Friday, August 3, 2012

अण्‍णांचे आंदोलन राजकीय पक्षात परिवर्तीत होणार-एक सुचिन्‍ह

दिल्‍लीस्थित उपोषणाच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यात (2 ऑगस्‍ट रोजी) आपले आंदोलन राजकीय पक्षात परिवर्तीत करण्‍याच्‍या सहका-यांच्‍या मागणीला अण्‍णा हजारेंनी रुकार दिला आहे. उपोषणात वेळ वाया घालवण्‍याऐवजी राजकीय पर्याय उभा करण्‍यासाठी देशभर प्रचार मोहिमा काढण्‍याचा मनोदय त्‍यांनी जाहीर केला आहे. येत्‍या दोन दिवसांत यासंबंधी जनतेच्‍या प्रतिक्रिया त्‍यांनी मागवल्‍या आहेत. त्‍यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे. अण्‍णांनी मी स्‍वतः निवडणूक लढवणार नसल्‍याचे म्‍हटले आहे. पण तो काही महत्‍वाचा मुद्दा नाही. आपल्‍या आंदोलनाला ते राजकीय प्रक्रियेत आणत आहेत, हे महत्‍वाचे. यामुळे आजवरच्‍या निर्नायकी उधाणाला लगाम बसून अण्‍णांच्‍या आंदोलनाला पाठिंबा देणा-या सत्‍प्रवृत्‍त जनतेला योग्‍य दिशा गवसण्‍याची शक्‍यता तयार होऊ शकते. या अर्थाने, अण्‍णा टीमचा राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याचा हा विचार हे सुचिन्‍ह ठरेल.

अर्थात, हे सर्व आंदोलनांना लागू नाही. कोणतेही आंदोलन अखेरीस पक्षात परिवर्तीत करायला हवे, असा याचा अर्थ नाही. अण्‍णांच्‍या आंदोलनाचे आजचे स्‍वरुप लक्षात घेता त्‍यास हीच मात्रा उपयुक्‍त ठरु शकते. या अर्थाने, हा उपाय 'विशिष्‍ट' आहे, 'सर्वसाधारण' नाही.

आपण लोकशाही प्रजासत्‍ताक देश आहोत. लोकांनी निवडून दिलेल्‍या प्रतिनिधींनी संसदेत अथवा विधिमंडळांत जाऊन कायदे करावयाचे असतात. लोकांच्‍या आशाआकांक्षा प्रति‍बिंबित करावयाच्‍या असतात. या आशाआकांक्षाना हितसंबंधांचा पाया असतो. 'भारतीय जनता' म्‍हणून तिची काही सर्वसाधारण समान लक्षणे आहेत, तसेच तिच्‍यात अनेक हितसंबंधांची गुंतागुंतही आहे. आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक असे अनेक पैलू या हितसंबंधांना आहेत. कर्नाटकातील जनता व महाराष्‍ट्रातील जनता 'भारतीय' असूनही 'बेळगाव'चा तिढा सुटत नाही. तामिळनाडूच्‍या जनतेचे कर्नाटकी जनतेइतकेच 'भारतीयत्‍व' अस्‍सल आहे, पण 'कावेरी'च्‍या पाण्‍याचा वाद चालूच राहतो. 'भारतीय' दलित-आदिवासींना राखीव जागा, विशेष सवलती देणे 'भारतीय' सवर्णांतल्‍या सर्वांनाच रुचते असे नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 'भारतीय जनता' आपले प्रतिनिधी निवडते, ती या हितसंबंधांना अनुसरुन. संसदेत अथवा विधिमंडळात या हितसंबंधांचे टकराव होत असतात. चर्चेच्‍या अखेरीस बहुमताने निर्णय होत असतात. तथापि, या बहुमताला भारतीय संविधानाने दिलेल्‍या दलित-आदिवासींसारख्‍या दुर्बल विभागांच्‍या खास संरक्षणांना हात लावता येत नाही. तसेच सेक्‍युलॅरिझमसारख्‍या मूळ चौकटीला इजा पोहोचवता येत नाही. त्‍या मर्यादेतच हे निर्णय करावे लागतात. कायदेमंडळांतल्‍या या चर्चा जेवढ्या विवेकी तेवढे हे निर्णय संतुलित असतात. भारतीय स्‍वातंत्र्याचा व सामाजिक सुधारणांचा जो महान संग्राम आपल्‍या देशात झाला, त्‍या संग्रामातून तयार झालेल्‍या 'भारतीय संविधानाने' देशाचा कारभार व पुढील वाटचाल ठरवण्‍यासाठी संसद व विधिमंडळाची ही व्‍यवस्‍था तयार केली आहे. कोणतीही 'व्‍यवस्‍था' ही परिपूर्ण नसते. तथापि, आपण स्‍वीकारलेली संसदीय प्रणाली आजचे प्रश्‍न सोडवायला निकामी ठरते आहे, अशीही आज स्थिती नाही. ही व्‍यवस्‍था नीट वापरली जात नाही, हा खरा प्रश्‍न आहे. ही व्‍यवस्‍था परिणामकारकपणे वापरण्‍याचे प्रयत्‍न ही आजची खरी गरज आहे. देशातील दुर्बल विभागांच्‍या कल्‍याणासह सर्व जनतेचे भविष्‍य घडविण्‍यासाठी ही संवैधानिक व्‍यवस्‍थाच आज उपयुक्‍त आहे, या विश्‍वासापोटी भारतीय संविधान संमत होण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला, 25 नोव्‍हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीतील आपल्‍या शेवटच्‍या भाषणात भारतीय जनतेला कळकळीचा इशारा देतात- ‘ ...जेव्‍हा, संवैधानिक मार्ग उपलब्‍ध आहेत, तेव्‍हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्‍याकरण आहे आणि जितक्‍या लवकर आपण त्‍यांना दूर सारु तेवढे ते आपल्‍या हिताचे होईल.’ 

याचा अर्थ आंदोलने करायचीच नाहीत, केवळ निवडणुकांत भागिदारी करावयाची असे नाही. आपापल्‍या हितसंबंधांच्‍या संवर्धनासाठी संघटना बांधणे, सभा-मेळावे-प्रचारपत्रकांद्वारे भूमिका प्रचारणे, सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी सनदशीर आंदोलन करणे हे या संसदीय प्रणालीचा भागच आहे. अर्थात, अशी आंदोलने ही विशिष्‍ट मुद्दा अथवा हितसंबंधावर आधारित असल्‍याने त्‍याकडे सरकारचे लक्ष वेधणे, सरकारने त्‍यावर चर्चा करावी, यासाठी दबाव निर्माण करणे, एवढ्यापुरतीच मर्यादित असली पाहिजेत. संसदीय निर्णयप्रकियेलाच आव्‍हान देणारी असता कामा नयेत. कामगार, दलित, आदिवासी, स्त्रिया, अल्‍पसंख्‍याक इ. विविध समाजविभाग आपापल्‍या हितरक्षणार्थ आपापल्‍या संघटनांकरवी आवाज उठवत असतात. सरकारशी बोलणी करत असतात. त्‍यावेळी त्‍यांच्‍या विशिष्‍ट मागण्‍या असतात. त्‍या मागण्‍यांपुरतेच त्‍यांचे संघटन व आंदोलन असते. काही संघटना याहूनही अधिक समग्र भूमिका घेऊन आंदोलने करतात. विवेकी पद्धतीने अशी आंदोलने वा आवाज उठवणे लोकशाही प्रजासत्‍ताक संवर्धित होण्‍यासाठी आवश्‍यकच आहेत. अण्‍णा हजारेंनी माहितीच्‍या अधिकारासाठी, भ्रष्‍टाचाराच्‍या विशिष्‍ट प्रकरणांचा छडा लावण्‍यासाठी केलेली याआधीची आंदोलने ही या प्रकारात मोडतात.

मात्र, जनलोकपाल आंदोलन हे या मर्यादा ओलांडणारे आहे. संसदीय प्रणालीवर आघात करु पाहणारे आहे. देशातील सर्व समस्‍यांचे मूळ भ्रष्‍टाचार आहे व लोकपालसारखी यंत्रणा उभारली की या समस्‍या दूर होतील, असा आभास या आंदोलनकर्त्‍यांनी निर्माण केला. प्रत्‍येकाला भ्रष्‍टाचाराचा त्रास आपापल्‍या पातळीवर होत असतो. अण्‍णांच्‍या आंदोलनात वकिलांची संघटना उतरली ती त्‍यांना न्‍यायालयात कागदपत्रे मिळविताना होणा-या भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधात. पण याच वकील मंडळींपैकी अनेकजण आपल्‍या अशिलांना लुटत असतात, तो त्‍यांच्‍या लेखी भ्रष्‍टाचार नसतो. सरकारच्‍या भ्रष्‍टाराविरोधात जे सिनेतारे अण्‍णांच्‍या आंदोलनात उतरले, त्‍यांच्‍यातल्‍या अनेकांना कर चुकवणे हा भ्रष्‍टाचार वाटत नाही. उच्‍चमध्‍यमवर्गातल्‍या तसेच उच्‍चवर्णीयांतल्‍या अण्‍णांना पाठिंबा देणा-या अनेकांनी आपल्‍या मुलांना विनाअनुदानित महाविद्यालयांत कॅपिटेशन फी भरुन प्रवेश घेतला आहे. त्‍यांना हा बिनपावत्‍यांचा पैसा देण्‍याचा राग आहे. आणि तो खरा आहे. पण ज्‍या दलित विद्यार्थ्‍याला थोडेसे गुण कमी पडल्‍याने राखीव जागातल्‍या मेरिटलिस्‍टमध्‍ये येता येत नाही त्‍याला या मध्‍यमवर्गातल्‍या सवर्ण विद्यार्थ्‍यापेक्षा अधिक गुण असूनही विनाअनुदानित महाविद्यालयांत पैश्‍यांअभावी प्रवेश मिळत नाही. राखीव जागांविषयी बोटे मोडणा-या सवर्णांतल्‍या अनेक मंडळींना दलित विद्यार्थ्‍याची जात व गरीबी ही दुहेरी व्‍यथा आपली वाटत नाही. अण्‍णांच्‍या आंदोलनात 'भ्रष्‍टाचारविरोध' या सबगोलंकारी संकल्‍पनेच्‍या एकाच ढगात प्रत्‍येकाला आपापले आकार दिसतात. हितसंबंधांचे हे अंतर्विरोध दिसेनासे होतात. 'भारतमाता की जय' म्‍हटले की प्रत्‍येकाला आपापल्‍या हितसंबंधाचा जयजयकार झाल्‍यासारखा वाटतो. 'इन्किलाब झिंदाबाद' या घोषणेचेही तसेच. प्रत्‍येकाला क्रांती आपापल्‍या सोयीची असणार असेच वाटते. अण्‍णा टीम भारतीय जनता, इन्किलाब या शब्‍दांचा वापर भोंगळपणे करुन जनतेची दिशाभूल तर करतेच, पण मुख्‍य म्‍हणजे संसदीय प्रणालीवरील जनतेचा विश्‍वास उडवते. अराजकीय माहौल तयार करते. खरा क्रांतिकारी लढ्याचा मार्ग यातून धूसर होतो. सर्वधर्मसमभाव व दलित-कष्‍टकरी-स्त्रियांच्‍या हितशत्रूंना आपल्‍या कारस्‍थानांसाठी भरपूर अवकाश तयार होतो. 

अण्‍णांच्‍या लोकपाल आंदोलनाचा राजकीय पक्ष होण्‍याने हा अराजकीय माहौल ओसरायला मदत होईल. राजकीय पक्षाला देशातील विविध हितसंबंधांबाबत भूमिका घेऊन समग्र धोरण जाहीर करावे लागते. आमच्‍या उमेदवाराला केवळ लोकपालसाठी निवडून द्या, असे म्‍हणता येत नाही. अण्‍णांच्‍या आंदोलनाला आपले आर्थिक, सामाजिक धोरण राजकीय पक्ष होताना ठरवावेच लागेल. आजचा गोलमालपणा बंद होईल. अण्‍णांचे उमेदवार निवडणुकांत भागिदारी करतील, त्‍यावेळी या सर्व प्रश्‍नांविषयी त्‍यांना बोलावे लागेल. पैश्‍याचा गैरवापर व उधळमाधळ टाळून निवडणुका लढवण्‍याचे चांगले पायंडेही ते पार पाडतील. मुख्‍य म्‍हणजे, निवडून जाऊन संसदेतील चर्चांत भाग घेऊन आपले उद्दिष्‍ट गाठायचा प्रयत्‍न करतील. त्‍यामुळे आजची संसदबाह्य अराजकी वाटचाल थांबेल. या क्रमात राजकारण्‍यांच्‍या भूलथापांना व भ्रष्‍टाचाराला कातावून अण्‍णांना पाठिंबा देणा-या सत्‍प्रवृत्‍त मंडळींना आंदोलनाच्‍या योग्‍य रीतीचा बोध होण्‍याचा मार्गही प्रशस्‍त होईल. 

- सुरेश सावंत

Thursday, August 2, 2012

रिओची वसुंधरा परिषद, जागतिक पर्यावरण व जीवाश्‍म इंधन

खनिज तेल, गॅस व कोळसा यांना जीवाश्‍म इंधन म्‍हटले जाते. या इंधनाच्‍या अतिरेकी वापराने जागतिक पर्यावरणाला हानिकारक अशा कार्बनचे उत्‍सर्जन मोठ्या प्रमाणात होत असते. त्‍यामुळेच या इंधनाचा वापर कमी करावा, त्‍यासाठी त्‍यावरचे देशांतर्गत दिले जाणारे अनुदान कमी करावे तसेच अन्‍य शाश्‍वत व पुनर्वापरयोग्‍य ऊर्जास्रोतांच्‍या (हवा, पाणी, सूर्य) शोधांना चालना द्यावी अशी मांडणी आंतराष्‍ट्रीय स्‍तरावर गेली अनेक वर्षे चालू आहे. कार्यकर्ते, अभ्‍यासक हा मुद्दा लावून धरत आहेतच. एवढेच नव्‍हे, तर देशादेशांच्‍या आंतरराष्‍ट्रीय परिषदांतही यासंबंधी चर्चा होऊन या दिशेने पावले टाकण्‍याचे निर्णय झालेले आहेत. तथापि, या पावलांच्‍या गतिबद्दल प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करणारे अभ्‍यास प्रसिद्ध होत आहेत. या अभ्‍यासांच्‍या आधारे जागतिक मंचांवर प्रश्‍न विचारले जात आहेत, आंदोलनेही होत आहेत. नुकतीच जून महिन्‍यात रिओ येथे वसुंधरा परिषद पार पडली. या परिषदेवेळीही आंदोलने झाली. परिषदेत चर्चाही झाल्‍या. परंतु, परिषदेच्‍या अंतिम निवेदनात त्‍यासंबंधी ठोस निश्‍चय जाहीर झाले नाहीत, असा आक्षेप घेतला जात आहे. जवळपास 28 राष्‍ट्रांचा सहभाग असलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय ऊर्जा एजन्‍सी (आयइए) चे मुख्‍य अर्थतज्‍ज्ञ फतिह बिरोल (Fatih Birol) यांची या प्रश्‍नाचा परिचय करुन देणारी मुलाखत 'गार्डियन' वृत्‍तपत्राने या दरम्‍यान घेतली होती. त्‍यातील काही मुद्दे खाली नमूद करत आहेः 

जीवाश्‍म इंधनावर देश देत असलेले अनुदान पर्यावरणाला घातक ठरत आहे. जी-20 राष्‍ट्रसमूहांच्‍या 2009 च्‍या बैठकीत हे अनुदान टप्‍प्याटप्‍प्‍याने कमी करत जाण्‍याची प्रतिज्ञा करण्‍यात आली होती. तथापि, 2010 मध्‍येच अब्‍जावधीत दिल्‍या जाणा-या या अनुदानांचा आकडा अधिक फु्गलेला दिसतो. देशाच्‍या सरकारांनी अनुदान देऊन किंमती कमी करण्‍याच्‍या या पद्धतीमुळे या इंधनांचा वायफळ वापर वाढतो, सार्वजनिक पैसा अवाजवी खर्च होतो तसेच इंधनाचे स्‍मगलिंग वाढते. पुनर्वापरयोग्‍य ऊर्जास्रोतांच्‍या निर्मितीतील स्‍पर्धाशीलताही मंदावते. आयइएच्‍या अभ्‍यासातून 37 राष्‍ट्रांनी 409 बिलिअन डॉलर्सचे अनुदान देऊन जीवाश्‍म इंधनाच्‍या किंमती कृत्रिमरित्‍या कमी केल्‍याचे, मात्र पुनर्वापरयोग्‍य ऊर्जास्रोतांच्‍या तंत्रज्ञानासाठी केवळ 66 बिलिअन डॉलर्स खर्च केल्‍याचे उघड होते. 

गरिबी निर्मूलनासाठी हे अनुदान दिले जात असल्‍याचा दावा अनेकांकडून केला जातो. तथापि, आइएच्‍या अभ्‍यासातून गरिबांतील तळच्‍या विभागाला या अनुदानातील योग्‍य वाटा मिळत नसल्‍याचेच समोर येते. 2010 साली खर्च झालेल्‍या 409 बिलिअन डॉलर्सच्‍या अनुदानातील जेमतेम 8 टक्‍के रक्‍कम तळच्‍या 20 टक्‍के गरिबांपर्यंत पोहोचल्‍याचे आढळून येते. याऐवजी थेट कल्‍याणकारी योजनांचा लाभ या गरिबांना अधिक व कमी खर्चात होऊ शकला असता. या गरिबांना 'दुहेरी शिक्षा' भोगावी लागते. त्‍यांना या अनुदानाचा योग्‍य लाभ मिळत नाही तो नाही, शिवाय या वाया जाणा-या पैश्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठीच्‍या शाळा, इस्पितळे आदि सार्वजनिक सेवांसाठी पुरेसा निधी शिल्‍लक राहत नाही. 

अर्थात, हे अनुदान कमी करणे देशांतर्गत असंतोषाला चालना देऊ शकते. पेट्रोलवरील अनुदान कमी करण्‍याच्‍या निर्णयाने नायजेरियात या वर्षी एक आठवड्याहून जास्‍त काळ संपांना सामोरे जावे लागले. कामगार संघटनांनी पेट्रोलच्‍या प्रचंड दरवाढीविरोधात आंदोलने केली. अखेरीस पंतप्रधान गुडलक जोनाथन यांना अनुदानातील कपात काही अंशी माघारी घेऊन पेट्रोलच्‍या किंमती कमी कराव्‍या लागल्‍या. उठावांच्‍या दबावाने ही अनुदाने कायम ठेवणे योग्‍य होणार नाही. मात्र, अनुदानात एकदम मोठी कपात न करता ती क्रमशः करत जावी तसेच समाजातील गरीब गजरवंतांना ती नेमकेपणाने मिळेल, असे उपाय करावेत, हा धडा या आंदोलनांतून घ्‍यायला हवा. नायजेरियातील 49 टक्‍के जनता विजेपासून वंचित आहे. वास्‍तविक, हा देश निर्यात करत असलेल्‍या जीवाश्‍म इंधनाच्‍या महसुलातील केवळ 0.6 टक्‍के रक्‍कम या जनतेपर्यंत वीज पोहोचवायला पुरेशी आहे. 

विकसित देशांत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने इंधन अनुदान कमी करण्‍याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तथापि, अन्‍य मार्गांनी हे अनुदान दिले जात असल्‍याचे 'ओइसीडी' (परस्‍पर विकासासाठी राष्‍ट्राराष्‍ट्रांनी एकत्र येऊन स्‍थापन केलेली संस्‍था) ने निदर्शनास आणले आहे. तेल, गॅस व कोळसा उद्योगांना करसवलत तसेच स्‍वस्‍तात जमीन व अन्‍य पायाभूत सुविधांच्‍या मार्गाने हे अनुदान दिले जात आहे. 

बिरोल यांच्‍या भूमिकेची चिकित्‍सा तज्‍ज्ञ करतीलच. तथापि, त्‍यांच्‍या वरील म्‍हणण्‍यातून जीवाश्‍म इंधनाच्‍या अतिवापराचा व त्‍यावरील अनुदानाचा प्रश्‍न गंभीरपणे अधोरेखित होतो. पेट्रोल-डिझेल-गॅस यांच्‍या अनुदानात कपात करणे व त्‍यांचे भाव वाढविणे ही प्रक्रिया भारतातही सुरु आहे. अशी भाववाढ झाली की त्‍याला सार्वत्रिक विरोधही होतो. सरकारने त्‍यावरील आपले विविध कर कमी केले तर अशी भाववाढ करावी लागणार नाही, असेही उपाय डाव्‍या संघटनांकडून सुचवले जातात. त्‍यांचा जरुर विचार करावा. मात्र, बहुतेकवेळा इंधन भाववाढीला विरोध हा सवंग व सत्‍ताधा-यांच्‍या विरोधात करायलाच हवा, म्‍हणून असतो. या गदारोळात, हे अनुदान सत्‍पात्री लागण्‍याचे व इंधनाचा वायफळ वापर टाळण्‍याचे उपाय दुर्लक्षित राहतात, असे मला वाटते. देशात 35 कोटींचा मध्‍यमवर्ग आज आहे. त्‍यातील काहींना खरे म्‍हणजे या अनुदानित इंधनाची गरज नाही आणि उरलेल्‍यांना या इंधनाच्‍या भाववाढीचा भार सोसू शकतो. प्रश्‍न गरिबांचा आहे. त्‍यांच्‍यावर निश्चितपणे प्रत्‍यक्ष अ‍थवा अप्रत्‍यक्ष भार पडता कामा नये. त्‍यासाठी थेट अनुदानाची पद्धत अवलंबावयास हवी. 

यादृष्‍टीने अनेक तज्ज्ञांकडून सुचवलेले काही उपाय खाली देत आहेः 

घरगुती वापराच्‍या गॅस कनेक्‍शन्‍ससाठी उत्‍तेजन, प्रसंगी गरिबांना मोफत कनेक्‍शन्‍स देणे. नळाद्वारे गॅस वितरणाचीच व्‍यवस्‍था अंतिमतः करणे. तोवर परवडतील अशा दराची छोटी सिलेंडर्स देणे. ती सहज उपलब्‍ध होतील, याची यंत्रणा उभी करणे. इंधनासाठी रॉकेलचा वापर शून्‍य करणे. 

पेट्रोल-डिझेलपेक्षा रॉकेलचा स्‍वस्‍त दर हा या भेसळीला उत्‍तेजन देणारा मूळ घटक आहे. पेट्रोल, डिझेल व रॉकेल यांचे दर एकच करणे. त्‍यामुळे भेसळीची शक्‍यताच नाहीशी होते. रॉकेल खुल्‍या बाजारात आणून ते कोणालाही खरेदी करण्‍याची मुभा ठेवावी. ज्‍या छोट्या व्‍यावसायिकांना, अगदी लोडशेडिंगमुळे दिवाबत्‍तीसाठी ज्‍या मध्‍यवर्गीयांना ते हवे असेल ते त्‍यांना विनाअनुदानित दरात सहज उपलब्‍ध होईल. असे फ्री सेलचे रॉकेल आज उपलब्‍ध नसल्‍याने हे सर्व गरजवंत रेशनच्‍या काळ्याबाजारात नाईलाजाने सहभागी होतात. 

रेशनकार्डधारकांना त्‍यांचे अनुदान थेट अथवा स्‍मार्टकार्डद्वारे देणे आहे. याचा अर्थ, रेशनकार्डधारकाच्‍या वाट्याच्‍या रॉकेलचे अनुदान दरमहा सरकार त्‍याच्‍या बँकखात्‍यात जमा करील. अथवा स्‍मार्ट कार्ड (क्रेडिट कार्डप्रमाणे) द्वारे देईल. खुल्‍या बाजारातील रॉकेल विक्रेत्‍याला स्‍मार्ट कार्ड आपल्‍या मशीनमध्‍ये स्‍वाईप केल्‍यावर अनुदानाची रक्‍कम आपोआप मिळेल व उरलेली रक्‍कम तो रेशन कार्डधारकाकडून (स्‍मार्टकार्डधारकाकडून) रोखीने घेईल. ही रक्‍कम रेशनच्‍या रॉकेल दराइतकीच असेल. या पद्धतीमुळे अनुदान वाया न जाता नेमकेपणाने गरजवंतलाच मिळेल. त्‍याला हवे तेव्‍हा रॉकेल घेता येईल. फे-या माराव्‍या लागणार नाहीत. खुल्‍या बाजारातील कोणत्‍या रॉकेल विक्रेत्‍याकडे जायचे याचे स्‍वातंत्र्य त्‍याला राहील. 

रेशन कार्डधारकाप्रमाणेच ज्‍या कोणाला रॉकेल अथवा डिझेल सवलतीत द्यायचे असेल, त्‍यांनाही असे थेट अनुदान देता येईल. उदा. सावर्जनिक प्रवासी वाहतूक करणा-या परिवहन सेवा. आवश्‍यक तर डिझेल वापरणा-या मालवाहतूकदारांनाही असे थेट अनुदान देता येईल. (त्‍यामुळे रॉकेलमिश्रित डिझेलच्‍या वापराने होणारे प्रदूषण रोखले जाईल. ट्रकच्‍या इंजिनांची प्रकृतीही नीट राहील.) 

- सुरेश सावंत 

Tuesday, June 12, 2012

मला आनंद कसला व्‍हावा - स्टीव्‍ह जॉब्‍सने 'माझा' धर्म स्‍वीकारल्‍याचा की पटलेला धर्म स्‍वीकारण्‍याच्‍या त्‍याच्‍या धाडसाचा ?

मला मध्यंतरी एक SMS आला.

'I am proud that I am Buddhist - Steve Jobs'

SMS पाठवणारा मित्र बौद्ध होता.

वाचले आणि मला आनंद झाला. अभिमानही वाटला.

असाच आनंद व अभिमान सुरेश भट व रुपाताई कुलकर्णींनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे कळले तेव्हा झाला होता.

पण आता मी सावध झालो. विचार करु लागलो...मला कसला आनंद झाला ? ...मला कसला अभिमान वाटला?

लक्षात आले - मीही बौद्ध आहे. स्टीव्ह जॉब्ससारख्या जागतिक कीर्तीच्या कर्तृत्ववान व्यक्तीने माझा धर्म स्वीकारला याचा हा आनंद व अभिमान होता.

समजा माझा नसलेला दुसरा धर्म स्टीव्ह जॉब्सने स्वीकारला असता तर माझ्या भावना अशा नसत्या. माझ्या बौद्ध मित्रानेही बहुधा तो SMS पाठवला नसता.

मी अजून विचार केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात उपासना स्वातंत्र्य बहाल केले आहे. खरे तर भारतीयांना मिळालेला हा हक्क जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. तो मानवी अधिकारच आहे. उपासना स्वातंत्र्य हे कळत्या वयात विचारपूर्वक उपभोगावयाची बाब आहे. मग माझ्या वडिलांचा धर्म केवळ मी त्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून माझा कसा काय होऊ शकतो ? जाणतेपणी मी विविध धर्मांचा समज घेतला व नंतर माझ्या वडिलांचा धर्म मला योग्य वाटला तर मी तो कायम ठेवेन; न पटला तर सोडेन व दुसरा पटलेला स्वीकारेन किंवा धर्महिन राहिन. खरे म्हणजे असेच व्हायला हवे. आधुनिक काळात 'जन्मजात धर्म' हा प्रकार असता कामा नये.

मला वाटते, स्टीव्ह जॉब्स आधुनिक आहे. त्याने 'जन्मजात धर्म' ही संकल्पना नाकारली व त्याला पटलेल्या धर्माचा जाणतेपणी स्वीकार केला. पूर्वजांकडून आलेली उपासना नाकारुन स्वतःला पटलेल्या उपासनेचे स्वातंत्र्य बजावणे ही मोठ्या धैर्याची गोष्ट असते. स्टीव्ह जॉब्स, सुरेश भट, रुपाताई कुलकर्णी आणि मुख्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे धैर्य दाखवले.

स्टीव्ह जॉब्सने माझा धर्म स्वीकारला म्हणून नव्हे, तर त्याला पटलेला धर्म स्वीकारायचे धाडस दाखवले, याचा आनंद व अभिमान वाटायला हवा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Friday, June 1, 2012

व्‍यंगचित्र आणि जाणत्‍यांतील 'व्‍यंग'

Inline image 1

वरील व्‍यंगचित्र पहा. यावरच गेल्‍या महिन्‍यात संसदेत व बाहेरही गदारोळ माजला. राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेच्‍या (NCERT) इयत्‍ता 11 वीच्‍या राज्‍यशास्‍त्र विषयाच्‍या पाठ्यपुस्‍तकातील या व्‍यंगचित्रामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होतो, असा आक्षेप आहे. आधी संसदेच्‍या बाहेर काहींनी हा आक्षेप घेतला व नंतर संसदेत गदारोळ करुन जवळपास एकमुखाने या आक्षेपास पाठिंबा देण्‍यात आला व हे व्‍यंगचित्र हटविण्‍याची तसेच ते पाठ्यपुस्‍तकात कसे घेण्‍यात आले याची चौकशी करुन कारवाई करण्‍याची मागणी करण्‍यात आली. मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्‍बल यांनी सरकारतर्फे हा आक्षेप स्‍वीकारुन माफी मागितली व हे व्‍यंगचित्र असलेली पाठ्यपुस्‍तके रद्द करण्‍यात येतील तसेच या व्‍यंगचित्राचा पाठ्यपुस्‍तकात समावेश कसा काय गेला याची चौकशी करण्‍यासाठी एका स्‍वतंत्र समितीची स्‍थापना करण्‍यात येईल, असे जाहीर केले. या पाठ्यपुस्‍तकाच्‍या रचनेशी सल्‍लागार म्‍हणून संबंधित असलेल्‍या योगेंद्र यादव व सुहास पळशीकर यांनी आपल्‍या सल्‍लागारपदांचा लगेचच राजीनामा दिला. त्‍यांनी लिहिलेल्‍या पत्रात संसदेच्‍या अधिकाराचा आदर राखून आम्‍ही  आमचे मतस्‍वातंत्र्य बजावत आहोत, असे नमूद करुन संसदेतला गदारोळ लोकशाही प्रक्रियेशी अनुचित व पुरेशा माहितीवर आधारित नसल्‍याचे म्‍हटले आहे. चौकशी समितीला तटस्‍थपणे चौकशी करणे सोयीचे जावे म्‍हणून आम्‍ही राजिनामे देत आहोत, असा खुलासा त्‍यांनी पत्रात केला आहे. या खुलाश्‍यात हे व्‍यंगचित्र असलेले पाठ्यपुस्‍तक 2006 पासून अभ्‍यासक्रमात आहे तसेच राज्‍यशास्‍त्राचे पुस्‍तक कोरडे न वाटता ते सुगम असावे यासाठी व्‍यंगचित्रांचा समावेश असलेल्‍या नव्‍या रचनापद्धतीनुसार ते करण्‍यात आले असून तज्‍ज्ञांनी या पद्धतीचे कौतुक केलेले आहे, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. 9 वीपासूनच घटना निर्मिती व त्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान याबाबतची माहिती असल्‍याने 11 वीला आलेल्‍या विद्यार्थ्‍यांना या व्‍यंगचित्राचा अर्थ कळतो, असा दावाही पत्रात करण्‍यात आला आहे. वादग्रस्‍त व्‍यंगचित्र हे आताचे नसून 1949 साली घटनासमितीचे काम चालू असताना प्रसिद्ध झालेले असून पं. जवाहरलाल नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी पाहिलेले (तरीही आक्षेप न घेतलेले) आहे. पद्मश्री, पद्मभूषण इ. सर्व पद्म पुरस्‍कार मिळालेले नामांकित व्‍यंगचित्रकार शंकर पिल्‍लई यांनी ते काढलेले आहे. पत्रात याही बाबींचा संदर्भ आहे.
संसदेतील गदारोळ, सरकारची माफी व यादव-पळशीकरांचे पत्र यानंतरही पळशीकरांच्‍या कार्यालयावर पुण्‍यात आंबेडकरी समूहातील युवकांकडून हल्‍ला करण्‍यात आला. अन्‍य तसेच आंबेडकरी चळवळीतीलही अनेक नामवंतांकडून या हल्‍ल्याचा निषेध करण्‍यात आला. आंबेडकरी समूहातून हल्‍ल्‍याचा जरी निषेध झाला, तरी यादव-पळशीकरांच्‍या मताशी असहमती दर्शवून हे व्‍यंगचित्र बाबासाहेबांचा अवमान करत असल्‍याने ते पाठ्यपुस्‍तकातून काढणेच योग्‍य असल्‍याची भूमिका तीव्रतेने मांडली गेली. योगेंद्र यादव व सुहास पळशीकर हे पुरोगामी वर्तुळातले व बाबासाहेबांबद्दल नितांत आदर असलेले म्‍हणूनच ओळखले जातात.
हा घटनाक्रम पाहिल्‍यावर आता पुन्‍हा व्‍यंगचित्राकडे वळू.
व्‍यंगचित्रात घटना म्‍हणजेच घटना तयार करण्‍याची प्रक्रिया किंवा समिती ही गोगलगाय, घटना मसुदा समितीचे प्रमुख या नात्‍याने हाती चाबूक घेऊन त्‍याचे सारथ्‍य करणारे गोगलगायीवर बसलेले बाबासाहेब, आपल्‍या आकांक्षांच्‍या पूर्ततेचा हा दस्‍तावेज कधी पूर्ण होतो आहे, हे मोठ्या अपेक्षेने पाहणारी भारतीय जनता व त्‍यांच्‍या या आकांक्षा तसेच स्‍वतंत्र भारताच्‍या उभारणीची मदार सांभाळणा-या पंतप्रधान पं. नेहरुंचे या गोगलगायीवर आसूड फटकारणे इतक्‍या बाबी दिसतात. नेहरुंचा चाबूक बाबासाहेबांवर उगारलेला आहे व म्‍हणून तो बाबासाहेबांचा अवमान आहे, हा गैरसमज हे चित्र पाहिल्‍यावर व नेहरुंची नजर व आसूडाची दिशा पाहिल्‍यावर दूर व्‍हावा. सारथ्‍य करणारे बाबासाहेब पाहिल्‍यावर घटनानिर्मितीचे ते प्रमुख शिल्‍पकार होते, हेही व्‍यंगचित्रकाराने नाकबूल केलेले नाही.
बाबासाहेबांसारख्‍याचे सारथ्‍य, नेहरुंसारखे राष्‍ट्रप्रमुख असतानाही संविधान तयार होण्‍यास विलंब होतो आहे, ह्या व्‍यंगचित्रकाराच्‍या टीकेत तथ्‍य आहे का यावर मतभेद होऊ शकतो. घटना समितीतील चर्चांची व्‍याप्‍ती टाळता येणे शक्‍य नव्‍हते. भारतासारख्‍या खंडप्राय देशातील हितसंबंधांची विविधता आवाक्‍यात घेण्‍यासाठी ते आवश्‍यकच होते. तथापि, प्रत्‍यक्ष मसुदा तयार करणा-या समितीतील अनेक सदस्‍यांची मात्र विविध कारणांनी अनुपस्थिती व अपेक्षित सहकार्य बाबासाहेबांना मिळाले नाही. हे काम बाबासाहेबांना जवळपास एकहाती पार पाडावे लागले. घटना समितीचे अध्‍यक्ष या नात्‍याने राजेंद्र प्रसादांनी बाबासाहेबांबद्दल संविधान सभेत काढलेले गौरवोद्गार याची साक्ष देतात. इतर अनेक देशांच्‍या घटनेतील कलमांची संख्‍या व निर्मितीचा काळ लक्षात घेता आपली घटना 27 महिन्‍यांत तयार झाली, यात आपल्‍या व्‍याधींची पर्वा न करता अहर्निश झपाटून काम करणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा आहे. तो देशाच्‍या तत्‍कालीन धुरिणांनाही मान्‍य आहे.
प्रश्‍न आहे तो तरीही बाबासाहेबांना गोगलगायीवर अशारीतीने बसलेले दाखवावे का ? आज सार्वजनिक जीवनातील कोणाही व्‍यक्‍तीबद्दल असे व्‍यंगचित्र काढले जाते. 1949 साली बाबासाहेब सार्वजनिक जीवनात होते. त्‍यांचे असे चित्र काढणे यात वावगे काहीच नव्‍हते. व्‍यंगचित्रकार शंकर यांनी असे करुन बाबासाहेबांचा अवमान मुळीच केलेला नाही. म्‍हणूनच बाबासाहेबांनी किंवा नेहरुंनी त्‍यास आक्षेप घेतलेला नाही. मग आज या चित्राने बाबासाहेबांचा अवमान कसा होतो ? तत्‍त्‍वदृष्‍ट्या 'होत नाही' असेच उत्‍त्‍ार द्यावे लागेल. पण तत्‍त्‍व काळाच्‍या संदर्भात पाहावे लागते. जन्‍माने दलित असलेल्‍या कांचा इलय्या या विचारवंताने या कार्टून वादाबद्दल बोलताना 'बाबासाहेब हे आता फक्‍त घटनेचे शिल्‍पकार नाहीत, तर दलित जनतेचे ते दैवत बनले आहेत' असे जे म्‍हटले आहे, ते बरोबरच आहे. आपल्‍या दैवताला अशारीतीने व्‍यंगचित्रात गोगलगायीवर बसलेले बघणे, हे सामान्‍य दलित जनतेला अवमानकारक वाटणे अगदी स्‍वाभाविक आहे. तिच्‍या भावनांवर तो आघात असतो. अशा भावनिक अवस्‍थेत 'विवेक' काम करत नाही. जिच्‍या भावना दुखावतात, अशी जनता मग कायदा-सुव्‍यवस्‍थेला तसेच ते कृत्‍य करणा-यांच्‍या पुरोगामी इतिहासालाही जुमानत नाही. पळशीकरांच्‍या कार्यालयावर हल्‍ला तसेच व्‍यंगचित्राच्‍या जागोजाग होळ्या म्‍हणूनच झाल्‍या. जनतेला पुढे नेण्‍यास 49 सालच्‍या व्‍यंगचित्राचा आज पुनर्मुद्रित आविष्‍कार उपयुक्‍त ठरला नाही. म्‍हणूनच हे व्‍यंगचित्र पाठ्यपुस्‍तकासारख्‍या सार्वजनिक मंचावर आणायला नको होते. आता ते काढण्‍याचा निर्णय झाला, हेही योग्‍यच झाले.
हे योग्‍य झाले, म्‍हणजे 'पुढचे पाऊल' पडले असे नाही. दलित समाजाचे 'भावनिक'पण ही मागास गोष्‍ट आहे. दलित समाजाच्‍या वंचनेचा व अवहेलनेचा इतिहास मानवतेला काळीमा फासणारा आहे. त्‍या अमानुष भोगातून मुक्‍तता करणारा मुक्तिदाता म्‍हणून बाबासाहेबांना दलित जनता मानते. म्‍हणूनच बाबासाहेब तिचे दैवत आहे. या दैवताचे कोणत्‍याही प्रकारे विरुपीकरण हे तिच्‍या अस्मितेचे खच्‍चीकरण तिला वाटते, अशा घटनांनी तिच्‍या अवहेलनेच्‍या गतस्‍मृतींवरची राख उधळली जाऊन अवमानाचे निखारे तप्‍त होतात. हे समजून घ्‍यायलाच हवे. त्‍या मर्यादेतच आविष्‍काराच्‍या लोकशाही स्‍वातंत्र्याचा आविष्‍कार व्‍हायला हवा. अन्‍यथा ती बेजबाबदार अहंता ठरेल. आपल्‍या कृतीने समाज किती शहाणा झाला, किती पुढे गेला यावरच आविष्‍कारस्‍वांतत्र्याचे माप ठरायला हवे. ...तरीही सामान्‍य दलित समाजाची विवेक हरवायला लावणारी व बाबासाहेबांना दैवत करणारी ही मनोवस्‍था मागासच आहे.
या 'मागास'पणाला समजून व्‍यवहार करणे यात पुरोगामीपण आहे. पण त्‍याला शरण जाणे, त्‍याचा आपल्‍या स्‍वार्थासाठी वापर करणे हे निश्चित प्रतिगामीपण आहे. व्‍यंगचित्राचा निषेध करताना जे दलित अथवा पुरोगामी नेते, विचारवंत या मागासपणाची ढाल करत आहेत, ते दलित समाजाला मागे खेचत आहेत. खुद्द बाबासाहेबांनी लोकशाहीला मारक ठरणा-या भारतीयांच्‍या विभूतीपूजेच्‍या मानसिकतेवर टीका करणारे 25 नोव्‍हेंबर 1949 रोजी केलेले घटनासमितीतील शेवटचे भाषण आठवल्‍यास आपण बाबासाहेबांचाच पराभव करतो आहोत, हे ध्‍यानी येईल. त्‍यांचे दैवतीकरण होणे, हे स्‍वाभाविक होते. ते समजूनही घ्‍यायला हवे. पण असे दैवतीकरण मुळीच योग्‍य नाही. या दैवतीकरणातून दलित समाजाला (खरे म्‍हणजे कोणत्‍याही समाजाला) बाहेर काढणे हे जाणत्‍यांचे परमकर्तव्‍य असले पाहिजे. व्‍यंगचित्राविषयीची सामान्‍य दलित जनतेची प्रति‍क्रिया व कांचा इलय्यांसारख्‍या त्‍या समाजातल्‍या विचारवंतांची प्रतिक्रिया यात निश्चित फरक असला पाहिजे. भारतीय जनतेच्‍या भविष्‍याचा फैसला करणा-या संसदेत म्‍हणूनच या व्‍यंगचित्रावरुन असा बेजबाबदार गदारोळ होणे गैर व निषेधार्ह आहे. तसेच या गदारोळाला उत्‍तर देताना सपशेल माघार व माफी मागणेही गैर व निषेधार्ह आहे. दोहोंकडून जाणतेपणाची, उन्‍नत करणारी चर्चा होऊन हे व्‍यंगचित्र काढण्‍याचा निर्णय होणे हे संसदेची प्रतिमा उंचावणारे व भारतीय समाजाला अधिक पुढे नेणारे ठरले असते. विरोधक व सत्‍ताधारी या दोहोंनी दलित जनतेच्‍या 'मतांचा'च केवळ विचार केला. तिचे 'मत' घडविण्‍याची संधी नाकारुन बाबासाहेबांच्‍या लोकशाही विवेकवादी विचारसरणीलाच पराभूत करण्‍याचा अश्लाघ्‍य व्‍यवहार संसदेतील तसेच संसदेच्‍या बाहेरील जाणत्‍यांनी केला आहे.
पाठ्यपुस्‍तकातील 'व्‍यंगचित्र' काढले गेले आहे. पण जाणत्‍यांच्‍या या व्‍यंगाचे काय करायचे ?
- सुरेश सावंत

Tuesday, March 27, 2012

कष्टक-यांच्या ‘ख-याखु-या राज्या ’साठीची दिशा व वृत्ती देणारे नागनाथअण्णा

स्‍वातंत्र्यचळवळीच्‍या अखेरच्‍या टप्‍प्यातले जे अखेरचे मोजके सेनानी आज हयात आहेत, त्‍यातले एक बुलंद सेनानी पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्‍णा नायकवडी 22 मार्चला काळाच्‍या पडद्याआड गेले. देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतर स्‍वातंत्र्यसैनिकांपैकी काहीजण प्रचलित राजकारणात सहभागी झाले, तर अनेकजण पुढच्‍या राजकारणाचा बदलता पोत पाहून ‘आम्‍ही लढलो ते यासाठी नव्‍हे’ असे म्‍हणत एकतर निष्क्रिय झाले किंवा एखाद्या समाजसेवी कामात मग्‍न झाले. या दोहोंपेक्षा वेगळा मार्ग निवडणारे जे कोणी अल्‍प होते, त्‍यात नागनाथअण्‍णांचा समावेश होतो. 90 वर्षांच्‍या कृतार्थ आयुष्‍याची सांगता झालेल्‍या अण्‍णांच्‍या या वैशिष्‍ट्याची नोंद घेणे म्‍हणूनच आवश्‍यक आहे.

1922 साली शेतकरी कुटुंबात जन्‍माला आलेल्‍या अण्‍णांचे 7 वीपर्यंतचे शिक्षण वाळव्‍याला, पुढचे शिक्षण आष्‍टा व कोल्‍हापूरच्‍या प्रिन्‍स शिवाजी मराठा बोर्डिंगमधून झाले. इथूनच ते मॅट्रिक झाले. शालेय जीवनातच विद्यार्थ्‍यांना संघटित करणे, सेवादलात सहभागी होणे आदि उपक्रम करणा-या अण्‍णांनी मुंबईला 9 ऑगस्‍ट 42 च्‍या ‘चले जाव’च्‍या भारलेल्‍या वातावरणात जीवनदानी क्रांतिकार्यकर्ता म्‍हणून काम करण्‍याचा निर्णय घेतला. भगतसिंग, बाबू गेनू यांच्‍या बलिदानाचे प्रथमपासूनच आकर्षण असणा-या अण्‍णांनी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासारखी आझाद हिंद फौज उभी करण्‍यासाठी नानकसिंग व मनसासिंग या सुभाषबाबूंच्‍या दोन साथीदारांना पंजाब, दिल्‍लीमधून वाळव्‍याला आणले. क्रांतिसिंह नाना पाटलांच्‍या नेतृत्‍वाखाली वाळवा परिसरात प्रतिसरकारची उभारणी करुन गावगुंड, गुन्‍हेगार यांना जरब बसवली. चळवळीसाठी साधने मिळविण्‍यासाठी गोव्‍यातून हत्‍यारांची आयात, स्‍पेशल ट्रेन लूट, पोलिसांची हत्‍यारे पळवणे, धुळ्याचा साडेपाच लाखांचा खजिना लुटणे या साहसांतही त्‍यांचा पुढाकार होता. 1944 साली विश्‍वासघाताने अटक झाली असता सातारा तुरुंगातून 44 व्‍या दिवशी तटावरुन उडी मारुन त्‍यांनी पलायन केले. 46 साली ब्रिटिश पोलिसांशी आमनेसामने झुंज देताना जवळचे सहकारी किसन अहीर व नानकसिंग धारातीर्थी पडले. उरलेल्‍या सहका-यांसह त्‍यांच्‍या चितेसमोर अण्‍णांनी शपथ घेतली- कष्‍टक-यांचे खरेखुरे स्‍वराज्‍य येईपर्यंत चळवळीची ज्‍योत तेवत ठेवायची. अण्‍णांच्‍या अखेरच्‍या श्‍वासापर्यंत ही ज्‍योत धगधगताना आपल्‍याला दिसते.

देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतरही तेलंगण तसेच निझामविरोधी लढ्यात त्‍यांचा सहभाग राहिला. हत्‍यारे पुरविल्‍याच्‍या आरोपावरुन भारत सरकारचे वॉरंट निघाल्‍याने भूमिगतही व्‍हावे लागले. या काळातच वाळव्‍यात किसन अहीर विद्यालय, हुतात्‍मा नान‍कसिंग वसतिगृहाची त्यांनी स्‍थापना केली. 57 साली संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे ते आमदार झाले, पुढे 85 साली स्‍वतंत्र आमदार म्‍हणून निवडून आले. गोवा मुक्‍ती संग्राम, भूमिहिन शेतमजूर चळवळ, कष्‍टकरी शेतकरी शेतमजूर परिषद, दुष्‍काळी जनावरांचे कॅम्‍प, काळम्‍मावाडी, वारणा-कोयना धरणग्रस्‍तांचा लढा इ. अनेक लढे कष्‍टक-यांचे खरेखुरे स्‍वराज्‍य आणण्‍याच्‍या प्रेरणेने ते अखेरपर्यंत लढत राहिले

स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्रात सहकाराचे पर्व सुरु झाले. ग्रामीण महाराष्‍ट्रात विकासाचा एक क्रम सुरु झाला. पुढे त्‍यातूनच साखरसम्राटही तयार झाले. तथापि, यातल्‍या सहकाराची ताकद नागनाथअण्णांनी ओळखली. आपले क्रांतिकारी, लढाऊ वळण कायम ठेवून अण्‍णांनी या सहकारी चळवळीत एक विलक्षण हस्‍तक्षेप केला. त्‍यांनी हुतात्‍मा किसन अहीर सहकारी साखर कारखाना काढण्‍याचे ठरवले. परिसरातील दोन कारखान्‍यांत विशिष्‍ट अंतर असल्‍याशिवाय नव्‍या कारखान्‍याला परवानगी न मिळण्‍याचा नियम आडवा आला. त्‍यासाठी खूप संघर्ष करावा लागला. कॉ. दत्‍ता देशमुखांनी सहाय्य केले. अंतराऐवजी त्‍या क्षेत्रातली उसाची उपलब्‍धता पाहा, अशी दत्‍तांनी बाजू मांडली. कारखाना मंजूर झाला. अकरा महिन्‍यात कारखाना उभा राहिला.

नागनाथअण्‍णांचे झपाटलेपण ही काय चीज होती, त्‍याचे हा कारखाना म्‍हणजे मूर्तिमंत प्रतीक आहे. साखर उतारा, साखरेचा दर्जा, शेतक-यांना दर तसेच कामगारांना पगार, बोनस, सुखसोयी, ऊस तोडणी कामगारांची काळजी, परिसर विकास चळवळींना सहाय्य इ. बाबतीत केवळ 6 वर्षांत त्‍यांनी चमत्‍कार वाटावा, असे काम केले. ते किती बारकाईने लक्ष देत याचा नमुना म्‍हणून या सूचना पहा- रिकव्‍हरी वाढून साखरेचा दर्जा उत्‍तम मिळण्‍यासाठी ऊसतोड अत्‍यंत काळजीपूर्वक, तळातून घासून कशी होर्इल, याची खबरदारी घेणे, तुटलेला ऊस शेतात जास्‍त वेळ पडू न देणे तसेच गाडीतळावर जास्‍त साठू न देणे वगैरे.

संस्‍थापक म्‍हणून अण्‍णा कारखान्‍याचे अध्‍यक्ष होऊ शकत होते. पण ते सभासदही झाले नाहीत. अध्‍यक्ष होण्‍याचा प्रश्‍नच नव्‍हता. गावमान्‍यतेने गरीब मुलांची कामगार म्‍हणून भरती, गावमान्‍यतेनेच संचालकांची निवड, एका संचालकाला एकदाच निवडणुकीला उभे राहण्‍याची परवानगी, काटकसरीचे, सचोटीचे प्रशासन अशा अनेक विलक्षण वाटाव्‍या अशा गोष्‍टी अण्‍णांनी सुरु केल्‍या. कारखान्‍यामुळे जी संसाधने तयार झाली, त्‍याचा परिसरविकासासाठी उपयोग झालाच; पण अनेक चळवळींना खात्रीचा हात मिळाला. दलित, भटक्‍या, विमुक्‍त जमातींना तर अण्‍णा आपली भावकी मानत. या विभागांवर कोठे अन्‍याय होत असल्‍याची सूचना वाळव्‍याला फोनवर मिळताक्षणी त्‍यांच्‍या मदतीला अण्‍णा धावत असत. पाणी तसेच धरणग्रस्‍तांच्‍या चळवळीला अण्‍णांनी ऊर्जा दिली. साखर कारखान्‍याचा अध्‍यक्ष दलित करणे, खु्द्द वाळव्यात आंतरजातीय विवाह घडवणे हे अण्‍णांनी केले. वाळव्याला महिला परिषद भरवली. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्‍य संमेलन आयोजित केले. याच संमेलनात पुढे आलेल्‍या कल्‍पनेप्रमाणे महाराष्‍ट्रातील पुरोगामी चळवळींचा हक्‍काचा मंच म्‍हणून ‘अमर हुतात्‍मा’ हे साप्‍ताहिक सुरु केले. समग्र परिवर्तनासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वांगांनी भिडणारा चळवळीचा ‘हुतात्‍मा पॅटर्न’ ते तयार करत होते.

कष्‍टक-यांचे खरेखुरे राज्य आणण्‍यासाठी असे सर्वांगांनी भिडावे लागेल, हे तर ते मानतच, पण सर्व कष्‍टकरी एकवटला पाहिजे, ही तर असे राज्‍य आणण्‍याची पूर्वअट आहे, असेच त्‍यांना वाटे. कष्‍टक-यांच्‍या एका विभागाचा लढा लढत असताना ते त्‍या विभागाला त्‍याच्‍या सहोदर कष्‍टकरी विभागाशी जोडून घ्‍यायची जाणीव सतत देत असत. त्याचवेळी आपले काम चोख करुन संपत्‍ती निर्माण करण्‍याचे, विकास करण्‍याचे आवाहन करत असत. अण्‍णांनी राज्‍यभर दौरा काढून सं‍घटित केलेल्‍या 89 सालच्‍या निफाड येथील साखर कामगार परिषदेत साखर कामगारांना उद्देशून ते म्‍हणाले होते, ‘गावाकडे गेल्‍यावर आपल्‍या भागातील कष्‍टक-यांना एकत्र करा. आपल्‍या कारखान्‍यातील गोंधळ थांबवा. कोणाच्‍याही दडपणाला बळी पडू नका. साखर कारखाने उत्‍कृष्‍ट कसे चालतील ते तुम्‍ही पाहायला हवे. संपत्‍ती कष्‍टातून निर्माण होणार आहे. कष्‍टक-यांचे राज्‍य आल्‍यावर जे करु, ते आता करुया. विकास करुया. त्‍याने सरकारवर दबाव आणू. आपले प्रश्‍न आपण सोडवू. अखेर आपले राज्‍य निर्माण करु.’

कष्‍टक-यांच्‍या ‘ख-याखु-या राज्‍या’चे अस्तित्‍व अजूनही दूर असले तरी त्‍यासाठी लढणा-या कार्यकर्त्‍याची दिशा व वृत्‍ती हीच असावी लागेल. दिशा व वृत्‍तीची ही कायमस्‍वरुपी ठेव ठेवून जगाचा निरोप घेतलेल्‍या नागनाथ अण्‍णांच्‍या स्मृतीस अभिवादन.

- सुरेश सावंत (‘दिव्य मराठी, 26 मार्च 2012’)

जोतिबांच्या महाकरुणेचा शोध घेणारे नाटकः ‘सत्यशोधक’


गो.पु. देशपांडे लिखित, पुणे महानगरपालिका सफाई कामगार युनियननिर्मित व अतुल पेठे दिग्‍‍दर्शित ‘सत्‍यशोधक’ नाटकाचे राज्‍यात जोरात प्रयोग चालू आहेत. अतुल पेठे हे प्रयोगशील व धाडसी दिग्‍दर्शक आहेत. त्‍यांची या आधीची नाटके व फिल्‍म्स याच्‍या साक्षीदार आहेत. तेच धाडस याही नाटकाच्‍या निर्मितीत दिसून येते. या नाटकातल्‍या कलावंतांपैकी 70 टक्‍के कलावंत सफाई कामगार आहेत. नाटकात काम करण्‍याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्‍या या कामगारांना ‘कलावंत’ करण्‍यासाठी अतुल पेठेंनी प्रचंड मेहनत घेतली. अर्थात, युनियनच्‍या नेत्‍या कॉ. मुक्‍ता मनोहरांची मोठी साथ त्‍यांना त्‍यासाठी मिळाली. म्‍हणूनच हे नाटक दर्जेदार झाले आहे.

या नाटकाच्‍या निर्मितीमागची भूमिका विशद करताना पेठे म्‍हणतात, ‘महात्‍मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्‍या आचार-विचारांचे आजच्‍या काळात अर्थ लावून पाहण्‍याचा या नाटकात प्रयत्‍न आहे. स्‍त्री-शूद्रातिशूद्र शिक्षण, जातव्‍यवस्‍थेशी लढा, धर्माचा नवा अर्थ, ब्राम्‍हण व ब्राम्‍हण्‍यवाद यातील फरक, सत्‍यशोधक समाज आणि शेतकरी-कामगार लढ्याची सुरुवाता असे विषय या नाटकात हाताळले गेले आहेत. नाटकाचा बाज हा सत्‍यशोधकी जलशाचा असून गाणी, नृत्‍य आणि नाट्य याद्वारे जोतिबा व त्‍यांच्‍या पत्‍नी सावित्रीबाई यांचा जीवनपट कलात्‍मकरीत्‍या उलगडण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.’

18 व्‍या शतकातील जुनाट रुढी व ब्राम्‍हण्‍यवाद यावर जोतिबांनी कठोर प्रहार केले. उक्‍ती, लेखन, अखंड याद्वारेच नाही, तर त्‍या काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर अचंबित वाटावा, असा प्रत्‍यक्ष व्‍यवहार करुन त्‍यांनी हे प्रहार केले. फुले पती-पत्‍नींचे हे कार्य केवळ अजोड आहे. मुलासाठी दुस-या लग्‍नाची वडिलांची सूचना जोतिबांनी तात्‍काळ नाकारलीच. पण मूल होत नाही म्‍हणून याच न्यायाने सावित्रीचे दुसरे लग्‍न केले तर चालेल का, असा खडा सवाल ते वडिलांना करतात. नाटकात हा प्रसंग आहे. ‘बायकोला दुसरा नवरा’ ही कल्‍पना आजही सहन करणे अशक्‍य आहे, हे लक्षात घेता जोति‍बा काळाच्‍या किती पुढे होते, ते ध्‍यानात येते.

उक्‍ती व कृती जोतिबा-सावित्रीबाईंच्‍या बाबतील कायमच अभिन्‍न होती. ब्राम्‍हण स्‍त्रीला पुनर्विवाहाची बंदी असलेल्‍या एकत्र कुटुंब पद्धतीच्‍या त्‍या काळात घरातील विधवा पुरुषी वासनेची बळी ठरत असे. अशाच बळी ठरलेल्‍या काशिबाई या ब्राम्‍हण विधवेचे बाळंतपण आपल्‍या घरी या पती-पत्‍नींनी केले. एवढेच नव्‍हे, तर तथाकथित ‘पापा’तून जन्‍माला आलेले हे मूल जोतिबा-सावित्रीबाईंनी दत्‍तक घेतले. या मुलाचे नाव यशवंत. हाही प्रसंग नाटकात आहे.

याचा पुढचा धागा सांगणे आवश्‍यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्‍या मुलाचे नाव ‘यशवंत’ ठेवून जोतिबांच्‍या विचारांचे आपण वारस असल्‍याचे जाहीर केले. जोतिबांच्‍या मृत्‍युनंतर जन्‍माला आलेल्‍या बाबासाहेबांनी जोतिबांना आपले गुरु मानले. आज आंबेडकरी समुदायात बाबासाहेबांच्‍या तसबिरीच्‍या शेजारी जोतिबांची तसबीर लावली जाते. महाराष्‍ट्राच्‍या पुरोगामी चळवळीत महात्‍मा फुलेंच्‍या विचारांना पुनःस्‍थापित करण्‍याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.

आज जोतिबा व बाबासाहेब या दोहोंना हितसंबंधी मंडळी आपल्‍या सोयीसाठी वापरताना दिसतात. काहींनी ते आपल्‍या जातीचे म्‍हणून त्‍यांच्‍यावर मालकीही प्रस्‍थापित केली आहे. साधेपणाने करावयाचा सत्‍यशोधकी विवाह जोतिबांनी प्रचारला. सत्‍यनारायणाचा पर्दाफाश करुन त्‍यामागचे ब्राम्‍हणांचे कारस्‍थान उघडे पाडले. तथापि, आज जोतिबांच्‍या जातीचे व त्‍यांच्‍या नावाने संघटना चालवणारे मुखंड बिनदिक्‍कत भपकेबाज लग्‍ने व साग्रसंगीत सत्‍यनारायण घालताना दिसतात. परिवर्तनवादी कार्यकर्त्‍यांच्‍यातही एक विभाग या ‘मालकी’ तत्त्‍वाचा बळी झालेला दिसतो. आपल्‍या समाजातल्‍या बदलाचे नेतृत्‍व आपल्‍याच जातीतल्‍याचे असले पाहिजे, याबाबत तो दक्ष असतो. फारतर अन्‍य शोषित जातीसमूहातल्‍या सहका-याला तो सहन करतो. पूर्वाश्रमीच्‍या पुढारलेल्‍या जातीतल्या प्रागतिक कार्यकर्त्‍यांच्‍या सहकार्याबद्दल तर तो सहनशीलही नसतो. काहींच्‍या मनात तर अशांविषयी विखार असतो. या विखाराने कैद मने मग आपल्‍या मुक्तिदात्‍यांनाही संकुचित करतात. बहुजनवादी साहित्‍य-कलेच्‍या प्रांतातही मग त्‍याचेच आविष्‍कार होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा जोतिबा फुले दोघांनीही आपल्‍या हयातीत ब्राम्‍हणी वर्चस्‍वावर कठोर हल्‍ला करत असताना ब्राम्‍हण व ब्राम्‍हण्‍यवाद यातील फरक कटाक्षाने अधोरेखित केला होता. त्‍यांच्‍या या संग्रामात खुद्द ब्राम्‍हण समाजातूनही सहकारी त्‍यांना मिळाले होते. आपल्‍या जातीतल्‍यांचे शिव्‍याशाप, बहिष्‍कार सहन करुन ही मंडळी फुले-आंबेडकरांबरोबर राहिली. ‘सत्‍यशोधक’ नाटकाने याची ठळक नोंद घेतली, हे या नाटकाचे वैशिष्‍टय.

महामानव तोच जो अखिल मानवतेचा कनवाळू असतो. त्‍यांच्‍या मर्यादित आयुष्‍यक्रमात, मर्यादित भौगोलिक-सामाजिक क्षेत्रात त्‍यांना कराव्‍या लागणा-या शस्‍त्रक्रिया या स्‍थान-समाजविशिष्‍टच असतात. परंतु, त्‍यामागचा अवकाश हा व्‍यापक मानवतेचा असतो. अखेर सगळ्या मानवजातीतीतली जळमटे, कुरुपता नाहीशी होऊन ती सुंदर व्‍हावी, हेच त्‍यांचे अंतिम ध्‍येय असते. म्‍हणूनच जोतिबा आपल्‍या अखंडात म्‍हणतात-

ख्रिस्‍त महंमद ब्राम्‍हणांशी|धरावे पोटाशी बंधूपरी|

मानव भावंडे सर्व एक सहा|त्‍याजमध्‍ये आहा तुम्‍ही सर्व|

सांप्रतच्‍या जाणते-अजाणतेपणातून झाकोळलेल्‍या जोतिबांच्‍या ह्या महाकरुणेचा शोध घेऊन ‘सत्‍यशोधक’द्वारे तो उजागर केल्‍याबद्दल नाटकाच्‍या लेखक, दिग्‍दर्शक, निर्माते, कलाकार व अन्‍य सर्व सहका-यांना मनःपूर्वक धन्‍यवाद व शुभेच्‍छा !

- सुरेश सावंत

Friday, March 16, 2012

अर्थसंकल्‍प व अन्‍नसुरक्षा


हा अर्थसंकल्‍प कोणालाच खुश करणारा नाही, असे सर्वसाधारणपणे म्‍हटले जाते आहे. कार्पोरेट व मध्‍यमवर्गाला मिळणा-या सवलतींना काहीसा लगाम बसला आहे. जागतिक व देशांतर्गत आर्थिक वातावरणात असलेला ताण हे जरी याचे कारण असले, तरी सरकारचे आर्थिक धोरण बदलते आहे, असे मुळीच नाही. उत्‍पादक शक्‍तींना मोकळीक देऊन संपत्‍ती वाढेल व या वाढीव संपत्‍तीतील काही भाग झिरपत तळच्‍या वर्गापर्यंत जाईल, ही धारणा तशीच आहे. म्‍हणूनच शिक्षण, आरोग्‍य, पिण्‍याचे पाणी व सांडपाण्‍याची व्‍यवस्‍था यांबाबतच्‍या तरतुदी नेहमीप्रमाणेच जेमतेम आहेत.

यास रेशन, अन्‍न सुरक्षा या बाबींचा अपवाद करावा लागेल. त्‍यांची निश्चित व ठोस नोंद अर्थसंकल्‍पात घेण्‍यात आली आहे. अर्थात, अन्‍न सुरक्षा कायदा होऊ नये आणि झालाच तर तो प्रभावी होऊ नये, अशी खटपट सरकारमधीलच काही शक्‍ती करत होत्‍या, अजूनही करत आहेत. सोनिया गांधींनी व्‍यक्तिशः लावून धरल्‍यामुळे अन्‍न सुरक्षा कायदा सरकारला करावा लागत आहे. साहजिकच ‘राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा विधेयक 2011’ संसदेच्‍या स्‍थायी समितीसमोर असून या कायद्याद्वारे गरीब व दुर्बल विभागांच्‍या अन्‍नसुरक्षेसाठी निश्चित अशी पावले सरकार उचलत आहे’ असे अर्थमंत्र्यांना आपल्‍या भाषणात सांगावे लागले आहे. अर्थमंत्र्यांनी म्‍हटल्‍याप्रमाणे हे विधेयक परिणामकारकरीत्‍या अमलात यावे म्‍हणून रेशन यंत्रणेला ‘आधार’चा आधार दिला जाणार आहे. आधार क्रमांकाची जोड देऊन सबंध रेशन व्‍यवस्‍थेचे संगणकीकरण करण्‍यात येत आहे. हे संगणकीकरण यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

विकासाच्‍या वेगवान गतीत कुपोषितांच्‍या लक्षणीय संख्‍येचे लांच्‍छनही देशाला सोसावे लागते आहे. अलिकडेच या संदर्भातील एका अहवालाचे प्रकाशन करताना ही शरमेची बाब असल्‍याचे सांगून खुद्द पंतप्रधानांनीच याची कबुली दिली होती. या समस्‍येला हाताळण्‍यासाठी कुपोषितांची संख्‍या अधिक असलेल्‍या 200 जिल्‍ह्यांत बहुक्षेत्रीय कार्यक्रम राबवला जाणार असून त्‍याद्वारे पोषणमूल्‍ये, सांडपाण्‍याचा निचरा, पिण्‍याचे पाणी, प्राथमिक आरोग्‍य व्‍यवस्‍था, स्‍त्रीशिक्षण, अन्‍नसुरक्षा आणि ग्राहक संरक्षण यांबाबतच्‍या उप‍क्रमांची सम‍न्‍वयित अंमलबजावणी केली जाणार असल्‍याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे. अंगणवाडी योजनेसाठीच्‍या तरतुदीतही 58 टक्‍क्‍यांनी वाढ करण्‍यात आली आहे. गेल्‍यावर्षी 10,000 कोटी रु.ची ही तरतूद यावर्षी 15,850 कोटी रु. इतकी असणार आहे. मध्‍यान्‍ह भोजन योजनेची परिणामकारकता लक्षात घेऊन तिच्‍या तरतुदीच्‍या रकमेतही वाढ करण्‍यात आली आहे. या बाबी स्‍वागतार्ह आहेत.

‘अनुदाने’ हा अन्‍नसुरक्षेच्‍या अंमलबजावणीशी संबंधित महत्‍वाचा मुद्दा आहे. त्‍यात मूलभूत बदल सरकार करु पाहते आहे. एकतर, जीडीपीच्‍या 2.5 टक्‍के असलेले अनुदान यावर्षी 2 टक्‍क्‍यांवर व क्रमात 1.75 टक्‍क्‍यांवर आणण्‍याचा सरकारचा मानस आहे. स‍बसिडी वाचवण्‍याचा प्रयत्‍न करणे वेगळे व अशी मर्यादा आधीच ठरविणे वेगळे. अशी मर्यादा आ‍धीच निश्चित करणे, ही चिंतेची बाब असली तरी अन्‍नसुरक्षा कायद्यासाठीच्‍या सबसिडीला सरकार हात लावणार नाही, ही आश्‍वासक गोष्‍ट आहे. अनुदानाच्‍या वाढत्‍या प्रमाणाला पेट्रोलियम पदार्थ, खते यांवरील सबसिडी मुख्‍यतः जबाबदार आहे. या पदार्थांवरील सबसिडी ही फक्‍त गरीब वर्गासाठी नसते. किंबहुना गरीब नसलेला वर्गच तिचा अधिक फायदा घेतो. या सबसिडीला लगाम लावणे आवश्‍यकच होते. ते धैर्य सरकार दाखवते आहे, याचे स्‍वागत करायला हवे. स‍बसिडी लाभार्थ्‍यापर्यंत नेमकेपणाने पोहोचावी यासाठी नंदन नीलकेणींच्‍या नेतृत्‍वाखालील टास्‍क फोर्सने सुचविल्‍याप्रमाणे थेट अनुदान देण्‍याची पद्धत अवलंबली जाणार आहे. खतांची सबसिडी शेतक-याला थेट दिली जाणार आहे. घरगुती वापराचा गॅस तसेच केरोसीन यांचे दर बाजारभावाशी सुसंगत करुन सवलतीस पात्र असणा-यांना अनुदानाची रक्‍कम थेट दिली जाणार आहे. सध्‍या त्‍याचे पायलट प्रोजेक्‍ट चालू आहेत. अनुदान थेट दिल्‍याने या वस्‍तूंचा काळाबाजार रोखला जाणार आहे. पात्र लोकांची निवड, वाढत्या महागाईशी सुसंगत अनुदानाच्‍या रकमेत वाढ इ. आव्‍हाने या पद्धतीत जरुर आहेत. तथापि, सरकारच्‍या – पर्यायाने जनतेच्‍या पैश्‍यांचा अपव्‍यय टाळणे व गरजूंना निश्चितपणे त्‍यांचा लाभ मिळणे यासाठी हे पाऊल उचलणे आवश्‍यकच होते. सरकारने हे धाडस दाखवल्‍याबद्दल त्‍याचे अभिनंदनच करावयास हवे.

- सुरेश सावंत