Tuesday, January 28, 2025

मालती चौधरी

नवरा व्यक्तिशः जबाबदार नसला तरी शासनात भ्रष्टाचाराची प्रकरणं घडतात. त्याविरोधात मालती आवाज उठवतात. आपलाच नवरा मुख्यमंत्री आहे, त्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल, याची तमा त्या बाळगत नाहीत. ना नवरा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो.
मालती चौधरी ओरिसा (म्हणजे आताच्या ओडिशा) मधून संविधानसभेवर निवडून गेल्या. मात्र त्या तिथं फार काळ टिकल्या नाहीत. संविधान बनवण्यात आपण मौलिक भागिदारी करु शकणार नाही. आपली उपयुक्तता प्रत्यक्ष लोकचळवळींत अधिक आहे, हे त्यांना कळून चुकलं. त्यांनी लागलीच संविधानसभेचा राजीनामा दिला आणि फाळणीच्या निर्णयानं उसळलेल्या दंगली शमवायला नोआखलीत दाखल झाल्या. गांधीजी नोआखलीत मुक्कामच ठोकून होते. आधी त्यांनी मालती चौधरींना तिथं यायला मनाई केली. त्यांनी कळवलं – ‘इथली परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. बाहेरचं कोणी येण्यानं ती अधिक चिघळण्याची भीती आहे. सबब, तुम्ही आहात तिथंच थांबा. तीच नोआखलीसाठी मदत होईल.’ पण थोडं थांबून मालती नोआखलीत पोहोचल्याच. त्यानंतर तिथं त्यांनी जे काम केलं त्याचा झपाटा पाहून खुद्द गांधीजी त्यांचं वर्णन करतात – ‘तूफानी..!’

संविधानसभेतल्या ज्या महिलांचा आपण परिचय करुन घेत आहोत, त्या सगळ्या स्वयंप्रज्ञ होत्या. स्वतःच्या अटींवर त्या जगल्या. कोणतंही भौतिक वा सत्तेचं आमीष त्यांना थोपवू शकलं नाही. नाही कोणा थोरा-मोठ्यांची अथवा ताकदवान सत्ताधाऱ्यांची त्यांनी वृथा पत्रास ठेवली. मालतींचा त्यांच्यासारखाचा वैयक्तिक सत्तालाभाबाबत निरिच्छ नवरा नेहरुंच्या आग्रहानं कर्तव्य म्हणून ओरिसाचं मुख्यमंत्रीपद स्वीकारतो. तथापि, त्याच्यासोबत त्या राजधानीत राहत नाहीत. त्यांचं नेहमीचं काम करायला शहरापासून दूर ग्रामीण भागातच आपलं वास्तव्य ठेवतात. नवरा व्यक्तिशः जबाबदार नसला तरी शासनात भ्रष्टाचाराची प्रकरणं घडतात. त्याविरोधात मालती आवाज उठवतात. आपलाच नवरा मुख्यमंत्री आहे, त्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल, याची तमा त्या बाळगत नाहीत. ना नवरा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो.

इंदिरा गांधी किशोरवयीन असताना त्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या त्यांच्या वयाच्या मुलांची ‘वानरसेना’ ही संघटना उभारतात. ओरिसातली मुलं त्यात सहभागी व्हावी म्हणून मालती खटपट करतात. याच इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आणीबाणी लागू करतात, त्यावेळी मालती विरोधात उभ्या राहतात. ज्या तळच्या विभागांसाठी स्वातंत्र्यानंतरही त्या अविरत कार्यरत राहिल्या, त्यांची बाजू घेताना सत्ताधाऱ्यांशी संघर्ष अपरिहार्यच होते. अशाच काही कारणाने १९८८ सालचा जमनालाल बजाज पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते स्वीकारायला त्यांनी नकार दिला. त्यांच्या भूमिकेचा आदर करुन अखेर सरकारनं तो त्यांच्या निवासस्थानी धाडला. भेटीस आलेल्या ओरिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक यांना एक तास उशीर झाला म्हणून मालती चौधरींनी त्यांना भेटच नाकारली.

आज ज्या दीप्तिमान शलाकेचा आपण परिचय करुन घेत आहोत, त्या मालती चौधरींचा जन्म २६ जुलै १९०४ रोजी एका उच्चभू कुटुंबात कलकत्ता येथे झाला. बॅरिस्टर कुमुद नाथ सेन वडील आणि स्नेहलता सेन आई. मालती ३ वर्षांच्या असतानाच त्यांच्या कुटुंबावर दुःखाची वीज कोसळली. त्यांचे वडील अकाली गेले. आई स्नेहलता धीरानं या आघाताला सामोरं गेल्या. त्या स्वतः शिक्षित आणि स्वावलंबी स्त्री होत्या. त्यांची माहेरची पार्श्वभूमी प्रगत विचारांची होती. स्नेहलतांचे वडील बिहारीलाल गुप्ता आयसीएस झालेले सनदी अधिकारी होते. त्यांनी जातिबाहेर लग्न केल्यानं त्यांचे जातबांधव त्यांच्यावर संतापलेले होते. कलकत्त्याचे प्रेसिडन्सी मॅजिस्ट्रेट असताना युरोपियन गुन्हेगारांवर भारतीय न्यायालयात खटला चालवता येईल, असा निर्णय त्यांनी दिल्यानं राष्ट्रवादी भावनांना बळ मिळालं होतं. पुढं ते बडोद्याचे दिवाण झाले. स्नेहलतांचे शिक्षण पूर्ण होईल याची दक्षता वडिलांनी घेतली. स्नेहलतांनी दार्जिलिंगच्या एका शाळेत नोकरी धरली. नंतर कलकत्त्याला त्या जेथून शिकल्या त्या बेथ्यून कॉलेजमध्ये त्या शिकवू लागल्या. त्याआधारे आपल्या मुलांचं संगोपन त्यांनी केलं. रवींद्रनाथ टागोर त्यांच्या वडिलांचे मित्र होते. स्नेहलतांनी टागोरांच्या काही साहित्याचा बंगालीतून इंग्रजीत अनुवाद केला आहे.

अशा या हिंमतीच्या आणि प्रगतीशील विचारांच्या आईनं आपल्या मुलांचं भवितव्य नीट होईल याची पूर्ण काळजी घेतली. दोन्ही मुलगे सनदी सेवेचं शिक्षण घ्यायला गेले. पण धाकटी मालती बंडखोर निघाली. ती मॅट्रिकला असतानाच गांधींजींच्या असहकाराच्या चळवळीनं तिला आकर्षून घेतलं. सोळा वर्षाची मालती या चळवळीत भाग घेण्यासाठी घरातून पळून गेली. आपल्या एका नातेवाईकांकडे आजच्या बांगला देशातल्या रंगपूरला गेली. आईनं तिथं जाऊन लेकीची कशीबशी समजूत घातली. मॅट्रिकची परीक्षा द्यायला लावली. मालती पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाली.

आता उच्चशिक्षणाचं काय? तिला कलकत्त्यातलं तिच्या आईचं बेथ्यून कॉलेज नको होतं. कोणतंच ठराविक साच्यातला अभ्यासक्रम शिकवणारं प्रस्थापित कॉलेज नको होतं. तिला जायचं होतं टागोरांच्या शांतिनिकेतनमधल्या विश्वभारती विद्यापीठात. पण तिथं मुलींसाठी सोय नव्हती. पण ती मागं हटणारी नव्हती. तिनं थेट टागोरांना पत्र लिहिलं. टागोरांनी विचार केला. मुलींच्या राहण्याची अडचण होती. त्यांनी मालतीच्या आईला, स्नेहलतांना विनंती केली – ‘मुलींचं वसतिगृह सुरु करु. त्याच्या अधीक्षक तुम्ही व्हाल का?’ त्यांनी टागोरांचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि दोघी मायलेकी शांतिनिकेतनवासी झाल्या. मालतीमुळे १९२१-२२ साली मुलींची पहिली तुकडी शांतिनिकेतनमध्ये सुरु झाली. वर्गखोली नसलेलं, कला-गुणांचं संवर्धन करणारं, सर्जनशीलतेचा आणि अभिव्यक्तीचा प्रभावी आविष्कार हा मातृभाषेतून होत असल्यानं भारतीय भाषांना प्राधान्य देणारं शिक्षण ही शांतिनिकेतनची वैशिष्ट्यं आपल्याला ठाऊक आहेत. या मुक्त वातावरणात मालतीच्या जाणिवा समृद्ध झाल्या. तिचं व्यक्तित्व सर्वांगांनी बहरलं. इथंच तिला तिचा पुढं आयुष्याचा जोडीदार होणारा मित्र मिळाला – नबकृष्ण चौधरी. साबरमतीहून गाधीजींच्या आज्ञेनुसार त्यानं इथं प्रवेश घेतला. मूळचा ओरिसाचा. घर जमीनदाराचं. वडील वकील. पुरोगामी विचारांचे. भाऊ गोपबंधू आयसीएस झाला. पण ती नोकरी सोडून स्वातंत्र्य चळवळीत उतरला. पत्नीचा म्हणजे मुलाच्या आईचा विरोध असतानाही त्याचं लग्न वडिलांनी त्यांच्या ख्रिस्ती मित्राच्या मुलीशी, रमादेवीशी करुन दिलं. मालती आणि नबकृष्ण यांचा विवाह १९२७ साली झाला.

लग्नानंतर काही महिन्यांतच कटक शहरापासून जवळ असलेल्या तारीकुंड गावात ते राहायला गेले. उभयतांचं सगळं राहणीमानच बदललं. उंची तलम साडीच्या जागी खादीचं जाडंभरडं लुगडं आलं. दोघं शेती करु लागले. खादी विणू-विकू लागले. प्रौढ आणि दिवसा गुरांकडं जाणारी मुलं यांच्यासाठी रात्रशाळा सुरु केली. हे सगळं खेड्यात जाऊन तिथलं बनून तिथल्या समाजाला सुधारा, या गांधीजींच्या शिकवणुकीप्रमाणे चाललं होतं. इथेच त्यांच्या मुलीचा – उत्तराचा जन्म झाला.

तारीकुंडमध्येच गुरुचरण मोहंती या मार्क्सवाद्याशी त्यांची ओळख झाली. त्याच्याशी होणाऱ्या चर्चांतून मार्क्सवादी विचारांचा गहिरा प्रभाव मालती आणि नबकृष्ण यांच्यावर झाला. काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनात ‘संपूर्ण स्वातंत्र्याचा’ ठराव झाल्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ जोरात सुरु झाली. २६ जानेवारी १९३० रोजी कटक येथे सरकारचा विरोध असतानाही लोकांनी तिरंगा फडकावला. मालती या आंदोलनात होत्या. त्यांच्यामुळे आंदोलनात भागिदारी करण्यासाठी महिलांना प्रेरणा मिळाली. मालतींनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सत्याग्रही निधीसाठी यावेळी दान केल्या. लगोलग अन्य महिलांनीही त्यांचं अनुकरण करत पैसे, दागिने चळवळीसाठी अर्पण केले. दांडी सत्याग्रहाप्रमाणे ओरिसातील इंचुडीला सत्याग्रह झाला. त्यात मालती चौधरींचा पुढाकार होता. इंचुडीचा सत्याग्रह दांडीच्या सत्याग्रहानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानला जातो.

जून १९३० ला कटक जिल्हा काँग्रेसच्या सचिवपदी मालती चौधरींची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली दारुबंदी, परदेशी मालाची होळी आदि उपक्रम जोरात सुरु झाले. यात ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना झाली. या काळात नवरा, दीर असे सगळे कुटुंबच तुरुंगात होते. दोन वर्षांच्या उत्तराला बघायला कोणी कुटुंबीय बाहेर नसल्यानं तिला भागलपूरच्या तुरुंगात आईबरोबर ठेवण्यात आलं. गांधी-आयर्विन करारानंतर आंदोलनकर्त्या कैद्यांची मुक्तता करण्यात आली. बाहेर आल्या आल्या मालती लागलीच स्वातंत्र्य चळवळीच्या नियमित कामाला लागल्या.

मालती आणि नबकृष्ण यांच्या मते समाजवाद आणि स्वातंत्र्य एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. शोषित-पीडितांची बाजू लावून धरण्यासाठी त्यांनी ‘उत्कल काँग्रेस साम्यवादी कर्मी संघ’ १९३३ ला स्थापन केला. या संघाचं ‘सारथी’ हे मुखपत्र त्यांनी सुरु केलं. त्याचं घोषवाक्य होतं – ‘कामगारांनो, एक व्हा !’

यातूनच पुढे ‘उत्कल किसान संघ’ १९३५ साली स्थापन झाला. मालती त्याच्या सचिव होत्या. या संघानं जमिनदारी उन्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतला. नबकृष्ण याचवेळी ओरिसाच्या विधानसभेवर निवडून गेले. बाहेरची आंदोलनं आणि सभागृहातलं प्रतिनिधीत्व यांतून वेठबिगारी विरोधी, शेतकरी अधिकाराचे कायदे व्हायला मदत झाली. संस्थानी प्रजेच्या जबाबदार सरकारच्या मागणीच्या आंदोलनानंही यावेळी जोर धरला. या आंदोलनात मालती या एकमेव महिला नेत्या होत्या.

१९४२ चा उठाव सुरु झाला. त्यासाठीच्या एका सभेला जाताना मालती चौधरींना अटक झाली. तीन वर्षांनी १९४५ साली त्यांची सुटका झाली. आता उत्कल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. चळवळीत पालक गमावलेल्या मुलांसाठी लोकांच्या आर्थिक पाठिंब्याने त्यांनी बाजीराऊत छात्रावास नावाची शाळा सुरु केली. इंग्रजांना पैलतीरी न्यायला नकार दिल्यानं मारल्या गेलेल्या नाविक मुलाचं नाव या शाळेला दिलं गेलं. मालती चौधरींची लेक उत्तरा या शाळेत शिकवू लागली.

देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी उत्कल नवजीवन मंडळ स्थापन केलं. त्याच्यावतीनं शोषित-पीडित समूहांच्या विकास आणि जागृतीसाठी अनेक उपक्रम सुरु केले. या कामात जवळ आलेल्या आदिवासी समूहांत मालती चौधरींना ‘नुमा’ म्हटलं जाऊ लागलं. नुमाचा अर्थ ज्याच्याशी आपण सुख-दुःखाचं, आपल्या मनातलं सगळं बोलू शकतो असं माणूस.

यथावकाश नबकृष्ण मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले. त्यांनी आणि मालतींनी राजकारणातून निवृत्त होऊन सामाजिक कामावरच लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. विनोबा भावे यांच्या भूदान आणि ग्रामदान चळवळीत ते सहभागी झाले. नक्षलींच्या नावानं सामान्य आदिवासींना होणाऱ्या पोलिसांच्या त्रासातून मार्ग काढण्यासाठी ओरिसा-आंध्रच्या सीमेवर त्यांनी ६ महिने मुक्काम टाकला.

आणीबाणीत तुरुंगात असतानाच नबकृष्ण यांना अर्धांगवायू झाला. पुढे त्यांची तब्येत ढासळत गेली. १९८० च्या दशकात मालती चौधरींवर एकामागून एक दुःखाचे डोंगरच कोसळले. आधी दोघे नातू, नंतर नवरा आणि नंतर लेक उत्तरा त्यांना सोडून गेली. कणखर बनून त्या पुढं काम करत राहिल्या तरी आतून त्या खचल्या होत्या. एकाकी झाल्या होत्या.

वयाच्या ९४ व्या वर्षी मार्च १९९८ मध्ये त्यांचं निधन झालं.

आपल्या तेजाची वलयं मागं ठेवून ही तारका भौतिक जगातून लुप्त झाली.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_______________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा दहावा भाग २८ जानेवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

No comments: