Tuesday, October 17, 2017

राम-कृष्ण गेले...भीम-बुद्ध आले


माझ्या जन्मापूर्वीची ही गोष्ट आहे. बाबासाहेबांनी मृत जनावरांचे मांस खाणे सोडायला सांगितले. मला आठवते त्याप्रमाणे आमच्या घरात मृत सोडाच मोठ्याचे मांसही खाल्ले जात नसे. फक्त कोंबड्या-बकऱ्याचेच मटण असे. आई त्याबाबत अधिक दक्ष असे. आमच्या नात्यातले, शेजारचे जे कोणी मोठ्याचे मांस खात त्यांना ती कमी प्रतीची माने. आपण बौद्ध म्हणजे काहीतरी उच्च आहोत. असे मोठ्याचे मटण खाण्याने आपण भ्रष्ट होतो, असा तिचा माझ्यावरील संस्कार आहे.

आमच्या घरी बुद्ध व बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणत्याही देवाचे फोटो मी पाहिले नाहीत. (हे आमचे वैशिष्ट्य. काही बौद्धांच्या घरांत ते आजही दिसतात.) ती या फोटोंना नित्यनेमाने हार घाली. त्यांच्यासमोर उदबत्ती-मेणबत्ती लावे. माझे वडिल वंदना घेत. आम्ही घरातले हात जोडून त्यात सामील होत असू. दुसऱ्या कोणत्याही देवाला न भजणाऱ्या माझ्या आईच्या अंगात सात आसरा (मोठ्या बाया असेही या देवींना म्हणतात) मात्र येत. तिच्या अंगात आले की लोक जमा होत व तिला आपल्या अडचणी सांगत, गाऱ्हाणे घालत. तिच्या अंगातली देवी त्यांना उत्तरे देई. मार्ग सांगे. या प्रकारात कुठेही कोणाकडून पैसे किंवा अन्य काही स्वीकारले जात नसे. परोपकाराचीच भावना असे. आम्ही मुलांनी थोडे कळू लागल्यावर गावी आमच्या बौद्धवाडीत ज्या कोणाच्या अंगात येईल त्याला दंड बसवला जाईल, असे विद्रोही फर्मान काढले. वाडीतल्या अनेक स्त्रियांप्रमाणे माझ्या आईच्या अंगात येणेही तेव्हापासून बंद झाले.

माझी आई माझ्या मित्रांशी अत्यंत आपुलकीने वागे. पण त्यांच्या जातींविषयी जागरुक असे. मांग ही जात आमच्या तुलनेत तथाकथित खालची. म्हणून मांगाच्या घरी जेवू नकोस, पाणी पिऊ नकोस अशी ती सांगे. फक्त सांगे. घरी आलेल्या मांग मित्राला तिने खाऊ-पिऊ घालण्यात काही कसर केल्याचे मला आठवत नाही.

आजच्या महाराष्ट्रातल्या बौद्धांचा, त्यातील महिलांचा विचार करताना बाबासाहेबांच्या ‘नवयानी’ बौद्ध धम्माचा संदर्भ घ्यावा लागेल. पारंपरिक बौद्ध धर्माशी इथल्या बौद्धांचा त्या अर्थाने संबंध नाही. म्हणूनच मग पारंपरिक बौद्ध धर्मात स्त्रीला दुय्यम लेखले गेल्याचा तत्त्व म्हणून अंगिकार करण्याची सूट बाबासाहेबांनी दीक्षा दिलेल्या बौद्धांना मिळत नाही. शिवाय बौद्ध धम्म स्वीकार हा बाबासाहेबांच्या वैचारिक विकासाचा शेवटचा टप्पा धरला तर बाबासाहेबांनी थेट १९२७ च्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून संविधानर्मिती प्रक्रिया व १९५१ च्या हिंदू कोड बिलापर्यंत तसेच या दरम्यानच्या अनेक भाषणांतून जी स्त्रीविषयक भूमिका मांडली ती चौकट स्वीकारावी लागते. ही चौकट आधुनिक स्त्रीवादाची आहे. स्त्री-पुरुषांचा दर्जा समान, पती-पत्नी मित्र, स्त्रीला पिता-पतीच्या संपत्तीत हक्क, घटस्फोटाचा अधिकार, द्विभार्या प्रतिबंधाद्वारे पतीच्या श्रेष्ठत्वाला लगाम, कामाच्या ठिकाणी बाळंतपणाच्या रजेचा अधिकार, आंतरजातीय लग्नाचा पुरस्कार आदि भूमिकांनी बाबासाहेबांनी या चौकटीचा आशय संपन्न केला आहे. महाराष्ट्रातल्या नवदीक्षित बौद्धांना आपल्या बौद्धत्वाची हीच चौकट स्वीकारावी लागते.

मानवी समाजाच्या विकासक्रमात धर्माच्या स्थानाची चिकित्सा करताना अभ्यासक जी सूत्रे मांडतात, त्यात पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे गौणत्व हा सामायिक भाग आहे. त्याच्या तीव्रतेत कमीअधिक फरक असला तरी स्त्रीला सगळ्याच धर्मांनी पुरुषापेक्षा दुय्यम मानलेले आढळते. स्त्रीला कमी लेखण्यात जैन वा बौद्ध हे प्रगतीशील धर्मही अपवाद नाहीत. ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या आपल्या पुस्तकाच्या अखेरच्या भागात विविध धर्मांतील स्त्रियांच्या स्थानाविषयी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विवेचन केले आहे. त्यात बौद्ध धर्माविषयी काही नोंदी ते करतात. आपले पालनपोषण केलेल्या सावत्र आईला ती स्त्री असल्याने भिक्षुसंघात प्रवेश देण्यास अनुत्सुक असलेले बुद्ध आपला शिष्य आनंद याच्या आग्रहाखातर काही अटींवर राजी होतात. मात्र त्याचवेळी स्त्रियांच्या भिक्षुसंघातील प्रवेशामुळे बौद्ध धम्म हजार वर्षांऐवजी पाचशे वर्षेच टिकेल असे उद्गार काढतात. नुकताच संघात प्रविष्ट झालेला तरुण भिक्षू समोर आल्यास शंभर वर्षे वयाच्या भिक्षुणीनेही उठून उभे राहायला हवे, ही भिक्षूसंघाची प्रथा होती. भार्येचे प्रकार सांगताना सातवा दासीभार्या हा सर्वोत्तम प्रकार असल्याचे बुद्ध सांगतात. बुद्धांचा याबाबतीतला दृष्टिकोण ‘परंपरागत’ होता, असे डॉ. साळुंखे म्हणतात, पण त्याचवेळी ‘..तरीही तत्कालीन समाजाचा विचार करता तुलनात्मक दृष्ट्या तो खूप उदार होता’ अशी प्रशंसाही करतात. त्यासाठी लिच्छवी सरदारांनी बुद्ध आपल्याकडेच यावेत यासाठी आटापिटा चालवला असतानाही ते आम्रपाली या गणिकेच्या निमंत्रणाचा स्वीकार करतात, या घटनेचे उदाहरण देतात. एकूण, ‘गौतम बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोण संमिश्र होता’ असा डॉ. साळुंखेंचा निर्वाळा आहे.

स्त्रीविषयक भूमिका ही अत्यंत महत्वाची असली तरी केवळ तिच्यावरुन एखाद्याचे संपूर्ण मापन करणे चुकीचे ठरेल, हे खरे. ऐतिहासिक क्रम लक्षात घेऊन गौतम बुद्धाच्या प्रगतिशील विचारांतली ती एक उणीव आहे, एवढी नोंद करुन आपण पुढे सरकायला हवे हेही बरोबर. पण त्याचे आज कोणत्याही प्रकारे समर्थन होता कामा नये, हेही तेवढेच खरे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला स्वीकारताना ही दक्षता घेतली आहे. अडीच हजार वर्षांनी बुद्धाचे नेमके काय स्वीकारायचे याचा निर्णय करताना मानवाच्या कल्याणाला ते उपयुक्त आहे का, अनुभवाच्या कसोटीला ते उतरते आहे का, हे बुद्धाने सांगितलेले निकषच ते वापरतात. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा त्यांचा ग्रंथ या कसोट्यांवरच सिद्ध झाला आहे. बौद्ध धर्मात हीनयान, महायान असे पंथ तयार झाले. ते नाकारुन आम्ही स्वीकारलेला बौद्ध धम्म हे ‘नवयान’ आहे, असे ते जाहीर करतात.

ही चौकट हा अर्थातच आदर्श आहे. प्रत्यक्षात काय झाले? काय आहे? ...डॉ. साळुंखेंचाच शब्द वापरायचा तर जे झाले व जे आहे त्याचे ‘संमिश्र’ असेच वर्णन करावे लागेल. महाडच्या परिषदेत व त्यानंतर अनेक ठिकाणी व खास करुन बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपली जातीची ओळख दर्शवणाऱ्या चिन्हांचा त्याग करायला बाबासाहेबांनी सांगितले. लुगडे नेसण्याची पद्धत बदलण्याचे त्यांचे आवाहन महार स्त्रियांनी लगोलग स्वीकारले. आमचे कुटुंब बौद्ध. म्हणजे पूर्वाश्रमीचे महार. माझ्या आईला मी कधीही ढोपरापर्यंतच्या लुगड्यात बघितले नाही. ती व्यवस्थित घोट्यापर्यंत नऊवारी लुगड्यात असायची. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिने वाख्या (कोपरापर्यंतचे चांदी किंवा कथिलाचे दागिने) वापरणे बंद केले. हे तिने सांगितले.

एकूण महार समाजात बौद्ध होण्याने एक निराळेच चैतन्य निर्माण झाले. हे चैतन्य, ही अस्मिता त्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात क्रांती घडवणारी ठरली. मुलांची शिक्षणे, सामाजिक चळवळी या सगळ्याला विलक्षण धार आली. संस्कारांच्या प्रभावी वाहक स्त्रिया असतात, असे बाबासाहेबांसकट अनेकांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे या अस्मितेच्या, आपल्या मुलाबाळांना शिकवले पाहिजे या प्रेरणेच्या त्या वाहक नक्की झाल्या. मात्र जुन्या ईश्वरी संकेतांतून बाहेर पडून बुद्धाच्या विवेकवादाला त्यांनी स्वीकारले किंवा समाजातील सर्वच विषमतेला त्यांनी नाकारले असे झाले नाही. बुद्धाला ईश्वरी शक्ती म्हणून भजणे हीच बव्हंशी तिची भावना असे. मुलाला पाळण्यात घालताना या बौद्ध बाया आता पाळणा गाताना कृष्ण-रामाच्या जागी ‘भिमाईच्या पोटी भीम जन्मला जो बाळा जो जो रे’ म्हणू लागल्या. त्यात सिद्धार्थाचे नाव गुंफू लागल्या. लग्नातल्या गाण्यांचेही तेच. हिंदू सांस्कृतिक चौकट बव्हंशी तीच. तिच्यातील नावे, प्रतिमा बदलल्या गेल्या. हल्ली हिंदूंच्या चारधामांप्रमाणे बौद्ध स्थळांचे दर्शन सुरु झाले आहे. ही तीर्थस्थळांची यात्राच असते. स्त्रियांचा त्यात अधिक भरणा असतो. मुलगा बाबासाहेब झाला पाहिजे, ही तिची (व बापाचीही) प्रेरणा मुलीबाबत मात्र तेवढ्याच तोलाची नसे. अजूनही नाही. दारु पिऊन आलेल्या नवऱ्याच्या ती लाथा खाईल. प्रसंगी त्यालाही बदडून काढेल. घराचा सगळा आर्थिक भार उचलेल. पण उतरंडीत पुरुषाला ती वरचाच मानेल. ‘नवऱ्याला मित्र माना’ हे १९२७ चे बाबासाहेबांचे विधान तिच्या मनात नीटसे रुजले असे दिसत नाही. एकूण व्यवस्थेचाच तो भाग आहे. बौद्ध म्हणून तिच्याकडून वेगळी अपेक्षा करणे हे कदाचित जादाचे होईल.

पॅंथरच्या काळात आणि त्यानंतरही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अगदी मध्यरात्रीही शिजवून जेवायला घालण्याचे काम या माऊलींनी केले आहे. आणि पुरुष कार्यकर्त्यांनी तिला गृहीत धरले आहे. आई म्हणून तिच्यावर त्यांनी कितीही भावपूर्ण कविता केल्या असतील. पण रात्री उशीरा येऊन आई किंवा बहिणीला उठवून जेवायला वाढायला लावणे, सकाळी उशीरा उठल्यावर आई-बहिणींनी आंघोळीचे पाणी काढणे, समोर चहा ठेवणे या सेवा घेताना तो पारंपरिक पुरुषच असतो. स्त्रीमुक्तीच्या वल्गना करणारे हे पुरुष बहिणीच्या सार्वजनिक वावराबाबत नैतिक रक्षकच असतात. आमचे मोर्चे, सभा, जयंत्या यांत स्त्रियांची संख्या मोठी. पण वक्त्यांत व निर्णयप्रक्रियेत नगण्य. आमच्या गावी कोकणात भावकीच्या किंवा गावच्या मंडळाच्या बैठका बसतात तेव्हा स्त्रियाही असतात. पण त्या खळ्याच्या (अंगणाच्या) एका कोपऱ्यात. मुख्य गोलात सगळे पुरुष. विषय सावित्रीबाईंच्या जयंतीचा असला तरी हीच स्थिती.

बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही वैचारिक, तत्त्वज्ञानात्मक होती. त्यातला विद्रोह, अस्मिता खूप खोलवर समाजात पोहोचली. त्याने त्यांच्या मानसिक-भावनिक प्रेरणांत आमूलाग्र म्हणावा इतका बदल झाला. पण विचारांचा भाग त्याप्रमाणात पोहोचला असे झाले नाही. बाबासाहेबांना ते मुख्यतः अपेक्षित होते. ते एके ठिकाणी म्हणतात- '..त्यांना (लोकांना) बौद्ध धर्माच्या वाङ्मयापेक्षा बौद्ध धर्मात पूजापाठ कशाप्रकारे होतो, हे जाणून घेण्याचे वेडच लागले आहे. आम्हाला  बौद्धधर्माचा पूजापाठ कसा असतो यासंबंधी काहीतरी वाङ्मय द्या, असा  सारखा तगादा लागून राहिला आहे. माझ्या शारीरिक अस्वस्थतेमुळे त्यांची जिज्ञासा पुरी करणे मला आतापर्यंत शक्य झाले नाही. तशात बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ याचा या देशात अगदीच लोप झाला आहे. त्या कारणांमुळे या प्रश्नासंबंधी बौद्ध धर्मातील पूजापद्धती व त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाही. त्या फक्त ज्या देशांमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे, तेथेच मिळू शकतात.'

बाबासाहेबांनी श्रीलंकेतून अशा गाथा मिळवल्या. त्या गुणतिलके नावाच्या आपल्या एका श्रीलंकन मित्राला गायला लावून त्याच्या रेकॉर्ड्स तयार केल्या. लग्नविधीबद्दल एका पत्रात ते म्हणतात, ‘बौद्ध विवाह विधी अगदी साधा आहे. त्यात होम किंवा सप्तपदी नाही. मातीचे एक कोरे भांडे मध्ये ठेवायचे. ते पाण्याने काठोकाठ भरायचे. त्याच्या एका बाजूला वधूने व दुसऱ्या बाजूला वराने उभे राहायचे. या भांड्यात कापसाचा धागा सोडायचा. या धाग्याची दोन टोके एक वधूच्या हातात व दुसरे वराच्या हातात धरायचे. कोणीतरी महामंगल सूत्त म्हणायचे. वधू-वरांनी पांढरे कपडे घालायचे असतात.’

गाथांच्या रेकॉर्ड्स बौद्ध धम्माच्या दीक्षेपूर्वीच १९५० साली बाबासाहेबांनी मिळवल्या होत्या. पण विधिसंबंधीचे त्यांचे पत्र ४ डिसेंबर १९५६ चे-म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी दोन दिवस आधीचे आहे. १४ ऑक्टोबरला त्यांनी दीक्षा घेतली व ६ डिसेंबरला ते गेले. जेमतेम दीड महिन्याचे हे अंतर आहे. त्यात त्यांचे आजारपण. अशा स्थितीत एका नव्या धर्माच्या (पारंपरिक बौद्ध धर्मातल्या कित्येक बाबी त्यांनी नाकारल्या होत्या) तत्त्वज्ञानाला ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाच्या रुपाने ते आकार देऊ शकले तरी विधींची रचना करायला त्यांना पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यांचे प्राधान्य तत्त्वज्ञान होते. ते त्यांनी पूर्ण केले.

हे तत्त्वज्ञान व त्यास अनुरुप विधींची रचना करुन ती लोकांपर्यंत नेण्याचे काम हे बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचे होते. पण ते तेवढ्या प्रभावी वा अपेक्षेप्रमाणे झाल्याचे दिसत नाही. भारतीय बौद्ध महासभा तयार झाली. पण अंतर्गत वादांनी तिला पोखरले. कोकणातील बौद्धजन पंचायत समितीने जातपंचायतीचेच मुख्यतः काम केले. पुढे या दोन संस्थांच्या कामांच्या सीमारेषा काय यावरुन वाद झाले. अनेक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने बौद्धजन पंचायत समितीचेच काम करायला सुरुवात केली. या काळात ज्यांनी विधीचे स्वरुप ठरवले, त्यातील गाथा रचल्या यात बाबासाहेबांच्या भूमिकेशी अनुरुपता ठेवल्याचे दिसत नाही. साधेपणाऐवजी ऐपतीप्रमाणे लग्ने होऊ लागली. विभूतिपूजेच्या विरोधात बाबासाहेब होते, पण त्यांच्यावरची ‘भीमस्तुती’ विधीचा अपरिहार्य भाग झाली. महामंगल सुत्ताऐवजी ‘जयमंगल अष्टगाथा’ (ज्यात जातक कथांतील चमत्कारांचे वर्णन आहे) मंगलाष्टकांना समांतर चालीवर म्हणणे सुरु झाले. वधू-वरांच्या ज्या शपथा आल्या, त्यात स्त्रीचे पारंपरिक स्थान सुरक्षित ठेवायचा प्रयत्न आहे. त्यात पतीने पत्नीला अलंकारादि बाबींनी संतुष्ट ठेवायचे असते व पत्नीने पतीने कमवून आणलेल्या संपत्तीचे रक्षण व घरच्यांचा मान राखायचा असतो. हल्ली दोघेही कमावत असताना हे वचन वस्तुस्थितीशी विसंगत नव्हे काय? आणि घरच्यांचा मान राखायची जबाबदारी ही फक्त पत्नीची कशी काय? पती-पत्नी हे मित्र असावेत असे बाबासाहेब म्हणतात, शिवाय घटनेत दर्जाची व संधीची समानता स्त्री-पुरुष दोहोंना दिलेली आहे. तरीही लग्नातली ही शपथ या मूल्यांशी सुसंगत नाही, हे लोकांना कळत नाही. त्यांना त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही. म्हणजेच त्याला कर्मकांडाचे स्वरुप आले आहे.

बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा घेताना ती चंद्रमणी या महास्थवीर भिख्खूंच्या हस्ते घेतली. प्राचीन बौद्ध परंपरेकडून एकप्रकारे त्यांनी वारसा घेतला. पण समोरच्या जनसमुदायाला त्यांनी स्वतः दिली. दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, कोणत्याही विधीसाठी भिख्खूची गरज नाही, हे त्यातून त्यांना दाखवायचे होते. भिख्खूच्या रुपाने एक नवा पुरोहित मला तयार करायचा नाही, ही त्यांची भूमिका होती. भिख्खूचे काम धम्म समजावून सांगण्याचे. त्याचा प्रसार करण्याचे. आज भिख्खूकरवी विधी लावणे प्रतिष्ठेचे समजले जाते. नामकरणापासून जलदानविधीपर्यंत भिख्खूंचा हस्तक्षेप सुरु आहे. त्यांच्या उत्पन्नाचेही (पुरोहिताप्रमाणे) ते साधन बनले आहे. या काषायवस्त्रधारी पुरोहिताच्या भजनी लागणाऱ्यांत स्त्रियांचा मोठा भरणा असतो. भिख्खूंच्या चरणी माथा टेकणे, त्यांचे आशीर्वाद घेणे, भक्तिभावाने त्यांची प्रवचने ऐकणे व त्यांना दान देणे यांत बौद्ध महिला आघाडीवर असतात. देवळातल्या महिला भजनी मंडळांच्या धर्तीवर बुद्धविहारात वंदना म्हणणे व ग्रंथपठन करणे या उपक्रमांत बौद्ध महिलांचा पुढाकार वाढतो आहे. ‘वर्षावासा’चे कार्यक्रम ‘चातुर्मासा’च्या भक्तिभावनेने केले जात आहेत.

बुद्धाने कार्यकारणभावाला महत्व दिले होते. बाबासाहेबांनी याच कार्यकारणभावाने धर्मग्रंथांची व बुद्धाचीही चिकित्सा केली. आज त्यांचे अनुयायी याला रजा देत आहेत. मंगळसूत्र वास्तविक पुरुषप्रधानतेचे प्रतीक. प्रारंभीच्या काळात त्याला नकार देण्याइतकी प्रगल्भता नसणे स्वाभाविक होते. पण हळूहळू त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या त्यागापर्यंत समाजाची मानसिकता तयार करणे गेल्या ६२ वर्षांत का शक्य झाले नाही? याचे कारण आहे कार्यकारणभावाला, तत्त्वज्ञानाला रजा देऊन विचारशून्य कर्मकांडी मनःस्थितीला शरण जाणे. महिला याच्या पहिल्या भक्ष्य आहेत. मंगळसूत्राचा त्याग राहिला बाजूला, आजही ते झोकात बौद्ध स्त्रियांच्या गळ्यात (ऐपतीप्रमाणे तोळ्यांत) डोलत असते. एक बदल होतो आहे. आता लक्षणीय संख्येने विशेषतः शहरातील बौद्ध महिला पांढरे मंगळसूत्र घालू लागल्या आहेत. पांढऱ्या साड्या नेसतात. म्हणून बहुधा पांढरे मणी. आपण हिंदू नाही, म्हणून हिंदूंसारखे काळे मणी नको. आपण बौद्ध आहोत. म्हणजे वेगळे आहोत. म्हणून  पांढरे मंगळसूत्र. यात काळ्याचे पांढरे झाल्याने मूळ ‘पुरुषप्रधानतेच्या मालकी’चे तत्त्व कुठे बदलते? ते तसेच राहते.

जातिव्यवस्थेचा मध्यवर्ती बिंदू (चालक नव्हे) स्त्री असते. तिचे तथाकथित पावित्र्य जातीची प्रतिष्ठा टिकवते. या स्त्रीने परजातीतील पुरुषाला वरु नये, ही दक्षता जातव्यवस्थेत घेतली जाते. बाबासाहेबांनी जातिनिर्मूलनाचा एक प्रभावी उपाय आंतरजातीय लग्न हा सांगितला आहे. बौद्धांनी आपल्या उद्धारकर्त्याचा हा उपदेश शिरोधार्य मानायला हवा. पण तसे होत नाही. एकतर जातीतच लग्नाची खटपट असते. झालेच आंतरजातीय तर तथाकथित वरच्या जातीची मुलगी आपल्याकडे आलेली चालते. पण आपली मुलगी तथाकथित उतरंडीत आपल्या खालच्या स्तरावरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली बौद्धांना चालत नाही. एकूण मुलीने दुसऱ्या जातीत जाणेच फारसे रुचत नाही. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न एका संख्येने मागे पडते, ही समजूत हेही त्यामागे एक कारण असते. दुसऱ्या जातीची मुलगी आली तर हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एका संख्येने पुढे तरी सरकता येते. भारत बौद्धमय करण्याच्या वैचारिक क्रांतीला माणसांवर बौद्धपणाचे ठप्पे लावण्याची ही प्रतिक्रांती गिळू पाहते आहे.

खुद्द बुद्धाने त्याचा धम्म विचारांनी पटला तर स्वीकारण्याचे आवाहन केले होते. आज बौद्धांच्यात कागदोपत्री, विधीद्वारे परधर्मीय मुलगी तांत्रिकदृष्ट्या बौद्ध होणे पुरेसे असते. तिने आमच्या मुलाशी लग्न केले, म्हणजे ती आपोआपच बौद्ध झाली. बाबासाहेबांनी संविधानात विचार, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य व्यक्तीला दिले आहे. या परधर्मीय मुलीच्या व्यक्ती म्हणून असलेल्या या अधिकाराचा गळा त्यांचेच अनुयायी घोटतात या आरोपाला बौद्धांचे उत्तर काय?

बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने जी आत्मिक ताकद वाढली, जी मिळकत झाली ती गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चालले आहे ते घसरणीच्या दिशेने आहे, असेच म्हणायला लागेल. पण हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. आणि ते खोटे आहे, असे कोणी म्हणणार नाही. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे. पुरोगामी चळवळीच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संवेदनशीलता त्याच दाखवत असतात. मी स्वतः ‘वर्षावासा’च्या तसेच बौद्धांच्या अनेक कार्यक्रमांत व्याख्यानांना जात असतो. त्यावेळी जी आत्मटीका करतो, त्याला महिलांमधून विशेष प्रतिसाद मिळतो. नंतर त्या भेटूनही बोलतात. त्यांना ते वेगळे व विचारार्ह वाटते. आत्मटीकेचा हा प्रवाह गतिमान झाला, तर हा प्रतिसादही वाढेल. पण आत्मटीकेचा प्रवाह गतिमान कधी होईल?...तूर्त ठाऊक नाही.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________

अक्षर, दिवाळी, २०१७

No comments: