Tuesday, January 14, 2025

कमला चौधरी


हिंदू कोड बिलाच्या कमला चौधरी कट्टर समर्थक होत्या. स्त्रियांच्या समस्यांवरचा आणि भारतीय समाजाच्या प्रगतीसाठीचा तो जालिम उपाय आहे, असे त्यांचे मत होते. बहुपत्नीत्वाच्या विरोधातल्या तरतुदीविषयी बोलताना त्या म्हणतात – “पहिली बायको असताना नवऱ्याला एक, दोन, तीन किंवा ४ लग्नांची परवानगी असणं हा त्या पहिल्या बायकोवर घोर अन्याय आहे. अनेक बायका करण्याची ही रुढी स्रियांना भयंकर वेदना देणारी आहे. आपल्याला सवत असणं यापेक्षा अधिक त्रासदायक बाब स्त्रियांच्या आयुष्यात दुसरी नाही.”
आपल्या सोबतच स्वतंत्र झालेल्या भारतीय उपखंडातल्या देशांची अवस्था पाहिली तर भारताच्या राजकीय स्थिरतेचं आश्चर्य वाटतं. भोवतालच्या छोट्या छोट्या देशांतही सलग लोकशाही राजवटी टिकू शकल्या नाहीत. मात्र भारतासारख्या धर्म, भाषा, प्रदेश यांची प्रचंड विविधता असलेल्या देशाची जनता स्वतंत्र झाल्यापासून लोकशाही निवडणूकांतूनच आपलं सरकार निवडते आहे. याचं रहस्य काय? ते आहे भारताची सर्वसमावेशक संस्कृती कवेत घेणारं आपलं संविधान. हे संविधान इतकं सामर्थ्यशाली कसं झालं? ते घडवतानाच्या संविधानसभेतल्या चर्चा पाहिल्या की त्याचं उत्तर कळतं. त्याचबरोबर या चर्चा करणाऱ्यांतले बहुसंख्य सदस्य काळाच्या किती पुढं होते याचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. संविधान लिहिलं जात असतानाचा काळ पाऊणशे वर्षं आधीचा. त्यावेळची सामाजिक बंधनं, विषमता ही आजच्यापेक्षा तीव्र असणं स्वाभाविक होतं. त्या विषमतांचे भोग भोगलेल्या महिला सदस्य संविधानसभेत किती मूलभूत प्रश्न आणि सूचना करतात, हे आपण पाहत आलो आहोत. आपण आतापर्यंत ज्यांचा परिचय करुन घेतला त्या सगळ्या महिला विलक्षण निर्भीड आणि बंडखोर आहेत. नवा समाज, नवं कुटुंब, त्यातले नातेसंबंध यांचा न्याय्य पाया काय असावा याबद्दलचे या सर्वांचे विचार क्रांतिकारक आहेत. आज ज्यांचा परिचय करुन घेणार आहोत, त्या कमला चौधरीही अशाच निर्भीड आणि बंडखोर आहेत. संविधान सभेतली, विशेषतः हंगामी संसदेत हिंदू कोड बिल मांडल्यावरची त्यांची भाषणं ही स्त्रीवादाची बाजू भक्कमपणे लावून धरणारी आहेत.

राजकारणी, कार्यकर्त्या आणि तेवढ्याच सशक्त आणि प्रतिभावान लेखिका असलेल्या कमला चौधरी यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९०८ रोजी लखनौ येथे एका संपन्न घरात झाला. त्यांचे वडील राय मनमोहन दयाल हे ब्रिटिश सरकारमध्ये उप जिल्हाधिकारी होते. वरच्या पदावरच्या सरकारी नोकरीमुळे कमलाच्या वडिलांच्या बदल्या होत असत. त्यामुळे वेगवेगळी ठिकाणं, तिथले रीतीरिवाज, तिथलं राजकीय आणि सांस्कृतिक जीवन यांचं वैविध्य कमलाला अनुभवता आलं. १९२३ मध्ये १५ वर्षं वय असताना कमलाचं मीरतच्या डॉ. जे. एम. चौधरी यांच्याशी लग्न झालं. भोवतालच्या राजकीय घडामोडींचा कमलावर परिणाम होत होता. ब्रिटिशविरोधी मतं तयार होत होती. वडील होते ब्रिटिश धार्जिणे. सरकारी अधिकारी म्हणून तसं असणं त्यांना भाग होतं. देशाच्या स्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहिल्यावर वडिलांशी, कुटुंबाशी कमलाला झगडा द्यावा लागला. मात्र नवऱ्याला त्यांनी आपल्या बाजूला वळवलं होतं. तो कमला चौधरींचा ठाम पाठिराखा बनला.

संपन्न कुटुंबातही त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन नव्हतं. अडचणीच असायच्या. त्यांच्याशी दोन हात करत कमला शिकत होत्या. त्याचवेळी भोवतालच्या वातावरणाबद्दल ललित लेखन करत होत्या. त्यानी हिंदी साहित्यात पंजाब विद्यापीठातून एम. ए. केलं. जातिभेद, धर्मनिरपेक्षता, वर्गभेद, प्रेम, नैतिकता, आचार-व्यवहार हे त्यांच्या कथांचे सर्वसाधारण विषय असत. महिलांविषयी त्यांचं लिखाण हे अधिक क्रांतिकारी असे. विधवांची स्थिती, लिंगभेद, महिलांचं मानसिक आरोग्य, त्यांचं शोषण यांचं भेदक चित्रण त्यांच्या साहित्यात आढळतं. उन्माद, पिकनिक, यात्रा, बेलपत्र, प्रसादी कमंडल या त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत. ‘बेलपत्र’ या त्यांच्या कथासंग्रहाचं पुनःप्रकाशन त्यांची कन्या इरा सक्सेना यांनी अलीकडे २०१६ साली केलं. त्यात १९३४ सालचं सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांचं कमला चौधरींच्या लेखनाची प्रशंसा करणारं पत्र समाविष्ट आहे. ज्या काळात मानसिक आरोग्य ही सार्वजनिक चर्चाविश्वात अगदी दुर्मीळ बाब होती, त्यास काळिमा मानलं जाई, त्यावेळी कमला चौधरींनी आपल्या साहित्यातून त्याला वाचा फोडली. ‘साधना का उन्माद’ या कथेत विवाहसंबंधात नाखुश असलेल्या एकाकी महिलेच्या खालावत जाणाऱ्या मानसिक आरोग्याचं चित्रण आहे. स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न इतरही अनेक कथांतून त्यांनी मांडला आहे.

१९३० साली वयाच्या २८ व्या वर्षी कमला चौधरी सक्रिय राजकारणात उतरल्या. महिला चरखा संघाच्या सचिव झाल्या. चरख्यावर सूत कातण्याचा गांधीवादी उपक्रम हा संघ चालवे. कमला चौधरी महात्मा गांधींच्या निष्ठावंत अनुयायी होत्या. आता त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला वाहून घेतलं. थोड्याच काळात जोर पकडलेल्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाशी त्या जोडल्या गेल्या. परिणामी अनेकदा त्यांना तुरुंगवास पत्करावा लागला. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत त्या एकेक पायरी चढत गेल्या. सुरुवातीला शहर काँग्रेस समितीवर निवडल्या गेल्या. नंतर जिल्हा समिती, त्यानंतर प्रांतिक समिती. १९४६ च्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या चोपन्नाव्या सत्राच्या त्या ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या.

संयुक्त प्रांत, म्हणजे आताचा उत्तर प्रदेश, येथून कमला चौधरींची १९४६ साली संविधानसभेवर निवड झाली. संविधान सभा संविधानाच्या मसुद्यावर एकीकडे चर्चा करत असताना ती कायदेमंडळ म्हणूनही काम करत होती. कारण भारत स्वतंत्र झाला तरी सार्वत्रिक निवडणूक होऊन लोकसभा अस्तित्वात यायला अजून अवकाश होता. तोवर संविधानसभाच हंगामी संसद होती. हिंदू कोड बिलाची चर्चा कायदेमंडळ म्हणून काम करणाऱ्या संविधानसभेत चालली. हिंदू कोड बिलाच्या कमला चौधरी कट्टर समर्थक होत्या. स्त्रियांच्या समस्यांवरचा आणि भारतीय समाजाच्या प्रगतीसाठीचा तो जालिम उपाय आहे, असे त्यांचे मत होते. बहुपत्नीत्वाच्या विरोधातल्या तरतुदीविषयी बोलताना त्या म्हणतात – “पहिली बायको असताना नवऱ्याला एक, दोन, तीन किंवा ४ लग्नांची परवानगी असणं हा त्या पहिल्या बायकोवर घोर अन्याय आहे. अनेक बायका करण्याची ही रुढी स्रियांना भयंकर वेदना देणारी आहे. आपल्याला सवत असणं यापेक्षा अधिक त्रासदायक बाब स्त्रियांच्या आयुष्यात दुसरी नाही.”

हिंदू कोड बिलातल्या घटस्फोटाच्या अधिकारावर संविधानसभेत अनेक सदस्य तुटून पडले. घटस्फोट ही पाश्चात्य रीत असून आपली कुटुंबव्यवस्था त्यामुळे मोडून पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कमला चौधरींच्या मते ही चिंता बिनबुडाची आहे. त्या म्हणतात – “घटस्फोट ही भारतात नवी गोष्ट नाही. आपल्या पवित्र ग्रंथांनी त्यास मान्यता दिली आहे. कोणत्या स्थितीत, काय प्रकारे विभक्त व्हावं हे आपल्या शास्त्रांत नोंदवलेलं आहे.” घटस्फोट ही बाब आपल्या धर्म आणि संस्कृतीला घातक असल्याचा प्रचार करणाऱ्यांना त्या असं न करण्याची विनंती करतात. त्यामुळे लोकांची मनं भडकतात, कलुषित होतात, हे सांगून अशा धर्मभावना भडकण्यातूनच आपल्या राष्ट्रपित्याचा - महात्मा गांधींचा खून झाला, हे वास्तव न विसरण्याचं आवाहन करतात. ‘परिस्थितीवश विभक्त होणं भागच पडलं तर त्याबाबतचा कायदेशीर अधिकार हा स्त्रियांकडेच हवा’ असंही त्या म्हणतात.

मुलीला मुलांच्या बरोबरीनं वारसा हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलातील तरतुदीलाही पाश्चात्य संस्कृती म्हणून हिणवलं गेलं. हे खरं नसल्याचं कमला म्हणतात. हा मुद्दा खोडून काढताना आपल्या वाङ्मयातले दाखले त्या देतात. खास करुन लोकगीतांतले, विशेषतः लग्नावेळच्या गाण्यांतले. ही गाणी आपल्या आज्या-पणज्यांच्या वेळेपासून आहेत. त्यांत पाश्चात्य संस्कृतीचा मागमूस असणं शक्यच नाही. कमला म्हणतात – “मुलींना बापाच्या संपत्तीत अधिकार नाकारणं हे अन्यायकारक आहे. पित्याच्या संपत्तीत मुलींना वारसा हक्क मिळणं हे कालसुसंगत असून आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी अनुरुपच आहे. आपण उदार अंतःकरणानं हे समजून घ्यायला हवं.” त्या पुढं म्हणतात – “निसर्गानं घडविलेली मुलगी आणि मुलगा आईवडिलांच्या नजरेतून सारखेच असतात. मग केवळ मुलाला पित्याच्या संपत्तीत हिस्सा मिळणार आणि मुलीला नाही हे कसं काय?”

कमलासारख्या इतरही अनेकांनी हिंदू कोड बिलाचं समर्थन केलं तरी सहमती होऊ शकली नाही. हे सभागृह काही जनतेनं निवडलेली लोकसभा नाही, तिला असा कायदा करण्याचा अधिकारच नाही, अशीही कारणं पुढं करुन हे बिल थोपवण्यात आलं. याच्या निषेधार्थ डॉ. आंबेडकरांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. पुढे १९५२ च्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदू कोड बिल हा नेहरुंनी प्रचाराचा मुद्दा केला. जनमताचा पाठिंबा घेतला. त्यांनी त्याचे विभाग केले आणि टप्प्याटप्यानं ते पहिल्या लोकसभेत मांडलं आणि मंजूर करुन घेतलं.

घटस्फोट, द्विभार्या प्रतिबंध आणि मुलाप्रमाणे मुलीला वारसा हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाला विरोध करताना मांडलेले मुद्दे आज तसेच कोणी मांडले तर आजच्या महिला खवळूनच उठतील. काळ बदलला हे खरं. पण काळ असा आपसूक बदलत नाही. डॉ. आंबेडकर, नेहरु, कमला चौधरी आणि बाकी संविधानसभेतल्या महिला सदस्य तसेच इतरही पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे काळ बदलला आहे. म्हणूनच आपण त्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञ राहायला हवं.

कमला चौधरी १९५२ पर्यंत हंगामी संसदेच्या सदस्य राहिल्या. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम केलं. १९६२ साली त्यांनी उत्तर प्रदेशातल्या हापूड़ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. मतांच्या मोठ्या फरकानं त्या ही निवडणूक जिंकल्या. मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात म्हणून शिक्षणाबरोबरच रोजगाराची काही कौशल्ये त्यांना मिळावीत यासाठी कमला प्रयत्नशील राहिल्या. उदा. शिवणकाम, विणकाम, मातीच्या वस्तू बनवणं वगैरे. अन्य ग्रामीण उद्योगांचंही प्रशिक्षण त्यांना मिळावं यासाठी त्यांनी खटपट केली.

उत्तम लेखिका, आधुनिक, प्रगत विचारांच्या पुरस्कर्त्या, संविधानसभेच्या सदस्य तसेच खासदारकीसारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या कमला चौधरींच्या जीवनकार्याविषयी खूप कमी तपशील उपलब्ध आहे. त्यांचं १९७० साली निधन झालं. त्यांच्या कन्या इरा यांनी आपल्या आईविषयी लिहिलं आहे. त्यात त्या म्हणतात – ‘माझ्या आईच्या आठवणीनं माझा ऊर भरुन येतो. ती स्वातंत्र्य सैनिक होती. कवयित्री होती. लेखिका होती. आधी संविधानसभेवर आणि नंतर लोकसभेवर निवडून आली होती. ...तिनं गांधीजींचे विचार अनुसरले. ती निष्ठावंत सत्याग्रही होती. फाळणीच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी तिनं प्रयत्न केले. तिनं लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या कथांमधून त्या प्रचंड उलथापालथीच्या काळाबद्दल जे कळलं त्यातून माझ्या मनात जिज्ञासा जागृत झाली. स्वातंत्र्यासाठीचा त्याग आणि निर्धार समजून घेता आला.’

भारतीय समाजाला एक नवी दिशा देण्यात कमला चौधरी यांचं महत्वाचं योगदान राहिलं आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या सतत प्रेरणा देत राहतील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

______________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा आठवा भाग १४ जानेवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

No comments: