(कॉ. यशवंत चव्‍हाण, पक्षांतर्गत विचारविनिमय, 1979, पान 69-70)

No comments: