Saturday, November 7, 2015

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्वअट


सध्या सांस्कृतिक आणीबाणीचा काळ आहे, असे बोलले जाते. केंद्रातील भाजपच्या सत्तेमुळे विवेकवादाला मूठमाती देणाऱ्या घटनांचे पेव फुटले आहे, हे तर खरेच. पण आधीही या गोष्टी घडत होत्या. केवळ आपल्याकडे नाही, तर आपल्या शेजारी राष्ट्रांत व जगातही हे घडते आहे. अनेक धर्मांत घडत आहे. बांगला देशात इस्लामी कट्टरपंथीयांच्या विरोधात टीका करणाऱ्या ब्लॉगर्सचे खून पडत आहेत, पॅरिसला पैगंबराचे व्यंगचित्र छापल्यामुळे शार्ली एब्दो साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसून गोळीबार करुन संपादक व अन्य कर्मचाऱ्यांचे मुडदे पाडण्यात आले. काळ्यांविषयीच्या तिटकाऱ्यामुळे गोऱ्या माथेफिरुने चर्च वा शाळा-कॉलेजमध्ये बेछूट गोळीबार करण्याच्या अनेक घटना अमेरिकेत घडल्या आहेत. इसिसचे दहशतवादी गोऱ्या पत्रकारांच्या गर्दनी उडवत आहेत. अशी उदाहरणे कैक देता येतील.

अशा या ज्वालाग्राही वातावरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अधिकच नाजूक झाला आहे. मूळात व्यक्तीच्या कोणत्याही स्वातंत्र्याला स्वभावतःच काही निर्बंध असतात. माझे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड येता कामा नये, ही दक्षता घ्यावीच लागते. संचार स्वातंत्र्य आहे, म्हणून रस्त्याच्या मध्यावरुन मी चालू शकत नाही. सार्वजनिक हिताच्या वा व्यवस्थेच्या दृष्टीने मला माझ्या स्वातंत्र्याला लगाम घालावाच लागतो. हे कोणालाही सहज पटते. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आकलनाबाबत मात्र खूप गोंधळ असतो. भोवतालचे सामाजिक-राजकीय वातावरण, वर्तमान लोकभावना, या लोकभावनांचा वापर करणाऱ्या हितसंबंधीय घटकांची ताकद, त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या प्रगतीशील शक्तींचा समाजातील पाया ही संदर्भ चौकट लक्षात घेऊनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लांबी-रुंदी ठरवायला हवी. हे नाही झाले तर काहींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखल्याचे कृतक समाधान मिळते, काही जण हुतात्मा होतात; पण एकूण समाज अंशतःही पुढे जायला मदत होत नाही. बरेचदा तो माघारीही येतो. रोग्याची प्रकृती पाहून औषधाची मात्रा दिली नाही तर जे होते, ते इथे समाजाच्या बाबत होते.

महात्मा फुले यांचा गणपतीवर एक पोवाडा आहे. त्यात ते म्हणतात, “पशुपरी सोंड पोर मानवाचे| सोंग गनोबाचे| नोंद ग्रंथी| बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड| फुकितो ‘शेंबूड’| सोंडेतून| अन्तेजासी दूर, भटा लाडू देतो| नाकाने सोलीतो| कांदे गणू| चिखला तुडवूनी बनविला मोरया| केला ढबू-ढेऱ्या| भाद्रपदी|…”

हा सुमारे दीडशे वर्षांपूर्वींचा पोवाडा आहे. आजच्या भौतिकदृष्ट्या प्रगत काळात जोतिबा गोविंद फुले नामक कवीने समजा असा पोवाडा लिहिला असता, तर शिवसेनेने त्यांची काय गत केली असती? सुधींद्र कुलकर्णींपेक्षा कमी नक्कीच नाही!

१५ व्या शतकात संत कबीर म्हणतात, “कांकर पाथर जोरि कै मस्जिद लई बनाय| ता चढि मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय|”

५०० वर्षांनंतरच्या आजच्या प्रगत लोकशाही काळात कट्टरपंथी मुस्लिमांनी कबिराची काय अवस्था केली असती? त्याच्या हातमागाची तोडफोड आणि माफीनामा एवढे तरी नक्की झाले असते.

भौतिक प्रगती व सामाजिक विवेक यांची गती समांतर नाही. ती व्यस्तही असू शकते. मध्ययुगातला कबीर व आधुनिक काळातले महात्मा फुले या दोहोंचा काळ ही प्रबोधन युगे होती. धर्मातील ढोंगावर प्रहार करणारे ते एकटेच नव्हते. त्यांच्यापेक्षा प्रतिभेने कमीअधिक असे अनेक संत तसेच समाजसुधारक हे सामाजिक जागरणाचे काम त्यांच्या आगेमागे व बरोबर करत होते. याचा अर्थ, या सगळ्यांचे सर्व समाज स्वागत करत होता असे नाही. विरोधक खूप होते. त्यांच्या जिवावर उठण्याइतपत कारवायाही ते करत होते. पण त्याचवेळी मूक व सक्रिय पाठिंबाही या सुधारकांना मिळत होता. पटत नसले, तरी आपल्या हिताचे काहीतरी हे सांगत आहेत, हे आपले हितचिंतक आहेत ही बहुजनसमाजाची धारणा होती. कारण फुले किंवा कबीर लोकांच्या ‘धर्मभावना’ दुखावण्याचेच फक्त काम करत नव्हते, तर समाजातील एकोप्याचे, प्रेमाचे, बंधुभावाचे दोहे-अखंड गात होते. ‘ढाई आखर प्रेम का पढे…’मधून कबीर किंवा ‘ख्रिस्‍त महंमद ब्राम्‍हणांशी|धरावे पोटाशी बंधूपरी|…’ या मानवतेच्या आवाहनातून महात्मा फुले समाजाच्या भावनांचा विकास, मांगल्याचा परिपोष करत होते. समाजाच्या उन्नतीसाठीचे मुलींसाठी शाळा, अस्पृश्यांसाठी हौद खुला करणे, शेतकऱ्यांचे प्रश्न उठवणे, विधवांसाठी आश्रम इ. उपक्रमांनी महात्मा फुल्यांचा समाजातील पाया घट्ट झालेला होता. कबिराचे आध्यात्मिक संतपद, हिंदू-मुस्लिम दोहोंकडच्या धर्ममार्तंडांवर समान आघात व महात्मा फुल्यांच्या काळी समाजातील कर्मठांच्या हाती राजकीय सत्ता नसणे हे ही त्यांना पूरक ठरले.

मी समाजहितैषी असल्याचा समाजाला कोणताही प्रत्यय नसेल, तर माझे समाजाच्या धार्मिक अथवा अन्य अस्मितांवरील योग्य आघातही समाजाला सोसवत नाहीत. शिवाय या भावना व अस्मितांचा आपल्या राजकीय अथवा धार्मिक सत्तास्वार्थासाठी वापर करणारे गट प्रबळ असतील तर मला ते समाजाचा शत्रू ठरवून समाजाला माझ्या विरोधात उभे करण्यात यशस्वी होतात. आज शिवसेना, भाजप तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक संघटना व व्यक्तींनी समाजाच्या सांस्कृतिक अंगाशी जो संबंध ठेवला आहे, तिथे प्रागतिक विचारांच्या पक्ष-संघटनांची व व्यक्तींची अनुपस्थिती आहे. त्याचा त्यांना लाभ होणे स्वाभाविकच आहे.

तस्लिमा नसरीन ही बांगला देशातील मुस्लिम कट्टरपंथीयांच्या विरोधात लढणारी लेखिका एक अग्निशलाका आहे, यात अजिबात शंका नाही. या मुस्लिम धर्ममार्तंडांनी (फक्त बांगला देश नव्हे, तर भारतातीलही) तिला मृत्युदंड जाहीर केला आहे. तिला स्वदेशातून परागंदा व्हावे लागलेच पण ज्या भारताबद्दल-कलकत्त्याबद्दल तिला आत्यंतिक प्रेम आहे, तेही तिला इथे थारा देऊ शकण्यात अपयशी ठरत आहेत. गुलाम अलींचे ममता बॅनर्जी स्वागत करत आहेत, मात्र मला कलकत्त्यात येऊ देत नाहीत, ही तुमची ढोंगी धर्मनिरपेक्षता नव्हे काय, असे तिने अलिकडेच ट्विट केले आहे. प. बंगालातील डाव्यांबद्दलही तिचा तोच आक्षेप आहे. तुम्ही मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करत आहात, हा तिचा थेट आरोप आहे.

मृत्युदंडाचा फतवा काढणाऱ्यांना जेरबंद करणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे किंवा कोणाच्या तरी आक्षेपाखातर तिला प्रवेश किंवा वास्तव्यबंदी करणे हे गैर आहे. इथे सरकार कमकुवत आहेच. मतांसाठी लांगूलचालन हा आक्षेपही पूर्ण नाकारता येत नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार बिकट होत असेल, तर शासनाने काय व किती काळ करायचे हाही गंभीर प्रश्न आहे. तस्लिमा नसरीनला कलकत्त्यातून दिल्लीत आणून एका गुप्त ठिकाणी खास संरक्षणात भारत सरकारने ठेवले होते. त्यासाठीचा बंदोबस्त वा अन्य खर्च सरकारला करावा लागलाच. शिवाय या एका व्यक्तीच्या संरक्षणाचे सतत व्यवधान ठेवणे हाही सरकारवरचा भार होता. हा खर्च किंवा व्यवधान ही सरकारची जबाबदारी आहे, हे मला नाकबूल नाही. पण यातून साधते काय?

बांगला देशातील सोडा, भारतातील मुस्लिम समाजातील एक छोटासा विभाग तरी तस्लिमा नसरीन आपल्या प्रबोधनाने आपल्या पाठीशी उभ्या करु शकल्या काय? जे कबिराला साधले, ते अंशतः तरी नसरीन यांना का साधता आले नाही? मुस्लिम धर्मांधतेशी लढताना स्वतःला पूर्ण नास्तिक जाहीर करुन (म्हणजे इस्लामशी संबंध तोडून) त्या इस्लामवर आघात करत राहिल्या. इस्लामी कट्टरपंथीयांना सामान्य इस्लाम समाज नसरीन यांच्या विरोधात उभा करणे त्यामुळे सोपे गेले. परिणामी, इस्लाममध्ये राहून अंतर्गत सुधारणा करु इच्छिणाऱ्या अल्पस्वल्प मंडळींनाही त्यांच्या बाजूने बोलणे अशक्य झाले.

ज्या विवेकवादी महामानवांनी विभूतिकरणाला विरोध केला, त्यांचीच विभूतिपूजा मांडली जाण्याचा हा काळ आहे. सत्यनारायणाच्या थोतांडावर कठोर आघात करणाऱ्या महात्मा फुलेंना मानणारा समाज आपल्या उत्सवांवेळी त्यांचे प्रतिमापूजन व सत्यनारायण एकाच मांडवात करताना दिसतो. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निस्सिम पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचा समावेश असलेले जे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते व त्यावर त्यांनी काही आक्षेप घेतला नव्हता, तेच व्यंगचित्र एन.सी.ई.आर.टी.च्या क्रमिक पुस्तकात पाहिल्यानंतर आजच्या आंबेडकरी समूहातील तरुणांचा तिळपापड होतो व ते सुहास पळशीकरांसारख्या त्यांच्या हितचिंतकाच्याच कार्यालयाचा विध्वंस करतात. समाजाच्या जाणतेपणाची व विवेकाची ही स्थिती गंभीर आहे, हेच यातून सूचित होते.

अशावेळी घटनेने दिले असले, तरी अभिव्यक्त होण्यात सारासार विवेक करायचा की नाही? हा घाबरण्याचा किंवा मागे हटण्याचा प्रश्न नाही. अशावेळी डावपेचात्मक धोरण व कृती आवश्यक ठरते. ज्यातून समाज अधिक प्रगल्भ होईल, त्यातील छोटा का होईना एक लक्षणीय विभाग अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाला स्वतःहून तयार होईल किंवा किमान सहानुभूती दर्शवेल, यासाठी समाजाची तयारी करणे गरजेचे ठरते.

सर्वसामान्य विचार अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य व कलावंताचे आविष्कार स्वातंत्र्य यात थोडा फरक आहे. कला प्रतिमा-प्रतीकांद्वारे अर्थसूचन करते. एम. एफ. हुसेन यांचे सरस्वतीचे नग्न रेखाटन हे देवतेचे नग्न चित्र नसते, तर ते सांकेतिक असते. चित्रकाराला त्यातून काही वेगळे सुचवायचे असते. हिंदू कट्टरपंथीयांनी एका मुस्लिमाने हिंदू देवतेचा अपमान केला, अशी आवई उठवली. कला समजण्याची किंवा कलावंताप्रती आदर दाखवण्याची प्रगल्भता नसलेल्या व सांप्रदायिक विषाची आधीच शिकार असलेला समाज या आवईला बळी पडला. परिणामी, हुसेन या भारताची शान असलेल्या कलावंताला भारतातूनच परागंदा व्हावे लागले.

हुसेनने पैगंबराचे असे चित्र काढले असते का, या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर काय? हुसेन यांचा पैगंबरांचे व्यंगचित्र काढणाऱ्या ‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकाच्या संपादकांप्रमाणे खून पडला असता किंवा तसलिमा नसरीन यांच्याप्रमाणे सतत मृत्यूची तलवार डोक्यावर लटकत ठेवत लपतछपत परागंदा जिणे जगावे लागले असते. हिंदू आणि मुस्लिम यांचा इतिहास कितीही उदारमतवादी वा प्रगत असला तरी आज मुस्लिम समाज हिंदूंपेक्षा अधिक मागास व बंदिस्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. साहजिकच जो अधिक मागास व बंदिस्त; त्याच्यात नवविचारांना अधिक विरोध होणार. आपण सुधारणांना तयार असतो, ही हिंदूंना खरे म्हणजे भूषणावह असलेली बाब. पण त्यांच्यातील कट्टरपंथीय तुम्ही त्यामुळेच कणाहिन आहात, असे त्यांना पटवून देण्यात यशस्वी होतो. पर्यायाने, हिंदूंना मागासपणाच्या दिशेने सरकवतो.

वसंत गुर्जरांच्या ‘गांधी मला भेटला’ कवितेच्या बंदीविरोधी आम्ही काहींनी कवीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येता कामा नये म्हणून पाठिंब्याचे निवेदन काढले. १९८४ सालच्या या कवितेवर तेव्हा काही झाले नाही आणि आता त्यावर बंदीची मागणी होते; हे चमत्कारिक असले, तरी समाजाच्या आजच्या प्रगल्भतेवर व प्रतिगामी शक्तींच्या ताकदीवर (म्हणजेच पुरोगाम्यांच्या कमकुवतपणावर) ते अवलंबून आहे, हे इथवरच्या मांडणीतून स्पष्ट झाले आहेच. या कवितेवर अश्लिलतेचा आरोप आहे. तो मला मान्य नाही. तथापि, कवीने जी भाषा, प्रतिमा वापरल्या आहेत त्याने समाजाचे उन्नयन होते, असे मला वाटत नाही. नामदेव ढसाळांसारखा विद्रोह करुन समाजाची चौकटबद्ध रुची बदलण्यासाठीची आशय व शैलीची ती अभिन्न अपरिहार्यता आहे, असेही मला वाटत नाही. कविता म्हणूनही ती खूप सामान्य आहे, असा माझा समज आहे. पण कलावंताचे आविष्कार स्वातंत्र्य धोक्यात येऊन ‘काळ सोकावता’ कामा नये, म्हणून आम्ही त्याच्या बाजूने आवाज उठवला. अर्थात, ‘गांधी’ या प्रतिमेवर ही कविता असल्याने आम्हाला हे कर्तव्य बजावण्याचे पुण्य मिळवता आले. तिथे जर आंबेडकर किंवा शिवाजी असते तर आम्ही (निदान मी तरी) पुढे आलो नसतो, हे कबूल केलेच पाहिजे.

कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि कायद्याने त्याला मर्यादाही घातल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत त्या सगळ्याची चर्चा होते. त्या चर्चा महत्वाच्या आहेत. पण त्या तांत्रिक आहेत. समाजाची घडण व्हायला त्या अपुऱ्या आहेत. समाजबदलासाठी कायद्यातील या तरतुदींचा आवश्यक तो वापर तारतम्याने जरुर करावा; मात्र स्थलकालाचे संदर्भ हेरुन समाजमनाची घडण करणे ही एक स्वतंत्र कला आहे, हे लक्षात ठेवावे. त्या कलेची आराधना ही आपल्या अभिव्यक्तीच्या ऊर्मीची पूर्ववट व्हायला हवी.

– सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

___________________________________________

(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, नोव्हेंबर २०१५)

आणीबाणीः सरकारी व गैरसरकारी

एका सहकारी मित्राने चळवळीच्या एका whatsupp group वर चर्चेसाठी खालील प्रश्न टाकलाः

एक confusion आहे.... in confidence विचारतो.... अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही ही तक्रार किंवा व्यथा वर्तमान पत्रांतून छापून येतेय, दूरदर्शनवर चर्चा होतेय, सोशल मिडीयातून forward होतेय आणि त्यावर निदर्शनं ही होतायत.... हयात विरोधाभास नाही का?? मला थोडं गोंधळल्यासारखं वाटतंय...

चर्चेत सहभाग घेताना मी दिलेलं उत्तरः

इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीसारखी ही प्रत्यक्ष सरकारी आणीबाणी नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरळ घाला घालत नाहीत. इंदिरा गांधींच्या आणीबाणीत नसलेली गोष्ट म्हणजे इथे गैर सरकारी घटक ही आणीबाणी आणत आहेत व सरकार त्याबाबत गप्प राहत आहे. त्यांना पाठीशी घालत आहे. खुद्द सरकारमधील व्यक्ती त्यास प्रोत्साहन देत आहेत, त्यात सहभागी होत आहेत आणि सरकार त्यांना अटकाव करत नाही. बीफ बंदीसारखी मागणी या गैर सरकारी घटकांकडून येते व सरकार तिला कायदेशीर चौकट देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, सेक्युलॅरिझम हे काहीही मंजूर नसलेले संघपरिवारातील घटक बोकाळले आहेत व याच संघपरिवाराचे राजकीय साधन-भाजप लोकशाही मार्गाने सत्तेवर आले आहे. फॅसिझमची प्रक्रिया ही अशीच असते. गैर सरकारी घटकांकडून होणाऱ्या या कारवायांना 'अगं अगं म्हशी' करत सरकार गप्प राहून, काही वेळा बोलल्यासारखे करुन व शक्य तेव्हा कायद्याने पाठिंबा देत राहणार व हे सगळे असेच धकले तर 'कल्याणकारी हुकूमशहा' अशी प्रतिमा तयार करुन प्रत्यक्ष कायद्यानेच लोकशाही अधिकार मोडून टाकणार. इंदिरा गांधींची आणीबाणी अंमलात आणायला त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरला नव्हता. सरकारी यंत्रणेवरच त्यांची भिस्त होती. इथे तर भाजपचे कार्यकर्ते व एकूण संघपरिवाराची भुतावळ दिल्लीपासून गल्लीपर्यंत हैदोस घालते आहे. हे दुहेरी आक्रमण आहे. म्हणून अधिक धोकेदायक आहे. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला लोकांत समर्थन कमी व विरोध अधिक होता. तिथे विखारी, समाजात दुही माजवणारा सांप्रदायिक प्रचार नव्हता. इथे विषारी प्रचाराने समाजातील बहुसंख्याकांच्या डोक्यात 'केमिकल लोचा' करुन अल्पसंख्याकांच्या विरोधात उभे करण्याची हिटलरी रणनीती आहे. त्यामुळे 'आपुलीच प्रतिमा होते आपुली वैरी' पद्धतीने आपलेच स्वजन आपल्या विचारांना विरोध करुन शत्रूला मदतनीस होतात व आपण एकटे पडतो.

- सुरेश सावंत

Sunday, October 25, 2015

पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक-कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी विवेकवादी नागरिकांचे निदर्शन

देशातील अविवेकी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक-कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी

विवेकवादी नागरिकांचे निदर्शन

गुरुवार, ५ नोव्हेंबर, दु. ३ वा., आझाद मैदान, मुंबई


आमची भूमिका व आवाहन

विचार पटत नाहीत म्हणून साहित्यिक-विचारवंतांचे खून, आमच्या धर्मश्रद्धांना मंजूर नसलेले गोमांस खाल्लेत अथवा खात असल्याचा संशय-अफवा यावरुन हजारोंच्या जमावाने अल्पसंख्याक समूहातील व्यक्तींच्या घरादाराचा विध्वंस करुन तर कधी रस्त्यात गाठून निर्घृणपणे हत्या करणे, दलितांविषयीची तुच्छता व संताप यामुळे रात्री झोपेत असलेल्या दलित कुटुंबाच्या घरात पेट्रोल टाकून दोन लहानग्यांना निर्ममपणे जिवंत जाळणेआरक्षणाच्या फेरविचाराची गोंधळ वाढवणारी चर्चा सुरु करुन सामाजिक विद्वेष भडकवण्याचा प्रयत्न करणे अशा असंख्य घटना हा देशात सध्या अपवाद नव्हे, तर परिपाठ झाला आहे.

हिंदू कट्टरपंथीय व त्याला प्रतिसाद देणारे मुस्लिम कट्टरपंथीय यांच्या संयुक्त प्रयत्नांनी देशातील वातावरण कलुषित होणे हा आपला जुना अनुभव आहे. याआधीच्या राज्यकर्त्यांनी या विष पेरणाऱ्या शक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात अनेकदा कमकुवतपणा दाखवला व त्यामुळे त्यांची ताकद  वाढली, हे खरे आहे. तथापि, या राज्यकर्त्यांचे सांप्रदायिकतेचे विष पेरणे अधिकृत धोरण नव्हते. सध्या प्रचंड बहुमताने केंद्रात निवडून आलेल्या भाजपचा व त्यांच्या संघपरिवाराचा इतिहास पाहता सांप्रदायिकतेला व हिंदू प्रभुत्ववादाला चालना देणे हे त्यांचे अधिकृत धोरणच आहे. पंतप्रधान अथवा भाजपच्या प्रवक्त्यांचे जाहीर निवेदन काहीही असो, त्यांचे खासदार म्हणून लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या साधू-साध्वींची, मंत्र्यांची आगलाऊ, चिथावणीखोर तसेच अल्पसंख्याक व दलितांची मानहानी करणारी विधाने राजरोस चाललेली असतात.

तुम्ही घेतलेल्या घटनेच्या शपथेच्या हे विरोधात असल्याचा आरोप लावून पंतप्रधानांनी यांपैकी एकाचाही राजीनामा घेतल्याचे उदाहरण नाही. परदेशात बुद्धाच्या-गांधीजींच्या देशातून आल्याचे ते अभिमानाने सांगत असतात. मात्र या महामानवांनी प्रचारलेल्या करुणेला ते मान देतात, असे दिसत नाही. अत्याचार पिडितांना भेट देण्याची अथवा त्यांच्याशी सहवेदना प्रकट करण्याची त्यांनी तातडी दाखवल्याचे अजून एकही उदाहरण नाही.

वास्तविक, या वेळच्या निवडणुकीत मोदींच्या नावाने जे भरघोस मतदान झाले, त्यातून त्यांच्याकडे मोठी नैतिक व राजकीय ताकद तयार झाली आहे. तथापि, त्यांच्या परिवारातील या उपद्रवी मंडळींना ते या ताकदीचा वापर करुन आळा घालत नाहीत. त्यांना तो घालायचाच नाही, असे यावरुन दिसते. राष्ट्रीय स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या प्रदीर्घ संघर्षातून लोकशाही, धर्मनिरपेक्षता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये उत्क्रांत झाली व पुढे संविधानाचा पाया बनली. ही मूल्ये निर्माणाची प्रक्रिया ज्या स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या आंदोलनांत चालली होती, त्याच्या कायम विरोधी राहण्याचेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले आहे. ते आमचे चुकले अशी कधीही आत्मटीका त्यांनी केलेली नाही. लोकशाही प्रक्रियेचा वापर करुन आपले प्रभुत्ववादी राजकारण करण्याचा त्यांचा डाव आहे. संघपरिवाराच्या घटकांकडून देशाची सहिष्णू, सेक्युलर व सामाजिकी न्याय यांची वीण उसवायचे सध्या जे जोरदार प्रयत्न चालू आहेत, तो या त्यांच्या धोरणाचाच भाग आहे, असे म्हणावे लागते.

वर नमूद केलेल्या या अतिशय गंभीर व चिंताजनक वातावरणाने व्यथित होऊन देशातील व महाराष्ट्रातील साहित्यिक-कलावंतांनी आपले साहित्य अकादमीचे तसेच अन्य सरकारी पुरस्कार मिळालेल्या रकमांसहित सरकारला परत करण्याची भूमिका घेतली, असे आमचे मापन आहे. या साहित्यिक-कलावंतांनी गट करुन, बैठक करुन सामुदायिकपणे हा निर्णय घेतलेला नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या कारणांची त्यांची म्हणून विविध तपशीलांची निवेदने त्यांनी दिलेली आहेत. त्या तपशीलांविषयी काहींची वेगळी मते असू शकतात. त्यांविषयी ज्यांना शंका आहेत, अशी मंडळी त्यांना त्याबाबत विचारणाही करत आहेत.

आम्ही त्या तपशीलात जात नाही. आजच्या भयकारी बनत चाललेल्या वातावरणामुळे व सरकारच्या त्यातील प्रभावी हस्तक्षेपाच्या अनास्थेपायी अस्वस्थ होऊन या संवेदनशील कलावंतांनी सरकारच्या व समाजाच्या विवेकाला आवाहन करण्याचे ठरवले. आपला निषेध व आवाहन सरकार तसेच समाजापर्यंत पोहोचविण्याचे त्यांच्याकडे असलेले एक साधन म्हणून शासनाने दिलेले पुरस्कार शासनाला परत करण्याची प्रतीकात्मक कृती ते करत आहेत, असे आम्ही समजतो. तुम्ही आधी का नाही परत केलेत वा ते न करताही निषेध व्यक्त करता आला असता, आदि अनेक मते अनेकांची असू शकतात. त्याविषयी या कलावंतांनी उत्तरे दिली आहेत. पुढेही देतील. तथापि, त्यामुळे त्यांच्या आजच्या हेतूंविषयी संशय घेणे हे गैर आहे, असे आम्हाला वाटते.

पुरस्कार परत करण्याच्या मार्गाविषयी वेगळे मत असलेले, तथापि पुरस्कार परत करणाऱ्यांच्या इतक्याच तीव्र भावना व भूमिका असलेले साहित्यिक-कलावंत समाजात आहेत आणि ते त्यांचा निषेध विविध पद्धतीने व्यक्त करत आहेत. त्यांचाही आम्ही आदर करतो. पुरस्कार परत करणाऱ्यांपेक्षा कोणत्याही प्रकारे त्यांच्या भावना कमी प्रतीच्या आहेत, असे आम्ही मानत नाही. किंबहुना, समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने व पद्धतीने आजच्या विषाक्त होत असलेल्या वातावरणात हस्तक्षेप करायला हवा, अशीच आमची अपेक्षा आहे.

५ नोव्हेंबरचे हे निदर्शन हा विवेकी नागरिक म्हणून आम्ही आमच्या परीने करत असलेला असाच एक हस्तक्षेप आहे. आपल्या मनात काही किंतु-परंतु असू शकतात. पण आपण जर आमच्या हेतूंशी सहमत असाल, तर  आपण या निदर्शनांत जरुर सहभागी व्हावे. इतर समविचारी मंडळींनाही सहभागी होण्याचे आवाहन करावे. हे निवेदन फेसबुक, व्हॉट्सअप तसेच ईमेलद्वारे विस्तृत प्रमाणावर शेअर करावे.

आपण येत असल्याचे संपर्कासाठीच्या खालील मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर कळवावे, ही नम्र विनंती.

आपले,

संजय शिंदे, प्रफुल्ल शिंदे, वैभव छाया, जॉन अल्मेडा, राजू कोरडे, सुरेश सावंत, सुनील गजाकोश, देवचंद रणदिवे, निसार अली, बाळासाहेब पवार, ओमप्रकाश पासी, श्रीधर क्षीरसागर, वैभव मोरे

संयोजन समिती

विवेकवादी लोकशाही मंच
________________________________
संपर्कः sanjaysushma1991@gmail.com , 9820890318
प्रकाशकः संजय शिंदे, श्रमिक, रॉयल क्रेस्ट, लो. टिळक वसाहत, रस्ता क्र. ३, दादर (पूर्व), मुंबई- १४.

Thursday, October 15, 2015

लोक पुरोगाम्यांकडे कसे पाहतात?

हा लेख लिहीत असताना ‘सनातन’च्या समीर गायकवाडला व आणखी तिघांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. त्यांची चौकशी चालू आहे. दाभोलकरांचे खूनी प्रदीर्घ काळ सापडत नव्हते. पानसरेंच्या खून्यांचेही तसेच होते की काय असे वाटत होते. त्यात कलबुर्गींच्या त्याच प्रकारे झालेल्या खूनाची भर पडली. अशा वेळी पानसरेंच्या खून प्रकरणात असे काही लोक पकडले जाणे ही आश्वासक बाब आहे. मुख्य म्हणजे ज्या हिंदू मूलतत्त्ववादी ‘सनातन’कडे पुरोगामी बोट दाखवत होते, त्याला या अटकेमुळे पुष्टी मिळाली आहे. राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने राजकीय दबाव अथवा आकसापोटी ही कारवाई झाली, असे म्हणण्याला आता जागा नाही. या अटकेचे पुढे, विशेषतः केस उभी राहताना-राहिल्यावर काय होईल, मालेगाव-समझौता एक्सप्रेस खटल्याप्रमाणे ही केस पातळ करण्याचे प्रयत्न होणार नाहीत ना, या शंका रास्त आहेत. पण ते सगळे पुढचे. तूर्त, भाजप सरकार या प्रकरणात तटस्थतेचा दावा करायला मोकळे आहे, हे निश्चित.

आपल्या उद्दिष्टाकडे सरकताना आपल्यातल्याच काहींचा बळी देणे अपरिहार्य आहे, ही संघाची धूर्तताही यामागे असू शकते. संघ जे बोलतो तेच त्याला म्हणायचे असते किंवा ताबडतोबीने जी कृती ते करतात तेच त्यांना साधायचे असते असा संघाचा इतिहास नाही. सोयीनुसार ते कसेही बदलू शकतात, काहीही बोलू, काहीही करु शकतात. त्यातून तार्किक निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. त्यांचा इतिहास, त्यांच्या गुरुजनांचे विचारधन यातील काहीही त्यांना त्याज्य वाटल्याचे त्यांनी जाहीर केलेले नाही किंवा कोणतीही आत्मटीका केलेली नाही. ते ज्या रणनीती वापरतात, त्यांच्या फळाची तातडीने अपेक्षा ते करत नाहीत. त्यांची सबुरी दीर्घ पल्ल्याची असते. त्यांच्या राजकीय साधनाचे-भाजपचे त्यांना हवे तसे भरभक्कम बहुमताचे सरकार केंद्रात आल्याने व पुढे एवढेच बहुमत मिळेल यावर विसंबणे बरोबर नाही हे त्यांना कळत असल्याने परिवारातील घटक अधिक सक्रिय होणे अगदी स्वाभाविक आहे. काही वेळा यातील काही घटक चेकाळतात किंवा चेकाळल्यासारखे दिसतात. तथापि, त्या सगळ्यांत एक मेळ असतो. संघपरिवार हा एक वाद्यवृंद आहे. त्यातील प्रत्येक घटकाचे आपले एक वाद्य, आपली एक भूमिका असते. परस्परांशी औपचारिक संघटनात्मक नाते नसले तरी ते परस्परांना पूरक असतात. इतरांना काही वेळा त्यात बेसूरपणा भले वाटला, तरी अंतर्गत त्यांचे सूर संवादीच असतात. काही जागा चुकल्या तरी सरसंघचालक हा नैतिक अधिकारी पुरुष आपल्या कटाक्षाने त्या लगेच दुरुस्त करतो. ते एक सैन्यदळ आहे. सरसंघचालक सेनापतीने वाटून दिलेले बुरुज प्रत्येकजण निष्ठेने सांभाळत असतो. त्यांच्या या लवचिक, सशक्त पिळामुळे समाजातील सौम्य हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांपासून कट्टर पंथीयांपर्यंत, सेवाभावी काम करु इच्छिणाऱ्यांपासून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांपर्यंत समाजातील विविध छटांचे लोक ते सामावून घेत असतात. आपला जनाधार वाढवत असतात.

पुरोगाम्यांच्यात याची चिंताजनक वानवा आहे. विचार थोर असून चालत नाही. तो रुजवण्यासाठी सुनियोजित प्रचार व संघटना असावी लागते. नाहीतर बी वाऱ्यावर उडून जाते. ते रुजत नाही. एकूणच भारतीय समाजाचे विविधतापूर्ण स्वरुप व आजवर प्रत्ययाला आलेली अंगभूत सूज्ञता या बळावर आपले सर्व काही चालू आहे. भारतीयांचे हे वैशिष्ट्य नादुरुस्त करण्याच्या प्रयत्नांनी काही वळसे पडतात. पण त्या सगळ्यांतून देश पुन्हा सावरतो. पण याला पुरोगाम्यांनी आपली ताकद समजू नये किंवा त्यावर कायमचा भरवसा ठेवू नये. ती आपल्या जमेची बाब असू शकते. पण ती बोनस समजावी. आपल्या ताकदीने व कौशल्याने आपण समाजाची ही घडी विस्कटू देणार नाही, हा निश्चय करण्याची गरज आहे. हा निश्चय परिणामकारक व्हायचा असेल तर आपल्या ताकदीला व कौशल्याला हानी पोहोचवणाऱ्या आपल्या कमजोऱ्यांचा वस्तुनिष्ठ शोध घेऊन त्या तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे.

आताच्या या समीर गायकवाडच्या अटकेनंतर ‘खरे सूत्रधार बहुजनांना हाताशी धरुन आपला कार्यभाग साधतात’ असा आरोप पुरोगामी वर्तुळांतून काहींनी सुरु केला. माध्यमांनी त्याला आणखी फोडणी दिली. ज्यांना पुरोगामी-प्रतिगामी हे शब्दही समजत नाहीत, असा समाज याकडे कसा पाहतो, त्याच्यावर आपल्या या वक्तव्याचा काय परिणाम होतो, डावपेच म्हणूनतरी लांब पल्ल्याचे यात काही हित आहे का, याचा ही पुरोगामी मंडळी काय विचार करतात हे मला कळत नाही.

आज समाज सरळ सरळ ब्राम्हण-ब्राम्हणेतर पद्धतीने विभागला गेलेला नाही. ज्याला ब्राम्हणी मूल्यविचार म्हणू तो मानणारे आता बहुजनांतही लक्षणीय आहेत व स्वतःच्या प्रेरणेनेच ते याचे वाहक-चालक झालेले आहेत. अशावेळी कोणीतरी ब्राम्हण सूत्रधार व बहुजन केवळ कठपुतळ्या आहेत, हे समाजाला समजत नाही. कारण तसे दिसत नाही. सरसंघचालक व मुख्य पदाधिकारी सोडले तर संघात व संघपरिवारातील अन्य संघटनांत पुढाकाराने असणाऱ्यांत ब्राम्हणच आहेत, असे आता दिसत नाही. (उद्या सरसंघचालक म्हणून ब्राम्हणेतर व्यक्तीची ते निवड करणारच नाहीत असे नाही. तेवढे ते लवचिक नक्की आहेत. त्या व्यक्तीत त्यांना सोयीचे ब्राम्हण्य ठासून भरलेले असले म्हणजे झाले.) पंतप्रधान मोदी तेली म्हणजे ओबीसी आहेत. त्यांना कोणी ब्राम्हण सूत्रधारांचे कठपुतळी म्हणणे म्हणजे कठीणच होईल. ते स्वतः सूत्रधारांतले एक आहेत. त्यांनी संघप्रणीत ब्राम्हणी विचार आत्मसात केला आहे, असे जरुर म्हणूया. पण कोणीतरी ब्राम्हण व्यक्ती वा समूह त्यांच्यावर अधिसत्ता गाजवतो आहे व त्याबरहुकूम ते वागत आहेत, असे समजणे ही आत्मवंचना ठरेल. या सूत्रधार ब्राम्हण व्यक्ती वा समूहाचा पर्दाफाश केला की बहुजन त्यांच्याबाबतीत निराभास होतील व आपल्या मूळ ‘पुरोगामी (?)’ भूमिकेवर परत येतील, ही आपण आपली फसवणूक करुन घेण्यासारखे आहे. आजच्या नाजूक स्थितीत ते बेजबाबदारपणाचेही आहे. हिंदूंतील प्रत्येक जातीत पुरोगामी व प्रतिगामी आहेत, अशी आजची स्थिती आहे. हिंदू मूलतत्त्ववाद्यांच्या (मग ते ब्राम्हण असोत अथवा ब्राम्हणेतर) आम्ही विरोधात आहोत, अशी सुस्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. ते लोकांना कळू शकते.

सनातनसारख्या संस्थांना ‘हिंदुत्ववादी’ म्हणून पुरोगामी संबोधतात तेव्हा त्यांना कडवे धर्मवादी किंवा मूलतत्त्ववादी असे म्हणायचे असते. सनातनही स्वतःला हिंदुत्ववादीच म्हणवते. हिंदू धर्माचे खरेखुरे अनुसरण करणारे असे त्यांना म्हणायचे असते. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे. म्हणजे त्यांचेही एक हिंदुत्व होते. पण त्यांचे हिंदुत्व सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव मानणारे होते. देशाच्या राजकीय व प्रशासकीय व्यवहारात ढवळाढवळ करणारे नव्हते. भागवतपंथीय वारकरी हिंदू (व म्हणून हिंदुत्ववादी) या ओळखीतच आज मोडतात. बौद्धत्ववादी, जैनत्ववादी, शीखत्ववादी असे त्या त्या धर्मातल्या कोणी स्वतःला म्हटले, तर ते प्रतिगामी ठरत नसल्यास हिंदूने मात्र स्वतःला हिंदुत्ववादी म्हटल्यास प्रतिगामी कसे ठरते, असा अनेक सामान्य हिंदूंना प्रश्न पडतो. हा देश फक्त हिंदूंचा नाही. पण तो हिंदूंचाही आहे. आणि हे हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या स्वतःच्या ओळखीला असे नकारात्मक मानले जाणे त्यांना मानवत नाही, असे अनेकांशी बोलताना लक्षात येते. (डॉ. आंबेडकरांनी सबंध हिंदूधर्मच- म्हणजे हिंदुत्वच नाकारले. त्यांनी बौद्धधम्म स्वीकारला. त्याचा अर्थ, संदर्भ हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण हे पाऊल न उचलणारे बहुसंख्य पुरोगामी हिंदू धर्मातच आहेत. त्यांपैकी कागदोपत्री धर्म न नोंदवणारे अपवादानेच असतील.) या हिंदूंपासून सनातनसारख्या मूलतत्त्ववादी हिंदूंना वेगळे काढण्याऐवजी सनातनलाच या सबंध हिंदूंचा-हिंदुत्वाचा ताबा आपण देत असतो, असे मला वाटते. पुरोगाम्यांची धर्मचिकित्सा न कळणाऱ्यांची समाजात आज बहुसंख्या आहे. अशावेळी पुरोगाम्यांकडून निषेधात्मक पद्धतीने होणारा हिंदुत्ववादी हा उल्लेख अपेक्षित परिणाम साधतो असे वाटत नाही. म्हणूनच यातही सुस्पष्टता आणून सनातन किंवा बजरंग दलसारख्यांसाठी हिंदू कट्टरपंथी किंवा मूलतत्त्ववादी अथवा यासारखे काही वेगळे संबोधन वापरायला हवे.

मूळात हिंदू ही संज्ञा नव्हतीच. सिंधू नदीच्या पलीकडच्यांना दिलेल्या नामाभिधानाचे ते अपभ्रंशित रुप आहे, ही व्युत्पत्ती पटवण्याची ही वेळ नव्हे. ते सावकाश करायचे काम आहे. आज हिंदूंतल्या पुरोगाम्यांनी स्वतःची हिंदू ही ओळख दाखवून हिंदूंच्या कळपातल्या या लांडग्यांना बाहेर काढायला हवे. आजचे प्राधान्य ते आहे. पण ते समजण्यात आपली पुरोगामी मंडळी गडबड करतात. सैद्धांतिक स्पष्टतेच्या या अस्थानी आग्रहाच्या तार्किक कर्कशतेतून आपण बाहेर यायला हवे.

‘लोकसत्तेत आलेले शेषराव मोरेंचे अंदमानच्या साहित्य संमेलनातील भाषण किती छान आहे नाही!’ हा अभिप्राय मी आमच्या सोबत्यांकडूनच ऐकला आहे. ती त्यांची प्रामाणिक, बाळबोध भावना होती. शेषराव मोरे हे ‘आपल्यातलेच’ (पुरोगामी छावणी) तलेच आहेत, अशी त्यांच्यापैकी काहींची समजूतही होती. त्यांच्याशी बोलताना नेहमीप्रमाणेच माझी दमछाक झाली. जातिव्यवस्था, जागतिकीकरण याबाबतची मोरेंची निरीक्षणे किंवा सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी ही मंडळी मोरेंशी सहमत होती. पुरोगाम्यांकडून काळ्या-पांढऱ्याऐवजी अनेक करड्या छटा असलेले बदलते वास्तव, त्यातील अंतर्विरोध नीट मांडले गेले असते, या मांडणीत सावरकरांना नाकारताना त्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून लोकांच्या मनात जो खोल ठसा आहे, त्याचा योग्य तो आदर राखला गेला असता, तर ही दमछाकीची वेळ बहुधा आली नसती.

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना झालेल्या विरोधाची कारणे सांगतानाही अशीच दमछाक झाली. तरी अलिकडेच कॉ. पानसरेंचे शिवाजी महाराजांवरील भाषण यातील काहींना ऐकवले होते. त्यांचे पुस्तकही वाचायला सांगितले होते. त्यामुळे थोडे सोपे गेले. पण सामान्यांना जर पुरंदरेंनीच सांगितलेला शिवाजी ठाऊक असला व डांगे किंवा पानसरेंचा शिवाजी पोहोचवायचा आपण फारसा प्रयत्नच केलेला नसला, तर ‘पुरंदरेंना विरोध का?’ याचे उत्तर ते ‘ब्राम्हण’ आहेत म्हणून, हेच लोकांपर्यंत पोहोचते. पुरोगामी हेच खरे जातियवादी आहेत, हे पटवायला भाजप सरकारला व संघपरिवाराला त्यामुळे सोपे झाले.

पुरोगाम्यांच्या या कमकुवत जागांबद्दल आत्मचिकित्सा म्हणून अजून बरेच लिहावे लागेल. ते यथावकाश लिहीन. तूर्त, या प्रतिकूल माहोलाचा नीट समज घेण्यासाठी आपल्या भोवतालच्या-जवळच्या मंडळींना सहाय्य करणे हा दिनक्रम म्हणून अंगिकारावा, अशी पुरोगामी सहकाऱ्यांना विनंती आहे. हे प्रासंगिक घटनांबाबत चर्चा छेडून करता येते. त्यासाठी भाषणे, लेख, माध्यमांना प्रतिक्रिया, शिबिरे, निदर्शने हीच साधने आहेत असे नव्हे. ते करावेच. ते करताना आपल्या सहवासात येणाऱ्या एकट्या-दुकट्या तरुण मंडळींशी अनौपचारिक बोलण्याचे विसरु नये एवढेच. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________________

(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, ऑक्टोबर २०१५)

वल्लभभाईंना नाकारायचा ५६ इंची बाणेदारपणा मोदी दाखवतील का?

‘दादरी येथील हत्याकांड आणि पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे यासारख्या घटना अतिशय दुर्दैवी अशाच आहेत. पण, त्या घटनांचा संबंध केंद्र सरकारशी जोडणे मुळीच योग्य नाही. भाजपा केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या घटना घडत आल्या आहेत. त्यावेळी ढोंगी धर्मनिरपेक्षवादी शांत राहायचे. आता भाजपा सत्तेवर असल्याने ते या घटनांना जातीय रंग देत आहेत’ -  नरेंद्र मोदी (‘आनंद बाजार पत्रिका’ या बंगाली दैनिकाला दिलेली मुलाखत)

यापूर्वीच्या व आताच्याही बहुसंख्य घटना या भाजपच्या भावकीतल्या संघटनांनी व त्यांच्याच प्रवृत्तीच्या दुसरीकडच्या कट्टरपंथीयांनी समाजात जे सांप्रदायिकतेचे विष भिनवण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्यातून झालेल्या आहेत. नरेंद्र दाभोलकर किंवा कलबुर्गी यांची हत्या ज्या राज्यांत व काळात झाली त्यावेळी भाजपचे तिथे सरकार नसले तरीही याच मंडळींनी निर्माण केलेल्या विषाक्त वातावरणाचे ते बळी आहेत. आता तर भाजप (म्हणजे हीच सगळी भावकी) सत्तेत आल्याने त्यांचा उन्माद अधिकच वाढला आहे. परिणामी वातावरण अधिकच विषाक्त होत आहे. त्यामुळे राज्यात आमचे सरकार नाही किंवा पूर्वी आम्ही सत्तेत नव्हतो, ही मोदींची तांत्रिक कारणे पूर्णतः गैरलागू आहेत.

वल्लभभाई पटेल हे भाजपचे हल्ली आराध्य दैवत आहे. या वल्लभभाईंनी गांधीहत्येच्या संदर्भात त्यांच्याच परिवारातील श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या पत्रातील खालील मजकूराविषयी मोदींचे काय म्हणणे आहे?

'रा. स्व. संघ व हिंदू महासभा या संघटनांच्या व विशेषतः संघाच्या कारवायांमुळे देशात जे वातावरण तयार झाले होते, त्यामुळेच गांधींच्या खुनासारखे घृणास्पद कृत्य घडू शकले. हिंदूमहासभेला मानणारा अतिरेकी गट गांधीखुनाच्या कटात सामील होता, याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. रा. स्व. संघाच्या कारवाया या राज्य व सरकार दोहोंच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरणाऱ्या आहेत.' (वल्लभभाई पटेल पत्रसंग्रह, खंड ६, पान ३२३, नवजीवन प्रकाशन, १९७३)

गांधीहत्येवेळी तर काँग्रेस सत्तेवर होती. हत्या दिल्लीत झाली. दिल्ली केंद्राच्या ताब्यात होती. नेहरु पंतप्रधान व स्वतः वल्लभभाई गृहमंत्री होते. त्या अर्थाने गांधीहत्येला तेच जबाबदार होते, असे मोदींनी म्हणायला हवे. या खूनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नथुराम गोडसेने केली असली तरी असा खून करण्यासाठी पोषक विषाक्त वातावरण ज्यांच्या कारवायांनी तयार केले गेले त्या हिंदू महासभा व रा. स्व. संघाला वल्लभभाईंनी स्पष्टपणे जबाबदार धरले आहे.

मोदी वल्लभभाईंचे शिष्योत्तम स्वतःला म्हणवत असतील, तर आपल्या या गुरुचा तर्क त्यांना मान्य आहे का? नसल्यास, वल्लभभाईंची ही मीमांसा आम्हाला मान्य नाही. आधुनिक भारताचा पाया घालणारे नेहरु मरणोत्तरही आम्हाला छळत आहेत. त्यांनी घट्ट केलेली भारताची सहिष्णू-सेक्युलर वीण अजूनही आम्हाला पूर्णतः उसवता येत नाही. उलट, मनात नसतानाही नाईलाजाने देशी-परदेशी जाहीर भाषणात तेच बोलावे लागते. म्हणून त्यांना बदनाम करुन संपविण्यासाठी कधी वल्लभभाई तर कधी नेताजी आम्ही हवे तेव्हा दत्तक घेतो, हवे तसे वापरतो, हे सांगण्याचा ५६ इंची बाणेदारपणा मोदी दाखवणार आहेत का?

- सुरेश सावंत

Thursday, October 8, 2015

गुलामअली...

गुलामअली, तुम्हाला माझ्या शहरातून माघारी जावे लागत आहे, याची मला लाज वाटते. तुम्हाला परतण्यास भाग पाडणाऱ्या धटिंगणांना मी अडवू शकत नाही, या माझ्या हतबलतेची मला घृणा येते आहे.

तुमच्या सूर व स्वरांनी मनाच्या तारा छेडल्या आणि आपण वयात आल्याचा बोध झाला. तेव्हापासून अनेक दशके तुम्ही माझे सोबती आहात. 'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना' असो की 'थोडी सी जो पी ली है' ची मस्ती असो. भावनांच्या अशा अनेक आवर्तनांत तुमच्याशी मोकळं होताना तुम्हालाही एखादा देश असणार, हे कधी ध्यानातच आलं नाही. आज ते आलं. हो, तुम्हालाही एक देश आहे. मलाही एक देश आहे. आपले देश वेगळे आहेत. या दोन देशांचे भांडण आहे, म्हणून माझ्या देशातल्या या धटिगणांनी तुम्हाला व मला भे़टू दिले नाही. तुमच्या गझलांचा आणि या दोन देशांच्या भांडणाचा काय संबंध आहे, हे मला कळत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष पाहता-भेटता येणार नाही, हे खरे. पण तसा मी प्रत्यक्ष कधीच तुम्हाला भेटलो नाही. तरीही तुम्ही माझे सोबती होता. तसेच यापुढेही राहाल.

...तरीही तुम्हाला माझ्या शहरातून परतावे लागणे व तुम्हाला परतताना असहायतेने बघणे हा घाव जिव्हारी लागला आहे, हे खरे.


- सुरेश सावंत

Tuesday, September 22, 2015

याकूबची फाशी व अशुभाच्या सावल्या



याकूबची फाशी रोखण्याचे, स्थगित करण्याचे सर्व प्रयत्न असफल होऊन अखेर ३० जुलैला सकाळी त्याला फासावर चढवले गेले. याकूबची फाशी जाहीर झाल्यानंतर ज्या घमासान चर्चा प्रसारमाध्यमांवर व लोकांत सुरु झाल्या, त्याने मला खूप अस्वस्थ व्हायला झाले होते. भविष्यातील अशुभाच्या सावल्या माझ्याभोवती घोंगावू लागल्या होत्या. काही करुन ही फाशी टळावी, किमान पुढे जावी अशी मनोमन आस धरुन होतो. फाशीच्या आधीची ती रात्र अनेकांप्रमाणे मीही झोपेविना काढली. सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या शेवटच्या सुनावणीच्या निकालाची मी धडधडत्या अंतःकरणाने वाट पाहत होतो.

५ वाजता निकाल लागला. शेवटची आस संपली. हतबल होऊन अंथरुणावर आडवा झालो. नागपूरच्या जेलमध्ये काय चालू असेल याचे चलत्चित्र माझ्या डोळ्यांसमोर सुरु झाले. माणूस मरतो. नैसर्गिकरित्या वा अपघाताने. पण त्याची नक्की तारीख, वेळ ठाऊक नसते. खून होतो, तेव्हा त्याचे काहीएक नियोजन असते. पण त्याचीही अगदी अचूक वेळ क्वचितच असू शकते. आणि असली तरी ती त्या खूनाच्या कारस्थान्यांना व प्रत्यक्ष खून करणाऱ्यांनाच ठाऊक असते. ज्याचा खून होणार आहे त्याला किंवा इतरांना ती ठाऊक असण्याचा प्रश्नच येत नाही. इथे मात्र अख्ख्या जगाला व ज्याचा मृत्यू होणार आहे त्यालाही मृत्यूच्या अंमलबजावणी करणाऱ्यांइतकीच वेळेची माहिती आहे. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी तो एक माणूस आहे व एक माणूस आपल्यासमोर आता मरणार आहे व आपण काहीही करु शकत नाही. नुसतेच साक्षी राहणार आहोत. हे सगळे भयानक होते. कसाब किंवा अफजल गुरुप्रमाणे आपल्या नकळत हे झाले असते व झाल्यावर आपल्याला कळले असते, तर किती बरे झाले असते, असे राहून राहून वाटत होते. याकूबला फासावर दिल्याचे टीव्हीवर जाहीर झाले व निःश्वास टाकला. झाले. याकूब (मरायला नको होता तरीही) एकदाचा मेला.

अधीरता, धाकधूक संपली. पण अशुभाच्या सावल्या घोंगावत होत्याच. याकूबचा मृतदेह माहीमला त्याच्या कुटुंबाच्या मूळ घरी आणणार होते व तेथून मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनासाठी नेणार होते. अशुभाचा अंदाज घेण्यासाठी मी माहीमला गेलो. पण मी पोहोचण्याच्या १० मिनिटे आधीच वरळी सीफेसमार्गे याकूबचे शव नेण्यात आले होते. आता होता तो जागोजाग पोलीस बंदोबस्त. विरळ लोक. विरळ वाहने. मी आमच्या रेशनिंग कृती समितीच्या तेथील कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांच्यासोबत बोललो. त्यांच्यासोबत याकूबच्या घराच्या परिसरात हिंडलो आणि नंतर माहीम स्टेशनवरुन लोकल पकडून मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानला गेलो. बडा कब्रस्तानमधून अंत्यविधी उरकून लोक शांतपणे बाहेर पडत होते. रस्त्यावर, स्टेशनवर दिसणाऱ्या या लोकांची संख्या लक्षणीय होती.

मी जाण्याच्या आधीच सगळे झाल्याने स्वानुभवावरुन काही अंदाज बांधणे कठीण होते. पण माहीमच्या आमच्या कार्यकर्त्यांशी जे बोलणे झाले त्यातून काही अंदाज घेणे शक्य झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे याकूबच्या घराच्या व माहीम चर्चपर्यंतच्या परिसरात हजारो लोक जमले होते. हे लोक फक्त माहीमचे नव्हते. खूप लोक बाहेरुन आले होते. ते ‘याकूब मेमन अमर रहे’च्या घोषणा देत होते. स्त्रिया अशा प्रसंगात कमी असतात. पण इथे स्त्रियाही लक्षणीय होत्या. त्याही घोषणा देत होत्या. आमच्या या कार्यकर्त्यांना हा माहौल नवीन होता. त्यांना वातावरणात खूप ताण व काहीशी भीतीही जाणवत होती. याकूब मेमनच्या घराजवळ राहणाऱ्या एका कार्यकर्तीशी बोललो. तिच्या म्हणण्यानुसार याकूब मेमन गुन्हेगार होता हे कोणाच्याही गावी नव्हते. मुस्लिम म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, इतर समाजाच्या तुलनेत आम्हाला असेच लक्ष्य करण्यात येते, अशी रागाची भावना लोकांच्या मनात ठसठसते आहे. हे ठसठसणे काय रीतीने बाहेर येईल, याबाबत या कार्यकर्तीला भय वाटते.

मी हा अनुभव, माझी मनःस्थिती फेसबुकवर व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली. काही प्रतिक्रिया लेखी, काही तोंडी आल्या. माझ्या भावनांशी सहानुभाव दर्शवणाऱ्या, चिंता प्रकट करणाऱ्या प्रतिक्रिया आल्याच. पण जास्त करुन २५७ लोक मारणाऱ्या एका गुन्हेगाराला फाशी दिल्याचे तुम्हाला का वाईट वाटावे?, अशांना फाशीशिवाय दुसरी काय शिक्षा योग्य होती?, गुन्हेगाराच्या बाजूने अमर रहेच्या घोषणा दिल्याच कशा जातात?, या घोषणा देणारे, फाशीची शिक्षा टळावी-स्थगित व्हावी म्हणून प्रयत्न करणारे हे देशद्रोही नव्हेत का?…या प्रश्नांचा भडिमार अधिक होता.

सगळ्यांशी नाही, पण जे जवळचे होते व जे तरुण होते, अशांशी जाणीवपूर्वक बोललो. त्यांचे म्हणणे समजून घेतले. माझे म्हणणे समजवण्याचा प्रयत्न केला. ते सगळे या लेखाच्या मर्यादेत नोंदवणे कठीण आहे. काही ठळक बाबी नोंदवण्याचा प्रयत्न करतो.

एक नक्की. जे गांधी-नेहरुंच्या व त्या नंतरच्या पिढीच्या वाट्याला आले, ९२-९३ ला आमच्या अनुभवाला आले, त्यापासून पुढच्या पिढीचीही सुटका नाही. हिंदू-मुस्लिम तेढीची ही भळभळती जखम घेऊन हा अश्वत्थामा अजून किती पिढ्या हिंडणार आहे, ठाऊक नाही.

आमच्या किशोर व तरुण अवस्थेत सामाजिक व लिंगभेद, आर्थिक विषमता व शोषण, विकासाचे न्याय्य वाटप या प्रश्नांना आम्ही सामोरे जात होतो. हेच आपल्या पिढीचे ध्येय राहणार असे मानून चाललो होतो. पण बघता बघता बाबरी मशीद-रामजन्मभूमीच्या प्रश्नाने वातावरण धुमसू लागले. इतर कामे बाजूला ठेवून धार्मिक सलोखा राखण्याचे काम आम्हाला प्रधान मानावे लागले. पुढच्या पिढीलाही ते करावे लागणार आहे. भौतिक प्रश्नांच्या लढाईबरोबरच किंबहुना अधिक या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

आमच्या एका तरुण कार्यकर्तीला माझी ही चिंता जास्तीची वाटली. तिने मनाने सावरण्याचा मला सल्ला दिला. तिला मी लिहिले- ‘मी सावरलो आहे. स्थिर झालो आहे. पण ९२-९३ ला बाबरी मशीद कोसळल्यावर जो उत्पात झाला, त्यावेळी शब्दशः रक्ताची थारोळी ओलांडत व हंबरडे ऐकत धारावी-शिवाजी नगरमध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून हिंडत होतो, सांत्वनाचे लंगडे प्रयत्न करत होतो. मदत गोळा करत, वाटत होतो. बेपत्ता नवरे-मुलांना हवालदिल होऊन शोधणाऱ्या बायांना सहाय्य करत होतो. जळलेली घरं उभी करण्यासाठी आधार देत होतो. दोन्ही समाजांना हात जोडून आपापल्या घरी निर्धोक मनाने परतण्याचे आवाहन करत होतो…हे सगळं आठवतं. आणि त्याच्या आधीची लालकृष्ण अडवाणींची विष ओकत जाणारी रथयात्रा आठवते. बाळासाहेब ठाकरेंची जहरी भाषणे आठवतात. गोध्रानंतर अहमदाबादला आचार्य धर्मेंद्रचे सेक्युलर व कम्युनिस्टांना कापून काढण्याचे सभेतले आवाहन ऐकून सभेला हजर असलेल्या आमचा कसा थरकाप झाला होता ते आठवते. …असे खूप काही आठवत जाते आहे. तुम्हाला या आठवणी न मिळोत यासाठी आतडे काहीसे पिळवटते, हे खरे. पण त्यास नाईलाज आहे.’

याकूबच्या फाशीमुळे असे काही होईल, असे या तरुण मंडळींना वाटत नव्हते आणि तसे काही अजून झालेही नाही. मग ९२-९३ च्या पुनरावृत्तीची ही भीती आम्ही उगीचच घालतो, असे त्यांना वाटू शकते. दूधाने तोंड भाजलेले आम्ही ताकही फुंकून पितो, हे खरे. पण आताचे हे केवळ ताक आहे, असे मला वाटत नाही. सर्वसामान्यांना आपली रोजीरोटी मिळवण्यासाठी समाजात शांतता राहावी, असेच वाटत असते. जुने अनुभव शहाणपणाही देतात. पण मनात आत जे साचत जाते, त्याचा निचरा झाला नाही, तर त्याचा उद्रेक कधी ना कधी होणारच. श्रीकृष्ण आयोगाने ज्यांना दोषी ठरवले, त्या हिंदू नेत्यांवर ना भाजपने ना काँग्रेसच्या सरकारने काही कारवाई केली, गोध्रानंतरच्या खुनाखुनीला जबाबदार गुन्हेगारांना तुम्ही केवळ जन्मठेपच मागता, ओरिसात ख्रिश्चन बाप-मुलींना त्यांच्याच गाडीत निर्घृणपणे जिवंत जाळणाऱ्या दारासिंगची फाशी जन्मठेपेत रुपांतरित होते, राजीव गांधींच्या खुन्यांची फाशी लांबणीवर तर पडतेच, शिवाय शिक्षा माफ करण्याचाही राज्यसरकार प्रयत्न करते. मालेगाव स्फोटाचा खटला सौम्य करण्याचा सल्ला सरकारी वकिलांना सरकार देते. समझौता एक्सप्रेसमधील स्फोटाच्या गुन्हेगारांविरोधातले साक्षीपुरावे दुबळे केले जातात. हा दुजाभाव आमच्याशी केला जातो. आम्हाला या देशात समान अधिकार दिला जात नाही, ही भावना कधी ना कधी उफाळून येणारच. ९३ च्या बॉम्बस्फोटात अशाच भावनेचे बळी असलेले मुस्लिम तरुण बदला घेण्याच्या उद्देशाने सहभागी झाली होते. स्फोट घडवणारे दोषी आहेतच. पण स्फोटासाठी भावना भडकावणाऱ्या दारुचा पुरवठा करणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या नेत्यांचे काय करायचे? ते नामानिराळे राहिलेत. न्याय सगळ्यांना सारखा नाही, या मुस्लिम समाजाच्या भावनेचा याकूब प्रतीक झाला. त्याच्या अंत्यविधीला हजारोंची हजेरी त्यामुळेच होती. फाशीची तारीख जाहीर करुन, ती बरोबर त्याच्या वाढदिवसाचीच धरुन, त्यानिमित्ताने जोरदार चर्चा उसळतील याची तजवीज करुन भाजप सरकारने या प्रतीकनिर्मितीला जाणीवपूर्वक चालना दिली. मुस्लिमांना ओवेसीच आपला तारणहार वाटून ते त्याच्याभोवती केंद्रित व्हावेत व हिंदू सेक्युलर पक्ष-संघटनांना झिडकारुन भाजपभोवती गोळा व्हावेत, हा डाव यामागे असणार. संघपरिवाराचा इतिहास पाहता ही शंका निराधार नाही.

बुद्धिवादी पुरोगाम्यांनी फाशीची शिक्षाच नको ही चर्चा टीव्हीवर नको इतकी व अवेळी केली. तिच्या परिणामी तुम्ही याकूबचे समर्थक आहात, असा सामान्य हिंदूंना अर्थ लागला. फाशी ही आधुनिक जगात पूर्णपणे गैर आहे, असेच माझे म्हणणे आहे. आधुनिक जगात शिक्षा ही गुन्हेगार सुधारावा म्हणून, समाजाला त्याचा त्रास होऊ नये यासाठी त्याला वेगळे ठेवावे म्हणून दिली जाते. त्यात सूड किंवा बदल्याची भावना नसते. न्यायाधीश ही अनेक संस्कारांनी बद्ध असलेली व स्खलनशील माणसेच असतात. त्यांनी दिलेली शिक्षा भविष्यात कधीतरी चुकीची आहे, असे सिद्ध होऊ शकते. जन्मठेपेत कधीतरी हा न्याय शिक्षा भोगणाऱ्याच्या वाट्याला येऊ शकतो. फासावर दिल्यास त्याची या न्यायाची संधी पूर्णतः संपते. तसेच फाशीमुळे गुन्हे कमी झालेत, असा जगातील अनुभव नाही. म्हणूनच जगातील अनेकानेक देश फाशीच्या शिक्षेला पूर्णविराम देत आहेत. भारतानेही त्या दिशेने जायचे तत्त्वतः कबूल केले आहे. त्यामुळेही एक माणूस म्हणून याकूब मारला जाणार याचा मला विलक्षण त्रास झाला. पण आज फाशीची तरतूद आपल्याकडे आहे. याकूबचा गुन्हा हा फाशीला पात्र नसेल तर तो तसा का नाही किंवा फाशीला अजून स्थगिती मिळणे का गरजेचे आहे, इतर समाजाच्या गुन्हेगारांना व मुस्लिम समाजाच्या गुन्हेगारांना वेगळा न्याय का, हेच प्रश्न ऐरणीवर येणे निकडीचे होते. काळाचा संदर्भ खूप महत्वाचा असतो. भगतसिंग-सुखदेव-राजगुरु या त्रयींच्या फाशीनंतर फाशी ही शिक्षाच स्वतंत्र भारतात असणार नाही, असा १९३१ च्या कराची काँग्रेसमध्ये नेहरु-गांधी ठराव करतात. गोडसेने गांधींचा खून केल्यानंतर हा ठराव बाजूला सारला जातो व आंबेडकरांसारखी अनेक मंडळी विरोधात असतानाही १९४८ साली घटना समितीत फाशीची शिक्षा स्वीकारली जाते. राष्ट्रीय सहमतीत आपण पुढे गेलेले मागे येतो. तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालता, मुस्लिम समाजाचा अनुनय करता, ही पुरोगाम्यांविषयीची हिंदू समाजात निर्माण होणारी, केली जाणारी भावना दूर करणे, हे मोठे आव्हान आहे.

दैनंदिन व्यवहार सुकर होण्यासाठी समाजात शांतता हवी. त्यासाठी सामाजिक सद्भाव हवा. या सद्भावासाठी अल्पसंख्याक समुदायाला सुरक्षित वाटेल ही बहुसंख्याकांची जबाबदारी असते. धर्मांधता, विद्वेष पसरवणारे, अतिरेकी कारवाया करणारे बहुसंख्याक असोत की अल्पसंख्याक दोहोंना समान विरोध हवा. कोणत्याही प्रकारे एकाचे लाड होत आहेत व दुसऱ्याशी दुजाभाव केला जातो आहे, ही भावना तयार होता कामा नये. दुबळ्यांना विकासासाठी सवलती देताना त्यामागचा तर्क इतरांना पटवून देत राहायला हवे. देशाची उभारणी व वाटचाल यासाठी दिशादिग्दर्शक असलेली संविधानाच्या सरनाम्यातील मूल्ये समाजात खोलवर रुजवणे हे आपले परमकर्तव्य असायला हवे. आपण लोकशाही म्हणून टिकलो आहोत, हे आपले मोठेपणच आहे. पण ही लोकशाही अर्थपूर्ण करण्याच्यादृष्टीने आपण सजग व कृतिशील आहोत, असे म्हणवत नाही. तसे झालो तरच अशुभाच्या सावल्या विरत जातील व मेल्यावरही समाजाला झपाटत राहणाऱ्या याकूबसारख्यांच्या भुतांना गती मिळेल.

– सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_____________________________________________

साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, सप्टेंबर २०१५