Sunday, January 14, 2018

माझी ओळख-माझी घडण

संक्षिप्त परिचयः 


सुरेश सावंत 

जन्‍मः १४ जानेवारी १९६५, मुंबई. 

शिक्षणः एम. ए. (मराठी) 

१९८४ ते १९८९ - शिक्षक म्हणून नोकरी 

१९८९ पासून पूर्णवेळ कार्यकर्ता 

आंबेडकरी तसेच स्त्रिया, कष्टकऱ्यांच्यात काम करणाऱ्या अनेक पुरोगामी संघटना व चळवळींत सहभाग. उदा. प्रागतिक विद्यार्थी संघ, बौद्ध युवा मंच, स्त्री मुक्ती संघटना, रेशनिंग कृती समिती, अन्न अधिकार अभियान, सम्यक संवाद, संविधान संवर्धन समिती इ. 

सहभाग असलेल्या चळवळीसंबंधी तसेच अन्य सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांसंबधी लेखन व भाषणे. 

अक्षर प्रकाशनातर्फे ‘गुंता व उकल’ हा लेखसंग्रह प्रसिद्ध. 

____ 

ईमेलःsawant.suresh@gmail.com ; मोबाईल क्र.9892865937 

ब्लॉगः www.sureshsawant.blogspot.com 

फेसबुक खातेः https://www.facebook.com/suresh.sawant65 

पत्ताः ३०४, कृष्णा अपार्टमेंट, सेक्टर १२ ए, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९. 

_____________


विस्तृत परिचयः 

मुंबईत चेंबूरच्‍या लेबर कॅम्‍पशेजारच्‍या पी.एल. लोखंडे मार्गावरील झोपडपट्टीत बौद्ध कुटुंबात माझा जन्‍म झाला. हा परिसर बाबासाहेब आंबेडकरांच्‍या चळवळीच्‍या काही बालेकिल्‍ल्‍यांपैकी एक. बाबासाहेबांच्‍या इथे सभा झालेल्‍या. दलित पँथरची चळवळ जोरात होती त्‍यावेळी मी ९-१० वर्षांचा असेन. त्‍या झंझावातात आमच्‍या वयाची मुलेही घुसळून निघत होती. 'जयभीम के नारे पे-खून बहे तो बहने दो...' घोषणा सुरु झाल्‍या की रोम न् रोम शहारुन उठायचा. सगळं वातावरणच भारुन टाकणारं होतं. राजा ढालेंच्‍या 'साधने'तील लेखातील राष्‍ट्रध्‍वजासंबंधीच्‍या उल्‍लेखाचा आणि नामदेव ढसाळांच्‍या 'स्‍वातंत्र्य कुठच्‍या गाढवीचं नाव आहे' या कवितेचा इतका व बराच काळ प्रभाव होता, की गवई बंधूंच्या हत्येनंतर मी शाळेत स्‍वातंत्र्य दिनाला काळी फीत लावून गेलो आहे. कितीतरी काळ राष्‍ट्रगीत म्‍हणायला मी नकार देत असे. नवीन समज आल्‍यावर हा प्रकार मी थांबवला. पुढे पँथरच्‍या चिरफळ्या झाल्‍या. प्रारंभ राजा-नामदेवच्‍या वैचारिक भूमिकांतल्‍या मतभेदाने झाला. त्‍या मतभेदालाही एक उंची होती. मात्र मतभेदाची जागा नेत्‍यांच्‍या अहंतांनी, वैयक्तिक महत्‍त्‍वाकांक्षांनी व पुढे स्‍वार्थाने व परिणामी संधिसाधूपणाने घेतल्‍यानंतर आंबेडकरी चळवळीची दारुण वाताहत झाली. मी १५-१६ वर्षांचा होईपर्यंत पँथरची रया पार गेली होती. 

या पार्श्‍वभूमीवर बुद्धाच्‍या 'अत्‍त दीप भव' म्‍हणजेच 'स्‍वयंप्रकाशित व्‍हा', स्‍वतःचा उद्धार स्‍वतःच करा, या तत्‍त्‍वाने 'प्रागतिक विद्यार्थी संघ' या संस्‍थेची १९८० साली स्‍थापना करुन आम्‍ही वस्‍तीत शैक्षणिक उपक्रम सुरु केले. आम्‍हा कार्यकर्त्‍यांत माझ्यासह बहुसंख्‍य १० वीचे तर काहीजण कॉलेजला जाणारे विद्यार्थी होते. यात अल्‍प प्रमाणात बौद्धेतर मुलेही होती. घरात अभ्‍यासाला जागा नाही, वीज नाही, घरात कोणी शिकलेले नाही. यावर उपाय म्‍हणून 'बुद्धविहारात' आम्‍ही एकत्रित अभ्‍यास करत होतो, आमच्‍यापेक्षा कमी इयत्‍तांच्‍या मुलांचे वर्ग घेत होतो. व्‍याख्‍यानमाला आयोजित करत होतो. या परस्‍परसहाय्याच्‍या उपक्रमाने आम्‍ही शिक्षणात बऱ्यापैकी यश संपादन केले. 'फूल होता है पहले बाग का, बाद में डाली का' या कवी नीरज यांच्‍या आमच्‍या हिंदीच्‍या पाठ्यपुस्‍तकातील कवितेच्‍या पंक्‍ती डोळ्यासमोर होत्‍या. व्‍यक्तिगत विकास हा समाजाच्‍या विकासात अंतर्भूत असतो, हे तत्‍त्‍व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, फुले यांच्‍याविषयी जे वाचत-ऐकत होतो, त्‍यातून आमच्‍या मनावर बिंबले होतेच. 

७७ टक्‍के गुणांनी एस.एस.सी. पास झालो. वस्‍तीत पहिला आलो. एवढे गुण मिळविणाराही वस्‍तीत आतापर्यंत मीच होतो. पण पुढे शिकणे अवघड होते. मी लवकर कमवायला लागणे आवश्‍यक होते. वडील व आई दोघेही वयस्‍क. त्‍यात सतत आजारी असायचे. छोटा भाऊ प्राथमिक शाळेत शिकत होता. वडील गिरणी कामगार. आजारपणाने रजेवर होते. पुढच्‍या दीड-दोन वर्षात निवृत्‍त होणार होते. त्‍यांच्‍या रजेच्‍या काळातच दत्‍ता सामंतांचा अजूनही न संपलेला संप सुरु झाला आणि वर्षभरात संपकाळातच ते निवृत्‍त झाले. आता तर घरी कमावणारे कोणीच नव्‍हते. ११ वीला प्रवेश घेतला होता. पण भौ‍तिक-भावनिक अस्‍वस्‍थतेत नियमितपणे कॉलेजला गेलो नाही. नापास झालो. पुढे डी. एड. केले. ती २ वर्षे अनेकांच्‍या, मुख्‍यतः शिक्षकांच्‍या मदतीवर काढली. (हे सर्व शिक्षक उच्‍चवर्णीय होते.) १९ व्‍या वर्षी नोकरीला लागलो. रस्‍त्‍यावर येऊ घातलेले घर थोडक्‍यात वाचले. 

या दरम्यान आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोण देणाऱ्या व आमचे जीवन आमूलाग्र बदलणाऱ्या बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार हीही माझ्या कामाची एक महत्वाची आघाडी राहिली. गावी कोकणात आम्ही ‘बौद्ध युवा मंच‘ या नावाची संघटना केली आणि अंधश्रद्धा व जुनाट रुढींविरुद्ध अनेक मोहिमा घेतल्या. बौद्धांतील प्रस्थापित कर्मठतेविरुद्धही संघर्ष छेडले. 

शिक्षक म्‍हणून आधी पार्ल्‍याला माधवराव भागवत हायस्कूल व नंतर चेंबूरला स्‍वामी मुक्‍तानंद हायस्‍कूल (वसंतराव खानोलकरांची शाळा) येथे नोकरी केली. प्रागति‍क विद्यार्थी संघ, शाळेतील अन्‍य उपक्रम इ. काम चालू असतानाच शाळेतील पर्यवेक्षिका रजनी लिमये यांच्‍यामुळे त्‍यांचे वडील लाल निशाण पक्षाचे कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, माजी शिक्षक आमदार भाऊ फाटक यांच्‍याशी संपर्क आला. त्‍यांच्‍यामुळे स्‍त्री मुक्‍ती संघटनेत व पुढे लाल निशाण पक्षात कार्यरत झालो. 

'संपर्क आला....कार्यरत झालो' या वरील ओळींतला प्रवास सहज नव्‍हता. भाऊ भेटले नसते, तर हा प्रवास बहुधा झालाच नसता. म्‍हणजे कम्‍युनिस्‍ट चळवळीत नसतो आलो. बुद्ध-फुले-आंबेडकरी चळवळीच्‍या परिसरात दीनदुबळ्यांच्‍या उत्‍कर्षासाठी आयुष्‍य वेचणे हे शालेय जीवनातच ठरले होते. त्‍यामुळे त्‍या कामात मी पूर्णवेळ कार्यकर्ता होण्‍याची शक्‍यता होतीच. समाजवादी, गांधीवादी व कम्‍युनिस्‍ट यांपासून सावध राहावे आणि त्‍यातही ते जर ब्राम्‍हण असले तर त्‍यांच्‍या वाऱ्यालाही उभे राहू नये, असा संस्‍कार व सामाजिक दहशतीच्‍या वातावरणात मी वाढलो होतो. आंबेडकरी चळवळीचे होत असलेले पतन व या दहशतीच्‍या अध्‍वर्यूंची नैतिक वाताहत अन्‍य पुरोगामी प्रवाह समजून घेण्‍याची निकड तयार करत होते. तथापि, ही दहशत मोडून त्‍यांच्‍याशी संग करण्‍याइतपत ती निकड तीव्र नव्‍हती. या स्थितीत भाऊंना भेटलो. नवे समजून घेणे; खरे म्‍हणजे अदमास घेणे-तपासणे हा हेतू या भेटीत अधिक होता. ही भेट व पुढील प्रक्रिया रोचक आहे. पण विस्‍तारभयास्‍तव अधिक लिहीत नाही. एवढेच सांगतो, भाऊंनी आधी साने गुरुजी, स्‍वातंत्र्य चळवळ व शेवटी मार्क्‍सवाद सांगितला. मी कोरा नव्‍हतो. काहीएक राजकीय-सामाजिक जाण असलेला, व्‍यवहार करत असलेला कार्यकर्ता होतो. भाऊंच्‍या या अभ्‍यासमंडळांनी मनात अनेक संघर्ष उभे केले. या संघर्षांतून जो समज तयार झाला, त्‍यामुळे माझ्या मूळ आराध्‍यांना - बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांना - धक्‍का तर लागला नाहीच, उलट त्‍यांच्‍या प्रतिमा, त्‍यांचे योगदान माझ्या मनात अधिक रेखीव झाले. त्‍या सर्वांना एक व्‍यापक संदर्भचौकट प्राप्‍त झाली. या विश्‍वाचा कोणीही निर्माता वा नियंता नसून ते विकसित झाले आहे व होत राहणार हा भौति‍कवाद बुद्धामुळे शालेय जीवनातच उमजला होता. परंतु, विरोधविकासवादाची संकल्‍पना, ऐतिहासिक दृष्टिकोण भाऊंनी सांगितलेल्‍या मार्क्‍सवादातून मिळाला. पुढच्‍या सर्व चिंतन, विश्‍लेषण व चळवळीतल्‍या व्‍यवहाराला याचे खूप सहाय्य झाले. आंबेडकरी कार्यकर्त्‍यांच्‍यात, आंबेडकरी वस्‍तीत राहत असताना त्‍याच वस्‍तीत नव्‍या जाणिवेने व डाव्‍या ओळखीने व्‍यवहार करणे हे संघर्षाचे, सोबती-सहकाऱ्यांशी अंतराय तयार करणारे होते. आंबेडकरी चळवळीतून डाव्‍या चळवळीकडे यापूर्वी जे आले त्‍यांचाही कमीअधिक तीव्रतेने हाच अनुभव राहिला आहे. त्‍यांनी जे सहन केले ते मलाही करणे भाग होते. ते मी केले. सोबत्‍यांशी-वस्‍तीशी संपूर्णतः तुटून न जाता तिथेच रुतून राहायला व विस्‍तार पावायला बुद्ध-बाबासाहेबांमुळे मिळालेली व्यवस्‍थाबदलाची जाज्‍ज्‍वल्‍य आकांक्षा, भाऊंकडून मिळालेला नवीन दृष्टिकोण आणि या दरम्‍यानच्‍या माझ्या मनातील सूक्ष्‍मातिसूक्ष्‍म तरंगांना हेरुन त्‍यांचा निरास करणारा भाऊंचा अत्‍यंत संवेदनक्षम प्रतिसाद व आधार मदतनीस ठरला. 

शिक्षक म्‍हणून नोकरी करत असतानाच मी मराठी विषयात बीए व एमए केले. एम.ए.ला प्रथम वर्ग मिळाला. मुंबई विद्यापीठातील माझ्या नामवंत शिक्षकांचा मी राज्‍यात अथवा राज्‍याबाहेरच्‍या विद्यापीठांत-किमानपक्षी महाविद्यालयांत लेक्‍चरर व्‍हावे, असा आग्रह होता. पण तो नम्रपणे नाकारला. चळवळीत पूर्णवेळ काम करायचे होते. याच दरम्‍यान, चळवळीतल्‍या कार्यकर्तीशीच माझा आंतरजातीय (आंतरधर्मीय) विवाह झाला. माझे दलितपण व झोपडपट्टीत राहणे यामुळे विरोध वगैरे नित्‍याचे सोपस्‍कार अर्थातच पार पाडावे लागले. आम्‍ही दोघेही पूर्णवेळ कार्यकर्ते होण्‍याच्‍या लायकीचे होतो, तरीही माझे सामाजिक स्‍थान व इतर काही घटक लक्षात घेता, पूर्णवेळ कार्यकर्तेपण माझ्या वाट्याला आले. लग्‍न झाले तेव्‍हा पत्‍नी शिकत होती. मी पूर्णवेळ कार्यकर्ता झाल्‍यानंतर पुढे दोन वर्षांनी तिने नोकरी सुरु केली. हा दरम्‍यानचा काळ जिकीरीचा होता. घरच्‍यांना, वस्‍तीतल्‍या मित्रांना, नातेवाईकांना हे अजिबात रुचले नव्‍हते. मात्र, भाऊ व भाऊंच्‍या अभ्‍यासमंडळांतून जोडल्‍या गेलेल्‍या माझ्या सहकाऱ्यांच्‍या भक्‍कम आधाराने हा काळही तरुन गेला. आमच्‍या या सहकाऱ्यांची लग्‍नेही चळवळीत झालेली व त्‍यांच्‍यातही दोघांपैकी एक पूर्णवेळ कार्यकर्ता अशीच रचना होती. एखाद-दोन वर्षे मागे-पुढे असे आम्‍ही पूर्णवेळ कार्यकर्ते झालो होतो. 

पहिली जबाबदारी मिळाली ती स्वातंत्र्य सैनिक नागनाथ नायकवडी यांच्‍या पुढाकाराने वाळव्‍यातून सुरु होणाऱ्या साप्‍ताहिकाचे ‘कार्यकारी संपादक’ म्हणून काम पाहण्‍याची. लाल निशाण पक्षाचे एस. के. लिमये, यशवंतराव चव्‍हाण व दत्‍ता देशमुख यांना नागनाथअण्‍णा व वाळवेकर मंडळी खूपच मानत. हुतात्‍मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्‍याची मान्‍यता मिळविण्‍यात दत्‍तांचे तर मोठे सहाय्य झाले होते. वयाच्‍या २५ व्‍या वर्षी लग्‍न, त्‍याच वर्षी एम.ए., त्‍याच वर्षी फुलटायमर व त्‍याच वर्षी वाळव्‍यात गेलो. वाळवेकरांना माझी काहीही ओळख नव्‍हती. माझे पत्रकारितेतलेही काही कर्तृत्‍व नव्‍हते. मी 'दत्‍तांचा माणूस' हीच माझी त्‍यांना पुरेशी असलेली ओळख होती. दत्‍तांचा माणूस व माझी क्षमता या पलीकडच्‍या काही कारणांनी हा प्रयोग काही जमला नाही. पुरोगामी चळवळीचे मुखपत्र व्हावे अशी अपेक्षा असलेल्या या साप्ताहिकाचे काम अल्पकाळातच सोडून मला मुंबईस परतावे लागले. त्‍यानंतर काही काळ साक्षरता चळवळ व ट्रेड युनियन आणि पुढे प्रदीर्घ काळ रेशनच्‍या चळवळीत सक्रीय राहिलो. अन्‍य सामाजिक-सांस्‍कृतिक कामांशी संबंध होताच. भाऊंशी संबंध आलेल्‍या आम्‍हा मंडळींना जाणीवपूर्वक वस्‍तीपातळीच्‍या कामाशी जोडणे हे भाऊंचे खास वैशिष्‍ट्य होते. ट्रेन युनियन एके ट्रेड युनियन न करता आम्‍ही समाजाच्‍या विविध अंगांशी संवादी राहावे, असा त्‍यांचा आग्रह व खटपट असे. 

ज्‍या रेशनच्‍या चळवळीशी माझा प्रदीर्घ संबंध राहिला तिच्‍याविषयी थोडेसे अधिक सांगायला हवे. १९८८ च्‍या सुमारास ‘रेशनिंग कृती समिती’ स्‍था‍पन झाली. ही समिती म्‍हणजे एक संघटना नाही. अनेक संस्‍था, संघटना, मंडळे यांची ती समन्‍वय समिती आहे. प्रारंभी मुंबई व क्रमात राज्‍यातील अन्‍य भागातील संघटनाही तिच्‍याशी जोडल्‍या गेल्‍या. आज राज्‍यात अनेक ठिकाणी ती सक्रीय असली तरी मुंबई हाच तिचा मुख्‍य आधार राहिला आहे. रेशनचा अधिकार सर्व गरजवंतांपर्यंत पोहोचावा यासाठी त्‍यांची जागृती, त्‍यांना संघटित करणे व प्रशासन-शासनाशी नव्‍या नियमांसाठी-धोरणांसाठी व त्‍यांच्‍या अंमलबजावणीसाठी संघर्ष असे तिचे काम राहिले आहे. या संघर्षादरम्‍यान रेशन नीट मिळावे यासाठीचे नवे नियम, ज्‍यांच्‍याकडे त्‍यांच्‍या अस्तित्‍वाचा काहीही कागदोपत्री पुरावा नाही, असे असं‍घटित कामगार, फुटपाथवर राहणारे, परित्‍यक्‍ता, हिजडे, वेश्‍याव्‍यवसाय करणाऱ्या स्त्रिया अशा दुबळ्या विभागांना रेशनकार्डे सुलभरित्‍या मिळावीत यासाठीचे नवे आदेश इ. अनेक बाबी मिळविण्‍यात आल्‍या. पुढे देश पातळीवरच्‍या ‘राईट टू फूड कँपेन’चा एक भाग म्‍हणून राज्‍य पातळीवर अन्‍नाच्‍या अधिकारासाठी जी 'अन्‍न अधिकार अभियान' नावाने आघाडी सुरु झाली, त्‍यास प्रारंभीचा आधार रेशनिंग कृती समितीच्‍या या कामामुळे प्राप्‍त झाला. 

विविध मतप्रवाह असणाऱ्या संघटनांना सामावून घेऊन त्‍यांची व्‍यापक एकजूट सांभाळत १९८८ पासून आजवर टिकून राहणे हे रेशनिंग कृती समितीचे वैशिष्‍ट्य आहे. रेशनच्‍या प्रश्‍नावर आमचे मतभेद आहेत वा नेतृत्‍वाचे परस्‍परांत जमत नाही, म्‍हणून दोन किंवा तीन आघाड्या झाल्‍या नाहीत. रेशनच्‍या प्रश्नावर रेशनिंग कृती समिती व अधिक व्‍यापक अन्‍न अधिकाराच्‍या प्रश्‍नावर रेशनिंग कृती समितीच्‍या समावेशासहित अन्‍न अधिकार अभियान, ही रचना इतर राज्‍यांच्‍या तुलनेत महाराष्‍ट्राचे वैशिष्‍ट्य राहिले आहे. हे वैशिष्‍ट्य तयार करण्‍यात, जोपासण्‍यात आम्‍हा भाऊंशी संबधित लाल निशाण पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांचे आटोकाट प्रयत्न राहिले आहेत, हे आत्‍मस्‍तुतीचा दोष पत्‍करुनही सांगणे भाग आहे. अन्‍यथा वस्‍तुस्थितीचे वर्णन प्रामाणिक राहणार नाही. व्‍यक्‍तीचे यथोचित महत्‍व अधोरेखित करत असतानाच 'व्‍यक्‍ती जावो, संघ माझा कायदा' या लाल निशाण पक्षाच्‍या शिकवणुकीवर आम्‍ही ठाम राहिलो. जनसंघटना पक्षनिरपेक्षच असल्‍या पाहिजेत, तेथील निर्णय हे 'पॉलिटब्‍युरोने' नव्‍हे, तर त्‍या जनसंघटनेच्‍या सदस्‍यांनी खरोखरच्‍या लोकशाहीने घ्‍यायचे असतात, हे तत्‍त्‍व आम्‍ही कसोशीने पाळले. केवळ पुढारपणाचे शहाणपण नव्‍हे, तर सर्वसामान्‍य कार्यकर्त्‍यांच्‍या 'किमान समजावर आधारित सामायिक सहमतीचे तत्‍त्‍व' प्रश्‍नाधारित व्‍यापक आघाडीच्‍या निर्णयप्रक्रियेचा मूलाधार राहायला हवा, याबाबत आम्‍ही आग्रही होतो. खुद्द पक्षातील अन्‍य कॉम्रेड्सशीही या व्‍यवहाराबाबत संघर्षाच्‍या वेळा आल्‍या. रेशनिंग कृती समितीला लाल निशाण पक्षाचे प्रत्‍यक्ष अप्रत्‍यक्ष खूप सहाय्य झाले, पक्षाचे कार्यालय, अन्‍य साधने मुक्‍तपणे रेशनिंग कृती समितीने वापरली. पण आम्‍ही पक्षकार्यकर्त्‍यांनी तिला पक्षाची आघाडी होऊ दिली नाही. 

रेशनिंग कृती समितीच्‍या स्‍थापनेपासून तिच्‍याशी माझा संबंध असला तरी प्रारंभी मिलिंद रानडे प्रामुख्‍याने तिचे काम पाहत होते. १९९४ पासून मी मुख्‍य जबाबदारी स्‍वीकारली. मिलिंद रानडे अन्‍य कामांत व्‍यग्र झाले. २००९ ला (सुमारे १५ वर्षांनी) मी तिची पूर्णवेळ जबाबदारी सोडली. सुकाणू समितीचा निमंत्रित सदस्‍य म्‍हणून सल्‍लामसलतीत असतो. बैठका-मोर्च्यांत असतो. महत्वाची आंदोलने वा कार्यक्रम असले तर अधिक लक्ष घालतो. 

सतत घोड्यावर बसल्‍यासारखे जनसंघटनेच्या दैनंदिन कामात अखंड बुडून राहावे लागत असल्‍याने काही करावयाच्‍या बाबी राहून गेल्‍या होत्‍या. त्‍यात वाचन-लिखाणाबरोबरच काही अन्‍य क्षेत्रांचा समावेश होतो. ते मी सुरु केले. या दरम्यान राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होऊन मोदी-म्हणजेच संघाचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. राजकीय वरदहस्ताने आत्मविश्वास दुणावलेल्या सांप्रदायिक फॅसिस्ट शक्ती मोकाट सुटल्या. संविधानाच्या चौकटीला हादरे बसू लागले. हा अनुभव आम्हाला नवीन नव्हता. गोध्राचा परिचय होताच. त्याचबरोबर कितीतरी आधी ९२-९३ ला बाबरीच्या विध्वंसनासाठी झालेली रथयात्रा व तदनंतरच्या दंगलींनी आम्हाला चांगलेच हादरवले होते. त्यावेळी आम्ही ‘राष्ट्रीय एकता समिती’ ही सर्व पुरोगामी, लोकशाही शक्तींना एकत्रित करुन संघटना उभी केली होती. फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात वस्त्यावस्त्यांत प्रबोधन व दंगलीनंतर पुनर्वसनाचे काम यात अन्य सर्व कामे सोडून आम्हाला उतरावे लागले होते. तथापि, त्यात सहभागी पुरोगामी मंडळी पुढच्या काळात निवडणुकादी राजकीय व्यवधानांमुळे सक्रीय राहिली नाहीत. आम्ही बरीच वर्षे हे काम चालू ठेवले. पण यथावकाश आमच्याकडूनही हे काम थांबले. २०१४ च्या मोदींच्या राज्यारोहणानंतर त्या कामाचे खंडित होणे तीव्रतेने जाणवले. 

मात्र आता राष्ट्रीय एकता समिती व तिचा त्यावेळचा अधिकार राहिलेला नव्हता. त्यात पुढाकाराने असलेले आम्ही आता जनसंघटनांच्या व्यवधानात अडकलो होतो. राजकीय कार्यकर्ते असलो तरी हा राजकीय संघर्ष अंगावर घेण्यासाठीची संघटनात्मक ताकद व प्रेरणा यांत विशविशितपणा आला होता. एकूणच पुरोगामी चळवळीची ती स्थिती होती. अशावेळी मी जिथे वाढलो त्या चेंबूर परिसरातील मुख्यतः आंबेडकरी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या ‘संविधान संवर्धन समिती’स आम्ही चालना दिली. विविध रिपब्लिकन गटांत विभागलेले कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर इथे एकत्र होते, ही जमेची बाब. ही संघटना तशी नऊ-दहा वर्षांपूर्वीची. पण आता संविधान धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ती अधिक सक्रीय झाली आहे. संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार, त्यासाठी शिबिरे, वस्त्यांत बैठका, विविध निमित्ताने दिवस साजरे करुन चर्चा-परिसंवाद घेणे, यात्रा असे उपक्रम सुरु आहेत. आंबेडकरी समूहाला विविध पुरोगामी शक्तींशी एकजुटीत आणण्याची खटपटही चालू असते. या कामात सध्या मी अधिक व्यग्र आहे. समविचारी संघटनांच्या सहकार्याने शाळा-कॉलेज तसेच वस्त्यांत होणाऱ्या संविधानातील मूल्यांच्या प्रचाराची सत्रे घेण्यात सहभाग घेत असतो. 

‘आंदोलन’ मासिकात सदर तसेच अन्य काही अंक, वर्तमानपत्रांतून प्रासंगिक लेखन चालू आहे. यांपैकीच काही निवडक लेखांचे ‘गुंता आणि उकल’ हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या अक्षर प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाले आहे. 

‘सम्यक संवाद’ या समविचारी कार्यकर्त्यांच्या गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या फिल्म क्लब, online नित्यकालिक, त्याचे फेसबुकपेज यात भागिदारी करत असतो. समाजमाध्यमांचा वापरही निवडक पद्धतीने करत असतो. 

एकूण पुरोगामी चळवळीची पडझड हे आज मोठे आव्‍हान आहे. हे आव्हान तसेच संविधानाची चौकट उध्वस्त करु पाहणाऱ्या फॅसिस्ट शक्तींचा मुकाबला करण्यासाठी पुरोगामी शक्तींची व्यापक एकजूट, मतभेदांसह सहमतीच्या मुद्द्यावर एकत्र येण्यासाठीच्या शक्यता हाच हल्ली माझ्या मांडणीचा व कृतीचा मुख्य आशय राहिला आहे. 

- सुरेश सावंत

(१ डिसेंबर २०२०)

Tuesday, January 9, 2018

जिग्नेश मेवाणीच्या विजयाचा बोध


गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी भरघोस मताधिक्याने निवडून आला. जिग्नेशचे या नेत्रदीपक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. देशातील अनेकांचे लक्ष या मतदारसंघाकडे होते. गाईंना मारुन वाहून नेत आहेत या संशयावरुन वर्षभरापूर्वी तथाकथित गोरक्षकांनी दलित तरुणांना उनात अमानुष मारहाण केली होती. त्यातून जो दलितांचा उद्रेक झाला त्याचे नेतृत्व जिग्नेश मेवाणी या ३५ वर्षांच्या डाव्या-पुरोगामी चळवळीशी संबंधित कायद्याचा पदवीधर असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने केले होते. त्यातूनच तो प्रकाशझोतात आला. कन्हैयावरचे सरकारी दमनचक्र, रोहित वेमुलाची आत्महत्या यांनी गरम झालेल्या माहोलात जिग्नेश नव्या दलित उठावाचा चेहरा झाला. त्याच्या या आंदोलनाला एकूणच संघपरिवाराच्या कारवायांनी अस्वस्थ असलेल्या देशभरच्या पुरोगामी, डाव्या व आंबेडकरी विचारांच्या बुद्धिजीवी-कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्याच्या निवडणुकीच्या प्रचारातही केरळ, दिल्ली, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अशा अनेक राज्यातून पुरोगामी विद्यार्थी, कार्यकर्ते, अभ्यासक सामील झाले होते. देशातील संघपरिवाराच्या उन्मादाला व मोदींच्या चढाईला अटकाव करण्यासाठीच्या राजकीय लढ्याचा एक भाग या प्रेरणेने व जिद्दीने ही मंडळी जिग्नेशला त्याच्या प्रचारात साथ करत होती.

जिग्नेशच्या यशाने या सर्व पुरोगामी वर्तुळात जल्लोष होणे अगदी स्वाभाविक होते. आंबेडकरी चळवळीची जन्मभूमी व एकेकाळची आधारभूमी असलेल्या महाराष्ट्रातील आंबेडकरी विभागाला तर याचे विशेष अप्रूप आहे. आज आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील शतखंडिततेने राजकीयदृष्ट्या दुबळेपणा अनुभवणाऱ्या युवकांना मेवाणीचे हे यश ऊर्जा देणारे वाटते. अर्थात, मेवाणीची डाव्या-पुरोगाम्यांसोबतची सलगी व त्याचे ‘जयभीम’सोबत ‘लाल सलाम’ म्हणणे न रुचणारेही अजून आहेत. त्यांच्या निकषांप्रमाणे तो ‘शुद्ध आंबेडकरवादी’ नसल्याने त्यांनी या यशाबद्दल थोडे आखडते घेत अभिनंदन केले आहे. डाव्या-पुरोगामी वर्तुळातील काहींना त्याच्या या यशात अखिल भारतीय दलितांचा नेता उदयाला येत असल्याचे दिसू लागले आहे.

जिग्नेश मेवाणीमध्ये असा दलितांचा राष्ट्रीय पातळीवरील नेता होण्याची नक्कीच क्षमता आहे. एवढेच नाही, तर दलितांमध्ये आपला आधार तयार करुन त्यांच्यासहित अन्य कष्टकरी, शोषित, पीडित समूहांना तो एकवटू शकतो अशी ताकदही त्याच्यात आहे. तळच्या विभागांतला वावर, त्यांच्या प्रश्नाची जाण, ती मांडण्याचे व त्याभोवती जनमत संघटित करण्याचे कौशल्य, केवळ ‘दलितां’विषयी बोलतो तोच दलितांचा खरा कैवारी या घेऱ्यात अडकून न राहता समग्र व्यवस्था परिवर्तनाबाबतची समज हे सगळे काही जिग्नेशमध्ये आहे. (अर्थात, अभिनिवेशी टाळ्याखाऊ भाषणांच्या सापळ्यात न अडकता आपल्या ताकदीचे योग्य मापन करुन पाय जमिनीवर ठाम राहतील याची दक्षता ही पूर्वअट मात्र त्यासाठी नक्की आहे.) ...आणि असा कार्यकर्ता आता विधानसभेत आमदार असणार आहे. रस्त्यावरच्या आंदोलनात सक्रिय राहून त्याबाबतचा आवाज तो आता विधानसभेत उठवत राहणार आहे. त्याची विरोधकांना धारेवर धरण्याची शैली लक्षात घेता तो विधानसभा गाजवणार हे नक्की. मतदारसंघातील विकासाच्या कामांतून पैसा गोळा करणे हा लोकप्रतिनिधींचा तसा प्रचलित व्यवहार असतो. याबाबत मनस्वी चीड व त्या विरोधात असलेला जिग्नेश आहे. तो आपल्या मतदारसंघात विकासाची उत्तम कामे करेल. एक आदर्श आमदार म्हणून तो काही काळातच नावाजला जाईल, याबद्दल मला खात्री आहे.

हे सगळे लक्षात घेत असताना या मापनाला वस्तुनिष्ठता यायची असली तर किंवा थोडे सावधान राहायचे असले तर किंवा पुढील दिशा अथवा रणनीती अधिक स्पष्ट व्हायची असेल तर जिग्नेशच्या विजयाच्या प्रक्रियेतील काही बाबींची नीट नोंद घेणे गरजेचे आहे. जिग्नेशच्या निवडणुकीतील यशाच्या स्वरुपाबद्दल बोलताना, लिहिताना आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी मंडळींकडून त्या बाबी नोंदवायच्या राहून गेल्या आहेत किंवा पुरेशा अधोरेखित केल्या गेल्या नाहीत असे मला वाटते.

जिग्नेशच्या उमेदवारीने आनंद झालेल्या व त्याला आपल्याकडून शक्य ती मदत-किमान नैतिक पाठिंबा द्यावा म्हणून देशभरातून गेलेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांत आम्हा मुंबईहून गेलेल्या काहींचा समावेश होता. आम्ही तिथे आठ दिवस होतो. या काळात जे प्रत्यक्ष पाहून-ऐकून ध्यानात आले त्याची नोंद पुढे करत आहे.

जिग्नेश मेवाणीचे या मतदारसंघात संघटन असावे, म्हणूनच त्याने या मतदारसंघाची निवड केली असणार व राज्य तसेच देश पातळीवरील दलितांना सकारात्मक संदेश जावा म्हणून काँग्रेसने ही जागा त्याला सोडली असणार असा या मतदारसंघात जाण्यापूर्वी व गेल्यानंतर पुढचे काही दिवस माझा समज होता. हळूहळू हा समज दुरुस्त होत गेला. काँग्रेसने ही जागा जिग्नेशला सोडली त्याचे कारण एकूण दलितांमध्ये अनुकूल संदेश जावा, हे बरोबर होते. पण जिग्नेशचे त्या भागात संघटन असणार हा माझा समज बरोबर नव्हता. त्याचे कर्तृत्व ज्या उना घटनेमुळे समाजासमोर आले ते उना वडगामपासून ३०० किलोमीटर दूर आहे. त्याचा परिणाम इथे झालेला नाही. त्याचे कोणतेही संघटन इथे नाही. तो या मतदारसंघाला अपरिचित होता. राहुल गांधींच्या नजीक असलेल्या त्याच्या मित्रांच्या सहाय्याने ही जागा जिग्नेशला सुटली. जिग्नेश अपक्ष म्हणून उभा राहिला. काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तो सुरक्षित मतदारसंघ आहे. एक अपवाद वगळता आतापर्यंत तिथे कायम काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे. तिथले काँग्रेसचे समर्थक ही बाब आम्हाला अभिमानाने सांगत होते. जो एक अपवाद झाला, तोही आम्ही आमच्या उमेदवाराला धडा शिकवायला म्हणून तसे केले असेही ते म्हणाले. हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. त्यांच्यानंतर दलितांची संख्या. मग राजपूत, ठाकोर, चौधरी या जाती. मुस्लिम-दलित, मुख्यतः मुस्लिम ज्याला मते देतील तो निवडून येतो.

काँग्रेसने ही जागा जिग्नेशचा त्या मतदारसंघात स्वतःचा काहीही आधार नसताना सोडली त्यामागे त्यांचे हिशेब नक्की होते. पण ती सोडताना तू आमच्या पंजा निशाणीवर उभा राहा, असा आग्रह धरल्याचे दिसत नाही. दुसरा युवा नेता ठाकोर समाजाचा अल्पेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सामील झाला व पंजा निशाणीवर उभा राहिला. जिग्नेश अपक्ष होता. त्याची निशाणी होती शिलाई मशीन. पंजा ऐवजी शिलाई मशीन हे लोकांपर्यंत पोहोचवणे जिकिरीचे होते. ते काँग्रेसने केले.

दलित नेत्याला जागा सोडायची व नंतर त्याला वाऱ्यावर सोडायचे, काँग्रेसच्या आधीच्या लोकप्रतिनिधीने किंवा अन्य निष्ठावंताने बंड करायचे व ती जागा येनकेनप्रकारेण जिंकून स्वतःकडे ठेवायची, असा अनुभव इथे आला नाही. जिग्नेशसाठी मणिलाल वाघेला या आपल्या तेथील आमदाराला काँग्रेसने तेथून हलवला व त्याला दुसऱ्या मतदारसंघातून उभे केले. वाघेला त्या मतदारसंघात पडले व तेथून भाजपचा उमेदवार विजयी झाला. रुढ भाषेत बोलायचे तर जिग्नेशच्या विजयासाठी आपल्या एका आमदाराचा काँग्रेसने बळी दिला. नाही म्हणायला काँग्रेसच्या एका जुन्या मंत्र्याचा मुलगा बंडखोर म्हणून अपक्ष उभा होता. जिग्नेशची दलित मते खाण्यासाठी त्याला भाजपनेच करोडो रुपये देऊन उभे राहायला प्रवृत्त केले होते, असा तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप होता. अजूनही काहीजण उभे होते. ते सगळे जोरात आपटले. एकदा भाजप कार्यालयातील मंडळींशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्या दृष्टीनेही हा काँग्रेसचाच मतदारसंघ होता. परंतु, जिग्नेशचे या मतदारसंघाबाहेरचे असणे, पंजा निशाणी नसणे व स्थानिक दलित अपक्षांच्यातील मतविभागणी यांमुळे आम्ही विजयी होऊ असे त्यांचे मापन होते. तथापि, तसे झाले नाही. काँग्रेसने मनापासून जिग्नेशची साथ केली. त्याच्या शिलाई मशीनवर पंजाचे वर्चस्व न लादता ही साथ केली. त्याच्या स्वतंत्रपणाची बूज राखली.

गोध्राच्या पार्श्वभूमीवर झालेल्या २००२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही असेच काँग्रेसच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये गेलो होतो. अहमदाबादमधील मोदींच्या मणिनगर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करत होतो. त्यावेळी तिथे व अन्यत्रही प्रचारासाठी पैसे देऊन रोजाने माणसे आणली जात होती, असे चित्र होते. हे चित्र आपल्याकडेही आहे. ते तसे सार्वत्रिक आहे. जिग्नेशच्या मतदारसंघात असे अजिबात दिसले नाही. एकतर जिग्नेश फाटका माणूस. त्याच्याकडे द्यायला काही नाही. बाहेरून आलेले पुरोगामी मित्र आपापल्या खर्चाने आलेले. त्यांपैकी काहींनी मदत गोळा करुन दिली. पण ती लाक्षणिक होती. निवडणुका लढवण्याचा अनुभव असलेल्या वा त्या प्रक्रियेत जवळून सहभागी झालेल्यांना अशी निडवणूक लढवण्याचा किती खर्च येतो याची कल्पना असेल. हा प्रचंड खर्च उभा करणे हे जिग्नेशच्या व त्याच्या मित्रांच्या अर्थातच आवाक्यातले नव्हते. स्थानिक लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे जिग्नेशला मदत करत होते. कोणी गाडी दिली. कोणी अन्य स्वरुपात मदत केली. स्थानिक सभा तर तिथले लोकच लावत होते. खुद्द राहुल गांधी यांनी खास जिग्नेशसाठी त्याच्या मतदारसंघात सभा घेतली.

जिग्नेशच्या सभांना लोक उत्स्फूर्तपणे जमत. आरोळ्या, घोषणा, टाळ्यांनी सभा दणाणून टाकत. अनेक ठिकाणी जिग्नेशला खांद्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणुकीने सभास्थळी नेत. ज्याचा आधी काहीही परिचय नाही, ज्या माणसाने याआधी त्यांच्या मतदारसंघात काही काम केलेले नाही अशावर लोक एवढे फिदा का होतात, हे मला कळत नव्हते. अंदाज लावला तो एवढाच. एकतर हा काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ. बहुसंख्य काँग्रेसला मानणारे. शिवाय मुस्लिम जास्त. या मुस्लिमांमध्ये मोदींना तीव्र विरोध. भाजपला हरवणे ही त्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई मानली होती. शिवाय उमेदवार लाखात एक होता. एखाद्या यशस्वी आंतरजातीय लग्नात जसे ‘असा वर आपल्या जातीत शोधून सापडला नसता’ असे नवऱ्या मुलाचे कौतुक करतात, तसे काहीसे इथे होते. काँग्रेसने दिलेले उमेदवार या लोकांनी अनुभवले होते. त्यांच्या तुलनेत जिग्नेश हा शंभर नंबरी सरस होता. असा माणूस काँग्रेसने दिला यावर ते खूप खूष होते. जिग्नेशला सर्वार्थाने उचलून धरणाऱ्या गटाशी याबाबत एकदा बोलताना आम्ही विचारले, ‘असा उत्तम क्वालिटीचा जिग्नेश स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उभा राहिला असता व त्याला काँग्रेसने पाठिंबा नसता दिला तर..?’ त्यावर क्षणाचीही उसंत न घेता त्यांचे उत्तर होते- ‘जिग्नेशचे डिपॉझिट गेले असते.’

जिग्नेशचा विजय काँग्रेसच्या खांद्यावर झाला आहे. त्याच्या व्यक्तित्वाने या विजयाला शोभा आणली आहे. मात्र आपल्या आंबेडकरी, पुरोगामी, डाव्यांच्या ताकदीवर तो निवडून आलेला नाही. तेव्हा त्याचा विजय हा आपला विजय असे मानताना आपण डाव्या-पुरोगामी-आंबेडकरी मंडळींनी हे वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे. या वास्तवात न रुजणाऱ्या अजून काही बाबी आहेत. त्या तडजोडी आहेत. त्या मूलभूत नाहीत. पण त्या मर्यादा आहेत हेही ध्यानात घ्यायला हवे. ज्या उनामुळे जिग्नेश उदयाला आला त्या उनाचा तो आपल्या प्रचारात उल्लेख करत नव्हता. कारण सवर्ण समाजात अॅट्रॉसिटी अॅक्टची भीती. जशी आपल्याकडे आहे तशी. त्याचा दुरुपयोग होतो वगैरे. राजपूत वगैरे मंडळींशी बोलताना ती आम्हालाही जाणवली. त्यामुळे त्यांना आश्वस्त करण्यासाठी ‘मी भाजपच्या २२ वर्षांच्या गुजरातवरील अॅट्रॉसिटीच्या विरोधात लढायला आलो आहे’ असे जिग्नेश वारंवार भाषणातून बोलायचा. ‘जयभीम-लाल सलाम’ या त्याच्या आवडत्या व अभिमानाच्या अभिवादनाला तो इथे कटाक्षाने टाळायचा. दलित विभागांतील सभेत व राहुल गांधींच्या सभेतच त्याने जयभीम म्हटल्याचे मला आढळले. लाल सलाम तर अजिबातच नाही. जयभीम म्हटले की सवर्ण दुखावणार व लाल सलाम तर राष्ट्रदोहाच्या आरोपाला आमंत्रण ठरणार. त्यामुळे ही तडजोड त्याला करावी लागत होती. कन्हैयाला प्रचाराला येऊ नको हे सांगण्यामागेही ही भीती होती. कन्हैया तर राष्ट्रद्रोहाचा जिताजागता नमुना. भाजपच्या हातात कोलित नको, ही दक्षता त्यामागे होती.

पण अशा दक्षता, अशा तडजोडी आपल्याला कराव्या लागतात याचाच अर्थ ज्या विभागांनी आपल्याला निवडून द्यावे असे आपल्याला वाटते त्यांची तशी वैचारिक तयारी आपण केलेली नाही. ज्या विभागाची ती आहे (समजा दलित विभाग..तेही मर्यादित अर्थाने. कारण त्यांतही भाजपला मोठा आधार आहे.) त्याच्या ताकदीवर फक्त आपण निवडून येणार नाही. शेतमजूर, अंगणवाडी सेविका वा अन्य असंघटित कामगार यांच्या युनियन्स केल्याने समजा त्यांनी मिठाला जागून आपली सर्वच्या सर्व मते (वास्तवात त्यातही मोठी मतविभागणी होते. पण समजा..) आपल्या नेत्याला द्यायची ठरवले तरी अन्य विभागांची साथ मिळाल्याशिवाय निवडून येणे कठीण असते. त्यासाठी मतदारसंघातील विविध समाजविभागांच्या भावनिक तसेच अन्य हितसंबंधांचा मेळ घालावा लागतो. काँग्रेसची मंडळी तत्त्वाचा पीळ दाखवत नाहीत. त्यांना ती अडचण नाही. पण ज्या पुरोगाम्यांना-आंबेडकरवाद्यांना तो पीळ आहे, तो तसाच ठेवून सर्व विभागांच्या हितसंबंधांचा मेळ घालता येणे शक्य नाही का? ते शक्य केल्याशिवाय संसदीय निवडणुकांत आपण तगू शकणार नाही. इतर वेळी ज्या दिमाखात जिग्नेश जयभीम-लाल सलाम म्हणतो तसे म्हणत आणि उनाच्या दलितांचा आक्रोश संयतपणे मांडत, आपली संघटनात्मक ताकद विविध समाजविभागांत तयार करत हा तसेच अन्य जिग्नेश पुढची निवडणूक मोकळेपणाने व स्वबळावर लढतील यासाठी आपण काय करु शकतो?

जिग्नेशचे दिल खोलकर अभिनंदन करत असताना हा प्रश्न विसरु नको हा बोध जिग्नेशच्या विजयानेच मला दिला आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

__________________________________

आंदोलन, जानेवारी २०१८

Friday, December 15, 2017

धर्म, श्रध्दा व मानवाचे उन्नयन


हातात मोबाईल, खांद्याला उंची पर्स; मात्र पायात चपला नाहीत. हे दृश्य रस्त्यात, स्टेशनवर जागोजाग या नवरात्रात आपण पाहिलं आहे. दरवर्षीच पाहतो हे. पूर्वी हातात मोबाईल नसायचे, कमरेत जीन्स नसायची. साडी, सलवार-कुर्ता असायचा. साधने, वेष बदलला. त्यात अधिक प्रगती, आधुनिकता आली. पण मनावरचा रुढींचा प्रभाव जुनाच राहिला. जीवनाला वेग आला. त्या वेगाशी जुळवताना आधुनिक साधनांचा वापर वाढला. त्यात प्रत्यक्ष पूजेला बसण्याचा वेळ वाचवण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने पूजा सांगण्याचेही प्रकार लोक अवलंबतात, असे ऐकले आहे. एवढंच कशाला, कुठेतरी एक अनुभव वाचला होता. एका म्हातारीचा अंत्यविधी सुरु होता. भटाचे विधी चालले होते. त्याच्यासमोर लॅपटॉप होता. त्या लॅपटॉपवर स्काईपवर म्हातारीचा अमेरिकेतला मुलगा होता. हातातल्या महत्वाच्या एंगेजमेंटस सोडून तातडीने - तेही हजारो किलोमीटरवरुन - आईच्या अंत्यविधीला वेळेवर पोहोचणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो या मार्गाने सहभागी झाला. भटालाही काही प्रॉब्लेम नव्हता. भट भारी लवचिक असतात. अलिकडे भटही यजमानाच्या अपेक्षेप्रमाणे तासाची, मिनिटांची पूजा सांगतात. सगळी पॅकेजेस त्यांच्याकडे उपलब्ध असतात. दक्षिणेत तडजोड नसली म्हणजे झाले.

कोणी म्हणेल ही धर्माची चेष्टा आहे. कोणी म्हणेल हे आधुनिक जगाबरोबर बदलणे आहे. दोन्ही असू शकते. पण यात धर्माचा एक भाग विसरला जातो, जो अनेक थोर संतांनी सतत प्रतिपादला आहे. तो म्हणजे, ईशशक्ती चराचरात व्यापलेली आहे. तिचे स्मरण, तिच्याशी तादात्म्यता साधणे हाच धर्म आहे. त्या शक्तीशी काही मागायचे नसते. अनवाणी राहून वा अन्य एखादे व्रत करुन भौतिक जगातील समृध्दीची कामना करायचा सौदा करायचा नसतो. उलट परमशक्तीला समर्पित व्हायचे असते.

इथेच श्रध्दा व अंधश्रध्दा यांच्या सीमारेषा ठळक होतात. हा सौदा व त्याप्रीत्यर्थ करावयाचे कर्मकांड ही अंधश्रध्दा आहे. एखादा निर्मिक कल्पून त्याच्याप्रती समर्पित होणे ही श्रध्दा आहे. अंधश्रध्दा असो वा श्रध्दा दोहोंना विज्ञानाचा, तर्काचा पाठिंबा नाही. देव, निर्मिक यांचे अस्तित्व किंवा त्याची कृपा विज्ञानाने सिध्द होत नाही. म्हणून काही जण निरीश्वरवादी, नास्तिक असतात. त्यांना अशी श्रध्दा बाळगणे, देवापुढे हात जोडणे हेही मंजूर नसते. काहीजण ईश्वर असेल वा नसेल, आज त्याची प्रचिती येत नाही, जीवन वा सृष्टीच्या घडामोडींत त्याचे अस्तित्व दिसत नाही, सबब त्याची चर्चा करण्यात वेळ घालवणे हेच निरर्थक आहे, असे मानतात. या गटातल्यांना अज्ञेयवादी म्हणतात.

संत तुकाराम, महात्मा फुले, गाडगेमहाराज ही निर्मिकाला मानणारी, त्याच्या प्रति श्रध्दा बाळगणारी पण अंधश्रध्देवर तुटून पडणारी मंडळी. त्यांची सश्रध्दता वैज्ञानिकतेत भले बसत नसेल पण मनुष्यजातीला पुढे नेणारी आहे. नाशिकला गोदावरीत उभे राहून स्वर्गवासी पितरांना ओंजळीत पाणी घेऊन अर्घ्य देणाऱ्यांच्या शेजारी गाडगेबाबा उभे राहतात. स्वत:ही तसेच खापरात पाणी भरुन ओतत राहतात. अर्ध्य देणाऱ्या शेजारच्या इसमाला त्यांची ही कृती चमत्कारिक वाटून 'तुम्ही हे काय करत आहात?' असे तो विचारतो. गाडगेबाबा उत्तर देतात, 'माझ्या अमरावतीच्या शेताला पाणी घालतो आहे.' प्रश्नकर्ता हसू लागतो. 'हा काय वेडपटपणा! शेकडो किलोमीटरवरच्या शेताला असे कसे पाणी पोहोचेल?' उत्तरादाखल गाडगेबाबांचा प्रतिप्रश्न असतो, 'अमरावतीपेक्षा दूर असलेल्या स्वर्गातील पितरांना जर तुमचे हे अर्ध्य पोहोचते तर माझ्या शेताला का नाही पोहोचणार?'

'गोपाळा गोपाळा-देवकीनंदन गोपाळा' असे कीर्तन करत गाडगेबाबा माणसांना माणूसपणाच्या धरतीवर उतरवण्यासाठी आयुष्यभर झटले. महात्मा फुले निर्मिकाला मानूनही कर्मकांड पसरविणाऱ्या, सत्यनारायणासारखा स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठीचा विधी प्रचारणाऱ्या ब्राह्मणांचे कसब उघडे करण्याचा सत्यशोधकी जागर करत राहिले. तथागत बुध्द अज्ञेयवादी. ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेत पडत नाहीत. जन्म व मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यानचे माणसाचे जीवन सुखी कसे होईल हे त्यांचे लक्ष्य होते. त्यामुळे बौध्द धर्मात ईश्वराच्या जागी त्यांनी 'नीती'ची प्रस्थापना केली. डॉ.आंबेडकर 'बुध्द आणि त्याचा धम्म' या आपल्या ग्रंथात म्हणतात, 'माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय.'

गांधीजी हे देखील तुकाराम, फुले, गाडगेबाबा यांच्या पंक्तीत बसतात. मात्र गांधीजी धर्माचा स्वत:चा अर्थ लावतात व तो समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतात. 'ज्या धर्मात अस्पृश्यता आहे तो हिंदुधर्म माझा नाही' हे, अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजाला स्वत:ला हिंदू म्हणवून घेत ते सांगतात. ते कधीही कुठल्याही देवळात गेलेले नाहीत. त्यांच्या हस्ते एकाच देवळाचे उद्घाटन झाले ते भारतमातेच्या आणि त्यातही भारतमातेची मूर्तीही नाही. काशीविश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कस्तुरबा आणि महादेवभाईंना ते, 'तिथे दर्शन घेण्याऐवजी तुम्ही सत्याग्रह करून मेला असतात तर मला आनंद झाला असता' म्हणून फटकारतात. 'मी सनातनी हिंदू आहे' असे ते म्हणतात तेव्हा धर्माचे शुद्ध स्वरुप त्यांना अपेक्षित असते, कर्मकांडांनी भ्रष्ट झालेले नव्हे.

आपण पाहिले हे लोक श्रध्दावान, धार्मिक आहेत. त्यांचा समाजाला पुढे न्यायला खूप उपयोग झाला आहे. त्यांची धार्मिकता मनुष्यजातीला पोषकच ठरली आहे. त्यामुळे मुळात धार्मिकताच वाईट असे म्हणता येत नाही. निरीश्वरवाद हा विज्ञानवाद आहे. त्याचेही स्वागतच असायला हवे. या विचारांची मंडळी धर्म मानत नसतील, तरी हरकत नाही. पण ते जर सर्वसामान्यांच्या श्रध्दांवर, धर्मावर केवळ कर्कश्य कोरडेच ओढत राहिले, तर त्यातून काही साध्य होत नाही. त्यांना अपेक्षित माणसे बदलत नाहीत. उलट ती तुटतात. हे निरीश्वरवादी माणसाचे माणसाशी असलेले नाते अधिक सुंदर करायला काय करतात, कोणती नीतीतत्वे प्रचारतात हेच त्यांच्या कार्याचे मापदंड राहणार आहेत. ते देवाला मानत नाहीत, हे नीतीमूल्य नाही. ती त्यांची धारणा आहे. धारणा नव्हे, तर नीतीमूल्य व त्याचा प्रसार माणसे बदलतो, हे निरीश्वरवाद्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

अंधश्रध्दांचा तर माणसाचे माणूसपण वाढविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. नऊ दिवस अनवाणी फिरा, उपवास करा, सिध्दिविनायकाला दहा किलोमीटर रांग लावा यातून स्वत:ला माणसे कष्टवतील, त्यातून पुण्यप्राप्तीचे कृतक समाधान मिळवतील एवढेच. दारु प्याल्यावर येणारी आभासी सुखद झिंग व ही कृतक पुण्यप्राप्तीची झिंग एकाच कुळातली. दारुची झिंग सकाळी उतरते तरी. अंधश्रध्देची ही झिंग अशी उतरत नाही. विवेकवादी विचारांची जोपासना हाच त्यावरचा उतारा असतो.

पण ही मंडळी जोवर इतरांना आपल्या अंधश्रध्दांचा त्रास देत नाहीत तोवर त्यांना ती पाळायचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. निरीश्वरवादी, श्रध्दावादी, अज्ञेयवादी व दुसऱ्याला त्रास न देणारे अंधश्रध्दावादी यांना आपल्या आस्था, विचार जपण्याचे, आचरणाचे व प्रचारण्याचे स्वातंत्र्य भारतीय घटनेने दिलेले आहे. तथापि, देशाचा कारभार धार्मिकतेवर चालणार नाही, भौतिकवादच त्याचा पाया राहील.

भारतीय संविधानाने धर्म व त्याची उपासना हा व्यक्तीला दिलेला अधिकार आहे. धर्माला किंवा धर्माच्या ठेकेदारांना स्वातंत्र्य दिलेले नाही. म्हणूनच मशिदीवरचे भोंगे असोत की दहीहंडीची उंची असो, यावर नागरिकांच्या वैयक्तिक वा सार्वजनिक हितासाठी सरकार बंधन आणू शकते. मुस्लिम किंवा हिंदू धर्माचे मुखंड सरकार आमच्या धर्मात ढवळाढवळ करत आहे, असे म्हणू शकत नाही. शनि-शिंगणापूर असो की हाजीअली दर्गा, जिथे-जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे-तिथे महिलांना प्रवेश द्यावाच लागेल असा आदेश म्हणूनच न्यायालय देते. न्यायालयाच्या या आदेशाला न मानणे, आमच्या धार्मिक बाबी आम्हीच ठरवणार तसेच आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ व त्याचाच स्वीकार सर्वांनी करायला हवा यासाठी हट्टाग्रही राहून भल्याबुऱ्या मार्गांचा, हिंसेचा, दहशतीचा वापर करणे याला धर्मांधता असे म्हणतात. धार्मिकता व धर्मांधता यात मूलभूत फरक आहे. धर्मांधता माणसाचे माणसाशी असलेले नाते समृध्द करत नाहीच. उलट ते नासवते. वैरभावी करते. धार्मिकता अशी नकारात्मक नसते. ती हे नाते वृध्दिंगत करु शकते. किमान नासवत तरी नाही.

धर्मांधता ही धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीतून येते. तथापि, धर्माचा वापर आपल्या राजकीय वा अन्य सत्ता-स्वार्थासाठी करणे हा निराळा प्रकार आहे. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना हे वैयक्तिक पातळीवर अजिबात धार्मिक नव्हते. इस्लामला मंजूर नसलेल्या अनेक गोष्टी व्यक्तिगत पातळीवर ते करत. तथापि, सत्ताकारणासाठी त्यांनी इस्लामी भावनेला भडकावले. धर्म हा राष्ट्राचा पाया मानला. हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत, हा त्यांनी सिध्दांत मांडला. हाच सिध्दांत सावरकरांनीही मांडला. मुस्लिम व हिंदू या धर्मांतल्या कट्टरतावादाचा हा धर्मबाह्य राजकारणाचा, सत्ताकारणाचा आयाम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या धार्मिक कट्टरतावादाचा धर्माशी काहीही संबंध नाही. लालकृष्ण अडवाणींनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली व पुढे बाबरी मशीद कोसळवल्यानंतर जी हिंदू-मुस्लिम दंगल झाली, जी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या प्रक्षोभक उद्गारांनी अधिकच भडकवली या मागे केवळ आणि केवळ सत्तेचे राजकारण होते. गोध्रा येथील ट्रेनमधला व त्यानंतरचा तसेच अलिकडे मुजफ्फरनगर असो की दादरी असो, या सर्व ठिकाणचा हिंसाचार याचा पाया धर्म नसून सत्ताकारण आहे. पाकिस्तानशी होणाऱ्या संघर्षाला किंवा काश्मीरमधील उद्रेकांना दोन्ही देशांतील हितसंबंधी धर्माची फोडणी द्यायचा प्रयत्न म्हणूनच करत असतात.

धर्मांधांपासून तसेच सत्तेसाठी धर्माला वापरणाऱ्या या चलाखांपासून लोकांना सतत सावध करत राहावे लागेल. तथापि, एक लक्षात घ्यायला हवे. भौतिक प्रगतीबरोबर माणसे आपोआप प्रगत होत नाहीत. त्यासाठी मनांची मशागत समांतरपणे करत राहावी लागते.या मशागतीचा एक भाग धर्म, धार्मिकता, श्रध्दा, अंधश्रध्दा, अज्ञेयवाद, निरीश्वरवाद व संविधानाचा त्यांच्याप्रतीचा दृष्टिकोन यांच्या स्पष्टतेचे प्रबोधन हा असेल.

- सुरेश सावंत, 

Tuesday, December 5, 2017

संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने

_________________________________

२६ नोव्हेंबरच्या संविधान जागर यात्रेची तयारी चालू असताना अगदी घाईत, मासिक सदरासाठी लेख देण्याची मुदत संपत असताना, खाली दिलेला लेख मी लिहिला. या यात्रेला लोक किती जमतील याबद्दल त्यात मी शंका नोंदवली होती. ती शंका पूर्णपणे गैरलागू ठरली. इतका भरघोस प्रतिसाद मिळेल हे अनपेक्षित होते. किती लोक आले हे मी मोजू शकलो नाही. पण इतरांकडून आलेले आकडे पाच ते वीस हजार या दरम्यानचे आहेत. त्यामुळे सहमतीचा आकडा नक्की करणे आज तरी कठीण आहे. काहीही असो. हजारांत लोक आले खरे. रस्त्यावर तिची दोन टोके गाठणे आम्हा संयोजकांना अशक्य झाले. नियोजनाची बारीक तयारी केली होती तरी या संख्येमुळे आमची नियंत्रणाची यंत्रणा काही बाबतींत कोलमडून पडली. पण लोकच सूज्ञपणा दाखवत होते. यात्रेत चालताना वाटेत मला अनेक पुरुष, महिला, मुली भेटून तुम्ही आमच्याकडे आला होतात, याची ओळख व नोंद देत होत्या. याचा अर्थ, आम्ही कोणतीही वाहनांची सोय केलेली नसतानाही लोक उत्स्फूर्तपणे त्यांची त्यांची व्यवस्था करुन आले होते. आपण श्रम करावे आणि ते सर्व सार्थकी लागावे हा माझ्याबाबतीत तरी या यात्रेनिमित्ताने आलेला हा दुर्मीळ अनुभव होता.

वस्त्यांत यात्रेच्या आधीच्या दोन दिवसांत लोकांच्या उत्साहाचा तसा अंदाज येत होता. पण तो एवढा असेल असे वाटले नव्हते. सण असल्यासारखी ही यात्रा लोकांनी वाजत, नाचत गाजवली. लोक ११ किलोमीटर कसे चालतील हा प्रश्न तर मला यात्रा ठरली त्या दिवसापासून सतावत होता. पण लोक चालले. गाड्यांचा आधार कमी लोकांनी घेतला. शिवाय सगळ्यांना गाड्या मिळणेही शक्य नव्हते. लोक दमलेत असेही दिसले नाही. वाटेत नियोजित तसेच उत्स्फूर्त आहार व पाणीवाटपाचे स्टॉल लागले होते. तिथेही लोकांची झुंबड उडाली वा ती व्यवस्था कोसळली असे झाले नाही. लोकांचा जथा अंतःप्रेरणेने चालतच होता. चैत्यभूमी हेच त्याचे लक्ष्य होते.

वस्त्यांतील लोकांबरोबरच अनेक पुरोगामी संघटना, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, साहित्य-कलाक्षेत्रातील नामवंत, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यापैकी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिलेले नव्हते. सर्वसाधारणपणे केलेल्या आवाहनाला आत्मीयतेने त्यांनी हा प्रतिसाद दिला होता.

या यात्रेला विविध प्रकारचे सहाय्य करणारे शेकडो लोक आहेत. त्यातले काही ठाऊक आहेत. तर असंख्यांची काहीही नोंद नाही वा त्यांनी कोणी अशा नोंदींची अपेक्षाही केली नाही. आता यात्रा संपल्यावर लोकांच्या भेटी होतात त्यावेळी कोणी कोणी काय केले ते काही प्रमाणात कळते आहे. त्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी लिहिलेल्या पोस्ट्समध्ये जेव्हा काही नावे आली, त्यावेळी अनेकांनी त्यांना इतर खूप नावे सुचवली. शेवटी सगळ्यांच्या सहाय्याची अशी जाहीर नोंद घेणे अशक्य आहे, अशा निष्कर्षाला आम्ही आलो.

यात्रेत बहुसंख्या आंबेडकरी समूहाची होती. तथापि, अन्य समाजविभागही लक्षणीय संख्येने होते. पुरोगामी परिवारातल्या आंबेडकरी, डावे, गांधीवादी, समाजवादी आदि सर्वांचा संयोजनापासूनच समान अधिकार असलेली ही यात्रा होती. यात्रा केवळ आंबेडकरी समुदायाची व इतर पुरोगामी मंडळी पाहुणे वा हितचिंतक असे तिचे स्वरुप नव्हते. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला होता. म्हणूनच यात्रेत फक्त तिरंगा असेल, अन्य पक्ष वा धार्मिक गटाचे झेंडे नसतील, बॅनर मात्र प्रत्येकजण आणू शकतो, असे ठरवण्यात आले होते. कोणा नवख्या सहभागींचा बारीकसा अपवाद वगळता झेंड्याची ही शिस्त बव्हंशी पाळली गेली. आपल्यात अनेक मतभेद असतानाही संविधानातल्या मूल्यांचे रक्षण या सामायिक मुद्द्यावर सगळा संविधान परिवार एकवटला पाहिजे हे जे आम्ही सतत बोलत असतो, त्याचा नमुना या यात्रेच्या मर्यादेत आम्हाला पाहता आला.

यात्रा ज्या प्रमाणात मोठी होती त्या प्रमाणात प्रसारमाध्यमांनी तिची दखल घेतली नाही. आमच्या काही कार्यकर्त्यांना त्याचा खूप रागही आला आहे. अशी दखल त्यांनी घेतली असती तर अन्य भागांतील लोकांपर्यंत ही घटना पोहोचायला खूप मदत झाली असती हे खरे. पण जे प्रत्यक्ष सहभागी होते त्यांना आत्मबलाचा जो प्रत्यय आला तो आलाच. प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष त्याला रोखू शकले नाही.

आता लोकांचे आभार मानायला संघटक-कार्यकर्ते वस्त्यांत हिंडताना लोक खूप अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्याचे दडपण येते आहे. पुढे काय करायचे, कसे करायचे हे मोठे आव्हान आहे. यात्रेची तयारी, सहभाग, स्वरुप व परिणाम आदिंचा बारकाईने धांडोळा तसेच या अशा भरघोस प्रतिसादाच्या कारणांचा शोध नीटपणे घेणे गरजेचे आहे. अनेकांनी आपापले फोटो व वृत्तांत खूप शेअर केले आहेत. ते सर्व संकलित करुन एक नेटका अहवाल तयार होणे आवश्यक आहे. हे कसे, कधी होणार ठाऊक नाही. पण हे सर्व अनुभव, निरीक्षणे नीट संकलित झाली तर या आव्हानाला भिडण्यासाठीच्या दिशादिग्दर्शनाला त्याची नक्कीच मदत होऊ शकेल.
- सुरेश सावंत
_________________________________

संविधान यात्रेच्या तयारीची खूप घाई सुरु आहे. आता तर तीन दिवसच राहिलेत. कशीतरी आजची संध्याकाळ लेख लिहायला काढली होती. लेख लिहायला सुरुवात करणार एवढ्यात फोन आला- “सभेला येताय ना?” एक सहकारी कार्यकर्ता वस्तीतून बोलत होता. वस्त्यांत प्रचार बैठका रोजच्याप्रमाणे आजही होत्या. पण मी कोणाला हो सांगितलेले नव्हते. मात्र या सहकाऱ्याच्या मते स्थानिक मंडळींनी मी येणार हे गृहीत धरुनच बैठक लावली होती. तो म्हणत होता- “लाऊड स्पीकर, खुर्च्या हा सगळा खर्च त्यांनी केला आहे. आपले इतर सहकारी आहेत. पण तुम्ही नाही आलात तर ते लोक नाराज होतील. उशीर झाला तरी तुम्ही या. आम्ही तोपर्यंत गाणी वगैरे सुरु करतो.”

मी माझी अडचण सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने ती ऐकली. मग म्हणाला- “ठीक आहे. आम्ही करतो बैठक. पण तुम्ही आला असतात तर बरे झाले असते.” त्याच्या मनातील नाराजी स्पष्ट कळत होती. मी क्षणभर विचार केला. जेव्हा कधी परतू त्यानंतर अख्खी रात्र असेल लेख लिहायला. पण आता आपल्याला लोक बोलावत आहेत तर जायलाच पाहिजे. आणि मी गेलो.

सभा उत्तम झाली. म्हणजे रुढ अर्थाने लोक फार नव्हते. शे-सव्वाशेच्या घरात. पण सभा संघटित करणारी तरुण मंडळी होती. त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांनी लोकांना घरी जाऊन जाऊन आणले होते. या मंडळींनी आमच्या इतर सभा ऐकल्या होत्या. त्यातील मुद्दे लोकांना बोलावताना ते सांगत होते. माईकवर आवाहन करत होते. त्यानंतर जमलेली माणसे शांतपणे दोन तास आम्हाला ऐकत होती. सभा संपल्यावर काही पुरुष-महिला-तरुण भेटायला आले. खूप छान सांगितलेत, ऐकतच राहावेसे वाटत होते वगैरे अभिप्राय त्यांनी दिला.

सभेला आल्याचे सार्थक झाल्याचे सुखद तरंग मनात उमटले. वास्तविक आम्ही लोकांकडे जाऊन गाणी म्हणून लोकांना जमवून भाषण करणारे लोक. आज आम्हाला लोक स्वतःहून बोलावतात यातील आनंद काही निराळाच आहे. आपण लोकांना हवेसे वाटतो ही भावना खूपच प्रेरक व ऊर्जा देणारी आहे.

सभेनंतरच्या या प्रशंसेत ‘तुम्ही संयत बोलता, लोकांना समजेल असे बोलता’ असे जे अभिप्राय हल्ली येतात, हे वैशिष्ट्य काही नवे नाही. माझी ही शैली थोड्याफार फरकाने जुनीच आहे. आशयसूत्रही जुने. तपशील काही नवे असतात. पण हल्ली मिळतो तसा प्रतिसाद पूर्वी नव्हता. याचा अर्थ, शैली व आशयसूत्र जुने असले तरी भोवतालचा संदर्भ बदलला आहे. या बदललेल्या संदर्भामुळे लोकांना हे आशयसूत्र व शैली भावू लागली आहे. हे सगळे खूप आश्वासक आहे.

सभा याचा अर्थ हजार-पाचशे लोक नव्हे. ते क्वचित असतात. लोक कमीच. त्यातही तरुण दुर्मीळ. बहुतेक मध्यमयीन व वयस्क. पण जे जमतात ते शांतपणे ऐकत बसतात. प्रसारमाध्यमांतून जे त्यांच्यापर्यंत पोहोचते वा त्यांच्यावर आदळत असते, त्यातून त्यांना जे मिळत वा आकळत नाही ते त्यांना या भाषणांतून मिळते असे लक्षात आले आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, वृत्तपत्रे, टीव्ही आदि माध्यमांची भरमार असली तरी थेट माणसाने माणसाला भेटून बोलायचे याला अजून पर्याय नाही, हे जाणवते.

संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी आम्ही वस्त्यांतून हिंडत होतोच. पण संविधान दिनी २६ नोव्हेंबरला अनेक संघटना एकत्र येऊन मुंबईत ‘संविधान जागर यात्रा’ काढायचे सुमारे अडिच महिन्यांपूर्वी ठरले. त्यानंतर ह्या प्रचार-प्रसाराला अधिक गती आली. पहिल्यांदा आम्हीच लोकांत जाऊन ओळखी काढून बोलायचो. नंतर आधीच्या बैठकांत आमचे ऐकलेले लोक अन्य ठिकाणी बैठका लावू लागले. मग रोजच बैठका-सभा सुरु झाल्या. आम्हाला घरी पोहोचायला मध्यरात्र होते. खूप थकायला होते. पण ते शारीरिकदृष्ट्या. मन खूप उल्हसित असते.

सभांची संख्या व सभेतील संपर्कात आलेले लोक यांची गणना खूप मोठी होईल. पण हे सगळे लोक यात्रेला येतील का? नाही. सगळे नाही येणार. पण काही नक्की येतील. ते किती हे सांगता येत नाही. निश्चित येणाऱ्यांची कार्यकर्त्यांनी दिलेली संख्या काही हजारांत जाते. पण एवढ्या संख्येने लोक येतील का याबद्दल मला शंका आहे. न आलेल्यांच्या शुभेच्छा राहतील याची खात्री आहे. शंकेचे कारण आमचा हा प्रचार तसा वाऱ्यावरचा आहे. अजून वस्त्यांत आमची संघटनात्मक बांधणी झालेली नाही. आमचे मनुष्यबळ हुकमी नाही. जे यात्रेला येतो म्हणालेत त्यांना स्मरण देऊन त्या दिवशी बाहेर काढणे, त्यांना वाहनांची सुविधा करुन देणे हे आमच्या आवाक्यातले नाही. लोकांची प्रेरणा व स्थानिक संघटकांचे प्रयत्न यावर सोडून द्यावे लागत आहे. शिवाय ही यात्रा थोडीथोडकी नव्हे, तर ११ किलोमीटर लांब असणार आहे. देवनार पांजरापोळ येथील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा ते चैत्यभूमी, दादर. तीही दुपारी. उन्हात. मुख्यतः चालायचे आहे. दमल्यावर वाहनात बसायची मुभा आहे. पण तेवढी वाहने असली तर. ही अडचण आमच्या संघटनेची, म्हणजे संविधान संवर्धन समितीची. ज्या संघटनांकडे साधने आहेत, हुकमी मनुष्यबळ आहे, ते किती आहे व किती लोकांना ते बाहेर काढणार आहेत, याचा अजूनही अंदाज नाही.

मध्यंतरी या यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे एक परिसंवाद झाला. डॉ. गणेश देवी, तिस्ता सेटलवाड, कुमार केतकर त्याला होते. त्यावेळी खूप लोक जमले होते. फेसबुक, व्हॉट्सअपवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांत कित्येक वर्षांत मुंबई मराठीचा हॉल असा ओसंडून वाहिलेला पाहिला नव्हता, असे अनेकांनी म्हटले. पण इथे आलेले लोक सायंकाळी सावलीत खुर्च्यांवर बसले होते वा उभे होते. हे सगळेच्या सगळे उन्हात रस्त्यावर चालायला उतरतील असे नव्हे.

यात्रेला जेवढे येतील तेवढे येतील. ते जास्त आले तर खूप छान होईल. पण कमी आले तरी वाईट वाटण्याचा प्रश्न नाही. वस्त्यांतले वर वर्णन केलेले वातावरण, आमच्या बैठकांना मिळणारा प्रतिसाद आश्वासक भवितव्याकडेच निर्देश करत आहे. त्याचे मोल मोठे आहे.

पूर्वी या वस्त्यांत, मुख्यतः बौद्ध वस्त्यांत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्याना खूप प्रश्नांना सामोरे जावे लागे. हे प्रश्न खूपसे हेतूंवर संशय घेणारे असत. ते जाणूनबुजूनही असत. हल्ली असे प्रश्न करणारे लोक वस्त्यांत क्वचित दिसतात. त्यांचा मध्यमवर्गात प्रवेश झाल्याने त्यांची वसतिस्थाने बदलली आहेत. त्यामुळे त्यांचे शब्दच्छल करणारी, हेत्वारोप करणारी शेरेबाजी ज्या प्रमाणात समाजमाध्यमांवर दिसते, तेवढी वस्त्यांत दिसत नाही. अर्थात, आम्हाला याचा अनुभव अगदी आलाच नाही, असे नाही. पण जो आला तोही बऱ्या स्थितीतल्या वसाहतीत.

याच्या उलट पूर्वी जेवढे चळवळीविषयी, आंबेडकरी, पुरोगामी विचारांविषयी जाणतेपण असायचे तेही लयाला गेलेले आढळते.

यात्रेच्या तयारीच्या या काळातच नवरात्रोत्सव होता. अनेक मंडपांतच आमच्या बैठका झाल्या. देवी बसवणारी वस्त्यांतील तरुण मुले आमचा आदर करत. दांडियाची सुरुवात व्हायच्या आधी त्यांचा मंच व माईक वापरायला देत. बैठकीला बसत. शेवटी यात्रेत आम्ही येणार आहोत, असे आश्वासन देत. एके ठिकाणी एक आयोजक तरुण म्हणाला, “सर, बिनधास्त बोला. आपलेच लोक आहेत.”

आपलेच म्हणजे बौद्ध. या मुलांना कोणतेही वैषम्य वाटत नव्हते, कोणताही अपराधीभाव त्यांच्यात नव्हता. जशी आंबेडकर जयंती तसा देवीचा उत्सव. तसाच गणपती. बाबासाहेबांबद्दल कणभरही कमी अभिमान नाही. तसेच गणपती-देवीबद्दलही काही वावडे नाही. एकदम समभाव.

मी राहत होतो त्या वस्तीतल्या मंडपातही अशीच बैठक झाली. तोच अनुभव...आपले लोक वगैरे. या वस्तीत आमचे एक पँथरचे नेते बौद्ध असतानाही होळी वगैरे कोणी रचली तर ती उद्धस्त करायचे. गणपती बसवायची तर कुणाची हिंमतच नव्हती. आम्ही मुले त्यांच्यासोबत असू. त्यांचे हे ‘अँग्री यंग मॅन’ असणे आम्हाला विलक्षण भावायचे. आमचे ते आदर्श होते. या जुन्या आठवणी एका बाजूला मनात उसळून येत होत्या अन् माझ्या त्याच वस्तीत देवीच्या मूर्तीच्या साक्षीने मी तरुण मुलांना संविधानातील मूल्ये समजावून सांगत होतो.

ही स्थिती त्रासदायक आहे हे खरे. भौतिक विकासक्रमात आमच्या पुढे असलेली ही पिढी पुरोगामी वैचारिक जाणीवेच्या बाबतीत कितीतरी मागे राहिली आहे. पण याला जबाबदार कोण? आम्ही एकेकाळी वस्तीत राहणारे सजग लोक. दरम्यान आंबेडकरी चळवळ विदीर्ण-विशीर्ण झाली हे खरे. पण आम्ही वस्ती सोडल्यानंतर वस्तीशी व चळवळीशीही संबंध तोडले किंवा तुटले हेही खरे. ते जाणीवपूर्वक सांधायचे आम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत. आमचे नाकर्तेपण आमच्यापुढे या मुलांच्या रुपाने दत्त म्हणून आता उभे ठाकले आहे.

हे आव्हान समोर आहे. पण आधी वर्णन केलेली आश्वासकताही आहे. आमचे स्वागत होते आहे. लोक शांतपणे समजून ऐकायचा प्रयत्न करतात. म्हणजेच या यात्रेच्या प्रचाराच्या निमित्ताने तयार झालेल्या संपर्कांना यात्रेनंतरही आम्ही जिवंत ठेवू शकलो, त्यांच्याशी संपर्क-संवादात सातत्य ठेवू शकलो तर ही स्थिती काही अंशी नक्कीच बदलू शकते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_______________________________

आंदोलन, डिसेंबर २०१७

Monday, October 23, 2017

ती सध्या काय करते?


ती अलिकडेच निवृत्त झाली. बहुधा स्वेच्छानिवृत्ती असावी. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी असली तरी निवृत्तीचे वय झाले असावे असे वाटत नाही. असो. काहीही असो. ते तसे महत्वाचे नाही. मुद्दा हा की तिने मला निवृत्तीच्या निरोप समारंभाचा आमच्या एका सामायिक मित्राकरवी निरोप पाठवला होता. आश्चर्य वाटले. कारण गेल्या ३३ वर्षांत आमचा संपर्क नाही. एकमेकांना पाहिलेलेही नाही. कार्यक्रमाला गेलो नाही. त्या दिवशी एक काम होते. त्याचे कारण दिले. पण मला जायचे नव्हते, हा खरा मुद्दा होता. ज्या संबंधांना संपून एवढा प्रदीर्घ काळ लोटला त्यांच्या एखाद्या पापुद्र्यालाही-कोणत्याही निमित्ताने स्पर्श मला नको होता.

म्हणजे मी हे सहज घेऊ शकत नव्हतो. ती आजही माझ्या डोक्यात-मनात आहे, हे कबूल करतो. वास्तविक आमचा ओळखीपासून निरोपापर्यंतचा सगळा काळ जेमतेम दोन वर्षांचा. त्यातला आमच्या जवळ असण्याचा अगदीच अल्प. बाकी एकमेकांचा ‘संदर्भ’ असण्याचा. पण हा संदर्भ पिळवटणारा, घुसमटवणारा. या संदर्भाचा अवकाश उमलत्या वयातील दोन स्त्री-पुरुषांच्या भावना-आकांक्षांचा केवळ नव्हता. त्याला आर्थिक स्थिती व जात या कठोर वास्तवांचे कराल पहारे होते. पुढच्या एका टप्प्यावर हे पहारे भेदणारीही मला भेटली. पण परस्परांवर जीव ओवाळून टाकू पाहणाऱ्या अनेक उमलत्या फुलांचे गुलाबी निःश्वास गुदमरवून टाकणारी आर्थिक-जात वास्तवाची तटबंदी आजही मजबूत आहे. हा संदर्भ बहुधा तिला माझ्या मनातून विसर्जित होऊ देत नसण्याचे महत्वाचे कारण असावा.

ती मराठा. मी बौद्ध. ती इमारतीत राहणारी. मी झोपडपट्टीत. अर्थात, नेहमीप्रमाणे हे संदर्भ आमच्या जवळीकीच्या प्रारंभी आले नव्हते. ते दरम्यान आले. आमची मैत्री खूप चांगली. एकमेकांना आश्वस्त करणारी. जपणारी. ती तशीच राहिली असती तर आम्ही आजही उत्तम मित्र असतो. ती उत्तम गायची. अक्षर सुरेख. कॉलेजच्या स्नेसंमेलनातल्या तिच्या नृत्यांची तालीमही चुकवू नये इतकी मला ती भावायची. मित्रमंडळींबरोबर असतानाचे हास्यविनोद, थट्टामस्करी, फिरणे, आग्रहाने आपल्या डब्यातले खाऊ घालणे याची आजही असोशी वाटते. पण मैत्रीच्या पुढचे काही बंध तयार होऊ लागले आणि हे विस्कटले.

बंध तयार होण्याचा काळ अर्थातच मोहरण्याचा होता. स्वतःच्या तसेच इतरांच्या कवितांचे सूचक, थेट संदर्भ या बंधांची वाट प्रशस्त करत होते. मी या काळात डायरी लिहीत असे. ती गद्य असे. तशीच अगद्यही. त्यातील ही एक नोंदः

‘किती वेंधळा रे तू! साधी भेळ तुला नीट खाता येऊ नये.’ – तू म्हणालीस.
बुडता सूर्य लाटांशी लपाछपी खेळताना
स्वतःजवळची भेळ भरवताना
मी तुझं बोट कधी चावलं कळलंच नाही.
...आता एक चित्कार कानभर
सूर्य मुकाट बुडताना;
व सांडलेली भेळ इतस्तत:

आमचे मैत्रीच्या पुढचे नाते सिद्ध झाल्या झाल्याच खरे तर हे इतस्ततः विखुरणेही सुरु झाले. जी कधीच संपू नये असे वाटले ती अगदी दुर्मीळ अशी समुद्रकिनारीची एक भेट अगदी कालच्यासारखी स्मरणात आहे. बिलगून बसलेले. हातात हात गुंफलेले. कलत्या सूर्यकिरणांनी मंद लाटांवर एक वाट प्रकाशमान केलेली. आमच्यापासून सुरु होऊन दूर क्षितीजात विरुन जाणारी. ती गात होतीः ‘..पत्ता पत्ता बूटा बूटा..’ जया-अमिताभचे ‘एक नजर’मधले गीत. तिच्या आवाजात ऐकलेली गाणी रेडिओ-टीव्हीवर लागली की ती समोर येई. आजही येते. तिच्या आठवणीसाठीही ती ऐकतो.

माझा काळ दलित पॅंथरच्या उताराचा. पण तरीही वस्त्या धगधगत होत्या. आम्हीही त्यातच घडत होतो. चळवळीत कधी पडलो असा कोणी प्रश्न केला तर आमच्या वस्तीत राहणाऱ्या त्या पिढीचे उत्तर असेल- जन्माला आल्या आल्या. एका बाजूला नाजूक भावनिक आंदोलने व दुसऱ्या बाजूला-नव्हे भोवताली रणरणती सामाजिक आंदोलने. हे सोबतच चालले होते. सामाजिक परिवर्तनाची चळवळ हेच आपले भागधेय हे तेव्हाच नक्की झाले होते. आणि ते नॉन निगोशिएबल होते.

अर्थात त्याबद्दल तिने थेट अभिप्राय कधीच दिला नाही. आमच्या चर्चा-संवादात हे संदर्भ असायचे. माझ्या अस्तित्वाचा तो भागच असल्याने अपरिहार्यपणे यायचे. ‘माझ्या घरी या नात्याचा स्वीकार होणे कठीण, वडिलांची मी खूप लाडकी आहे. त्यांना कसे दुखवायचे?..’ हे प्रश्न तिच्या बोलण्यात वाढू लागले. अनिश्चितता, अस्थिरता आम्हाला घेरु लागली. तिचा स्वर जड होई. डोळे भरुन येत. आमच्या एकत्र असण्यातला अधिकाधिक वेळ या अस्थिरतेच्या ताणाने भरलेला असायचा. जवळच्या मित्र-मैत्रिणींनी तिला निर्णयात आधार द्यायचा खूप प्रयत्न केला. त्यामुळे ती दोलायमान मात्र होई.

या दोलायमान अवस्थेत दुसऱ्या टोकाला गेलेला लंबक वेगाने या टोकाला आल्यावर तिने मला लिहिलेले हे पत्रः

प्रिय सुरेश,

‘हमे तुमसे प्यार कितना
ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते
तुम्हारे बिना’

मी आतापर्यंत तुला दुःख आणि दुःखच दिलं आहे. पण आता येणारे आषाढमेघ न बरसता निघून जाण्यासाठी नव्हेत. या गदगदणाऱ्या शिशिराची झळ आपल्या वसंत बहाराला लागणार नाही याचे आश्वासन देते. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. तुझं भवितव्य उज्जवल आहे यात तिळमात्र शंका नाही.

चांगला अभ्यास कर.

तुझी आणि तुझीच,

……

(पत्राच्या खालच्या मोकळ्या जागेत मोठी ठळक आद्याक्षरांना हंसाचा आकार दिलेली आमची दोघांची नावे.)

तिच्या सुरेख अक्षरातले हे पत्र मी अजून जपून ठेवले आहे. हे लिहिताना ते माझ्या समोरच आहे.

आश्वस्ततेचा हा काळ अगदीच मामुली ठरला. पुन्हा तीच दोलायमान आंदोलने. याची नोंद करताना डायरीत मी लिहिलेः

तुझं न येणं गृहीत धरुनही
मी उभा होतो कारंज्याशी
तुझ्या प्रतीक्षेत केव्हाचा!
कारंजे...जसे तुझे शब्द
तुषाराची सप्तरंगी कमान
तुझ्या भोवती;
तशीच हौदाची चाकोरीही.
हौदाचे कठडे
खरंच इतके बळकट
की तुलाच हवी आहे कमान..?

आमच्या नात्याला अधिकृत विराम न देताच ते विरत गेले. कॉलेज संपले. प्रत्यक्ष दिसणेही संपले. तिच्या पत्राशिवाय तिचा फोटो वगैरे काहीही जवळ ठेवले नाही. आम्ही एकत्रित केलेल्या नाटकाचा फोटोही मी घेतला नाही. तिने तो घेतला असे मला नंतर कळले.

आमच्या नात्याची ही अटळ परिणती आहे, याचा पुरेपूर अंदाज आला असतानाही मी स्वतःला स्थिर ठेवू शकलो नाही. बाहेरुन दिसलो नाही तरी आतून खूप विकल झालो. पण या स्थितीत राहण्याची चैनही करता येत नव्हती. आधीच गरीबी. त्यात गिरणी संपाने केलेली वाताहत. आई-वडिलांची आजारपणं. लहान भावाची जबाबदारी. कॉलेज करत राहणं शक्य नव्हतं. कमावणं भाग होतं. नोकरीला लागलो. पुढचे शिक्षण नोकरी करत केले. सामाजिक कामात होतोच. तो तर श्वासच होता. संधी मिळताच पूर्णवेळ कार्यकर्ता व्हायचे हे मनात होतेच. आंबेडकरी परिसराबरोबरच अन्य पुरोगामी चळवळींतला सहभागही वाढत गेला.

जीवनाचा हा नवा टप्पा सुरु झालेला असतानाच ती लग्नाची पत्रिका द्यायला घरी आली. मी नव्हतो. आईजवळ ठेवून गेली. तिच्या लग्नाच्या दिवशीच मी स्त्री मुक्ती संघटनेच्या विदर्भ दौऱ्यात नाटकात उभा होतो. माझे पात्र गंभीर होते. त्यात भावूक होणे हा नाटकाचाच भाग होता. खरं तर हे पात्र करताना मी आपसूकच भावूक होई. पण आजच्या अश्रूंना एक वेगळे परिमाण होते. नाटक संपल्यावर आंघोळीला गेलो. कडाक्याच्या थंडीत कितीतरी वेळ नळाखाली बसून राहिलो.

डायरीत एक नोंद आहेः

कालपरवापर्यंत दूरवर का होईना 
एक ‘घर’ होतं माझ्या दृष्टिक्षेपात...
आज अखंड मुशाफिरीची दीक्षा.
कुठले कवडसे, कुठल्या तिरीपी,
कुठलीच शलाका जोजारणं नाही.
पायलीभर चांदण्या ओतून अवकाशाचे मापन नाही.
समाधान, खेद, हर्ष, दुःख..सारे पडद्याआड;
मला अनोळखी आहेत ते.

दुसरी एक नोंद अशीः

जखम मुक्तपणे वाहू द्यावी...
शुष्क मांसात चोपडावी माती 
पाहिजे तर ‘निर्दय’ या संज्ञेने.
राखेला खाक होण्याची भीती आता कशासाठी..?
अंगणातला गुलमोहोर पेटला तरी खंत नाही.
निःश्वासाची गोष्टच दूर
विझविण्याचा प्रयत्न नाही.
वैफल्य- स्थितप्रज्ञतेचा पाया भरतं का..?

मी स्थितप्रज्ञ वगैरे काही झालो नाही. तिच्या लग्नानंतर तिच्याविषयीच्या खोल कुठेतरी असलेल्या प्रतीक्षेला विराम मिळाला एवढेच. तिच्याविषयी काही तक्रार नव्हती. पुढेही राहिली नाही. या काळात मीनाकुमारी, गुरुदत्त हे दोस्त वाटत. त्यांच्याशी कितीतरी गुजगोष्टी मी डायरीत केल्या आहेत. ‘चाँद तन्हा है आसमाँ तन्हा, दिल मिला है कहाँ-कहाँ तन्हा’ या मीनाच्या ओळी वेदनेवर फुंकर घालत. गुरुदत्त या स्थितीला एक भला थोरला सामाजिक आयाम देई. कितीतरी वेळा पाहिलेल्या ‘प्यासा’तला गुरुदत्त ही आपलीच प्रतिमा वाटे. दुरावलेल्या माला सिन्हाला तो जे म्हणतो ते माझेच उद्गार वाटत- “मुझे तुमसे शिकायत नहीं. मुझे शिकायत है समाज के इस ढाँचे से.” भोवताली घोंगावणाऱ्या फुले-आंबेडकरी, डाव्या-समाजवादी चळवळींमुळे हेच विचारसूत्र आम्हाला मिळाले. माझे दारिद्र्य, माझी जात व त्यामुळे येणारी प्रेमातली विफलता यास मी किंवा ती जबाबदार नाही, तर जबाबदार आहे ही 'समाजव्यवस्था'. ...आणि म्हणूनच पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला ही वंचना, ही विफलता येऊ द्यायची नसेल, तर समाजाचा हा 'ढाँचा' बदलला पाहिजे हे ध्येय अधिकच पक्के झाले.

हा प्रवास एकट्याने करावा लागणार याची तयारी मनाशी झाली होती. याचा अर्थ जोडीदाराची आस संपली होती असे नव्हे. पण ती मिळेल याची प्रतीक्षा मात्र सोडली. मनाने वास्तवाचा स्वीकार बऱ्याच प्रमाणात केला होता.  ज्या कोणी सहकारी, मैत्रिणी सहवासात येत त्यांना कोणत्यातरी निमित्ताने घर-वस्ती अगत्याने दाखवत असे. त्यामुळे संबंधांचा पाया प्रारंभीच पुरेसा स्पष्ट होई. आमच्या वस्तीत संघटनेच्या उच्चवर्णीय सहकारी मुली सोबत येत त्यावेळी नेहमीचा एक प्रश्न वस्तीतल्या कार्यकर्त्या मित्रांकडून येई– ‘यातली कोण लग्न करुन येईल का राहायला या झोपडपट्टीत?’ त्यांना मी समजावत असे- ‘अरे, त्या माझ्या सहकारी आहेत. आपल्या वस्तीत येतात याचे आपण स्वागत करायला हवे. माझ्याशी लग्न करुन इथे राहणे ही त्यांच्या कामाची पावती कशी काय असू शकते?’

पण यातल्याच एकीने माझ्याशी लग्न केले. समजून-उमजून. वस्ती, घर, आई-वडील सगळे सगळे बघून. तिला घरी संघर्ष करावा लागला. आई-भावंडांनी साथ दिली. पण वडिलांचा विरोध तीव्र होता. विरोधाचे कारण जात. तिला घरातून बाहेर पडावे लागले. ज्या वस्तीत आम्ही राहत होतो, तिथे तिला काय सोसावे लागले हे कळायचे असेल तर ‘सैराट’मधील आर्ची-परशा पळून जाऊन ज्या घरात राहतात, ते घर डोळ्यासमोर आणा. ज्या शौचालयात जाताना आर्चीला कसंनुसं होत होतं त्यापेक्षा वाईट स्थिती आमच्या सार्वजनिक शौचालयांची होती. तिने हे सोसलं वगैरे म्हणणे तिला फारसे पटत नाही. तिची भूमिका असते- ‘ती माझी निवड होती. आयुष्यात काय हवंय याची मला स्पष्टता होती.’ त्यामुळे मीही तिने काय व कसे सोसले हे जाहीरपणे सांगण्याचे किंवा त्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्याचे धारिष्ट्य अजून तरी दाखवलेले नाही.

चळवळीतले सहकारी म्हणून वस्तीतल्या तसेच बाहेरच्या अनेक कामांत आम्ही एकत्र असू. पण घर चालवणे, सांभाळणे व उभे करण्यात तिचाच वाटा आहे. आमचे लग्न झाले तेव्हा मी पंचविशीत व ती तेवीस वर्षांची होती. ती शिकत होती. त्याचवेळी मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. चळवळीतल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने तिचे शिक्षण व नोकरी मिळेपर्यंतचा काळ आम्ही निभावला. आई-वडिलांची आजारपणं, अन्य नातेवाईकांचे करणे ही जबाबदारी तिने अधिक उचलली. वस्तीतल्या तसेच गावातल्या लोकांशी तिच्या दोस्तीने माझे त्यांच्याशी नव्याने संबंध तयार झाले. मी कार्यकर्ता होतो. मांडणी करण्यात मला गती होती. पण व्यक्ती-व्यक्तींशी हृदयाचे नाते जोडून त्यांना संघटित करण्यातले तिचे कसब माझ्यात नव्हते.

आम्ही संघटनेत एकत्र होतो. पण जेव्हा जोडीदार म्हणून विचार करण्यासाठी भेटलो, त्या दिवसाला उद्देशून मी जे लिहिले व तिला दिले त्यातल्या शेवटच्या काही ओळी अशा आहेतः

हे २५ जून १९८८,
उगवलास अन् मावळलास त्याच सूर्यास्ताने
जगरहाटीचे, रुढ नियमांचे बाज सांभाळत;
तरीही
उसळलास माझ्या आत-भोवती
किनारा गिळू पाहणाऱ्या समुद्रलाटांचे तुफानणारे श्वास होऊन,
मात्र उसळलास, तुफानलास, झेपावलास एवढेच नाही;
तर गेलास याच्याही पल्याड आणि-
शांतवलास आदिम ज्वालाडोह,
तुफानणाऱ्या लाटांना दिलीस हलक्या समुद्रगाजेची कुजबुज,
बेमुर्वत आषाढसरी झाल्या कारंज्याची थुईथुई,
काळ्या मेघांची भयकारी गुहा छेदून दिलेस
निरभ्र आकाश
पिवळे, शांत, निळे
ज्यात पाखरांचा विहार
मनसोक्त, मुक्त, संथ...

भौतिक स्थितीत तसेच चळवळीत ज्या काही लाटा वरखाली व्हायच्या त्या होत राहिल्या. पण आमच्या नात्याचे हे निरभ्र, मुक्त, संथत्व आजही ढळलेले नाही. उलट त्याला आता एक प्रौढ गहिरेपण आलं आहे. खरं म्हणजे आता आम्ही अनेक जबाबदाऱ्यांतून बऱ्यापैकी मुक्त आहोत. आम्ही दोघेच एकत्र असणे, जाणे हे आता अधिक होते. लग्नावेळी आमचा हनिमून होऊ शकला नाही. पण आता ‘हनिमूनी’अवस्था ही नित्यावस्था आहे.

आणि याला ‘तिची’आठवण बाधा होत नाही. काळाचा अगदी लहान पण मनाचा मोठा अवकाश व्यापणारा तो टप्पा डायरीसारखा सोबत राहिला. पुढेही राहील. मंद. तेवत. कधीतरी झुळूकीने ज्योत हलेल. मोठी होईल. एवढेच.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________

पुरुष उवाच, दिवाळी. २०१७

Thursday, October 19, 2017

या वादांवर मार्ग काढण्यासाठी एकत्र बसून चर्चा करुया !

बौद्धांनी दिवाळी करावी की करु नये याबद्दल घमासान चर्चेच्या पोस्ट्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. तथापि, या वादाचे लागते असलेले लोक अगदी नगण्य आहेत. या दोहोंच्या वादाचे काहीही पडलेले नसलेला बौद्ध समाजातील मोठा विभाग आपल्याला हवे तेच करतो आहे. हे वाद त्याच्या गावीही नाहीत.

आजच आम्ही काही सहकारी या विषयावर बोलत होतो. आमचे एक सहकारी हिरामण खंडागळे यांनी एक आठवण सांगितली. त्यांची सांगण्याची ढब न्यारी आहे. शेवटी आम्ही खो खो हसत सुटलो. मी ऐकले ते माझ्या शब्दांत मांडतो.
बौद्ध बहुसंख्येने राहत असलेल्या एका इमारतीत वरच्या माळ्यावरील एका बौद्ध इसमाच्या घरी तुळशीचे लग्न होते. खालच्या मजल्यावरील काही बौद्धांना हे सहन झाले नाही. बौद्ध असताना हा इसम हिंदू रुढी पाळतोच कसा? त्यांनी जाऊन त्याला असे न करण्याबद्दल तंबी दिली. तरीही तो ऐकेना. त्याच इमारतीत रिपब्लिकन पक्षाचे एक ज्येष्ठ नेते राहत होते. तंबी देणारे लोक त्यांच्याकडे गेले. तुम्ही तरी समज द्या त्याला, अशी या लोकांनी नेत्याला विनंती केली. नेत्याने फोन लावला त्या वरच्या मजल्यावरील इसमाला. लोकांची तक्रार सांगितली. नेत्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन तो इसम नेत्यास म्हणाला, “साहेब, मी तुळशीचे लग्न लावतो आहे, हे बरोबर. आणि मी ते लावणार. कारण ते मी हिंदू पद्धतीने लावत नाही. मी ते बौद्ध पद्धतीने लावतो आहे.”

आम्ही खो खो हसलो खरे. पण असे प्रकार गंभीरपणे करणाऱ्यांची अनेक उदाहरणे नंतर इतर सहकाऱ्यांनीही सांगितली. मयतालाही बौद्ध असल्याने नीळ लावणे वगैरे.

२६ नोव्हेंबरला संविधान दिनी मुंबईच्या देवनार पांजरापोळ येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दादर चैत्यभूमीपर्यंत अनेक संघटना मिळून आम्ही संविधान जागर यात्रा काढणार आहोत. तिच्या तयारीसाठी या नवरात्रात अनेक मंडपांतच आमच्या बैठका झाल्या. देवी बसवणारी ही वस्त्यांतील तरुण मुले आमचा आदर करत. दांडियाची सुरुवात व्हायच्या आधी त्यांचा मंच व माईक वापरायला देत. बैठकीला बसत. शेवटी यात्रेत आम्ही येणार आहोत, असे आश्वासन देत. एके ठिकाणी एक आयोजक तरुण म्हणाला, “सर, बिनधास्त बोला. आपलेच लोक आहेत.”

आपलेच म्हणजे बौद्ध. या मुलांना कोणतेही वैषम्य वाटत नव्हते, कोणताही अपराधीभाव त्यांच्यात नव्हता. जशी आंबेडकर जयंती तसा देवीचा उत्सव. तसाच गणपती. बाबासाहेबांबद्दल कणभरही कमी अभिमान नाही. तसेच गणपती-देवीबद्दलही काही वावडे नाही. एकदम समभाव.
मी राहत होतो त्या वस्तीतल्या मंडपातही अशीच बैठक झाली. तोच अनुभव...आपले लोक वगैरे. या वस्तीत आमचे एक पँथरचे नेते बौद्ध असतानाही होळी वगैरे कोणी रचली तर ती उद्धस्त करायचे. गणपती बसवायची तर कुणाची हिंमतच नव्हती. आम्ही मुले त्यांच्यासोबत असू. त्यांचे हे ‘अँग्री यंग मॅन’ असणे आम्हाला विलक्षण भावायचे. आमचे ते आदर्श होते. या जुन्या आठवणी एका बाजूला मनात उसळून येत होत्या अन् माझ्या त्याच वस्तीत देवीच्या मूर्तीच्या साक्षीने मी तरुण मुलांना संविधानातील मूल्ये समजावून सांगत होतो.

आहे हे असे आहे. यावर मार्ग काय?

ज्याला जे बरोबर वाटते तेच खरे व तेच इतरांनी ऐकायला हवे; नाहीतर तो धर्मद्रोह असे करुन कसे चालेल?
दिवाळीबद्दल गेल्या वर्षी एका मोठ्या धम्म परिषदेत मंचावरील भिख्खूंकडूनच दोन मते व्यक्त झाली. एका भन्तेंनी बौद्धांनी दिवाळी करु नये अशी भूमिका मांडली. त्याचे ऐतिहासिक कारण दिले. दुसऱ्या भन्तेंनी दिवाळी हा बौद्धांचा सण आहे, असे जोरदार समर्थन केले. त्यांनीही ऐतिहासिक संदर्भ दिले.

अशावेळी सर्वसामान्य बौद्धांनी (तुळशीचे लग्नवाले किंवा नवरात्रवाले सोडून जे या वादांना थोडी किंमत देतात त्यांनी) काय करावे, असा प्रश्न उभा राहतो. बौद्ध सूत्रांचे नव्या परिस्थितीत अर्थ लावण्यासाठी बुद्धानंतर शंभर वर्षांनी वा अशोकाच्या काळात धम्म संगिती (म्हणजे परिषदा) झाल्याची इतिहासात नोंद आहे. संगिती हा मोठा प्रकार झाला. पण आपण बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेनंतर आता ६१ वर्षांनी जे प्रश्न आपल्याला पडतात, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किमान छोट्या छोट्या परिषदा का घेऊ नयेत?

या परिषदांत बौद्धांमधल्या विविध मतांच्या प्रतिनिधींना बोलवावे. त्यांना आपले म्हणणे सकारण मांडायला सांगावे. त्याची टिपणे आधी वितरित करावी. मांडणी झाल्यावर त्या वक्त्यास प्रश्न विचारावे. दुसऱ्या मताच्या वक्त्यालाही हीच संधी मिळावी. अभिनिवेश, वकिली युक्तिवाद या मांडणींत नसावा. आपल्या मतांच्या लोकांनाच केवळ टाळ्या अशी गटबाजी नसावी. इतरांना आपले म्हणणे समजावून सांगणे, पटविणे ही रीत असावी. ही चर्चा लिहून काढावी. त्यातील विरोधाचे व सहमतीचे मुद्दे नीट नोंदवून त्यांचे इतिवृत्त तयार करावे. ते विचारार्थ विविध माध्यमांतून प्रसारित करावे. शक्य झाल्यास ही चर्चा रेकॉर्ड करुन यू ट्यूबवर अपलोड करावी. परिषद चालू असताना ती फेसबुक लाईव्हही करता येईल. या परिषदेत कोणत्याही निर्णयाला येऊ नये. अशा परिषदा महाराष्ट्रात विविध ठिकाणी व्हाव्यात. पहिल्या फेरीच्या परिषदांनंतर ६ महिन्यांनी दुसरी फेरी करावी. अशा काही फेऱ्यांनंतर एक मध्यवर्ती परिषद करावी. तिच्यातही निर्णयवजा काही जाहीर न करता सहमतीचे मुद्दे विशेष अधोरेखित करुन तुम्ही याचा विचार करा, असे समाजाला आवाहन करावे.

आज तमाम महाराष्ट्रातल्या बौद्धांची एकच एक शिखर संघटना नाही, ही वस्तुस्थिती मान्य करुन आमचेच ऐकायला हवे असा कोणत्याही संघटनेने आग्रह धरु नये. त्याने काहीही हाताशी लागणार नाही. अशा अधिकारी केंद्राकडे वाटचाल हा लांबचा पल्ला आहे. ते धर्मपीठ होता कामा नये ही सुद्धा दक्षता घ्यायला हवी. या परिषदांमुळे आज मनाला वाटेल तसे तलवारी परजणे चालू आहे, ते थांबून गंभीर चर्चेला लोक बसले तरी खूप यश मिळाले असे समजायला हवे.

हे कोणी करायचे?

माझ्याकडे सगळी स्पष्टता व आराखडा आहे असे नव्हे. मी कल्पना मांडतो आहे. आपल्या सगळ्यांच्या सूचनांतून त्यास अधिक आकार येऊ शकेल. क्रमात मलाही अजून काही सुचेल. एक नक्की वाटते. तरुणांनी यात पुढाकार घेतला तर अधिक बरे. याचा अर्थ ज्येष्ठांनी हे करण्यास प्रतिबंध आहे असे नव्हे. कोणत्याही राजकीय गटाच्या, मताच्या व्यक्तीस यातून वगळू नये. कोणालाही अस्पृश्य ठरवू नये. गंभीरपणे म्हणणे मांडणाऱ्या कोणालाही यात प्रवेश असावा.

या परिषदांकडे जाण्यासाठी सुरुवात म्हणून एखादा ‘नवयानी बौद्धः चिकित्सा व उपाय’ या किंवा अधिक उचित नावाने फेसबुक गटही सुरु करता येईल. अट एकच यावर ‘शुभ धम्म सकाळ, कडक जयभीम’ अशा पोस्ट्स न टाकता विषयाला अनुसरुनच चिकित्सा करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या तसेच उपाय सुचविणाऱ्या पोस्ट्स टाकल्या जाव्यात. याच्या admin ची जबाबदारी घेणाऱ्यांनी याबाबत दक्ष राहण्याची गरज असेल.

आपण या दिशेने चर्चा सुरु केली की अशा अनेक कल्पना पुढे येऊ शकतील.

बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे व त्याला मानणाऱ्या समुदायाचे भवितव्य नीट मार्गी लागण्यासाठी असे काहीतरी करण्याची गरज आहे, असे मला तीव्रतेने वाटते.

आपण विचार करावा, विनंती.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_______________________________________________

(आपणास योग्य वाटल्यास हे टिपण आपण ऑनलाईन तसेच प्रिंट माध्यमांद्वारे शेअर करावे ही विनंती.)

Tuesday, October 17, 2017

राम-कृष्ण गेले...भीम-बुद्ध आले


माझ्या जन्मापूर्वीची ही गोष्ट आहे. बाबासाहेबांनी मृत जनावरांचे मांस खाणे सोडायला सांगितले. मला आठवते त्याप्रमाणे आमच्या घरात मृत सोडाच मोठ्याचे मांसही खाल्ले जात नसे. फक्त कोंबड्या-बकऱ्याचेच मटण असे. आई त्याबाबत अधिक दक्ष असे. आमच्या नात्यातले, शेजारचे जे कोणी मोठ्याचे मांस खात त्यांना ती कमी प्रतीची माने. आपण बौद्ध म्हणजे काहीतरी उच्च आहोत. असे मोठ्याचे मटण खाण्याने आपण भ्रष्ट होतो, असा तिचा माझ्यावरील संस्कार आहे.

आमच्या घरी बुद्ध व बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणत्याही देवाचे फोटो मी पाहिले नाहीत. (हे आमचे वैशिष्ट्य. काही बौद्धांच्या घरांत ते आजही दिसतात.) ती या फोटोंना नित्यनेमाने हार घाली. त्यांच्यासमोर उदबत्ती-मेणबत्ती लावे. माझे वडिल वंदना घेत. आम्ही घरातले हात जोडून त्यात सामील होत असू. दुसऱ्या कोणत्याही देवाला न भजणाऱ्या माझ्या आईच्या अंगात सात आसरा (मोठ्या बाया असेही या देवींना म्हणतात) मात्र येत. तिच्या अंगात आले की लोक जमा होत व तिला आपल्या अडचणी सांगत, गाऱ्हाणे घालत. तिच्या अंगातली देवी त्यांना उत्तरे देई. मार्ग सांगे. या प्रकारात कुठेही कोणाकडून पैसे किंवा अन्य काही स्वीकारले जात नसे. परोपकाराचीच भावना असे. आम्ही मुलांनी थोडे कळू लागल्यावर गावी आमच्या बौद्धवाडीत ज्या कोणाच्या अंगात येईल त्याला दंड बसवला जाईल, असे विद्रोही फर्मान काढले. वाडीतल्या अनेक स्त्रियांप्रमाणे माझ्या आईच्या अंगात येणेही तेव्हापासून बंद झाले.

माझी आई माझ्या मित्रांशी अत्यंत आपुलकीने वागे. पण त्यांच्या जातींविषयी जागरुक असे. मांग ही जात आमच्या तुलनेत तथाकथित खालची. म्हणून मांगाच्या घरी जेवू नकोस, पाणी पिऊ नकोस अशी ती सांगे. फक्त सांगे. घरी आलेल्या मांग मित्राला तिने खाऊ-पिऊ घालण्यात काही कसर केल्याचे मला आठवत नाही.

आजच्या महाराष्ट्रातल्या बौद्धांचा, त्यातील महिलांचा विचार करताना बाबासाहेबांच्या ‘नवयानी’ बौद्ध धम्माचा संदर्भ घ्यावा लागेल. पारंपरिक बौद्ध धर्माशी इथल्या बौद्धांचा त्या अर्थाने संबंध नाही. म्हणूनच मग पारंपरिक बौद्ध धर्मात स्त्रीला दुय्यम लेखले गेल्याचा तत्त्व म्हणून अंगिकार करण्याची सूट बाबासाहेबांनी दीक्षा दिलेल्या बौद्धांना मिळत नाही. शिवाय बौद्ध धम्म स्वीकार हा बाबासाहेबांच्या वैचारिक विकासाचा शेवटचा टप्पा धरला तर बाबासाहेबांनी थेट १९२७ च्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून संविधानर्मिती प्रक्रिया व १९५१ च्या हिंदू कोड बिलापर्यंत तसेच या दरम्यानच्या अनेक भाषणांतून जी स्त्रीविषयक भूमिका मांडली ती चौकट स्वीकारावी लागते. ही चौकट आधुनिक स्त्रीवादाची आहे. स्त्री-पुरुषांचा दर्जा समान, पती-पत्नी मित्र, स्त्रीला पिता-पतीच्या संपत्तीत हक्क, घटस्फोटाचा अधिकार, द्विभार्या प्रतिबंधाद्वारे पतीच्या श्रेष्ठत्वाला लगाम, कामाच्या ठिकाणी बाळंतपणाच्या रजेचा अधिकार, आंतरजातीय लग्नाचा पुरस्कार आदि भूमिकांनी बाबासाहेबांनी या चौकटीचा आशय संपन्न केला आहे. महाराष्ट्रातल्या नवदीक्षित बौद्धांना आपल्या बौद्धत्वाची हीच चौकट स्वीकारावी लागते.

मानवी समाजाच्या विकासक्रमात धर्माच्या स्थानाची चिकित्सा करताना अभ्यासक जी सूत्रे मांडतात, त्यात पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे गौणत्व हा सामायिक भाग आहे. त्याच्या तीव्रतेत कमीअधिक फरक असला तरी स्त्रीला सगळ्याच धर्मांनी पुरुषापेक्षा दुय्यम मानलेले आढळते. स्त्रीला कमी लेखण्यात जैन वा बौद्ध हे प्रगतीशील धर्मही अपवाद नाहीत. ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या आपल्या पुस्तकाच्या अखेरच्या भागात विविध धर्मांतील स्त्रियांच्या स्थानाविषयी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विवेचन केले आहे. त्यात बौद्ध धर्माविषयी काही नोंदी ते करतात. आपले पालनपोषण केलेल्या सावत्र आईला ती स्त्री असल्याने भिक्षुसंघात प्रवेश देण्यास अनुत्सुक असलेले बुद्ध आपला शिष्य आनंद याच्या आग्रहाखातर काही अटींवर राजी होतात. मात्र त्याचवेळी स्त्रियांच्या भिक्षुसंघातील प्रवेशामुळे बौद्ध धम्म हजार वर्षांऐवजी पाचशे वर्षेच टिकेल असे उद्गार काढतात. नुकताच संघात प्रविष्ट झालेला तरुण भिक्षू समोर आल्यास शंभर वर्षे वयाच्या भिक्षुणीनेही उठून उभे राहायला हवे, ही भिक्षूसंघाची प्रथा होती. भार्येचे प्रकार सांगताना सातवा दासीभार्या हा सर्वोत्तम प्रकार असल्याचे बुद्ध सांगतात. बुद्धांचा याबाबतीतला दृष्टिकोण ‘परंपरागत’ होता, असे डॉ. साळुंखे म्हणतात, पण त्याचवेळी ‘..तरीही तत्कालीन समाजाचा विचार करता तुलनात्मक दृष्ट्या तो खूप उदार होता’ अशी प्रशंसाही करतात. त्यासाठी लिच्छवी सरदारांनी बुद्ध आपल्याकडेच यावेत यासाठी आटापिटा चालवला असतानाही ते आम्रपाली या गणिकेच्या निमंत्रणाचा स्वीकार करतात, या घटनेचे उदाहरण देतात. एकूण, ‘गौतम बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोण संमिश्र होता’ असा डॉ. साळुंखेंचा निर्वाळा आहे.

स्त्रीविषयक भूमिका ही अत्यंत महत्वाची असली तरी केवळ तिच्यावरुन एखाद्याचे संपूर्ण मापन करणे चुकीचे ठरेल, हे खरे. ऐतिहासिक क्रम लक्षात घेऊन गौतम बुद्धाच्या प्रगतिशील विचारांतली ती एक उणीव आहे, एवढी नोंद करुन आपण पुढे सरकायला हवे हेही बरोबर. पण त्याचे आज कोणत्याही प्रकारे समर्थन होता कामा नये, हेही तेवढेच खरे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला स्वीकारताना ही दक्षता घेतली आहे. अडीच हजार वर्षांनी बुद्धाचे नेमके काय स्वीकारायचे याचा निर्णय करताना मानवाच्या कल्याणाला ते उपयुक्त आहे का, अनुभवाच्या कसोटीला ते उतरते आहे का, हे बुद्धाने सांगितलेले निकषच ते वापरतात. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा त्यांचा ग्रंथ या कसोट्यांवरच सिद्ध झाला आहे. बौद्ध धर्मात हीनयान, महायान असे पंथ तयार झाले. ते नाकारुन आम्ही स्वीकारलेला बौद्ध धम्म हे ‘नवयान’ आहे, असे ते जाहीर करतात.

ही चौकट हा अर्थातच आदर्श आहे. प्रत्यक्षात काय झाले? काय आहे? ...डॉ. साळुंखेंचाच शब्द वापरायचा तर जे झाले व जे आहे त्याचे ‘संमिश्र’ असेच वर्णन करावे लागेल. महाडच्या परिषदेत व त्यानंतर अनेक ठिकाणी व खास करुन बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपली जातीची ओळख दर्शवणाऱ्या चिन्हांचा त्याग करायला बाबासाहेबांनी सांगितले. लुगडे नेसण्याची पद्धत बदलण्याचे त्यांचे आवाहन महार स्त्रियांनी लगोलग स्वीकारले. आमचे कुटुंब बौद्ध. म्हणजे पूर्वाश्रमीचे महार. माझ्या आईला मी कधीही ढोपरापर्यंतच्या लुगड्यात बघितले नाही. ती व्यवस्थित घोट्यापर्यंत नऊवारी लुगड्यात असायची. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिने वाख्या (कोपरापर्यंतचे चांदी किंवा कथिलाचे दागिने) वापरणे बंद केले. हे तिने सांगितले.

एकूण महार समाजात बौद्ध होण्याने एक निराळेच चैतन्य निर्माण झाले. हे चैतन्य, ही अस्मिता त्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात क्रांती घडवणारी ठरली. मुलांची शिक्षणे, सामाजिक चळवळी या सगळ्याला विलक्षण धार आली. संस्कारांच्या प्रभावी वाहक स्त्रिया असतात, असे बाबासाहेबांसकट अनेकांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे या अस्मितेच्या, आपल्या मुलाबाळांना शिकवले पाहिजे या प्रेरणेच्या त्या वाहक नक्की झाल्या. मात्र जुन्या ईश्वरी संकेतांतून बाहेर पडून बुद्धाच्या विवेकवादाला त्यांनी स्वीकारले किंवा समाजातील सर्वच विषमतेला त्यांनी नाकारले असे झाले नाही. बुद्धाला ईश्वरी शक्ती म्हणून भजणे हीच बव्हंशी तिची भावना असे. मुलाला पाळण्यात घालताना या बौद्ध बाया आता पाळणा गाताना कृष्ण-रामाच्या जागी ‘भिमाईच्या पोटी भीम जन्मला जो बाळा जो जो रे’ म्हणू लागल्या. त्यात सिद्धार्थाचे नाव गुंफू लागल्या. लग्नातल्या गाण्यांचेही तेच. हिंदू सांस्कृतिक चौकट बव्हंशी तीच. तिच्यातील नावे, प्रतिमा बदलल्या गेल्या. हल्ली हिंदूंच्या चारधामांप्रमाणे बौद्ध स्थळांचे दर्शन सुरु झाले आहे. ही तीर्थस्थळांची यात्राच असते. स्त्रियांचा त्यात अधिक भरणा असतो. मुलगा बाबासाहेब झाला पाहिजे, ही तिची (व बापाचीही) प्रेरणा मुलीबाबत मात्र तेवढ्याच तोलाची नसे. अजूनही नाही. दारु पिऊन आलेल्या नवऱ्याच्या ती लाथा खाईल. प्रसंगी त्यालाही बदडून काढेल. घराचा सगळा आर्थिक भार उचलेल. पण उतरंडीत पुरुषाला ती वरचाच मानेल. ‘नवऱ्याला मित्र माना’ हे १९२७ चे बाबासाहेबांचे विधान तिच्या मनात नीटसे रुजले असे दिसत नाही. एकूण व्यवस्थेचाच तो भाग आहे. बौद्ध म्हणून तिच्याकडून वेगळी अपेक्षा करणे हे कदाचित जादाचे होईल.

पॅंथरच्या काळात आणि त्यानंतरही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अगदी मध्यरात्रीही शिजवून जेवायला घालण्याचे काम या माऊलींनी केले आहे. आणि पुरुष कार्यकर्त्यांनी तिला गृहीत धरले आहे. आई म्हणून तिच्यावर त्यांनी कितीही भावपूर्ण कविता केल्या असतील. पण रात्री उशीरा येऊन आई किंवा बहिणीला उठवून जेवायला वाढायला लावणे, सकाळी उशीरा उठल्यावर आई-बहिणींनी आंघोळीचे पाणी काढणे, समोर चहा ठेवणे या सेवा घेताना तो पारंपरिक पुरुषच असतो. स्त्रीमुक्तीच्या वल्गना करणारे हे पुरुष बहिणीच्या सार्वजनिक वावराबाबत नैतिक रक्षकच असतात. आमचे मोर्चे, सभा, जयंत्या यांत स्त्रियांची संख्या मोठी. पण वक्त्यांत व निर्णयप्रक्रियेत नगण्य. आमच्या गावी कोकणात भावकीच्या किंवा गावच्या मंडळाच्या बैठका बसतात तेव्हा स्त्रियाही असतात. पण त्या खळ्याच्या (अंगणाच्या) एका कोपऱ्यात. मुख्य गोलात सगळे पुरुष. विषय सावित्रीबाईंच्या जयंतीचा असला तरी हीच स्थिती.

बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही वैचारिक, तत्त्वज्ञानात्मक होती. त्यातला विद्रोह, अस्मिता खूप खोलवर समाजात पोहोचली. त्याने त्यांच्या मानसिक-भावनिक प्रेरणांत आमूलाग्र म्हणावा इतका बदल झाला. पण विचारांचा भाग त्याप्रमाणात पोहोचला असे झाले नाही. बाबासाहेबांना ते मुख्यतः अपेक्षित होते. ते एके ठिकाणी म्हणतात- '..त्यांना (लोकांना) बौद्ध धर्माच्या वाङ्मयापेक्षा बौद्ध धर्मात पूजापाठ कशाप्रकारे होतो, हे जाणून घेण्याचे वेडच लागले आहे. आम्हाला  बौद्धधर्माचा पूजापाठ कसा असतो यासंबंधी काहीतरी वाङ्मय द्या, असा  सारखा तगादा लागून राहिला आहे. माझ्या शारीरिक अस्वस्थतेमुळे त्यांची जिज्ञासा पुरी करणे मला आतापर्यंत शक्य झाले नाही. तशात बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ याचा या देशात अगदीच लोप झाला आहे. त्या कारणांमुळे या प्रश्नासंबंधी बौद्ध धर्मातील पूजापद्धती व त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाही. त्या फक्त ज्या देशांमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे, तेथेच मिळू शकतात.'

बाबासाहेबांनी श्रीलंकेतून अशा गाथा मिळवल्या. त्या गुणतिलके नावाच्या आपल्या एका श्रीलंकन मित्राला गायला लावून त्याच्या रेकॉर्ड्स तयार केल्या. लग्नविधीबद्दल एका पत्रात ते म्हणतात, ‘बौद्ध विवाह विधी अगदी साधा आहे. त्यात होम किंवा सप्तपदी नाही. मातीचे एक कोरे भांडे मध्ये ठेवायचे. ते पाण्याने काठोकाठ भरायचे. त्याच्या एका बाजूला वधूने व दुसऱ्या बाजूला वराने उभे राहायचे. या भांड्यात कापसाचा धागा सोडायचा. या धाग्याची दोन टोके एक वधूच्या हातात व दुसरे वराच्या हातात धरायचे. कोणीतरी महामंगल सूत्त म्हणायचे. वधू-वरांनी पांढरे कपडे घालायचे असतात.’

गाथांच्या रेकॉर्ड्स बौद्ध धम्माच्या दीक्षेपूर्वीच १९५० साली बाबासाहेबांनी मिळवल्या होत्या. पण विधिसंबंधीचे त्यांचे पत्र ४ डिसेंबर १९५६ चे-म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी दोन दिवस आधीचे आहे. १४ ऑक्टोबरला त्यांनी दीक्षा घेतली व ६ डिसेंबरला ते गेले. जेमतेम दीड महिन्याचे हे अंतर आहे. त्यात त्यांचे आजारपण. अशा स्थितीत एका नव्या धर्माच्या (पारंपरिक बौद्ध धर्मातल्या कित्येक बाबी त्यांनी नाकारल्या होत्या) तत्त्वज्ञानाला ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाच्या रुपाने ते आकार देऊ शकले तरी विधींची रचना करायला त्यांना पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यांचे प्राधान्य तत्त्वज्ञान होते. ते त्यांनी पूर्ण केले.

हे तत्त्वज्ञान व त्यास अनुरुप विधींची रचना करुन ती लोकांपर्यंत नेण्याचे काम हे बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचे होते. पण ते तेवढ्या प्रभावी वा अपेक्षेप्रमाणे झाल्याचे दिसत नाही. भारतीय बौद्ध महासभा तयार झाली. पण अंतर्गत वादांनी तिला पोखरले. कोकणातील बौद्धजन पंचायत समितीने जातपंचायतीचेच मुख्यतः काम केले. पुढे या दोन संस्थांच्या कामांच्या सीमारेषा काय यावरुन वाद झाले. अनेक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने बौद्धजन पंचायत समितीचेच काम करायला सुरुवात केली. या काळात ज्यांनी विधीचे स्वरुप ठरवले, त्यातील गाथा रचल्या यात बाबासाहेबांच्या भूमिकेशी अनुरुपता ठेवल्याचे दिसत नाही. साधेपणाऐवजी ऐपतीप्रमाणे लग्ने होऊ लागली. विभूतिपूजेच्या विरोधात बाबासाहेब होते, पण त्यांच्यावरची ‘भीमस्तुती’ विधीचा अपरिहार्य भाग झाली. महामंगल सुत्ताऐवजी ‘जयमंगल अष्टगाथा’ (ज्यात जातक कथांतील चमत्कारांचे वर्णन आहे) मंगलाष्टकांना समांतर चालीवर म्हणणे सुरु झाले. वधू-वरांच्या ज्या शपथा आल्या, त्यात स्त्रीचे पारंपरिक स्थान सुरक्षित ठेवायचा प्रयत्न आहे. त्यात पतीने पत्नीला अलंकारादि बाबींनी संतुष्ट ठेवायचे असते व पत्नीने पतीने कमवून आणलेल्या संपत्तीचे रक्षण व घरच्यांचा मान राखायचा असतो. हल्ली दोघेही कमावत असताना हे वचन वस्तुस्थितीशी विसंगत नव्हे काय? आणि घरच्यांचा मान राखायची जबाबदारी ही फक्त पत्नीची कशी काय? पती-पत्नी हे मित्र असावेत असे बाबासाहेब म्हणतात, शिवाय घटनेत दर्जाची व संधीची समानता स्त्री-पुरुष दोहोंना दिलेली आहे. तरीही लग्नातली ही शपथ या मूल्यांशी सुसंगत नाही, हे लोकांना कळत नाही. त्यांना त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही. म्हणजेच त्याला कर्मकांडाचे स्वरुप आले आहे.

बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा घेताना ती चंद्रमणी या महास्थवीर भिख्खूंच्या हस्ते घेतली. प्राचीन बौद्ध परंपरेकडून एकप्रकारे त्यांनी वारसा घेतला. पण समोरच्या जनसमुदायाला त्यांनी स्वतः दिली. दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, कोणत्याही विधीसाठी भिख्खूची गरज नाही, हे त्यातून त्यांना दाखवायचे होते. भिख्खूच्या रुपाने एक नवा पुरोहित मला तयार करायचा नाही, ही त्यांची भूमिका होती. भिख्खूचे काम धम्म समजावून सांगण्याचे. त्याचा प्रसार करण्याचे. आज भिख्खूकरवी विधी लावणे प्रतिष्ठेचे समजले जाते. नामकरणापासून जलदानविधीपर्यंत भिख्खूंचा हस्तक्षेप सुरु आहे. त्यांच्या उत्पन्नाचेही (पुरोहिताप्रमाणे) ते साधन बनले आहे. या काषायवस्त्रधारी पुरोहिताच्या भजनी लागणाऱ्यांत स्त्रियांचा मोठा भरणा असतो. भिख्खूंच्या चरणी माथा टेकणे, त्यांचे आशीर्वाद घेणे, भक्तिभावाने त्यांची प्रवचने ऐकणे व त्यांना दान देणे यांत बौद्ध महिला आघाडीवर असतात. देवळातल्या महिला भजनी मंडळांच्या धर्तीवर बुद्धविहारात वंदना म्हणणे व ग्रंथपठन करणे या उपक्रमांत बौद्ध महिलांचा पुढाकार वाढतो आहे. ‘वर्षावासा’चे कार्यक्रम ‘चातुर्मासा’च्या भक्तिभावनेने केले जात आहेत.

बुद्धाने कार्यकारणभावाला महत्व दिले होते. बाबासाहेबांनी याच कार्यकारणभावाने धर्मग्रंथांची व बुद्धाचीही चिकित्सा केली. आज त्यांचे अनुयायी याला रजा देत आहेत. मंगळसूत्र वास्तविक पुरुषप्रधानतेचे प्रतीक. प्रारंभीच्या काळात त्याला नकार देण्याइतकी प्रगल्भता नसणे स्वाभाविक होते. पण हळूहळू त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या त्यागापर्यंत समाजाची मानसिकता तयार करणे गेल्या ६२ वर्षांत का शक्य झाले नाही? याचे कारण आहे कार्यकारणभावाला, तत्त्वज्ञानाला रजा देऊन विचारशून्य कर्मकांडी मनःस्थितीला शरण जाणे. महिला याच्या पहिल्या भक्ष्य आहेत. मंगळसूत्राचा त्याग राहिला बाजूला, आजही ते झोकात बौद्ध स्त्रियांच्या गळ्यात (ऐपतीप्रमाणे तोळ्यांत) डोलत असते. एक बदल होतो आहे. आता लक्षणीय संख्येने विशेषतः शहरातील बौद्ध महिला पांढरे मंगळसूत्र घालू लागल्या आहेत. पांढऱ्या साड्या नेसतात. म्हणून बहुधा पांढरे मणी. आपण हिंदू नाही, म्हणून हिंदूंसारखे काळे मणी नको. आपण बौद्ध आहोत. म्हणजे वेगळे आहोत. म्हणून  पांढरे मंगळसूत्र. यात काळ्याचे पांढरे झाल्याने मूळ ‘पुरुषप्रधानतेच्या मालकी’चे तत्त्व कुठे बदलते? ते तसेच राहते.

जातिव्यवस्थेचा मध्यवर्ती बिंदू (चालक नव्हे) स्त्री असते. तिचे तथाकथित पावित्र्य जातीची प्रतिष्ठा टिकवते. या स्त्रीने परजातीतील पुरुषाला वरु नये, ही दक्षता जातव्यवस्थेत घेतली जाते. बाबासाहेबांनी जातिनिर्मूलनाचा एक प्रभावी उपाय आंतरजातीय लग्न हा सांगितला आहे. बौद्धांनी आपल्या उद्धारकर्त्याचा हा उपदेश शिरोधार्य मानायला हवा. पण तसे होत नाही. एकतर जातीतच लग्नाची खटपट असते. झालेच आंतरजातीय तर तथाकथित वरच्या जातीची मुलगी आपल्याकडे आलेली चालते. पण आपली मुलगी तथाकथित उतरंडीत आपल्या खालच्या स्तरावरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली बौद्धांना चालत नाही. एकूण मुलीने दुसऱ्या जातीत जाणेच फारसे रुचत नाही. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न एका संख्येने मागे पडते, ही समजूत हेही त्यामागे एक कारण असते. दुसऱ्या जातीची मुलगी आली तर हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एका संख्येने पुढे तरी सरकता येते. भारत बौद्धमय करण्याच्या वैचारिक क्रांतीला माणसांवर बौद्धपणाचे ठप्पे लावण्याची ही प्रतिक्रांती गिळू पाहते आहे.

खुद्द बुद्धाने त्याचा धम्म विचारांनी पटला तर स्वीकारण्याचे आवाहन केले होते. आज बौद्धांच्यात कागदोपत्री, विधीद्वारे परधर्मीय मुलगी तांत्रिकदृष्ट्या बौद्ध होणे पुरेसे असते. तिने आमच्या मुलाशी लग्न केले, म्हणजे ती आपोआपच बौद्ध झाली. बाबासाहेबांनी संविधानात विचार, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य व्यक्तीला दिले आहे. या परधर्मीय मुलीच्या व्यक्ती म्हणून असलेल्या या अधिकाराचा गळा त्यांचेच अनुयायी घोटतात या आरोपाला बौद्धांचे उत्तर काय?

बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने जी आत्मिक ताकद वाढली, जी मिळकत झाली ती गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चालले आहे ते घसरणीच्या दिशेने आहे, असेच म्हणायला लागेल. पण हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. आणि ते खोटे आहे, असे कोणी म्हणणार नाही. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे. पुरोगामी चळवळीच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संवेदनशीलता त्याच दाखवत असतात. मी स्वतः ‘वर्षावासा’च्या तसेच बौद्धांच्या अनेक कार्यक्रमांत व्याख्यानांना जात असतो. त्यावेळी जी आत्मटीका करतो, त्याला महिलांमधून विशेष प्रतिसाद मिळतो. नंतर त्या भेटूनही बोलतात. त्यांना ते वेगळे व विचारार्ह वाटते. आत्मटीकेचा हा प्रवाह गतिमान झाला, तर हा प्रतिसादही वाढेल. पण आत्मटीकेचा प्रवाह गतिमान कधी होईल?...तूर्त ठाऊक नाही.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________

अक्षर, दिवाळी, २०१७