Monday, July 13, 2015

हवे न्यायाचे (आ)रक्षण




उत्तम आर्थिक ऐपत असलेल्या पालकांनी केवळ ते अनुसूचित जातींच्या गटात मोडतात म्हणून आपल्या मुलांसाठी आरक्षणाचा लाभ घ्यावा का? असे करणे कितपत योग्य आहे?…अशी आमची चर्चा चालली होती. ज्यांच्या घरी ही चर्चा चालली होती, ते कुटुंब बौद्ध होते. मध्यमवर्गीय होते. म्हणजे आज आहे. तीन पिढ्यांची मंडळी घरात आहेत. पहिल्या पिढीने गरिबीचा-वंचनेचा व मुख्य म्हणजे अस्पृश्यतेचा दाहक अनुभव घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने, त्यांनी जागवलेल्या अस्मितेने व खूप परिश्रमाने त्यांनी आपल्या कुटुंबाचा शैक्षणिक व आर्थिक विकास साधला. हे करताना आरक्षण, सवलती व एकूण स्वतंत्र भारतातील विकासक्रमाचा त्यांना खूप उपयोग झाला. मुले उच्चशिक्षित झाली. चांगल्या नोकऱ्यांना लागली. एक मुलगी परदेशीही स्थायिक झाली. या मुलांना जातिभेदाचा अनुभव आलाच नाही असे नाही. पण आई-वडिलांसारखी अस्पृश्यता त्यांनी निश्चित अनुभवली नाही. लहानपणापासून बदलत गेलेले आर्थिक स्तर त्यांनी पाहिले आहेत. तथापि, या मुलांच्या मुलांना म्हणजे या कुटुंबातील तिसऱ्या पातीला अस्पृश्यता व आर्थिक वंचना काहीच ठाऊक नाही. त्यांच्यात व त्यांच्या थरातील अन्य सवर्ण मुलांच्या जगण्यात काहीच फरक नाही. ही मुले ज्या सोसायटीत राहतात, तेथील मुलांना लहानपणी जाती कळण्याची तशी वेळच येत नाही.

तर आमच्या चर्चेत या तिसऱ्या पातीतील मुलीच्या कॉलेजप्रवेशाचा अनुभव आला. या मुलीला गुण काही कमी नव्हते. पण आधीच्या दोन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेत आल्या होत्या. त्यांच्या त्या सवयीने या मुलीच्या प्रवेशाच्या वेळीही जातीचा दाखला लावण्यात आला. आरक्षणाच्या कोट्यामुळे पहिल्या यादीतच तिचे नाव आले. तिच्या बरोबरीने शाळेत शिकत असणाऱ्या, तिच्या आसपास गुण मिळवलेल्या व आता कॉलेजलाही बरोबरीने प्रवेश घेणाऱ्या तिच्या सवर्ण मैत्रिणीचे मात्र पहिल्या यादीत नाव लागले नाही. या दोघी मैत्रिणी बावचळल्या. असे कसे झाले, हे त्यांना काहीच कळेना. आरक्षित जागेवर प्रवेश मिळालेल्या मुलीने आपल्या पालकांना याबाबत विचारले. आता या पालकांचीही अडचण झाली. काय सांगायचे? खरे कारण त्यांना मुलीला अखेर सांगावेच लागले. पण त्यांनी तिला, तू तुझ्या मैत्रिणीला हे कारण सांगू नकोस. मी खेळाडू असल्याने मला त्या कोट्यातून हा प्रवेश मिळाला, असे सांगायला बजावले.

या प्रसंगात, कळत-नकळत जे आरक्षण घेतले गेले, त्यातून न्यायाचे मात्र रक्षण झाले नाही, असेच मला वाटते. आज बौद्ध किंवा अन्य दलित जातींत या कुटुंबातील पहिल्या-दुसऱ्या पिढीतील जीवन वाट्याला येत असलेली मुले बहुसंख्येने आहेत. प्रगत अवस्थेतील वरील मुलीने ही जागा घेतल्याने आजही दुर्बल असलेल्या एका मुलाची त्या जागेवर येण्याची संधी हुकली. बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या पुरस्कर्त्या पालकांनी जाणते-अजाणतेपणी आपल्या समाजाच्या अंतर्गत मात्र न्याय केला नाही, असेच इथे म्हणावे लागेल.

एका युवाशिबिरात ‘सामाजिक न्याय व आरक्षण’ असे सत्र मी घेत होतो. आरक्षणाच्या मुद्द्यावर आल्यावर चर्चा काहीशी तीव्र होऊ लागली. आरक्षणाने गुणवत्ता डावलली जाते, हा मुद्दा एका गटाकडून जोरात मांडला जात होता. चर्चेसाठी म्हणून मी माझ्या अनुभवातले एक उदाहरण समोर ठेवले.

सरकारी मेडिकल कॉलेजला अनुसूचित जातीतील असूनही व गुणवत्तेच्यादृष्टीने खूप चांगले मार्क्स असतानाही त्या वर्गवारीतील मेरिटची कटऑफलाईन पार करणे थोडक्यात हुकल्याने एका विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही. त्याचवेळी खुल्या प्रवर्गातील एका मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यापेक्षा कमी मार्क्स असतानाही एका विनाअनुदानित कॉलेजला प्रवेश मिळाला. त्यासाठी त्याला बिनपावतीचे २० लाख रुपये रोखीने मॅनेजमेंटला द्यावे लागले. हा खुल्या गटातील सवर्ण मुलगा आता डॉक्टर होणार होता. मात्र या मुलापेक्षा अधिक गुण असूनही तो दलित मुलगा डॉक्टर होणार नव्हता. कारण त्याच्याकडे २० लाख रुपये भरण्याची कुवत नव्हती.

हे उदाहरण देऊन मी प्रश्न केला, या उदाहरणात गुणवत्तेचे काय झाले? सरकारी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशांत खुल्या जागा व राखीव जागा यांसाठीच्या गुणांसाठीच्या कटऑफलाईनमधील अंतर आता कमी कमी होत चालले आहे. तरीही तेथे एखाद्या सवर्ण विद्यार्थ्याला प्रवेश न मिळता त्याच्या आसपास गुण असलेल्या दलित विद्यार्थ्याला प्रवेश मिळण्याने आपल्यावर मोठा अन्याय झाला असे आपल्याला वाटते. ही बाब आपल्याला इतकी डाचते की अशा कमी गुणवत्तेच्या डॉक्टरांमुळे उद्या रोग्यांचा जीव धोक्यात येणार ही आपल्याला खात्री वाटू लागते. पण मग २० लाख रुपये भरुन कमी मार्क्सवाले विद्यार्थी डॉक्टर होणार असतात, त्यांच्याबाबत अशी भीती का वाटत नाही? असे पैसे भरुन प्रवेश घेऊ न शकणाऱ्या त्या दलित विद्यार्थ्यावर अन्याय होतो आहे, असे आपल्याला का वाटत नाही?

माझ्या प्रश्नाने ते निरुत्तर झाले. समोरच्या शिबिरार्थींमध्ये अशी भरभक्कम रक्कम भरुन विविध अभ्यासक्रमांना विनाअनुदानित शिक्षणसंस्थांत प्रवेश घेतलेले काही विद्यार्थी होते. त्यांनी निरुत्तर होणे हा माझा उद्देश नव्हता. आरक्षणाच्या प्रश्नाची विविध अंगे संवेदनशीलतेने व गांभीर्याने त्यांनी समजून घ्यावीत, ही अपेक्षा होती. चांगली गोष्ट म्हणजे तशी ती पुढे झालीही.

६-७ वर्षांपूर्वी आयआयटी/आयआयएम सारख्या अतिउच्च शिक्षणक्रमांत ओबीसींसाठी आरक्षण नको, यासाठीचे आंदोलन सुरु होते. आरक्षणाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटना होती- स्टुडंट्स फॉर इक्वॅलिटी. त्यावेळीही हे गुणवत्तेचे वगैरे प्रश्न जोरात होते. आम्ही जात मानत नाही, आमच्या मित्र-मैत्रिणींपैकी कोणाची कोणती जात आहे, हे आम्हाला ठाऊक नसते. अशा आरक्षणाच्या धोरणाने सरकार आमच्यात जातिभेदाचे विष कालवून आमच्यातील समतेची भावना नष्ट करत आहे…असे अनेक मुद्दे ही मुले मांडत होती. समतेच्या(?) रक्षणासाठी तीव्रतेने चाललेल्या या आंदोलनकर्त्यांपैकी काहींशी चर्चेचा प्रसंग आला. त्यांना म्हणालो, “तुम्हा नव्या पिढीतील तरुणांच्या जातिविरोधी भावनांचा मी आदर करतो. तुम्हाला कोणाची जात विचारण्याची-माहिती करुन घेण्याची गरजच नाही, हेही मी समजू शकतो. पण याला थोडा अपवाद करुन तुमच्या शिक्षकवर्गात किती जण कोणत्या जातीचे आहेत, याची माहिती काढलीत तर बरे होईल.” (विद्यार्थ्यांऐवजी शिक्षक घेण्याचे कारण त्यांची संख्या कमी असल्याने अभ्यासाला सोपे जावे.)

त्यांच्यापैकी काहींनी माहिती काढली. अनुसूचित जाती-जमातीच्या आधीपासूनच आरक्षित असलेल्या जागा वगळल्यावर उरलेल्यांमध्ये बहुसंख्येने ब्राम्हण वा तत्सम उच्च जातींचे लोकच होते. त्यावर चर्चा करताना मी म्हणालो, “आज समाजात जाती आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या जातींची जी टक्केवारी समाजात आहे, ती या तुमच्या शिक्षकांमध्येही दिसायला हवी. ती का दिसत नाही? काही विशिष्ट जातींचेच प्राबल्य का दिसते? याच जातींत हुशार लोक असतात, असे समजायचे का? म्हणजे जन्मजात काही जाती हुशार व काही बिनहुशार असे मानावे लागेल. विज्ञान तर तसे मानत नाही. मग असे का? याचा अर्थ काही जातींना आपल्या संस्कृती व समाजव्यवस्थेकडून अधिक संधी मिळाली, तर काही जातींना ती नाकारली गेली. मग आता प्रश्न एवढाच आहे, हे संधीचे विषम प्रमाण बदलायचे कसे? ज्या जातींचे जे प्रमाण समाजात आहे, ते तुमच्या शिक्षकांत, विद्यार्थ्यांत आणायचे कसे? हा न्याय करायचा कसा?”

याला त्यांच्याकडे उत्तर नव्हते. जे बनचुके नाहीत, ज्यांना खरोखर अडल्यासारखे होते, अशांना निरुत्तर करणे, हा माझा उद्देश नसतो, हे आधीच मी स्पष्ट केले आहे. पुढील चर्चेत, यासाठीच जातीआधारित आरक्षणाची गरज असते, ती कायमस्वरुपी नाही, ज्या क्षणी हा न्याय दिसू लागेल त्याक्षणी या आरक्षणाच्या धोरणाचाही फेरविचार सुरु व्हायला हवा इ. बाबींचा समावेश होता.

एक चकवा देणारा मुद्दा नेहमी उपस्थित होतो, तो म्हणजे आर्थिक निकषावर राखीव जागा ठेवण्याचा. एकाच आर्थिक स्तरातील समान गुणवत्ता असलेले वेगवेगळ्या जातीचे उमेदवार मुलाखतीला गेले, तर कोणाची निवड व्हायची शक्यता आहे? या प्रश्नाचे उत्तर ही निवड करणाऱ्यांची जात काय आहे, यावर आजतरी अवलंबून आहे. ‘यातले आपल्यापैकी कोण’ हा मुद्दा प्रभावी ठरत असतो. अशावेळी, म्हणजे जोवर समाजात जातभावना व त्यावर आधारित प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेदभाव केले जात आहेत, तोवर जात हा आरक्षणाचा पाया राहणेच उचित ठरेल. आरक्षणास पात्र जातीतले आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातील लोक वगळण्यासाठी क्रिमी लेयरचा मुद्दा जो ओबीसी आरक्षणात आहे, तो योग्य आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्येही तो यथावकाश यायला हवा. या विभागांत पुढारलेल्यांचे प्रमाण टक्केवारीच्या दृष्टीने आजही अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींतील बौद्धांपैकी काही पुढारलेले लोक पाहून देशातील दलितांच्या स्थितीविषयी अनुमान काढणे बरोबर होणार नाही. २०११ साली सामाजिक, आर्थिक व जातीची गणना देशभर झाली. त्याचे निष्कर्ष अजून यायचे आहेत. ही गणना खूप सदोष झाली हे खरे. पण तिचा काहीएक आधार कोणत्या जातींची प्रगती किती झाली, याचा अंदाज यायला उपयुक्त ठरेल. त्याच्याआधारे सर्वच आरक्षणाचा व त्यांच्या निकषांचा फेरआढावा घेणे शक्य होणार आहे.

आरक्षणाच्या धोरणाने मागासलेल्या विभागांतल्या काहींना पुढे यायला एका मर्यादेपर्यंत निश्चित मदत झाली. पण आता वेगाने बदलत चाललेल्या आर्थिक धोरणांनी आरक्षण अधिकाधिक निष्फळ ठरत आहे. सरकारी नोकऱ्या तसेच सरकारी वा अनुदानित शिक्षणसंस्था यांच्या संख्येत वेगाने होत असलेल्या घसरणीमुळे आरक्षण हे आता प्रतीकात्मकच ठरण्याची शक्यता आहे. आज सामाजिक-आर्थिक न्यायासाठी आरक्षण याऐवजी आपापला संकुचित राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजविभागांची मोर्चेबांधणी होते आहे. त्यापासून जनतेला सावध करायला हवे. सरकारच्या या धोरणांतील न्याय्य समाजनिर्मितीला धोकादायक ठरणाऱ्या बाबींना विरोध करण्यासाठी या धोरणाचा फटका बसणाऱ्या सर्व समाजघटकांचा व्यापक एकजुटीचा लढा संघटित करायला हवा. हाच त्यावरचा परिणामकारक उपाय आहे. सर्व समाजाचे समग्र कल्याण इच्छिणाऱ्या न्यायाच्या रक्षणासाठीचा तो एक मूलभूत मार्ग आहे.

– सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com

(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, जुलै २०१५)

Thursday, June 11, 2015

‘मराठी’ ची चर्चा आणखी एकदा; पुन्हा पुन्हा

‘एक वांद्रे कॉलनी,’ म्हणून कंडक्टरना तिकीट मागितले की ते आणि अन्य सहप्रवाशीही चमत्कारिकपणे आपल्याकडे पाहताहेत असे वाटते. ‘हे घ्या बांद्रा कॉलनी’ म्हणत कंडक्टर मला दुरुस्त करतात. कोणीतरी ‘बँड्रा’ उच्चारुनही तिकीट मागतात. ते मात्र तितकेसे त्यांना चमत्कारिक वाटताना दिसत नाही. गंमत म्हणजे बसचा फलक ‘वांद्रे वसाहत’ असताना हे चालत असते. मी फक्त ‘वांद्रे’ म्हणत असतो. ‘वसाहत’ म्हणत नाही. ‘कॉलनी’ असेच म्हणतो. कंडक्टरना ‘कंडक्टर’ किंवा ‘मास्तर’ म्हणतो. ‘वाहक’ म्हणत नाही. ड्रायव्हरना तर ‘चालक’ म्हणण्याची मला हिंमतच होत नाही.

तरीही माझा हा किमान मराठीचा आग्रह जवळच्यांना जास्तीचा वाटतो. बांद्रा किंवा बँड्रा म्हटल्याने काय फरक पडतो, असे त्यांना वाटते. मराठीत ज्या शब्दाचा जो उच्चार असेल, तोच उच्चारला जायला हवा, हा साधा आग्रह माझा असतो.

पण या साध्या उच्चारांच्या नेटकेपणावर मराठीचे भवितव्य अवलंबून आहे का?

खरे म्हणजे नाही. भाषा ही विकसित होत असते. जसे नद्यांचे संगम होतात, तसेच भोवताली बोलल्या जाणाऱ्या भाषांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. नवे शब्द, नवे उच्चार परस्परांत मिसळत असतात. आजची मराठी ही चक्रधरांची किंवा ज्ञानेश्वरांची नाही. शिवाजी महाराजांचीही नाही. महाराजांच्या काळातील मराठीत सुलतानी राजवटीच्या अमलामुळे कितीतरी फारसी शब्द मिसळले गेले. हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, तपशील हे मूळ फारसी शब्द असल्याचे कोणाला सांगूनही पटणार नाही, इतके ते आज मराठीत रुळले आहेत. उच्चारांच्या सुलभीकरणाच्या प्रवृत्तीनेही शब्द बदलतात. चंद्रकांतला ‘चंदर’ म्हणून तर सुरेशला ‘सुरेस’ म्हणून हाक मारणे हे आमच्या गावी आजही चालते. मी शाळेत सुरुवातीला ‘सुरेस’ असेच नाव सांगत असे. आमच्या बाईंनी ते दुरुस्त केल्यावर मग ‘मीलन’मधल्या सुनीलदत्तच्या ‘अरे बाबा, शोर नहीं सोर’ चालीवर मी ‘सुरेस नाही, सुरेश..’, ‘..स नाही श..श..’ असे मला हाक मारणाऱ्यांना दुरुस्त करु लागलो.

शब्द ही ध्वनिचिन्हे आहेत. हे शब्द उच्चारल्यावर त्याचा काही एक अर्थ ऐकणाऱ्याला लागतो. तोच महत्वाचा असतो. स किंवा श याला स्वतःचे मूल्य काही नसते. पाली भाषेतील ‘सरणं’ व संस्कृतमधील ‘शरणं’ यांचा अर्थ एकच. काही वेळा एकाच शब्दाचे दोन भाषांतील अर्थ वेगळे असू शकतात. लिंग वेगळे असू शकते. मराठीत ‘व्यक्ती’ स्त्रीलिंगी तर हिंदीत पुल्लिंगी. अलिकडे मराठीतही अनेकजण ‘मला एक व्यक्ती भेटला’ असे बोलू लागले आहेत. माझ्यासमोर असे बोलणाऱ्यांना मी दुरुस्त करायचा आधी प्रयत्न करत असे. आता तो सोडून दिला आहे. या लिंगबदलाने अर्थात काही फरक पडत नसतो. उत्तरप्रदेशातील हिंदीत ‘दुकान’ स्त्रीलिंगी, तर छत्तीसगडी हिंदीत ‘पुल्लिंगी’ उच्चारले जाते.

मुद्दा असा, हे बदल, हे स्वीकार हे मूळ भाषेत सहजासहजी त्याचे प्रत्यय लावून स्वीकारले जातात, तेव्हा प्रश्न नसतो. ‘ड्रायव्हरने गाडी साईडला घेतली’ यात ने, ला प्रत्ययांमुळे ड्रायव्हर, साईड हे शब्द मराठीत सामावले जातात. जगातल्या सगळ्याच भाषा अशा बदलत असतात. जिचा व्यवहारात अधिक वापर होतो, जितक्या विविध क्षेत्रातले लोक तिचा वापर करतात, तितकी ती अधिक समृद्ध होत जाते. इंग्रजी त्यामुळेच समृद्ध होत गेली आहे.

मग माझा बांद्रा-बँड्राला विरोध का? मी अचूकवादी नाही. माझा शब्दांना विरोध नाही. अन्य भाषकांनी तसे ते उच्चारण्यासही माझी हरकत नाही. वास्तविक मराठी माणसांनीही उच्चारण्यास हरकत असणार नाही. पण आज हे उच्चार करणारी मराठी माणसे वांद्रे, बांद्रा, बँड्रा असा तिन्हींचा सहज एकाच प्रतिष्ठेने उच्चार करत नाहीत, तर ‘वांद्रे’ म्हणणे त्यांना कमीपणाचे वाटते व इतर दोन त्यांना प्रतिष्ठितपणाचे वाटते. माझा आक्षेप याला आहे. बहुजनसमाजातील खास मराठी घरातील बीडीडी चाळीतील मुले कॉलेजमध्ये गेल्यावर कोठे राहता असे विचारल्यावर ‘मी बीडीडी ‘चॉल’ मध्ये राहतो’ असे सांगू लागतात. कारण त्यांचे इंग्रजी माध्यमातून आलेले अमराठी सहाध्यायी तसा उच्चार करत असतात. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेत आपल्यापेक्षा पुढारलेला समूह जी भाषा बोलतो, ती प्रतिष्ठित मानली जाते. त्यांनी आपल्या भाषेची मोडतोड केली तरी ते आपल्याला खुपत नाही. उलट ती तोडफोडच आपण शिरावर घेऊन चालू लागतो. 

एका जोशी नावाच्या मुलीने शिंदे नावाच्या मुलीची फेसबुकवरील एक शब्द लिहितानाची चूक जाहीरपणे व कटाक्षाने काढली. तिने नोंदवले- अगं ‘विशिष्ठ’ नाही ‘विशिष्ट’. तिने ‘ट’ वर जोर देताना ‘ही बहुजन समाजातली ‘आनिपानी’वाली माणसं, यांना धड मराठी शुद्ध बोलता येत नाही.’ असे काहीतरी तिचे स्वगत चालू असावे, असे माझ्या मनात आले. अशा अनेक मराठी जोशी ‘अशोक’चा ‘अशोका’, ‘सिद्धार्थ’चा ‘सिद्धार्था’ असा उच्चार करताना सेमिनारमध्ये मला आढळतात. त्यांना ते चुकीचे किंवा ‘अशुद्ध’वाटत नाही. कारण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेत त्यांच्यापेक्षा वरचढ असणारे इंग्रजी भाषक इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे तसाच उच्चार करत असतात. ‘गांधी मला भेटला’तील वसंत गुर्जरांच्या भाषेला अश्लील म्हणताना यांच्या आपसातील इंग्रजी संवादात मात्र दर चार वाक्यांनंतर ‘Fuck’ शब्द येत असतो.

माझ्या मनावर लहानपणी ‘सुरेस’ ला प्रतिष्ठा नाही, एवढेच नव्हे, तर ते मागासलेपणाचे, अडाणीपणाचे आहे असेच बिंबले गेले. कारण असा उच्चार करणारे आमचे लोक हे जातीने खालचे, संपत्ती-सत्तेपासून वंचित होते. ते अप्रतिष्ठित होते. माझ्या बाई (ज्या खूप चांगल्या, प्रेमळ व आमच्याविषयी आत्मीयता असणाऱ्या असल्या तरी) या निकषांवर वरच्या होत्या. त्यांचे अनुकरण हेच प्रतिष्ठा मिळवायचे, प्रगती करण्याचे गमक मी मानू लागलो. शक्यतो आई-वडिलांनी शाळेत येऊ नये, बाईंशी ‘अशुद्ध’ बोलून आपली इज्जत घालवू नये, असेच वाटायचे. आम्ही कोकणी ‘ळ’चा उच्चार ‘ल’ असा करत असू. माझा एक मामेभाऊ शुद्ध बोलण्याच्या प्रयत्नात सगळे ‘ल’ ‘ळ’ असेच उच्चारायचा. वकिलालाही ‘वकिळ’ असेच म्हणायचा. मी मात्र ब्राम्हणी (चित्पावनी) मराठी (जी आज प्रमाण मराठी भाषा मानली जाते) आत्मसात केली. अगदी ‘श’ व ‘ष’ यातील उच्चारभेदांसहित. सगळ्या पारंपरिक शिव्या टाकून दिल्या. अगदी मनातही उच्चारत नाही. या शुद्ध-अशुद्धच्या फेऱ्यातून मी आज बाहेर असलो, तरी माझी भाषा प्रमाण मराठीच राहिली. माझी व्यक्त होण्याची, सांस्कृतिक व्यवहाराची भाषा आज तीच आहे. केवळ विद्रोहासाठी म्हणून माझी मूळ भाषा वापरणे, हे आता कृत्रिम असणार आहे.

भाषा ‘शुद्ध’ नसते. ती ‘प्रमाण’ असू शकते. अनेक बोली बोलणाऱ्या समूहांचा प्रादेशिक व्यवहार होण्यासाठीची ती गरज असते. बोलीतून प्रमाणभाषेकडे सरकणे हे शाळेत व्हायला हवे असते. पण या शुद्धतेने गडबड केली. सरसकट प्रमाण भाषा (तीही संस्कृतप्रचुर) स्वार झाली. अशुद्धता ही व्यक्त होणाऱ्याच्या मनात, वृत्तीत असते. ‘रांडच्या’ संबोधनात मायेचा ओलावा असू शकतो, तर बिगरशिवीचे संबोधन ठार कोरडे असू शकते.

एकेकाळच्या प्रमाण मराठीच्या प्रतिष्ठेची जागा आता इंग्रजी घेत आहे. समाजातला प्रमाण मराठीचा आग्रह धरणारा वर्ग आता इंग्रजीकडे सरकला आहे. तिच्या आधारे त्याने नव्या काळातील सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळवली आहे. त्याचेच अनुकरण बहुजन व तथाकथित तळचे समुदाय करु लागले आहेत. त्यातूनच वांद्रेऐवजी बांद्रा-बँड्राला प्रतिष्ठा मिळत आहे.

सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा किंवा सांप्रत अन्य मानकांनी निर्देशित प्रगती आम्ही करत असू तर आपली भाषा टिकली पाहिजे, हा आग्रह का?

यावर खूप तज्ज्ञांनी लिहिले आहे. त्या सगळ्यात मी जात नाही. एकच सांगतो, भाषा ही फक्त संवादाचे माध्यम नसते. ते ती भाषा बोलणाऱ्या समूहाचे सांस्कृतिक संचित असते. त्यात त्या समूहाच्या माणूसपणाच्या विकासाचा इतिहास असतो. त्याचे भावविश्व, त्याची मूल्ये, मानसिक आंदोलने त्यात असतात. त्याच्या जीवनाचे सौंदर्य त्यात असते. लोकगीते, नाटक, कथा इ. साहित्याद्वारा ते सौंदर्य आविष्कृत होत असते. हो, त्या समूहाचे पारंपरिक ज्ञानही त्यात असते. म्हणी, वाक्प्रचारांनी त्या भाषेचे सौंदर्य तर वाढतेच; पण आशयही अधिक प्रभावीपणे व नेमकेपणाने व्यक्त होतो. चळवळीत लगेच यश मिळत नाही, सतत लढावे लागते, हे सांगताना मी ‘पी हळद अन् हो गोरी’ असे होत नसते, अशी म्हण वापरतो. हे ऐकल्यावर लोक हसतात. त्यांना तो मुद्दा बरोबर पोहोचतो. ज्या संस्कृतीत हळदीचा आणि गोरेपणाचा हा संबंध जोडलेला नसतो, त्या संस्कृतीतील भाषेतून हा आशय कसा व्यक्त करणार? ती भाषा बोलणाऱ्या समूहांत दुसरी कोणतीतरी म्हण असू शकते. समजा ती म्हण मला ठाऊक असली व ती मी उच्चारली, तरी समोरचे त्या संस्कृतीशी परिचित नसतील, तर त्यांना तिचा बोध कसा होणार? तिची गंमत कशी कळणार?

परिसरात बोलली जाणारी बोलीभाषा, मग प्रमाण भाषा व नंतर अधिक व्यापक समुदायांशी संवादासाठी इंग्रजी भाषा असाच शैक्षणिक माध्यमाचा क्रम असायला हवा. हा प्रमाण भाषेच्या किंवा इंग्रजीच्या दुस्वासाचा प्रश्न नसतो. त्यासाठी ती भाषा ‘हटाओ’ची मोहीमही घ्यायची नसते. केवळ भौतिक प्रगतीने माणूसपण विकसित होत नाही. तुमच्या माणूसपणाचे झरे तुमच्या मूळ संस्कृतीतूनच वाहत येऊन पुढे विस्तारावे लागतात. मराठी माणसाला हे समजावून सांगावे लागेल. त्याच्या न्यूनगंडाला आवाहन करुन पुन्हा भौतिक बाबींवरच सत्ता प्रस्थापित करायचे आवाहन त्याला केले जाते. यात संधिसाधू राजकारणाचा मोठा भाग असतो, हे तर उघडच असते. हटाव लुंगी-बजाव पुंगी पासून भय्यांना मारहाणीपर्यंतच्या उपक्रमांतून या न्यूनगंडाचे विरेचन झाल्याचा केवळ खोटा दिलासा मिळाला. पण काही काळाने ही नशा उतरल्यावर मराठी माणूस पुन्हा न्यूनगंडाच्या खाईत फेकला गेला. हाच क्रम सध्या चालू आहे. या मराठी माणसाला माणूसपण विकसित करण्यासाठी, जीवनाचे सौंदर्य टिकविण्यासाठी मराठीची जोपासना आवश्यक आहे, हे पटल्याशिवाय हा क्रम थांबणार नाही. हे पटविण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही, हे वारंवार म्हणून झाले. सरकारवर दबाव आणण्यासाठी ते एका बाजूला म्हणतही राहू. पण हे म्हणत असताना समाजातल्या जाणत्यांनी त्यांना शक्य ते प्रयत्न करत राहायला हवेत. ‘अगं अगं म्हशी’ म्हणत लघुदृष्टीच्या या स्वार्थशर्यतीत आपणही धारेला लागणे थांबवावे लागेल. असे थांबून विचार करु लागलो, तर यातून बाहेर निघण्याचे मार्गही दिसू शकतील. अनेक तज्ज्ञ ते सुचवितही आहेत. पण धोक्याचे गांभीर्य समजणे व त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती असणे हे सर्वप्रथम आहे.

- सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com

(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, जून २०१५)

Sunday, May 31, 2015

अंधाराने कडे घातले घराभोवती...

मी ज्या शाळेत शिक्षक होतो, त्या शाळेत माझे ज्येष्ठ सहकारी असलेल्या एका शिक्षकांचा आज संध्याकाळी मला फोन आला. तब्बल २७ वर्षांनी. वर्तमानपत्रातील एका लेखाखालील माझ्या नावावरुन त्यांनी माझा शोध काढला होता. तो सुरेश सावंत मीच ही खात्री पटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आणि अर्थात मलाही.

१९८४ साली वयाच्या १९ व्या वर्षी मी शिक्षक झालो. पाच वर्षांनी ८९ साली वयाच्या २५ व्या वर्षी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. नोकरीत असतानाच मी शिकत होतो. नोकरी सोडली त्याच वर्षी एम. ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो. नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा माझा हा निर्णय नातेवाईक-मित्र, एमएचे प्राध्यापक तसेच शाळेतल्या सहकाऱ्यांपैकी बहुतेकांना न पटलेला होता. घरची आर्थिक स्थिती वाईट. मीच एकमेव कमावता. हे या न पटण्याचे तसे सबळ कारण होते. एक वर्ष विनावेतन रजा घे. नाही जमले तर परत नोकरीत येण्याचा मार्ग खुला राहील, असा सावधानतेचा सल्ला आस्थेने देणारेही यात अनेक होते. पण तो मी मानला नाही. परतीचे दोर कापायचा माझ्या राजकीय गुरुंचा सल्लाच मला योग्य वाटला.

आम्ही बोलत होतो. खूप आठवणी निघाल्या. सध्या त्यांचे काय चाललेय, मी काय करतोय, मुलांचं काय चाललंय, कोण शिक्षक आता कोठे आहेत वगैरे बरेच बोलून झाल्यावर ते म्हणाले, एक विचारु, तू शाळेत जे करायचास, मुलांच्या गराड्यात असायचास, त्यावरुन तुझा पिंड हा आदर्श शिक्षकाचा आहे, असे आम्हाला वाटायचे. आता एवढ्या वर्षांनंतर तुला काय वाटते? तू जो मार्ग पत्करलास त्याने तुला अधिक समाधान दिले की तू शिक्षक राहिला असतास तर अधिक समाधानी झाला असतास?

मी दचकलो. पण उत्तर लगेच दिले. म्हणालो, आयुष्याचे सार्थक म्हणून काही असते. मी जो मार्ग पत्करला, तो आयुष्य सार्थकी लावायचा होता. व्यक्तिगत अभिरुची, आवड यापेक्षा कर्तव्य मोठे समजणाऱ्यांची परंपरा मानणारा मी आहे. त्या सार्थकतेच्या दिशेनेच माझा प्रवास झाला. मी समाधानी आहे. पण, एक कल्पना म्हणून, मला सर्वसाधारण आयुष्य जगायची पुन्हा पहिल्यापासून संधी मिळाली, तर ज्यात मला आनंद मिळेल व समाजालाही उपयुक्त ठरेल, असे काम म्हणून मी शिक्षक होणेच कबूल करेन. तुम्ही म्हणता तसा तोच माझा पिंड आहे. 

काही वेळाने पुढे प्रत्यक्ष भेटायचे ठरवून आमचा फोन थांबला. 

उत्तर देऊन झाले. खरे तेच बोललो. तरीही खपली निघाली ती निघालीच. माझ्या भोवती मुलांचे अन् माझे मुलांभोवती रुंजी घालणे, बागडणे, सहली, रिकाम्या तासाला मुलांनी मला ओढून वर्गावर नेणे, स्नेहसंमेलने, त्यातील कार्यक्रम बसविणे, शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे रमणे इ. कितीतरी आठवणी अंगावर चाल करुन आल्या. इंदिरा संतांच्या या ओळींनी आगंतुकपणे माझ्याभोवती आता फेर धरला आहेः 'अंधाराने कडे घातले घराभोवती, जलधारांनी झडप घातली कौलारांवर, एकाकीपण आले पसरत दिशादिशांतुन...घेरायास्तव'

असो. सकाळपर्यंत थांबेल हे. असे होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
- सुरेश सावंत

Wednesday, May 20, 2015

आम्ही कवीच्या बाजूचे...

आजच्या लोकसत्तेत (२० मे २०१५) प्रसिद्ध झालेली 'गांधी मला भेटला' या कवितेच्या वादाविषयीची आमची भूमिकाः

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या १९८४ सालच्या कवितेवरून १९९४ मध्ये सुरू झालेला वाद आता न्यायालयातही एका वळणावर आलेला असताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य, त्याला मर्यादा घालणारे वर्चस्ववादी राजकारण आणि कलाकृतीचा आशय व दर्जा यांची चर्चा होणे आवश्यक आहे. ती साध्या भाषेत करणारा हा मसुदा...
...............................

'गांधी मला भेटला' या वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या कवितेवरून सध्या न्यायालयीन वाद सुरू आहे. समाजातही तिच्याविषयी चर्चा सुरू आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक संकेत आदी मूल्यांबाबतच्या चर्चा सुरू आहेत. या चच्रेत राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या व सामाजिक सुधारणेच्या महान संग्रामातून विकसित झालेल्या पुरोगामी वारशावर उघड तसेच प्रच्छन्न हल्ले करून त्यांविषयी गोंधळ माजवणे सुरू आहे. या पुरोगामी वारशाचे वारसदार या नात्याने या चच्रेत भाग घेणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटते. त्यादृष्टीने आम्ही काही मुद्दे खाली नोंदवत आहोत :

ही कविता १९८३ सालची असून अशोक शहाणेंच्या प्रास प्रकाशनाने ती पोस्टर पोएट्रीच्या स्वरूपात १९८४ साली प्रसिद्ध केली. १९९४ साली बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या अंकात ती पुनप्र्रकाशित करण्यात आली. बँकेतल्या वरिष्ठांच्या काही गरप्रकारांना उघडकीस आणण्याचा लौकिक असलेले तुळजापूरकर हे या अंकाचे संपादक होते. आधी १० वष्रे ज्या कवितेवर काहीही आक्षेप घेतला गेला नव्हता, त्या कवितेवर या वेळी मात्र आक्षेप घेऊन कवी वसंत गुर्जर व या अंकाचे संपादक तुळजापूरकर यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. गांधीजींसारख्या ऐतिहासिक महान व्यक्तीचा अवमान व अश्लील भाषा या मुद्दय़ाच्या आधारे १९९४ साली दावा दाखल करणारी संघटना होती संघकुळातली पतितपावन संघटना. संपादक म्हणून तुळजापूरकर यांनी आधीच माफी मागितल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुक्त केले असून कवी गुर्जर यांच्यावर मात्र लातूर येथील न्यायालयात खटला चालू राहणार आहे. गुर्जर यांनी माफी मागायला नकार दिला आहे.

या घटनेत कलाकृतीचा दर्जा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि राजकारण हे तिन्ही मुद्दे समाविष्ट आहेत. त्यातील राजकारणाचा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतला पाहिजे. कारण हा खटला दाखल करण्यामागील प्रेरणाच राजकीय आहे. 

पतितपावन संघटनेचे गांधीप्रेम हे पूतनामावशीचे प्रेम आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पतितपावन ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे. आणि हिंदुत्ववादी संघटनांना गांधींबद्दल किती प्रेम आणि आदर वाटतो हे जगजाहीर आहे. पण पतितपावन संघटना असे म्हणू शकते की, 'आमचा गांधींच्या काही भूमिकांना विरोध आहे. पण गांधींबद्दल मात्र आदर आहे.' पण या म्हणण्यातदेखील केवळ चलाखी असणार आहे. हे समजण्यासाठी केवळ एकाच गोष्ट पुरेशी आहे. गांधीहत्येचा, एका खुनी माणसाचा गौरव करणारे 'मी नथुराम बोलतोय' हे नाटक महाराष्ट्रात गेली कित्येक वष्रे जोरात चालू आहे. पण पतितपावन संघटनेने त्यावर बंदी घालण्याची गोष्ट तर सोडाच, साधा निषेधही केलेला नाही. यावरूनच पतितपावन संघटनेचे 'राजकारण' स्पष्ट होते. महात्मा गांधींचा अधिकृत वारसा सांगणाऱ्या विचारवंतांकडून वा संघटनांकडून या कवितेबद्दल आक्षेप घेतले न जाणे व पतितपावन संघटनेने ते घेणे हेही पुरेसे बोलके आहे.

मग या कवितेबद्दल आक्षेप घेण्यामागील पतितपावन संघटनेचे 'राजकारण' काय असेल? ते उघड आहे. त्यांना या निमित्ताने कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणायची आहे. त्यांचा खरा आक्षेप कवितेतील भाषेबद्दल आहे. 'गांधींचा अपमान' हा देखावा आहे. एकदा का सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला हवा तसा निर्णय मिळाला की मग एखादी कलाकृती आमच्या देव-देवतांचा तसेच त्यांना राजकीयदृष्टय़ा सोयीच्या असलेल्या ऐतिहासिक व्यक्तींचा अपमान करते असा मुद्दा उपस्थित करून त्या कलाकृतीवर बंदी घालणे पतितपावनसारख्या संघटनांना शक्य होणार आहे. आज जगात अनेक ठिकाणी मूलतत्त्ववादाला जोर आला आहे. अलीकडच्या इस्लामी राष्ट्रांतील घटना तर त्याचे ठळक उदाहरण आहे. हा मूलतत्त्ववाद येथील बहुसंख्य हिंदू धर्मीयांत रुजवणे, त्यास असहिष्णू बनविणे व प्राचीन काळापासून वैचारिक मतभिन्नतेचे जागरण करत एकत्र नांदणाऱ्या बहुसांस्कृतिक 'भारतीयत्वा'ला कमजोर करणे, अशी ही रणनीती आहे. महाराष्ट्रातील विचारी जनतेने हे समजून घेण्याची गरज आहे.

बंदी हवी कुणाला?

येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे. 'मी नथुराम बोलतोय' या नाटकावर बंदी घालण्याची मागणी जरी कोणी केली तरी आमचा त्या मागणीला पूर्ण विरोध असेल. नथुराम गोडसेंचे विचार आम्हाला अजिबात मान्य नाहीत आणि त्याची कृती आम्हाला घृणास्पद वाटते. पण म्हणून त्याची राजकीय भूमिका मांडण्याच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणे आम्हाला पूर्ण चुकीचे वाटते. हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेऊ या की, महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांना ते िहदुत्ववादाच्या विरोधात असल्यामुळे 'स्यूडो-सेक्युलर' म्हणून हिणवण्यात आले आहे त्यांपकी कोणीही, 'मी नथुराम बोलतोय' या नाटकावर बंदी आणली पाहिजे, असे म्हटलेले नाही. उलट अशी बंदी आणता कामा नये अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे. विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य या गोष्टी अत्यंत मोलाच्या आहेत. त्यांना तडा गेला तर एक सुसंस्कृत लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येण्याच्या आपल्या ध्येयालाच तडा जाऊ शकेल.

समाजातल्या साचले-कुजलेपणावर आपल्या कवितांद्वारे कोरडे ओढणारे संवेदनशील कवी म्हणून वसंत दत्तात्रय गुर्जर परिचित आहेत. त्यांनी या कवितेत गांधीजींच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांचा समाचार उपरोधिक-रूपकात्मक शैलीने घेतला आहे. हा उपरोध प्रभावी व कलात्मकरीत्या व्यक्त करतानाची अपरिहार्यता म्हणून बहुजन समाजात व्यापकरीत्या वापरली जाणारी भाषा कवीने वापरली आहे. तिला अश्लील ठरविले गेल्यास संत तुकारामांपासून नामदेव ढसाळांपर्यंत अनेकांना निकाली काढावे लागेल. कवितेचे अभिन्न अंग म्हणून येणारी ही भाषा, तिचा लहेजा व रूपकात्मता इंग्रजी अनुवादाद्वारे आकलन होणे कठीण आहे. ही कविता समजून घेताना न्यायालयालाही हीच मर्यादा पडली असावी. वास्तविक न्यायालयाने मराठी भाषेचे तज्ज्ञ, साहित्यिक, गांधीवादी विचारवंत अशांचा Amicus curiae (न्यायालयाचे मित्रवकील) म्हणून सल्ला घ्यायला हवा. 

सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आमच्या हाती नाही. पण वृत्तपत्रांतील बातम्यांमधून न्यायालयाचे जे म्हणणे कळते त्यानुसार भाषा, ऐतिहासिक व्यक्तींचा अवमान यादृष्टीने कलाकृतीचे मापन करताना प्रचलित सामाजिक संकेतांचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला आहे. तोही निसरडा आहे. काळ, समाजविभाग, संस्कृती, प्रदेशनिहाय हे संकेत भिन्न असू शकतात. भारतातील हिंदू समाजातच उत्तरेत रावण खलनायक, तर दक्षिणेत तो नायक मानला जातो. असे अनेक बाबतींत संभवते. खुद्द या कवितेबाबत ८३ सालचे सामाजिक संकेत विचारात घेणार की ९४ सालचे? ते ठरवणार कसे? असे प्रश्न उभे राहतात. 

रुपकांचा अन्वयार्थ
 
सर्वसाधारण वैचारिक अभिव्यक्ती व कलात्मक अभिव्यक्ती यातही फरक आहे. वैचारिक अभिव्यक्ती सरळ असते, त्यामुळे तिचा अर्थ स्पष्ट असू शकतो. कलात्मक अभिव्यक्ती ही अशी सरळ नसते. ती अनेकविध पद्धतींची असते. तिचा अर्थ शब्दश: घेण्याने फसगत होऊ शकते. या कवितेत गांधीजी कवीला जिथे भेटतात, तिथे प्रत्यक्ष गांधीजी भेटतात, असे कवीला म्हणायचे नसते. त्याला काही वेगळे सूचित करायचे असते. अशा वेळी कवितेचा-कलेचा अर्थ लावणे कलावंतांवर, त्या क्षेत्रातील समीक्षकांवर सोडणेच उचित ठरते.

सर्वसाधारण समाज त्याचा अर्थ कसा लावतो, हे महत्त्वाचे आहेच. त्या दृष्टीने कलाकारांसहित सर्वानीच विवेकी राहावे, हे म्हणणे निराळे. पण त्यामुळे समाजातील सर्वाना स्पष्टपणे अर्थबोध होईल वा आक्षेपार्ह असणार नाही अशीच कलाकृती तयार करा, असा आदेश कलावंतांना दिला तर कला ही कला राहणारच नाही. समाजात कलेबाबतच्या समजाची प्रौढता असलेले तसेच नसलेलेही असतात. त्यासाठी कलाकृतीतील रुपकांचा अन्वयार्थ लावता येण्याची, त्यातील सौंदर्यस्थळे हेरण्याची, त्यातील संदेश समजण्याची कुवत व कलेबाबतचा उदार दृष्टिकोन आपल्या समाजात वाढायला पाहिजे. तो वाढवण्यासाठी व जोपासण्यासाठी कलावंत, विचारवंत, सामाजिक-राजकीय संघटना तसेच सरकार या सगळ्यांनीच प्रयत्नशील असले पाहिजे. 

आज गांधींचा अपवाद वगळता इतर अनेक इतिहासकालीन आणि आधुनिक काळातील लोकांचे आपण दैवतीकरण केले आहे. त्यांच्या विचारांवरील, कृतीवरील कोणतीही टीका सहन केली जात नाही. अशी टीका करणाऱ्या लोकांना त्याची मोठी, जबर किंमत द्यावी लागू शकते. सुदैवाने महात्मा गांधींसारख्या जगन्मान्यता असलेल्या नेत्याच्या बाबतीत तो धोका नाही. म्हणून आम्ही ही भूमिका घेण्याचे धर्य दाखवू शकतो याची आम्ही प्रामाणिक कबुलीदेखील येथे देत आहोत. जे स्वातंत्र्य आपल्याला महात्मा गांधींबद्दल मिळते तेच स्वातंत्र्य महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या बाबतीत मिळण्याइतका महाराष्ट्र सुसंस्कृत आणि विचारी व्हावा, अशी या निमित्ताने कळकळीची अपेक्षा व्यक्त करतो.

शेवटी पुन्हा एकदा, या प्रकरणातील 'पतितपावन' संघटनेच्या राजकारणाचा निषेध करतो आणि कवी वसंत गुर्जरांच्या आम्ही बाजूने आहोत, हे जाहीर करतो.

-------------------------------------------

शांता गोखले, उल्का महाजन, सुरेश सावंत, मिलिंद मुरुगकर, लोकेश शेवडे, भारती शर्मा, मधुकर डुबे, नीला लिमये  यांनी विचारविनिमयाने हा मसुदा प्रसृत केला आहे.


Saturday, May 16, 2015

'गांधी मला भेटला' च्या वादात भूमिका काय घ्यायची?

गुर्जरांचे मित्र त्यांच्या कवितांविषयी:
त्यांची सर्वांत गाजलेली सर्वश्रेष्ठ कविता म्हणजे अशोक शहाणे यांनी छापलेली, आणि तिच्यावर झालेल्या खटल्यामुळे प्रसिद्धी पावलेली ‘गांधी मला भेटला’. - राजा ढाले (खेळ, 2011)
समकालीन मराठी कवितेत वसंतचं वैशिष्ट्य त्याची भाषा आहे. ती सांकेतिक, रूढ भाषेविरुद्ध जाऊन सभोवारची सर्वसामान्यांची, वरवर सपाट वाटणारी पण खोलवर दडलेल्या दुःखांकडे घेऊन जाण्याचा निर्देश करणारी आहे. ती जेव्हा सामाजिक-राजकीय विसंगतीकडे बोट दाखवते तेव्हाही विद्रोहाची आक्रमकता दूर ठेवून सर्वसामान्यांच्या कवेत असलेला उपहास वापरते. आणि या उपहासाला फक्त स्वगताचंच, स्वतःशी संवाद करण्याचंच रूप असतं. यामुळे ती नारेबाजी- शेरेबाजीतून स्वतःला वाचवते. वसंतची कविता भारतीय लोकशाहीचा गाभा असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेचाच सर्जनशील वापर करते. -चंद्रकांत पाटील (‘पाटीवरच्या टीपा’, साकेत प्रकाशन)
मी:
ढाले-ढसाळ-गुर्जर या वातावरणातच आम्ही घडलो. हे little magazine वाले आमचे त्या काळी हिरो होते. पुढे त्यांची घसरण सुरु झाली. त्याच्याशी मी सहमत नसलो तरी साचलेल्या-सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारलेल्या या मंडळींनी आम्हाला विलक्षण ताकद दिली, हे त्यांचे आमच्या पिढीवरील ऋण मोठे आहे.
मग मी काय भूमिका घ्यायची?
माझी 'बाजू' गुर्जरांची आहे. या कवितेने गांधीजींचा अवमान होतो म्हणून कोर्टात गेलेल्या पतितपावन संघटनेचे गांधीजींविषयीचे प्रेम हे पुतनामाशीचे प्रेम आहे, हेही मला ठाऊक आहे. पण तरीही मला सुस्पष्ट भूमिका घेता येत नाही. यात अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. त्यातील काही असे:
विचार स्वातंत्र्य व कलात्मक स्वातंत्र्य एकच समजायचे का? समाज संकेत व समाजाच्या प्रगल्भतेची अवस्था कलावंताने लक्षात घ्यायची की नाही? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी आज ढोंगबाजी चालू आहे, त्याबद्दल 'आंबेडकर मला भेटला' अशी कविता कोणी लिहिली तर काय होईल? गांधीजींबद्दल हे चालू शकते. कारण त्यांच्या मागे फक्त सरकारी भिंत आहे. खुद्द राजा ढालेंची प्रतिक्रिया काय राहील? नामदेव ढसाळांनी एका कवितेत बाबासाहेबांविषयी गुर्जरांच्या तुलनेत अत्यंत मामुली उल्लेख केले होते. त्यावरुनही गदारोळ झाला होता. कलात्मकता समजण्यासाठीची प्रगल्भता समाजात यावी यासाठी साहित्यिक-कलावंतांचे कला प्रसवण्याव्यतिरिक्त काही प्रयत्न-कार्यक्रम राहणार आहेत का?
...I'm confused.मला भूमिका ठरवायला मदत हवी आहे.
- सुरेश सावंत

केस तर केस; भीमजयंतीला वाजणार २४ बेस


…जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी ‘अत्त दीप भव’ (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, ‘सब्बे सत्ता सुखि होन्तु’ च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे…या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.

१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो.

पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. आपल्या लोकांच्या काय भावना आहेत, हे कळावे, म्हणून तो फोटो पाठवला.’

दुपारीच याचा प्रत्यय आला. कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज जवळ येत गेला तसा अधिकच असह्य होऊ लागला. घराच्या भिंती कंप पावू लागल्या. छातीत धकधक होऊ लागले. घराबाहेर आलो. अर्थातच जयंतीची मिरवणूक होती. मला आलेल्या संदेशासारखेच भल्या मोठ्या स्पीकर्सचे थरावर थर असलेले मोठे ट्रेलरसारखे वाहन अग्रभागी. त्याच्या मागे डीजेच्या तालावर बेधुंद नाचणारे तरुण. ‘आजचा दिवस आमचा आहे’ ही भावना त्यातून ओसंडत होती. मिरवणुकीतले बाकी महिला-पुरुष घोषणा देत होते. पण या घोषणा डीजेच्या आवाजात कुठच्या कुठे हरवून जात होत्या.

काही काळ मिरवणुकीत चाललो. पण आवाज आणि उन्ह अगदीच असह्य व्हायला लागले. मग इतरांच्या नकळत हलकेच बाहेर पडलो. मिरवणूक लांब गेल्यावर आवाजही कमी झाला. अन् मी ‘हुश्श’ केले.

मी आता मध्यमवर्गीय आहे. वस्ती सुटली आहे. नुकतीच पन्नाशीही झाली आहे. उन्हाचा-आवाजाचा त्रास पहिल्यापेक्षा अधिक जाणवू लागला आहे. पण कार्यकर्ता असल्याने तसेच अनेक नातेवाईक तिथेच राहत असल्याने वस्तीशी माझे संबंध तुटलेले नाहीत. पण पूर्वीची हस्तक्षेपाची ताकद आता राहिलेली नाही; क्षीण झालेली आहे म्हणा फारतर. कारण केलेली सूचना अगदीच कोणी अव्हेरत नाही. कधीतरी एखादी अमलातही येते.

आंबेडकरी समूहात हे जे काही बदलते आहे, ते सर्वस्वी त्याचे वैशिष्ट्य नाही. भोवतालच्या समाजात जे वारे वाहते आहे, ते त्याच्याही काना-डोक्यात शिरत आहे. शिवाय काही बाबी खास त्याच्या स्वतःच्याही आहेत. गणपती-दहिहंडी-शिवजयंतीला जर २४ बेस डिजेच्या तालावर लोक बेहोश होत असतील, फटाक्यांची आतषबाजी, रोषणाईचा झगमगाट हेच उत्सवाच्या यशस्वीतेचे मानदंड ठरत असतील; तर मग आंबेडकर जयंतीही त्याच मानदंडांवर साजरी होणार. सगळंच आवाजी-झगमगाटी असेल, तर जयंतीही तशीच असणार. इतर जर कायदा उल्लंघत असतील, तर मग आमच्यावरही होऊ द्या केस, ही बेफिकीरी येते. अजूनही दलित-आंबेडकरी समुदायाच्या वाट्याला अत्याचार, अवमान, दुजाभाव येत असल्याने या बेफिकीरीला विद्रोहाचाही एक आयाम असतो, हे विसरुन चालणार नाही.

पण त्यामुळे हे योग्य ठरत नाही. ते सिगरेट ओढतात-दारु पितात ते चालते; मग मी हे केले तर काय वावगे झाले, हे समर्थन गैर आहे. जे कोणालाच हितावह नाही, ते दुसरा करतो म्हणून आपण करण्याने आपल्याला हितावह ठरत नाही.

हे लिहिताना जुन्या काळी सगळं कसं आदर्श होतं आणि आता सगळं ढासळत चाललं आहे, असा माझा आविर्भाव मुळीच नाही. आवाजाचे-रोषणाईचे तंत्र व आर्थिक क्षमता आजच्याच तेव्हा असत्या तर डीजे व थाटमाट तेव्हाही दिसणे अशक्य नव्हते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर १४ तारीख सुरु झाली की लाऊडस्पीकरचे भोंगे जे ‘उद्धरली कोटी कुळे-भीमा तुझ्या जन्मामुळे’ गायला लागायचे त्याने बिगर आंबेडकरी माणसाची खाडकन झोपच उडायची. ती त्या रात्री तरी पुन्हा लागणे कठीण होते. आमच्या अंगावर रोमांच उभे राहत, ते आम्ही त्या समाजाचे होतो म्हणून. आम्ही कोणी, खास करुन मुले त्या रात्री झोपतच नसू. पताका लावणे, भिंतीवर बाबासाहेबांच्या प्रतिमा रंगवणे, मंडपात पाणी मारणे, फलकावर जयंतीचा कार्यक्रम लिहिणे यात आम्हाला परमानंद मिळायचा. आता ही अनेक कामे पैश्यांनी आऊटसोर्स केली जातात.

फरक पडला आहे, तो प्रेरणांत. विचारांत. जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी ‘अत्त दीप भव’ (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, ‘सब्बे सत्ता सुखि होन्तु’ च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे…या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.

या प्रेरणा, जाणिवा आता आहेत, असे दिसत नाही. किमान सार्वत्रिक तरी नक्की नाहीत. अर्थात आमच्या वेदनांचा अनुभव वा त्यांची तीव्रता आताच्या मुलांमध्ये नाही, हेही कारण आहेच. पण नफा-नुकसानीच्या भाषेत बोलायचे, तर आर्थिक-भौतिक अभावग्रस्ततेत लक्षणीय घट झाली असली तरी जाणिवांचे दारिद्र्य हे खूप मोठे नुकसान आहे. बैलगाडीत बुद्ध-बाबासाहेब-फुल्यांच्या प्रतिमा व लेझिम अशा मिरवणुकांच्या जागी डीजेचा आवाजी, झगमगाटी बदल हे एकवेळ चालू शकेल. पण त्यावेळी होणाऱ्या व्याख्यानमाला आता अपवादानेच होतात. आंबेडकर, गांधी, मार्क्स यांतील मतभेद कोणते, मूर्तिपूजा नाकारणाऱ्या बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांनी स्वीकारण्यामागचे कारण काय, देवाची पूजा आणि बुद्धाची पूजा यातला फरक, अगरबत्ती, मेणबत्ती, फुले यांचे प्रतीकात्मक अर्थ, मंगळसूत्र घालायचे की नाही, कुंकू लावायचे की नाही…अशा चर्चांनी तेव्हा रात्री उजाडायच्या. बोलणारे बोलायचे. बाकीचे रस घेऊन ऐकत असायचे. आताच्या मुलांना हे प्रश्न ग्रासतात, असे दिसत नाही. स्मार्ट फोनवर बाबासाहेबांची पूजा बांधणारे अविवेकी संदेश, फोटो मात्र शेअर होत असतात. विभूतिपूजेच्या विरोधात असलेल्या बाबासाहेबांची ‘गर्व से कहो’चालीवर यथासांग डिजिटल पूजा होत असते. एक जीवनप्रणाली, जीवन व चळवळ उन्नत करण्याचे वैचारिक साधन याअर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे, असे म्हटले होते. आज त्याला व्यवस्थित धर्माचे स्वरुप आले आहे. त्याच्याविषयी थोडे अधिक बोलू.

बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबरला दिली आणि जेमतेम दीड महिन्यात ६ डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्माच्या आचरणाविषयी त्यांना नीट आखणी करायला तसा वेळच मिळाला नाही. काही तयारी त्यांनी आधीपासून केली होती. त्यामुळे किमान ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ सिद्ध झाला. विधिंविषयी वगैरे काही भाषणांत उल्लेख केलेले होते. त्या सगळ्याबाबत बाबासाहेबांच्या नंतरच्या नेत्यांनी एकवाक्यतेने काही ठरवायला हवे होते. राजकीय बाबतीतला त्यांचा कर्मदरिद्रिपणा इथेही दिसतो. धार्मिक संस्था निघाल्या. पण त्याही बव्हंशी राजकीय पंखाखालीच राहिल्या. धार्मिक बाबतीत दिशादिग्दर्शन करणारी आंबेडकरी बौद्धांची मध्यवर्ती मान्यता असलेली एकच एक संस्था नाही.

‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे काही ठिकाणी ग्रंथ लावल्यासारखे ‘पठन’ केले जाते. या ग्रंथाची पारायणे केलेले लोक मला भेटतात. पण या ग्रंथातला नेमका एक भाग वाचायचा विसरतात, तो म्हणजे ‘परिचय’. ग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या या छोटेखानी परिचयात बाबासाहेब बौद्ध धम्माच्या प्रसारात ज्यामुळे अडथळा येतो असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करत नाही. फक्त एकच करतो. तो म्हणजे भिख्खू संघाचा. त्यांच्या काळातील पारंपरिक भिख्खूंचे ऐषारामी राहणे त्यांना खटकत असे. भिख्खूंचे समाजापासून तुटणे हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे एक कारण ते समजत. ते भिख्खूंच्या भूमिकेविषयी साशंक होते. तो एक पूर्णपुरुष असेल तर समाजाला त्याचा काही उपयोग नाही, भिख्खू हा सामान्य माणसाचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असायला हवा, असे ते या परिचयात म्हणतात. त्यांच्या दृष्टीने तो एक पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो उच्चासनावर बसणारा, विधी लावणारा पुरोहित नव्हे. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षासमारंभात महास्थवीर चंद्रमणींच्या हस्ते स्वतः पत्नीसह दीक्षा घेऊन परंपरेशी नाते जोडले. मात्र समोरच्या लाखोंच्या समुदायाला त्यांनी स्वतः दीक्षा दिली. चंद्रमणींच्या हस्तेच समाजाला दीक्षा दिली असती, तर दीक्षा किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी भिख्खूचीच गरज असते, असे समाजाला वाटले असते व एक नवा चिवरधारी पुरोहित तयार झाला असता, असे बाबासाहेबांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणीही उपासक कोणतेही विधी लावू शकतो. त्यासाठी भिख्खूची गरज नाही, हे सूत्र त्यांनी इथे समाजाला दिले. दीक्षा समारंभाला लाखो लोक होते. पण सगळा समाज काही तेथे नव्हता. त्याला कोण दीक्षा देणार? त्यासाठी दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, असे त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी मुंबईच्या कामगार मैदानात झालेल्या दीक्षा समारंभात बॅरिस्टर भंडारेंच्या हस्ते दीक्षा घेतली.

आजही विधी लावण्याचे काम सामान्यांतलाच एकजण विधिकर्ता (बौद्धाचार्य असे चुकीचे नाव त्याला पडले आहे) म्हणून करतो. तथापि, थोडी अर्थसंपन्नता आलेला यजमान यासाठी भिख्खूला पाचारण करण्यात, त्याला उच्चासनावर बसवून, मंतरलेला धागा मनगटात बांधून विधी करण्यात प्रतिष्ठा मानताना दिसतो आहे. त्याचे अनुकरण मग सामान्य आर्थिक कुवतीचाही माणूस करताना आढळतो. बुद्धविचारांचे मार्गदर्शन, प्रवचन, प्रचार-प्रसार याच कामाला पूर्ण वाहून घेण्याऐवजी अशा विधी लावण्याच्या कामांत भिख्खूंचे जथे सामील होताना दिसू लागले आहे. ‘वंदामि भन्ते’तील ज्येष्ठ मित्राला आदरार्थी करावयाच्या संबोधनात आता लीनता येऊ लागलेली आहे. यथावकाश भिख्खूंचे ऐषारामी मठ उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये. लग्न साधेपणाने करावयाचा बाबासाहेबांचा संदेशही उधळला जावू लागला आहे. थाटमाट व प्रतिष्ठेचे सगळे संकेत खास करुन मध्यम व उच्च मध्यमवर्गीय आंबेडकरी समुदायांत रुजायला सुरूवात झाली आहे. बुद्धाने प्रचारासाठी संस्कृतऐवजी पाली ही लोकभाषा निवडली. आज पाली लोकभाषा नाही. तरी विधिची सूक्ते पालीतच म्हटली जातात. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे नाही. पण काहीही कळले नाही तरी पालीत म्हणण्यालाच आज प्रतिष्ठा आहे.

बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीचे भले परिणाम अनुभवणाऱ्या मला हे प्रतिक्रांतीचे संकेत अस्वस्थ करतात. अर्थात, पुढे काय होणार याची केवळ चिंता वाहण्याऐवजी आपल्याला वाटणारा हस्तक्षेप करत राहणे, हेच श्रेयस्कर असते. ते करण्याचा यत्न मी करत असतो. यावेळी १३ एप्रिलला रात्री १२ वा. मला एका वस्तीत पाहुणा म्हणून बोलावले होते. (हल्ली असे बोलावणे कमी झाले आहे.) रात्री १२ च्या ठोक्याला माझ्या हस्ते ध्वजारोहण झाले. बुद्ध-बाबासाहेबांच्या प्रतिमांना हार घातले गेले. नंतर काही काळ फटाक्यांची आतषबाजी. नंतर वंदना. पूजा पाठ. आणि मग माझे भाषण. वर जे लिहिले ते आणि इतर बरेच बोललो. आगामी वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीचे १२५ वे आहे. ते साजरे करण्याकरता शेवटी मी काही कार्यक्रम सुचवला. पहाटे घरी परतलो. दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीतल्या ‘२४ बेसला’ घाबरुन घरी आलो. आणि थोड्याच वेळात रात्रीच्या आयोजकांचा फोन आला. ते म्हणाले- “तुमच्या भाषणावर आम्ही कार्यकर्ते चर्चा करत बसलो होतो. आम्हाला तुमचे पटले. आम्ही दर पौर्णिमेला एक प्रबोधनपर कार्यक्रम ह्या वर्षी नियमतिपणे घ्यायचे ठरवले आहे. तुमचे मार्गदर्शन मात्र लागेल”.

आता माझी जबाबदारी आहे, हे वर्षभराचे कार्यक्रम त्यांना सुचवणे व ते उद्दिष्टानुरुप होतील, यासाठी प्रयत्न करणे. ही जबाबदारी मी आनंदाने पार पाडेन.

– सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com
_____________________________
साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, मे २०१५
(‘बुद्ध आणि….दीक्षा घेतली’ हा परिच्छेद ‘आंदोलन’मधील लेखात समाविष्ट नाही.)

Friday, May 1, 2015

ज्या नात्यात आत्मीयता नसते, ते खात्रीने पवित्र बंधन नव्हे - पं. जवाहरलाल नेहरु

'लग्न हे भारतात पवित्र बंधन, विवाहाअंतर्गत बलात्कार अपराध नाही! - भारत सरकार' या आशयाचे शीर्षक असलेली बातमी ही आज माध्यमांतली 'ताजा खबर' आहे. या बातमीनुसार भारतात लग्न म्हणजे पवित्र संस्कार, बंधन मानले जात असल्याने विवाहाअंतर्गत होणाऱ्या बलात्काराला गुन्हा मानण्यास भारत सरकारने नकार दिला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सरकारतर्फे हे मत व्यक्त केलं आहे.

ही बातमी वाचल्यानंतर आजपासून ५९ वर्षांपूर्वी, १९५५ सालच्या मे महिन्याच्या ५ तारखेला संसदेत दिल्या गेलेल्या पं. जवाहरलाल नेहरुंच्या भाषणाची आठवण झाली. संदर्भ होता हिंदू कोड बिलाचा. हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. प्रतिगामी हिंदुत्ववादी शक्तींचा या बिलाला विरोध होताच, पण कॉँग्रेस अंतर्गतही त्याला एका विचारप्रवाहाचा विरोध होता. त्यामुळे या बिलाच्या बाजूने असलेल्या नेहरुंनाही माघार घ्यावी लागली होती. १९५२ च्या निवडणुकांतील भरभक्कम बहुमताने पं. नेहरुंना मोठी ताकद दिली. या ताकदीच्या जोरावर त्यांनी हे बिल खंडित स्वरुपात संसदेत आणले. यावेळीही त्याला जोरदार विरोध झाला. आज सत्तेत असलेल्या भाजपचे पूर्वसूरी या विरोधात आघाडीवर होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या एन. सी. चटर्जी यांनी आजच्या केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरींचीच भाषा त्यावेळी वापरली होती. हिंदू कोड बिलात हिंदू स्त्रीला देऊ केलेल्या घटस्फोटाच्या अधिकाराला त्यांनी कडाडून विरोध केला. 'विवाह हा पवित्र संस्कार, पवित्र बंधन, पवित्र विधी आहे. त्यामुळे अशा पवित्र संस्काराने जोडलेले नाते तोडण्याचा कायद्याला अधिकार असू शकत नाही' अशी भूमिका त्यांनी संसदेत मांडली. सरकारचे प्रमुख या नात्याने पं. जवाहरलाल नेहरु यांनी या विरोधाचा खणखणीत समाचार घेतला. त्यांच्या त्या भाषणातील ही काही स्वैर अनुवादित विधानेः

‘पती-पत्नीच्या आत्मीय नात्यातच हे पवित्र बंधन असू शकते. ज्या नात्यात आत्मीयता नसते, तिरस्कार असतो, ते नाते चालू ठेवणे म्हणजे जीवन अधिक कटू करणे होय. अशाने त्या नात्याच्या अस्तित्वाचा पायाच डळमळीत होतो. ...हे खात्रीने पवित्र बंधन नव्हे!’

सीता-सावित्रीसारख्या स्त्रियांच्या महान त्यागाची परंपरा, मनू-याज्ञवल्क्य यांच्या वारशाची महती हिंदुत्ववादी विरोधकांकडून संसदेत गायली गेली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नेहरु प्रतिप्रश्न करतात, “सीता-सावित्री होण्याचा उपदेश स्त्रियांनाच का म्हणून? पुरुषांना का नाही राम, सत्यवान बनायला सांगत?”

संस्कृती-परंपरांचा जुना वारसा सांगणाऱ्यांना पंडितजी पुढे बजावतात, “आता काळ बदलला आहे. अर्धी मानवता बंधनात ठेवून खरी लोकशाही आपण आणू शकत नाही.”

बदलत्या काळाचा भविष्यलक्ष्यी वेध घेऊन पुरोगामी पावले टाकणारे नेहरुंच्या नेतृत्वाखालचे ते सरकार आणि आज ५९ वर्षांनंतर अधिक पुढची पावले टाकण्याऐवजी सांस्कृतिक इतिहासाची चाके उलटी फिरवू पाहणारे मोदींच्या नेतृत्वाखालचे हे सरकार!

किती ही भयप्रद विसंगती!

- सुरेश सावंत