लीला रॉय यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. महिलांच्या एका मेळाव्यात त्या त्यांचा सत्कार ठेवतात. तिथं जमलेल्या हजारो महिलांची संख्या पाहून टागोर म्हणतात – ‘आपल्या खंडात इतकं मोठं महिलांचं संमेलन मी पाहिलं नाही.’ लीला रॉय यांचं हे संघटन कौशल्य पाहून टागोर शांतिनिकेतनमधल्या महिला विभागाची जबाबदारी त्यांनी घ्यावी असा प्रस्ताव ठेवतात. तथापि, अत्यंत आदराचं स्थान असलेल्या टागोरांना त्या नम्रपणे नकार देतात. स्त्रियांचे अधिकार तसेच जनतेच्या उत्थापानाची व्यापक चळवळ हे जीवनध्येय मानलेल्या लीला रॉय यांना एका जागी सीमित राहायचं नव्हतं. टागोर त्यांच्या नकाराचा आदर करतात आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतात.
एकीकडे गांधीजींविषयी आदर आहे, त्यांच्याशी चळवळीतलं सख्यही आहे. तरीही वेगळं मत आहे. सार्वजनिक जीवनात महिलांसाठी ते मर्यादित भूमिका देत असल्याबद्दल लीला रॉय यांनी गांधीजींवर टीका केली. स्वातंत्र्य चळवळीतल्या महिलांची भूमिका फक्त दारूबंदीसाठी आंदोलन करणं आणि खादी विणणं यापलीकडे जायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. वास्तविक त्यांच्या या टीकेशी सहमत नसलेली मतंही प्रभावी आहेत. हेही खरं की महात्मा गांधीजींच्या प्रभावानं हजारो महिला घराबाहेर पडल्या. सार्वजनिक जीवनात आल्या. अनेक मोठ्या चळवळींत आणि उपक्रमांत त्यांचा पुढाकार राहिला. लीला रॉय मुख्यतः क्रांतिकारक बाण्याच्या होत्या. स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि अर्थोत्पादनासाठी विविध कौशल्यं देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच; पण तेवढंच न करता, मुख्य काम त्यांनी केलं ते या स्त्रियांना राजकीय शिक्षण देऊन क्रांतिकारी चळवळीत उतरायला सिद्ध करणं.
संविधानसभेतल्या महिलांचा आपण परिचय करुन घेत आहोत. आज लीला रॉय यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी, याआधीही आपण पाहिलं आहे, त्याची नोंद पुन्हा करु. ते म्हणजे अभिव्यक्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी अजिबात तडजोड न करण्याचं, त्यासाठी तथाकथित लाभ-प्रतिष्ठा त्यागण्याचं या महिलांचं वैशिष्ट्य. स्वयंतेजानं तळपणाऱ्या या तारका आजही सर्वांनाच, पण खास करुन मुलींना-महिलांना सांगतात- आपलं स्वत्व जपा. पुरुषप्रधान व्यवस्थेला शरण जाऊ नका. स्वतःचं आणि भोवतालच्या समाजाचं जीवन बदलण्यासाठी, उन्नत करण्यासाठी कटिबद्ध राहा. हे करण्यासाठी आपल्यातली मतभिन्नता आड येत नाही. उलट ते जिवंतपणाचं, स्वतंत्र विचारशक्तीचं लक्षण आहे. एकसाची नव्हे, तर विविधांगांनी परिस्थितीचं मापन करण्यातूनच नवं सर्जन होत असतं. तेच लोकशाहीचं मर्म आहे.
गांधीजींच्या जन्मदिनी, मात्र खूप नंतर आणि वेगळ्या साली लीला रॉय-आधीच्या लीला नाग जन्माला आल्या. तारीख २ ऑक्टोबर १९००. मूळ गाव ढाका. आताची बांगला देशची राजधानी. तेव्हाचा पूर्व बंगाल. मात्र जन्म झाला आसामात गोलपारा येथे. त्यांचे वडील गिरीश चंद्र नाग नोकरीनिमित्त त्यावेळी तिथं होते. ते ब्रिटिश सरकारमध्ये उपविभागीय अधिकारी होते. लीला रॉय यांच्या आईचं नाव होतं कुंजलता. कुंजलतांचे वडील म्हणजे लीलाचे आजोबाही सरकारी अधिकारी होते. ते आसामच्या सचिवालयातले पहिले भारतीय अधीक्षक. एकूण उच्चमध्यवर्गीय कुटुंबात लीलाची वाढ झाली. वडील गिरीश चंद्र सरकारी नोकरीत असतानाही बंगालच्या फाळणीविरोधातल्या चळवळीत उतरले. निवृत्त झाल्यावर आसाममधून केंद्रीय कायदेमंडळावर ते निवडून गेले. पुढे मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रह करताना त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला.
घरच्यांचा राजकारणातला हा सहभाग पाहत लीला मोठी होत होती. आधी कलकत्त्याच्या ब्राम्हो मुलींच्या शाळेत नंतर ढाक्याच्या इडन हायस्कूलमध्ये तिचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं. अभ्यासात खूप हुशार असलेल्या लीलानं शिष्यवृत्ती मिळवून कलकत्त्याच्या बेथ्यून महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदवी मिळवली. सर्वप्रथम आल्यामुळे तिला सुवर्णपदक आणि रोख रु. १०० देऊन गौरविण्यात आलं.
घरातलं चळवळीचं वातावरण आणि लीलाची अंतःप्रेरणा यातून चळवळ हेच तिचं पुढचं क्षेत्र नक्की झालं. सुरुवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं नेतृत्व करण्यापासून झाली. महाविद्यालयात आलेल्या व्हाईसरॉयच्या पत्नीपुढं गुडघे टेकून अभिवादन करण्याच्या विरोधात तिनं आवाज उठवला. लो. टिळकांच्या मृत्युनंतर दुखवटा पाळण्यासाठी महाविद्यालय बंद ठेवण्याची तिनं मागणी केली.
लीला १९२१ साली पदवीधर झाली, त्याचवेळी ढाक्यात विद्यापीठाची स्थापना झाली. तिनं तिथं प्रवेशासाठी खटपट केली. सगळे विद्यार्थी पुरुष असताना हिला प्रवेश कसा द्यायचा असा व्यवस्थापनाला प्रश्न पडला. लीला कुलगुरुंना भेटली आणि तिनं मुला-मुलींच्या एकत्रित सहशिक्षणाची मागणी केली. अखेर ती आणि आणखी दोन मुलींसाठी संध्याकाळचे वर्ग विद्यापीठानं सुरु केले. ढाका विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी मिळवणारी लीला पहिली विद्यार्थिनी ठरली. अनिल रॉय या विद्यापीठातच शिकत होता. इथंच लीला आणि अनिल यांची मैत्री झाली. चळवळीत दीर्घकाळ सहकारी राहिल्यावर त्यांनी विवाह केला.
विद्यापीठात असतानाच स्त्रियांच्या मताधिकाराच्या चळवळीत लीला उतरली होती. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांनी हा मुद्दा प्रांतिक विधिमंडळांच्या पातळीवर निर्णय घेण्यासाठी सोडला. बंगाल प्रांताच्या विधिमंडळात याबाबतचा कायदा व्हावा म्हणून विविध महिला संघटना एकवटल्या. अशाच एका ‘निखिल बंगा नारी वोटाधिकार समिती’ या संघटनेच्या सहसचिव म्हणून लीला रॉयना निवडण्यात आलं. सर्व प्रयत्न करुनही विधिमंडळात स्त्रियांच्या मताधिकाराच्या मुद्द्याच्या विरोधात ६० टक्के मतं पडली. तो नामंजूर झाला. तो मंजूर होण्यासाठी पुढे १९२५ सालपर्यंत वाट पाहावी लागली.
स्त्रियांच्या सर्वप्रकारच्या स्वावलंबनासाठी त्यांना प्रथम आर्थिक बाबतीत स्वावलंबी होणं गरजेचं आहे तसेच समाजपरिवर्तनाच्या लढ्यात महत्वाची जबाबदारी निभावण्यासाठी महिला राजकीयदृष्ट्या सजग असाव्या लागणार आहेत. ही दोन उद्दिष्टं नजरेसमोर ठेवून लीला आणि त्यांच्या १२ मैत्रिणींनी ‘दीपाली संघ’ ही संघटना १९२३ साली स्थापन केली. सबंध ढाका शहरात तिचा विस्तार झाला. गांधीजी, टागोरांसह अनेक नामवंतांनी या संघटनेला भेटी दिल्या.
दीपाली संघाच्या कामांना गती यायची तर साम्राज्यवाद्यांच्या जोखडातून देश मुक्त झाला पाहिजे, ही बाब लीला रॉयना तीव्रतेनं जाणवू लागली. लीला यांचे मित्र अनिल रॉय ‘श्री संघ’ या क्रांतिकारक संघटनेचे नेते होते. दीपाली संघाच्या कामानं प्रभावित होऊन अनिलनी लीला यांना श्री संघात यायचं निमंत्रण दिलं. एका बाजूला गांधीजींच्या प्रेरणेनं अहिंसक आंदोलनं करणारे लोक होते. तर दुसऱ्या बाजूला गांधीजींचा हा मार्ग अपुरा वाटणारे गट होते. त्यांच्यादृष्टीनं नाईलाज म्हणून हिंसेचा मार्ग अवलंबण्यात काही गैर नाही. श्री संघाची ही दुसरी भूमिका होती. आधी द्विधा अवस्थेत असलेल्या लीला रॉय यांनी अखेर श्री संघाच्या भूमिकेबरोबर जायचं ठरवलं. क्रांतिकारक पुरुषांनाही क्रांतिकारक स्त्री झेपत नाही. लीला रॉय यांच्या श्री संघातला प्रवेश त्यातल्या अनेक पुरुष कार्यकर्त्यांना रुचला नाही. तिच्या बाजूचे आणि विरोधाचे असे दोन गट झाले. खुद्द लीला यांचा भाऊ प्रभात वेगळा झाला. त्याने दुसऱ्या संघटनेत काम करायला सुरुवात केली.
याच म्हणजे १९३० च्या दरम्यान गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर बंगालात क्रांतिकारक उठावांना जोर आला होता. प्रसिद्ध चितगाव कट याचवेळी झाला. १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. शस्त्रास्त्रे ताब्यात घेतल्यानंतर क्रांतिकारकांनी लगेच टेलिफोन आणि टेलिग्राफ यांसारख्या संदेशवहनाच्या साधनांच्या तारा तोडून टाकल्या. यानंतर ब्रिटिश पोलीस क्रांतिकारक कामं करणाऱ्या सगळ्यांच्याच मागे हात धुवून लागले. अनिल रॉय यांना अटक झाली. अशावेळी श्री संघ आणि दीपाली संघ या दोन्ही संघटना चालवण्याची जाबाबदारी लीला रॉय यांच्यावर आली.
याच काळात लीला रॉय यांच्या संपादकत्वाखाली ‘जयश्री पत्रिका’ निघू लागली. जयश्री हे नाव टागोरांनी सुचवलं होतं. ब्रिटिशांनी क्रांतिकारकांना चिरडण्याच्या या काळात जागृतीचं मोठं काम या पत्रिकेनं केलं. दीपाली संघाशी संबंधित दोन किशोरवयीन मुलींनी ढाक्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा खून केला. त्यानंतर लीला रॉयना अटक झाली. दीपाली संघ आणि श्री संघ या संघटनांवर बंदी घातली गेली. लीला रॉय यांच्या सहकाऱ्यांनी जयश्री पत्रिका चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तीही पुढे बंद पडली. लीला तुंरुंगातून सुटल्यावर ती पुन्हा सुरु झाली. १९३१ ते १९३७ या काळात लीला रॉयना विविध तुरुंगांत ठेवण्यात आलं. त्या काळात कैद्यांच्या वाईट अवस्थेबद्दल त्यांनी आवाज उठवला.
१९३८ साली तुरुंगातून सुटका झाल्यावर अनिल आणि लीला रॉय यांनी काँग्रेसमधल्या सुभाष चंद्र बोस यांच्या समाजवादी प्रवाहाशी जोडून घेतलं. श्री संघ त्यांनी त्यात विसर्जित केला. काँग्रेसमधल्या वैचारिक मतभेदांपायी सुभाषबाबूंना काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं. त्यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा नवा पक्ष स्थापन केला. अनिल आणि लीला या पक्षाला जोडल्या गेल्या. याच दरम्यान १९३९ साली त्यांनी लग्न केलं. सुभाषबाबूंना १९४१ साली अटक झाली. ते तेथून सटकले आणि भूमिगत झाले. जवळचे सहकारी म्हणून अनिल आणि लीला रॉय यांच्यावर सुभाषबाबूंच्या इथल्या कामाची जबाबदारी पडली. १९४२ च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर या दोघांना पुन्हा अटक झाली. १९४५ साली सुभाषबाबूंचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला त्यावेळी लीला तुरुंगातच होत्या. पुढच्या वर्षी त्यांना सोडलं गेलं. सुभाषबाबूंच्या जाण्याचं त्यांना अतीव दुःख झालं. ते जिवंत असावेत असं मानणाऱ्यांत त्याही होत्या.
देश स्वतंत्र व्हायची चिन्हं दिसू लागली. संविधानसभा तयार झाली. लीला रॉय यांची सदस्य म्हणून निवड झाली. थोड्याच काळात स्वातंत्र्य मिळणार पण देशाची फाळणी होणार हे नक्की झालं. त्यांचं मूळ गाव ढाका पाकिस्तानात जाणार होतं. यामुळे त्या खूप अस्वस्थ झाल्या. फाळणीचा निषेध म्हणून त्यांनी संविधानसभेचा राजीनामा दिला. यानंतर फाळणीनंतरच्या भयंकर उत्पातात सापडलेल्यांसाठीच्या मदतकार्याला त्यांनी वाहून घेतलं. नोआखलीत दंगली शमवण्यात गांधीजींबरोबर त्याही सहभागी होत्या.
स्वातंत्र्यानंतरच्या १९५२ च्या पहिल्या लोकसभेसाठीच्या निवडणुका लढवून सुभाषबाबूंचा राजकीय वारसा पुढं न्यायचा निर्णय लीला आणि अनिल रॉय यांनी घेतला. तथापि, अनिल यांचं त्याचवेळी कॅन्सरनं निधन झालं. लीला या धक्क्यानं पूर्ण खचल्या. काही काळ सार्वजनिक जीवनातून त्या बाहेर पडल्या. नंतर थोडीफार राजकीय हालचाल त्यांनी केली. १९६० मध्ये फॉरवर्ड ब्लॉक आणि प्रजा सोशालिस्ट पार्टीचे विलिनीकरण करून स्थापन झालेल्या पक्षाच्या त्या अध्यक्षा झाल्या. मात्र एकूणच अनिल गेल्यानंतर खचलेल्या स्थितीतून त्या पूर्ण बाहेर आल्याच नाहीत. त्यांनाही आजारांनी घेरलं. ११ जून १९४७ साली त्यांचं निधन झालं.
स्वयंतेजानं तळपणाऱ्या या तारकेचं भौतिक अस्तित्व मावळलं तरी तिचा क्रांतिकारक व्यवहार आणि विचारांची किरणं यांत असंख्य मनं उजळवण्याचं सामर्थ्य आजही आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_______________________
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा नववा भाग २१ जानेवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.
No comments:
Post a Comment