Thursday, February 19, 2015

दाभोलकर-पानसरेंवरील हल्ल्यांचा बोधः ‘संघपरिवारा’विरोधात ‘संविधान परिवार’ उभारणे

कॉ. गोविंदराव पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोहोंच्यावरील हल्ल्यांत साम्य असल्याचे बोलले जात आहे. ते खरे आहे. सकाळी चालायला जाताना हल्ला होणे, हल्लेखोरांचे मोटारसायकलवरुन येऊन गोळ्या झाडणे हे साम्य आहेच. शिवाय दोघेही भारतीय संविधानातील लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद इ. मूल्ये जोपासण्याचे आयुष्यभराचे व्रत घेतलेले कार्यकर्ते होते. साहजिकच ज्यांना ही मूल्ये समाजात रुजणे मान्य नाही, अशा शक्तींनीच त्यांच्यावर हल्ला केला असणार अशी शक्यता वर्तवणे स्वाभाविक आहे. त्यांचे चारित्र्य पाहता वैयक्तिक हितसंबंध वा हेवेदाव्यांमुळे हे हल्ले झाले असणे अजिबात शक्य नाही.

दाभोलकरांचे खूनी १८ महिने झाले अजून सापडले नाहीत, तेवढ्यात कॉ. पानसरेंवर हा हल्ला झाला आहे. तीन दिवस झाले तरी अजून हल्लेखोर सापडलेले नाहीत. या हल्ल्यांनी व आरोपींना पकडण्यात येत असलेल्या उशीरामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व संताप आहे. जागोजागी त्यांची निदर्शनेही होत आहेत. या निदर्शनांत सध्या सत्तेत असलेल्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. आजचे केंद्रातले व राज्यातले सत्ताधारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला निष्ठा असणारे आहेत. रास्वसं आज जाहीरपणे काहीही बोलत असला तरी संविधानातील वर उल्लेख केलेल्या मूल्यांचा व दाभोलकर-पानसरेंच्या कार्याचा कायम विरोधक राहिला आहे. संघाची छत्रछाया असलेल्या विविध कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटना व त्यांचे नेते यांची अलिकडची वक्तव्ये व कारवाया यांना जोर आला आहे. वर आपलेच सरकार आहे, ही भावना त्यामागे आहे. त्यामुळे पुरोगामी कार्यकर्त्यांचे सरकार व संघपरिवार यांवरील टिकास्त्रही स्वाभाविक आहे.

तथापि, अशा टीकास्त्राचा नीटसा बोध न होणारे, मात्र अशा हल्ल्यांना मनापासून विरोध असलेले खूप लोक समाजात आज आहेत. निदर्शकांच्या घोषणा व भाषणे ऐकून त्यांना कळत नाही, अशा निदर्शनांत सहभागी व्हायचे की नाही. काहींना हिंदुत्ववादी मंडळींचे काही पटतही असते, मात्र त्यांचा हिंसकपणा मंजूर नसतो. तेही अशा निदर्शनांपासून दूर राहतात. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या जनसंघटनांतही असा नीटसा बोध न होणारे किंवा संघीय विचारांपैकी काही बाबी पटणारे लोक असतात. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या प्रभावामुळे तसेच मनापासून अशा निदर्शनांत ते सहभागी मात्र होत असतात.

दाभोलकर-पानसरेंवर हल्ला करणाऱ्या शक्तींची ताकद कमी करावयाची असेल तर नीटसा बोध न होणारे तसेच विरोधी शक्तींच्या काही बाबी पटणारे हे जे लोक आहेत, त्यांचे शिक्षण गरजेचे आहे. त्यांच्या समजुतींवर कठोर भाषेत हल्ला न करता सौहार्दाने त्यांच्याशी संवाद वाढविणे आवश्यक आहे.

बनचुक्यांवरचा हल्ला त्यामुळे सौम्य करायचा असे अजिबात नाही. मात्र या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालू ठेवणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार निदर्शनांचे दोन प्रकारही करता येऊ शकतात. एकात, हा पूर्ण हल्ला असू शकतो. त्याला आपल्याशी संपूर्ण सहमत असलेले, जाणते लोक बोलवायचे. दुसरा प्रकार हा समाजाच्या विवेकाला आवाहन करणारा व असे हल्ले मानवतेला लांच्छनास्पद आहेत, लोकशाहीला घातक आहेत या तऱ्हेची व्यापक परंतु मर्यादित मांडणी करणारा असावा.

अशारीतीच्या हल्ल्यांनंतर पुरोगाम्यांना व्यापक एकजुटीचे आवाहन केले जाते. त्याला प्रतिसादही मिळतो. मतभेद असलेले तथापि पुरोगामी छावणीतले हे लोक एकत्र निदर्शने करतात. पुढे हा निदर्शनांचा जोर ओसरतो व प्रत्येकजण आपापल्या तंबूत परत जातात. संघपरिवारातल्या संघटना-व्यक्ती ज्या रीतीने परस्परपूरक राहतात व वेळ आली की एकत्र होतात (उदा. मोदींना निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्या खूप आधी रामजन्मभूमी आंदोलन व दरम्यान बरेच काही). या परस्परपूरकतेत त्यांची ताकद आहे. तशी ताकद उभारण्यासाठी पुरोगामी मंडळींनी अशी परस्परपूरकता साधायला हवी. त्यासाठी स्वतःला लवचिक व समावेशक करायला हवे. मतभेद संवादी चर्चेत ठेवून आपल्यातले सामायिकत्व शोधले पाहिजे. या सामायिकातूनच एक सहमतीची भूमिका ठरविली पाहिजे व कार्यक्रम आखला पाहिजे. ही लांब पल्ल्याची मोहीम आहे. रास्वसंघाने त्यांची मोहीम १९२५ साली सुरू केली. त्याला अलिकडच्या काळात फळे येऊ लागली आहेत. पुरोगामी शक्तींना इतका नाही तरी दीर्घ काळ हा एकजुटीचा प्रयोग चालवावा लागेल. ‘संघपरिवारा’ला आव्हान देणारा सशक्त ‘संविधान परिवार’ उभारण्यात आता अधिक उशीर तसेच कसूर न करणे, हा दाभोलकर-पानसरेंवरील हल्ल्यांचा बोध आहे.

- सुरेश सावंत

No comments: