Tuesday, February 18, 2025

रेणुका रे


‘जर मी आता तरुण असते आणि गांधीजींसारख्यांचं मार्गदर्शन मिळालं नसतं, तर बहुधा मी नक्षलवाद्यांत सामील झाले असते.’ १९७० च्या दशकात देशात नक्षलवादी चळवळीनं जोर पकडला होता. त्यावेळी रेणुका रे गांधीयुगाच्या आपल्या आठवणी सांगताना हे लिहितात. वयाच्या १७-१८ व्या वर्षी लंडनमध्ये शिकत असताना त्यांच्या एका नातेवाईक तरुणानं त्यांच्या हातात रिव्हॉल्वर दिलं आणि सरावासाठी बोलावलं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांत जे विविध प्रवाह होते, त्यातल्या भूमिगत राहून इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा उभारणाऱ्या एका गटाचा हा तरुण कार्यकर्ता होता. एका दुसऱ्या तरुणानं, जो तिचा पुढे नवरा झाला, त्या सत्येनला तिच्या पर्समध्ये रिव्हॉल्व्हर आढळलं. तो चपापला. त्यानं तिला समजावलं. हिंसक मार्गाचा फोलपणा सांगण्याचा प्रयत्न केला. योगायोगानं त्याच दिवशी तिला गांधीजींचं पत्र मिळालं. पुढच्या काळात हिंसक मार्ग अवलंबणाऱ्या क्रांतिकारकांच्या हेतूबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल रेणुकांच्या मनात आदर राहिला, तरी त्यांचा प्रवास मात्र गाधीजींच्या अहिंसक मार्गानंच झाला.

संविधानसभेतल्या महिला सदस्यांचा आपण परिचय करुन घेत आहोत. रेणुका रे त्यातल्या एक. आज त्यांची माहिती आपण घेणार आहोत.

४ जानेवारी १९०४ रोजी तेव्हाच्या पूर्व बंगालमधल्या म्हणजे आजच्या बांगला देशातल्या पबना या ठिकाणी रेणुका रे यांचा जन्म झाला. वडील सतीश चंद्र मुखर्जी, आई चारुलता मुखर्जी. रेणुका चार भावंडांत थोरली. त्यांचं कुटुंब उच्चशिक्षित आणि सुधारणावादी होतं. वडील आयसीएस झालेले मोठे सनदी अधिकारी. १८९७ च्या सुमारास कलकत्त्याच्या प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये फक्त दोन मुली शिकत होत्या. बाकी सारे पुरुष. या दोघींतली एक रेणुका रे यांची आई होती. आई चारुलता समाजसेविका होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक शाळा काढल्या. महिला समित्या संघटित केल्या. थोर स्वातंत्र्य सेनानी आणि कवयित्री सरोजिनी नायडूंशी त्यांची मैत्री होती. रेणुकाचे वडिलांकडचे आजी-आजोबा ब्राम्हो समाज या सुधारणावादी चळवळीचे कार्यकर्ते होते. आईकडचे आजोबा डॉ. पी. के रॉय मोठे विद्वान होते. एडिनबर्ग विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्राची पदवी मिळवली तर लंडन विद्यापीठातून ते डॉक्टरेट झाले. त्यांची पत्नी म्हणजे रेणुकाची आजी सरला रॉय याही कार्यकर्त्या होत्या. त्यांनीही मुलींसाठी अनेक शाळा उघडल्या. रॉय कुटुंबीयांच्या घरी थोरा-मोठ्यांचा राबता असे. रवींद्रनाथ टागोर त्यांच्या घरी येत-जात असत. टागोरांनी त्यांचं एक पुस्तक रेणुकाच्या आजी सरला यांना अर्पण केलं आहे.

१९११ साली चारुलतांच्या वडिलांची लंडनमधल्या उच्चायुक्तांच्या कार्यालयात अकादमीय समुपदेशक म्हणून नियुक्ती झाली. रेणुकाचं कुटुंबही दोन वर्षांसाठी त्यांच्यासोबत लंडनला स्थलांतरित झालं. सहा वर्षं वयाची रेणुका लंडनमधल्या केन्स्टिंग्टन हायस्कूलमध्ये शिकू लागली. भारतात परतल्यावर कलकत्त्याच्या लोरेटो हाऊस स्कूल मध्ये रेणुकाचं पुढचं शिक्षण सुरु झालं.

असहकार चळवळीची घोषणा करण्यासाठी १९२० च्या सप्टेंबर महिन्यात गांधीजी कलकत्त्याला आले होते. त्यावेळी एका नातेवाईकांच्या घरी रेणुकाची गांधीजींशी भेट झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या रेणुकाचं संपूर्ण जीवन बदलून टाकणारी ही भेट होती. ती आणि तिची एक मैत्रिण ललिता यांनी कॉलेज सोडलं आणि त्या स्वातंत्र्य चळवळीत उतरल्या. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे त्या घरोघर फिरुन जागृती करु लागल्या. चळवळीसाठी निधी जमा करु लागल्या. गांधीजींनी त्यांना चरखा चालवायला आणि हिंदी शिकायला सांगितलं. घरोघर फिरण्यातून या मुलींना स्त्रियांच्या पराधीनतेचा अधिक सखोल समज आला. कर्मठ, खानदानी घरांतल्या महिला आतल्या खोलीत असत. त्यांना भेटायला घरच्या कर्त्या पुरुषाची परवानगी घेऊनच या मुलींना आत जाता येई. यातल्या काही महिला गल्लीत त्यांना भेटत आणि पुरुष घरी नसतील तेव्हा यायला सांगत. यातल्या बहुतेकजणी चळवळीला पैसे आणि दागिने देत. शक्य तिथं या महिलांच्या सभा संघटित करुन गांधीजींना त्यांच्यासमोर बोलायला रेणुका बोलावत असे.

पुढं काय करावं, याची स्पष्टता येण्यासाठी रेणुका साबरमती आश्रमात येते. सुखवस्तू घरातल्या या मुलीला आश्रमातली साधी, काटकसरीची राहणी तशी कठीण होती. पण तिला तिथलं वातावरण भावलं. तिथल्या जीवनात रुळायला तिला वेळ गेला नाही. गांधीजींबरोबर चळवळीच्या कामासाठी ती बंगालला काही काळासाठी आली. त्यावेळी रेणुकाचे वडील तिच्या नकळत गांधीजींना भेटले. तिला ते लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवू इच्छित होते. रेणुका संतापली. तिनं लंडनला जायला जोरदार विरोध केला. पण गांधीजींनी तिला समजावलं. तिथल्या ‘मुक्त वातावरणात’ ल्या शिक्षणाचं महत्व त्यांनी तिला पटवून दिलं. ते म्हणाले, ‘तू न इंग्राजळता तिथल्या शिक्षणाचा पूर्ण लाभ घे आणि नव्या धडाडीनं तसेच स्वतंत्र दृष्टिकोनानं आपल्या देशाची सेवा करायला सिद्ध होऊन ये.’

अखेर मनाविरुद्ध ऑगस्ट १९२१ ला रेणुका लंडनला केंब्रिज विद्यापीठातल्या एलिट गिर्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेते. मात्र तिथलं उमरावी, शाही वातावरण तिला रुचत नाही. ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेते. इथेच तिची सत्येंद्र नाथ रे या तरुणाबरोबर मैत्री होते. रेणुकाच्या मते त्याचं व्यक्तित्व समतोल आणि तिच्या भावनावेगानं उसळी मारणाऱ्या व्यक्तित्वाला सावरणारं होतं. रिव्हॉल्वरचा प्रसंग आपण सुरुवातीला पाहिलाच आहे.

कॉलेजच्या युनियनमध्ये रेणुका निवडून येते. तिथल्या सदस्यांत ती एकमेव महिला आणि एकमेव भारतीय असते. याच दरम्यान भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पुढे महत्वाचं स्थान निर्माण करणाऱ्या मंडळींशी तिची भेट होते. कृष्ण मेनन, सुभाष चंद्र बोस ही त्यातली दोन नावं.

सत्येन आयसीएस होतो. सरकारी सनदी अधिकारी आणि आपण सरकारच्या विरोधात चळवळ करणारे. हे कसं जमायचं असा प्रश्न रेणुकाच्या मनात असतो. पण रेणुका तिच्या मनाप्रमाणे काम करु शकते, तिच्या कामात त्याचा अडथळा येणार नाही, याची खात्री सत्येन देतो. गांधीजी याविषयी सत्येनशी बोलतात. सत्येनची स्पष्टता आणि रेणुकाच्या कामाविषयीचा आदर गांधीजींना भावतो. रेणुका ऑगस्ट १९२५ ला भारतात परतते. त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रेणुका आणि सत्येन यांचं लग्न होतं.

सत्येनचं सरकारी काम आणि रेणुकाचं चळवळीचं, विशेषतः महिलांतलं काम सुरु होतं. १९२८ साली राष्ट्रीय पातळीवर झालेल्या महिलांच्या सामाजिक परिषदेत रेणुका आणि इतर काही जणींनी द्विभार्या प्रतिबंध, घटस्फोटाचा अधिकार आणि स्त्रियांना वारसा हक्क हे ठराव मांडले. मोठ्या बहुमतानं ते मंजूर झाले. पण विरोधाची धारही तीव्र होती. विरोध करणाऱ्यांत नामवंत महिला नेत्याही होत्या. त्यांची म्हणून काही समर्थनं होती. यावरुन हे लक्षात येतं की त्यावेळच्या स्त्रीवाद्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद होते. प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या ब्राम्हो समाजानं घटस्फोटाच्या मुद्द्यावर रेणुका रे यांच्यावर जोरदार टीका केली. रेणुकांनी त्यांना आठवण करुन दिली. ब्राम्हो समाजाची लग्नं ज्या विशेष विवाह कायद्याखाली होत, त्यात घटस्फोटाचा अधिकार अनुस्यूत आहेच. संततिनियमनाचा मुद्दाही रेणुका प्रचारत. या विषयाची अशी जाहीर चर्चा करणं त्याकाळात शिष्टसंमत नसल्यानं माध्यमांतून रेणुकांवर आगपाखड होई. धार्मिक कायदे स्त्रियांना दुय्यम लेखणारे असल्यानं त्याविरोधात ब्रिटिशांनी कायदा करावा, अशी रेणुकांची मागणी होती. एकरुप नागरी संहितेच्या त्या जोरदार पुरस्कर्त्या होत्या.

दरम्यान ग्रामोद्योग तसेच ग्रामसुधारणा यांना चालना देण्यासाठी रेणुकांनी नियोजित प्रयत्न केले. जातिभेदविरोधी पदयात्रांत गांधीजींबरोबर त्या फिरल्या. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना विश्वभारती विद्यापीठाच्या ‘कर्म समिती’वर म्हणजेच कार्यकारी समितीवर घेतलं.

१९४१ साली बी. एन. राव या कायदेतज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन कायद्यांचा आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी हिंदू कायदा समिती सरकारनं स्थापन केली. या समितीला सूचना करण्यासाठी केंद्रीय कायदेमंडळात महिला संघटनांच्या प्रतिनिधी म्हणून यावं, अशी राव यांनी रेणुकांना विनंती केली. आमच्या लोकांना बंदीवान करणाऱ्या सरकारच्या कायदेमंडळात जायला त्यांनी प्रारंभी नकार दिला. पण अनेकांनी त्यांचं समितीच्या कामात महत्वाचं योगदान होईल हे सांगून त्यांना गळ घातल्यानं अखेर त्या १९४३ साली केंद्रीय कायदेमंडळात गेल्या. तिथं त्यांनी चक्क सुधारित कायदे हा अर्धवट उपाय असून आम्हाला जनतेला उत्तरदायी असलेलं स्वतंत्र राष्ट्रीय सरकार हवं अशी मागणी केली. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांचे पहिल्या पानावरील मथळे या बातमीचे होते.

रेणुका पुढे १९४६ साली संविधानसभेवर गेल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर संविधानसभाच हंगामी कायदेमंडळ म्हणून काम करु लागली. त्यात हिंदू कोड बिल डॉ. आंबेडकरांनी मांडलं. त्याला विरोध झाला. ते मंजूर झालं नाही. त्याच्या निषेधार्थ त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. संविधानसभेत विविध विषयांवर त्या बोलल्याच. पण हिंदू कोड बिलाच्या बाजूनं त्या ठाम उभ्या राहिल्या. पुढे पहिल्या लोकसभेत ते टप्प्याटप्यानं मंजूर झालं. त्यावेळी रेणुका प. बंगाल सरकारात मंत्री होत्या. तरीही त्यांनी संसदेत हिंदू कोड बिल मंजूर व्हावे यासाठी पाठिंबा मिळवण्याचे अथक प्रयत्न केले.

त्यांची प. बंगाल सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारतानाची घटना उद्बोधक आहे. मुख्यमंत्री रेणुकांनी मंत्री व्हावं यासाठी आग्रही होते. मी विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सदस्य नसल्यानं मी मंत्रिपद घेणार नाही, असा रेणुकांचा पवित्रा होता. वास्तविक, ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचं सदस्यत्व घेता येण्याची तरतूद होती. पण रेणुकांना ते मान्य नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी अखेरीस त्यांचे पती सत्येन यांना मध्ये घालून रेणुकांना समजावलं. सत्येन त्यावेळी प. बंगाल सरकारचे मुख्य सचिव होते. सत्येन रेणुकांनी मंत्री व्हावं या बाजूचे होते. रेणुकांनी सत्येनना मुख्यमंत्री काय म्हणाले विचारलं. सत्येन म्हणाले, ‘बायको मंत्री म्हणून दालनात आली की तुला उठून उभं राहायला अडचण होईल का? मी म्हटलं – कोणीही महिला आली तरी मी उठून उभा राहतो. ’

रेणुका मंत्रिपद स्वीकारतात. ६ महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून येतात.

१९५७ साली त्या लोकसभेवर निवडून गेल्या. मात्र संविधान सभेच्या तुलनेत आताच्या लोकसभेतील सदस्यांची प्रेरणा आणि गुणात्मकता रेणुकांना खंतावणारी वाटत होती. संसदेनं सामाजिक कल्याण आणि मागासवर्ग कल्याण यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. तिच्या अध्यक्ष त्या होत्या. ‘रेणुका रे समिती’ या नावानं ही समिती ओळखली जाते. या समितीनं अनेक महत्वाच्या सूचना केल्या.

१९६९ साली पती सत्येन वारल्यानंतर विविध महिला संघटनांना एकवटणाऱ्या महिला समन्वय परिषदेच्या कामात त्या स्वतःला व्यग्र ठेवू लागल्या. १९९८ साली त्यांना पद्मभूषण किताबानं भारत सरकारनं गौरवलं. ११ एप्रिल १९९७ रोजी कलकत्त्याला वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

महिलांच्या अधिकारांचे खूप प्रश्न त्यांच्या कारकीर्दीत मार्गी लागले. तथापि, बरेच प्रश्न अजून शिल्लक आहेत. मुख्यतः स्त्रियांकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन. त्यासाठी लढणाऱ्या पिढीला रेणुका रेंचं कार्य आणि विचार दीपस्तंभ म्हणून नेहमीच दिशा दाखवत राहतील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

______________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा तेरावा भाग १८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

No comments: