Friday, August 3, 2012
अण्णांचे आंदोलन राजकीय पक्षात परिवर्तीत होणार-एक सुचिन्ह
Thursday, August 2, 2012
रिओची वसुंधरा परिषद, जागतिक पर्यावरण व जीवाश्म इंधन
Tuesday, June 12, 2012
मला आनंद कसला व्हावा - स्टीव्ह जॉब्सने 'माझा' धर्म स्वीकारल्याचा की पटलेला धर्म स्वीकारण्याच्या त्याच्या धाडसाचा ?
'I am proud that I am Buddhist - Steve Jobs'
SMS पाठवणारा मित्र बौद्ध होता.
वाचले आणि मला आनंद झाला. अभिमानही वाटला.
असाच आनंद व अभिमान सुरेश भट व रुपाताई कुलकर्णींनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे कळले तेव्हा झाला होता.
पण आता मी सावध झालो. विचार करु लागलो...मला कसला आनंद झाला ? ...मला कसला अभिमान वाटला?
लक्षात आले - मीही बौद्ध आहे. स्टीव्ह जॉब्ससारख्या जागतिक कीर्तीच्या कर्तृत्ववान व्यक्तीने माझा धर्म स्वीकारला याचा हा आनंद व अभिमान होता.
समजा माझा नसलेला दुसरा धर्म स्टीव्ह जॉब्सने स्वीकारला असता तर माझ्या भावना अशा नसत्या. माझ्या बौद्ध मित्रानेही बहुधा तो SMS पाठवला नसता.
मी अजून विचार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात उपासना स्वातंत्र्य बहाल केले आहे. खरे तर भारतीयांना मिळालेला हा हक्क जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. तो मानवी अधिकारच आहे. उपासना स्वातंत्र्य हे कळत्या वयात विचारपूर्वक उपभोगावयाची बाब आहे. मग माझ्या वडिलांचा धर्म केवळ मी त्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून माझा कसा काय होऊ शकतो ? जाणतेपणी मी विविध धर्मांचा समज घेतला व नंतर माझ्या वडिलांचा धर्म मला योग्य वाटला तर मी तो कायम ठेवेन; न पटला तर सोडेन व दुसरा पटलेला स्वीकारेन किंवा धर्महिन राहिन. खरे म्हणजे असेच व्हायला हवे. आधुनिक काळात 'जन्मजात धर्म' हा प्रकार असता कामा नये.
मला वाटते, स्टीव्ह जॉब्स आधुनिक आहे. त्याने 'जन्मजात धर्म' ही संकल्पना नाकारली व त्याला पटलेल्या धर्माचा जाणतेपणी स्वीकार केला. पूर्वजांकडून आलेली उपासना नाकारुन स्वतःला पटलेल्या उपासनेचे स्वातंत्र्य बजावणे ही मोठ्या धैर्याची गोष्ट असते. स्टीव्ह जॉब्स, सुरेश भट, रुपाताई कुलकर्णी आणि मुख्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे धैर्य दाखवले.
स्टीव्ह जॉब्सने माझा धर्म स्वीकारला म्हणून नव्हे, तर त्याला पटलेला धर्म स्वीकारायचे धाडस दाखवले, याचा आनंद व अभिमान वाटायला हवा.
Friday, June 1, 2012
व्यंगचित्र आणि जाणत्यांतील 'व्यंग'
Tuesday, March 27, 2012
कष्टक-यांच्या ‘ख-याखु-या राज्या ’साठीची दिशा व वृत्ती देणारे नागनाथअण्णा
जोतिबांच्या महाकरुणेचा शोध घेणारे नाटकः ‘सत्यशोधक’

गो.पु. देशपांडे लिखित, पुणे महानगरपालिका सफाई कामगार युनियननिर्मित व अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ नाटकाचे राज्यात जोरात प्रयोग चालू आहेत. अतुल पेठे हे प्रयोगशील व धाडसी दिग्दर्शक आहेत. त्यांची या आधीची नाटके व फिल्म्स याच्या साक्षीदार आहेत. तेच धाडस याही नाटकाच्या निर्मितीत दिसून येते. या नाटकातल्या कलावंतांपैकी 70 टक्के कलावंत सफाई कामगार आहेत. नाटकात काम करण्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या या कामगारांना ‘कलावंत’ करण्यासाठी अतुल पेठेंनी प्रचंड मेहनत घेतली. अर्थात, युनियनच्या नेत्या कॉ. मुक्ता मनोहरांची मोठी साथ त्यांना त्यासाठी मिळाली. म्हणूनच हे नाटक दर्जेदार झाले आहे.
या नाटकाच्या निर्मितीमागची भूमिका विशद करताना पेठे म्हणतात, ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आचार-विचारांचे आजच्या काळात अर्थ लावून पाहण्याचा या नाटकात प्रयत्न आहे. स्त्री-शूद्रातिशूद्र शिक्षण, जातव्यवस्थेशी लढा, धर्माचा नवा अर्थ, ब्राम्हण व ब्राम्हण्यवाद यातील फरक, सत्यशोधक समाज आणि शेतकरी-कामगार लढ्याची सुरुवाता असे विषय या नाटकात हाताळले गेले आहेत. नाटकाचा बाज हा सत्यशोधकी जलशाचा असून गाणी, नृत्य आणि नाट्य याद्वारे जोतिबा व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जीवनपट कलात्मकरीत्या उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे.’
18 व्या शतकातील जुनाट रुढी व ब्राम्हण्यवाद यावर जोतिबांनी कठोर प्रहार केले. उक्ती, लेखन, अखंड याद्वारेच नाही, तर त्या काळाच्या पार्श्वभूमीवर अचंबित वाटावा, असा प्रत्यक्ष व्यवहार करुन त्यांनी हे प्रहार केले. फुले पती-पत्नींचे हे कार्य केवळ अजोड आहे. मुलासाठी दुस-या लग्नाची वडिलांची सूचना जोतिबांनी तात्काळ नाकारलीच. पण मूल होत नाही म्हणून याच न्यायाने सावित्रीचे दुसरे लग्न केले तर चालेल का, असा खडा सवाल ते वडिलांना करतात. नाटकात हा प्रसंग आहे. ‘बायकोला दुसरा नवरा’ ही कल्पना आजही सहन करणे अशक्य आहे, हे लक्षात घेता जोतिबा काळाच्या किती पुढे होते, ते ध्यानात येते.
उक्ती व कृती जोतिबा-सावित्रीबाईंच्या बाबतील कायमच अभिन्न होती. ब्राम्हण स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या त्या काळात घरातील विधवा पुरुषी वासनेची बळी ठरत असे. अशाच बळी ठरलेल्या काशिबाई या ब्राम्हण विधवेचे बाळंतपण आपल्या घरी या पती-पत्नींनी केले. एवढेच नव्हे, तर तथाकथित ‘पापा’तून जन्माला आलेले हे मूल जोतिबा-सावित्रीबाईंनी दत्तक घेतले. या मुलाचे नाव यशवंत. हाही प्रसंग नाटकात आहे.
याचा पुढचा धागा सांगणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचे नाव ‘यशवंत’ ठेवून जोतिबांच्या विचारांचे आपण वारस असल्याचे जाहीर केले. जोतिबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या बाबासाहेबांनी जोतिबांना आपले गुरु मानले. आज आंबेडकरी समुदायात बाबासाहेबांच्या तसबिरीच्या शेजारी जोतिबांची तसबीर लावली जाते. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीत महात्मा फुलेंच्या विचारांना पुनःस्थापित करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.
आज जोतिबा व बाबासाहेब या दोहोंना हितसंबंधी मंडळी आपल्या सोयीसाठी वापरताना दिसतात. काहींनी ते आपल्या जातीचे म्हणून त्यांच्यावर मालकीही प्रस्थापित केली आहे. साधेपणाने करावयाचा सत्यशोधकी विवाह जोतिबांनी प्रचारला. सत्यनारायणाचा पर्दाफाश करुन त्यामागचे ब्राम्हणांचे कारस्थान उघडे पाडले. तथापि, आज जोतिबांच्या जातीचे व त्यांच्या नावाने संघटना चालवणारे मुखंड बिनदिक्कत भपकेबाज लग्ने व साग्रसंगीत सत्यनारायण घालताना दिसतात. परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्यातही एक विभाग या ‘मालकी’ तत्त्वाचा बळी झालेला दिसतो. आपल्या समाजातल्या बदलाचे नेतृत्व आपल्याच जातीतल्याचे असले पाहिजे, याबाबत तो दक्ष असतो. फारतर अन्य शोषित जातीसमूहातल्या सहका-याला तो सहन करतो. पूर्वाश्रमीच्या पुढारलेल्या जातीतल्या प्रागतिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दल तर तो सहनशीलही नसतो. काहींच्या मनात तर अशांविषयी विखार असतो. या विखाराने कैद मने मग आपल्या मुक्तिदात्यांनाही संकुचित करतात. बहुजनवादी साहित्य-कलेच्या प्रांतातही मग त्याचेच आविष्कार होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले दोघांनीही आपल्या हयातीत ब्राम्हणी वर्चस्वावर कठोर हल्ला करत असताना ब्राम्हण व ब्राम्हण्यवाद यातील फरक कटाक्षाने अधोरेखित केला होता. त्यांच्या या संग्रामात खुद्द ब्राम्हण समाजातूनही सहकारी त्यांना मिळाले होते. आपल्या जातीतल्यांचे शिव्याशाप, बहिष्कार सहन करुन ही मंडळी फुले-आंबेडकरांबरोबर राहिली. ‘सत्यशोधक’ नाटकाने याची ठळक नोंद घेतली, हे या नाटकाचे वैशिष्टय.
महामानव तोच जो अखिल मानवतेचा कनवाळू असतो. त्यांच्या मर्यादित आयुष्यक्रमात, मर्यादित भौगोलिक-सामाजिक क्षेत्रात त्यांना कराव्या लागणा-या शस्त्रक्रिया या स्थान-समाजविशिष्टच असतात. परंतु, त्यामागचा अवकाश हा व्यापक मानवतेचा असतो. अखेर सगळ्या मानवजातीतीतली जळमटे, कुरुपता नाहीशी होऊन ती सुंदर व्हावी, हेच त्यांचे अंतिम ध्येय असते. म्हणूनच जोतिबा आपल्या अखंडात म्हणतात-
ख्रिस्त महंमद ब्राम्हणांशी|धरावे पोटाशी बंधूपरी|
मानव भावंडे सर्व एक सहा|त्याजमध्ये आहा तुम्ही सर्व|
सांप्रतच्या जाणते-अजाणतेपणातून झाकोळलेल्या जोतिबांच्या ह्या महाकरुणेचा शोध घेऊन ‘सत्यशोधक’द्वारे तो उजागर केल्याबद्दल नाटकाच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार व अन्य सर्व सहका-यांना मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा !
- सुरेश सावंत
Friday, March 16, 2012
अर्थसंकल्प व अन्नसुरक्षा
हा अर्थसंकल्प कोणालाच खुश करणारा नाही, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते आहे. कार्पोरेट व मध्यमवर्गाला मिळणा-या सवलतींना काहीसा लगाम बसला आहे. जागतिक व देशांतर्गत आर्थिक वातावरणात असलेला ताण हे जरी याचे कारण असले, तरी सरकारचे आर्थिक धोरण बदलते आहे, असे मुळीच नाही. उत्पादक शक्तींना मोकळीक देऊन संपत्ती वाढेल व या वाढीव संपत्तीतील काही भाग झिरपत तळच्या वर्गापर्यंत जाईल, ही धारणा तशीच आहे. म्हणूनच शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व सांडपाण्याची व्यवस्था यांबाबतच्या तरतुदी नेहमीप्रमाणेच जेमतेम आहेत.
यास रेशन, अन्न सुरक्षा या बाबींचा अपवाद करावा लागेल. त्यांची निश्चित व ठोस नोंद अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. अर्थात, अन्न सुरक्षा कायदा होऊ नये आणि झालाच तर तो प्रभावी होऊ नये, अशी खटपट सरकारमधीलच काही शक्ती करत होत्या, अजूनही करत आहेत. सोनिया गांधींनी व्यक्तिशः लावून धरल्यामुळे अन्न सुरक्षा कायदा सरकारला करावा लागत आहे. साहजिकच ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2011’ संसदेच्या स्थायी समितीसमोर असून या कायद्याद्वारे गरीब व दुर्बल विभागांच्या अन्नसुरक्षेसाठी निश्चित अशी पावले सरकार उचलत आहे’ असे अर्थमंत्र्यांना आपल्या भाषणात सांगावे लागले आहे. अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे हे विधेयक परिणामकारकरीत्या अमलात यावे म्हणून रेशन यंत्रणेला ‘आधार’चा आधार दिला जाणार आहे. आधार क्रमांकाची जोड देऊन सबंध रेशन व्यवस्थेचे संगणकीकरण करण्यात येत आहे. हे संगणकीकरण यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
विकासाच्या वेगवान गतीत कुपोषितांच्या लक्षणीय संख्येचे लांच्छनही देशाला सोसावे लागते आहे. अलिकडेच या संदर्भातील एका अहवालाचे प्रकाशन करताना ही शरमेची बाब असल्याचे सांगून खुद्द पंतप्रधानांनीच याची कबुली दिली होती. या समस्येला हाताळण्यासाठी कुपोषितांची संख्या अधिक असलेल्या 200 जिल्ह्यांत बहुक्षेत्रीय कार्यक्रम राबवला जाणार असून त्याद्वारे पोषणमूल्ये, सांडपाण्याचा निचरा, पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य व्यवस्था, स्त्रीशिक्षण, अन्नसुरक्षा आणि ग्राहक संरक्षण यांबाबतच्या उपक्रमांची समन्वयित अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे. अंगणवाडी योजनेसाठीच्या तरतुदीतही 58 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 10,000 कोटी रु.ची ही तरतूद यावर्षी 15,850 कोटी रु. इतकी असणार आहे. मध्यान्ह भोजन योजनेची परिणामकारकता लक्षात घेऊन तिच्या तरतुदीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. या बाबी स्वागतार्ह आहेत.
‘अनुदाने’ हा अन्नसुरक्षेच्या अंमलबजावणीशी संबंधित महत्वाचा मुद्दा आहे. त्यात मूलभूत बदल सरकार करु पाहते आहे. एकतर, जीडीपीच्या 2.5 टक्के असलेले अनुदान यावर्षी 2 टक्क्यांवर व क्रमात 1.75 टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा मानस आहे. सबसिडी वाचवण्याचा प्रयत्न करणे वेगळे व अशी मर्यादा आधीच ठरविणे वेगळे. अशी मर्यादा आधीच निश्चित करणे, ही चिंतेची बाब असली तरी अन्नसुरक्षा कायद्यासाठीच्या सबसिडीला सरकार हात लावणार नाही, ही आश्वासक गोष्ट आहे. अनुदानाच्या वाढत्या प्रमाणाला पेट्रोलियम पदार्थ, खते यांवरील सबसिडी मुख्यतः जबाबदार आहे. या पदार्थांवरील सबसिडी ही फक्त गरीब वर्गासाठी नसते. किंबहुना गरीब नसलेला वर्गच तिचा अधिक फायदा घेतो. या सबसिडीला लगाम लावणे आवश्यकच होते. ते धैर्य सरकार दाखवते आहे, याचे स्वागत करायला हवे. सबसिडी लाभार्थ्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचावी यासाठी नंदन नीलकेणींच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने सुचविल्याप्रमाणे थेट अनुदान देण्याची पद्धत अवलंबली जाणार आहे. खतांची सबसिडी शेतक-याला थेट दिली जाणार आहे. घरगुती वापराचा गॅस तसेच केरोसीन यांचे दर बाजारभावाशी सुसंगत करुन सवलतीस पात्र असणा-यांना अनुदानाची रक्कम थेट दिली जाणार आहे. सध्या त्याचे पायलट प्रोजेक्ट चालू आहेत. अनुदान थेट दिल्याने या वस्तूंचा काळाबाजार रोखला जाणार आहे. पात्र लोकांची निवड, वाढत्या महागाईशी सुसंगत अनुदानाच्या रकमेत वाढ इ. आव्हाने या पद्धतीत जरुर आहेत. तथापि, सरकारच्या – पर्यायाने जनतेच्या पैश्यांचा अपव्यय टाळणे व गरजूंना निश्चितपणे त्यांचा लाभ मिळणे यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यकच होते. सरकारने हे धाडस दाखवल्याबद्दल त्याचे अभिनंदनच करावयास हवे.
- सुरेश सावंत