Wednesday, September 23, 2009

'नवे पर्व' ऑक्‍टोबर 2009 साठी दिलेले साहित्‍य

राष्‍ट्रीय संपत्‍ती म्‍हणजे पैसा की जनतेचे समाधानी जीवन ?

राष्‍ट्राची संपत्‍ती, प्रगती मोजायचे सकल घरेलू उत्‍पादन हेच एक साधन आहे का ? ... हा प्रश्‍न अनेक विचारवंत उपस्थित करत असतात. आशिया खंडातील अगदी छोटा देश भूतान सर्वसामान्‍यांचे आनंदी असणे (हॅपिनेस इंडेक्‍स) हा आपल्‍या प्रगतीचा निकष मानतो. आता फ्रान्‍सचे राष्‍ट्राध्‍यक्ष सर्कोझी यांनीही हाच प्रश्‍न अख्‍ख्‍या जगासमोर ठेवला आहे. राष्‍ट्रीय संपत्‍ती मोजण्‍याच्‍या प्रचलित पद्धतीत क्रांतिकारक बदल करण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले आहे. या प्रश्‍नावर त्‍यांनी एक आयोग नेमला होता. जोसेफ स्टिगलिट्झ व अमर्त्‍य सेन या दोन नोबेल पारितोषिक विजेत्‍या अर्थतज्‍ज्ञांच्‍या या आयोगाने नेमलेल्‍या शिफारशी आपल्‍या देशासाठी सर्कोझी यांनी स्‍वीकारल्‍याच, पण अन्‍य देशांसाठी आता ते त्‍यांचा प्रचार करत आहेत.

या नव्‍या निकषांत पर्यावरण संरक्षण, काम व जीवनाचे संतुलन, जनतेच्‍या शाश्‍वत आनंदासाठी आवश्‍यक आर्थिक विकासाचा दर या मुद्द्यांचा समावेश आहे. अँजेल गुर्रिया, सरचिटणीस, आर्थिक सहकार्य व विकास संघटना हे म्‍हणतात, आर्थिक संसाधने म्‍हणजे लोकांच्‍या जीवनातले सर्वस्‍व नव्‍हे. लोकांच्‍या आकांक्षा आणि समाधानाची पातळी काय आहे, ते त्‍यांचा वेळ कसा व्‍यतित करतात, त्‍यांचे त्‍यांच्‍या समाजातील अन्‍य व्‍यक्‍तींशी नाते कसे आहे, या बाबी मोजल्‍या गेल्‍या पाहिजेत.

गेली काही दशके फ्रान्‍सच्‍या आर्थिक विकासाचा दर मंद आहे. तथापि, त्‍यांना आपल्‍या अन्‍य काही बाबींचा अभिमान आहे. फ्रान्‍सची आरोग्‍य व्‍यवस्‍था ही जगातील एक आदर्श व्‍यवस्‍था असल्‍याचे जागतिक आरोग्‍य संघटनेने नोंदवले आहे. तुलनात्‍मकरीत्‍या त्‍यांचा कामाचा आठवडा हा लहान आहे. या अभिमानात या नव्‍या मापदंडाची भर पडली आहे. सर्कोझींना त्‍याचा रास्‍त अभिमान आहे. ते जी-20 समूहाच्‍या आगामी संमेलनात हा मापदंड सर्वांनी स्‍वीकारण्‍याचे आवाहन करणार आहेत. तसेच जोसेफ स्टिगलिट्झ व अमर्त्‍य सेन यांचा हा अहवाल आगामी जागतिक बैठकांच्‍या कार्यक्रमपत्रिकेवर आणण्‍याचा ते प्रयत्‍न करणार आहेत.

(संदर्भः द हिंदू, 16 सप्‍टेंबर 2009)


राजस्‍थानच्‍या पाठ्यपुस्‍तकांतील भगवे धडे

हिंदूंच्‍या विवाहाचे मुख्‍य उद्दिष्‍ट धर्माचे अनुसरण, तर मुसलमानांच्‍या विवाहाचे लैंगिक संबंध स्‍थापित करणे हे आहे.

हिंदूंविषयी संशयाची भावना मुसलमानांत वि‍कसित झाल्‍यानंतर ब्रिटिश सरकारच्‍या निर्देशावरुन मुस्लिम लीगची स्‍थापना करण्‍यात आली.

हे उतारे आहेत राजस्‍थानच्‍या 11 वी-12 वीच्‍या पाठ्यपुस्‍तकांतील. गेली 5 वर्षे हीच पाठ्यपुस्‍तके आहेत. या काळात वसुंधरा राजे यांच्‍या नेतृत्‍वाखालचे भाजपचे सरकार सत्‍तेत होते. नव्‍या कॉंग्रेसच्‍या सरकारने नेमलेल्‍या पंचसदस्‍यीय समितीने या पाठ्यपुस्‍तकांचा अभ्‍यास करुन आपला अहवाल दिला आहे. या अहवालाच्‍या आधारे हे तसेच यासारखे अन्‍य वादग्रस्‍त व सांप्रदायिक उल्‍लेख ताबडतोब काढून टाकण्‍याचे आदेश राज्‍य शिक्षण मंडळाला राज्‍य सरकारने दिले आहेत. वसुंधरा राजेंच्‍या गतसरकारने तरुणांच्‍यात सांप्रदायिक विचारसरणी रुजविण्‍यासाठी केलेले हे प्रयत्‍न असून ते संविधानातील तत्‍त्‍वांच्‍या विरोधात आहेत, असे मत या पंचसदस्‍यीय समितीच्‍या 75 पानी अहवालात नोंदविण्‍यात आले आहे. या धड्यांचे लेखक राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ तसेच त्‍याच्‍याशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी असून संघाचा छुपा अजेंडा शिक्षणव्‍यवस्‍थेद्वारे राबविण्‍याचा त्‍यांचा हा डाव आहे, असेही या अहवालात म्‍हटले आहे.

सांप्रदायिक शक्‍ती सत्‍तेत येतात तेव्‍हा ते काय काय करतात, त्‍याचा हा एक नमुना.

(संदर्भः हिंदुस्‍तान टाईम्स, 17 सप्‍टेंबर 2009)


ओबामांची अवघड वाट

आरोग्‍य सुधारणा

ओबामांचा रस्‍ता बराच अवघड आहे, असे अमेरिकेतील अलिकडच्‍या वृत्‍तांवरुन दिसते. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्‍टन येथे हजारोंचा एक मोर्चा अलिकडेच निघाला. आरोग्‍यासंबंधीच्‍या ओबामांच्‍या प्रस्‍तावित सुधारणांना विरोध करणा-या या मोर्च्‍याने ते अमेरिकेला समाजवादाच्‍या वाटेने नेत असल्‍याचा आरोप केला आहे.

मोर्चेक-यांपैकी एकाच्‍या हातातील फलकावर लिहिले होते- गर्भपात हा आरोग्‍यसुधारणांच्‍या धोरणाचा भाग होत नाही. युक्रेनहून स्‍थलांतरित असलेल्‍या मोर्च्‍यातील एका व्‍यक्‍तीच्‍या हातातील फलकावर मजकूर होता- सोव्हिएट युनियनमध्‍ये मी पुरेसा समाजवाद भोगला आहे.

हा मोर्चा फ्रीडमवर्क्‍स या चळवळीने संघटित केला होता. करांमध्‍ये घट, कमी प्रशासन आणि सर्व अमेरिकनांना अधिक आर्थिक स्‍वातंत्र्य या त्‍यांच्‍या प्रमुख मागण्‍या होत्‍या. जवळपास अमेरिकेच्‍या सर्व भागांतून आलेल्‍यांचा या मोर्च्‍यात सहभाग होता.

ओबामा आपल्‍या भूमिकेवर ठाम आहेत. जैसे थे वाल्‍या शक्‍तींना माझा विरोध असून सुधारणा होणारच, असा त्‍यांनी मनोदय व्‍यक्‍त केला आहे. तथापि, खुद्द डेमोक्रॅटिक पक्षातले सगळे त्‍यांच्‍या बाजूने नाहीत. असे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोहोंना राजी करण्‍याचे त्‍यांचे प्रयत्‍न चालू आहेत.

इराण

अमेरिकेचे माजी अध्‍यक्ष जॉर्ज बुश यांनी बहिष्‍कृत ठेवलेल्‍या इराणशी बोलणी सुरु करण्‍याचे आश्‍वासन ओबामांनी आपल्‍या निवडणूक प्रचारावेळी केले होते. अध्‍यक्ष झाल्‍यावर ओबामांनी इराणला दोन पत्रे लिहून प्रत्‍यक्ष बोलणी करण्‍याचा प्रस्‍ताव दिला. पण इराणने प्रतिसाद दिला नाही. अखेर या महिनाअखेरची अंतिम मुदतच ओबामांनी इराणला दिली आहे. इराणहून येणारे इशारे मिश्र आहेत. इराणचे अध्‍यक्ष अहमदेनिजाद यांची एक सोडून बाकी सर्व विषयांवर बोलणी करण्‍याची तयारी आहे. तो एक कळीचा विषय म्‍हणजे, अण्‍वस्‍त्र प्रसार. याविषयी अमेरिकेकडूनच अजून स्‍पष्‍ट प्रस्‍ताव आला नसल्‍याचे इराणचे म्‍हणणे आहे.

जर इराणने बोलणी केली नाहीत, तर अमेरिका ब्रिटन, फ्रान्‍स आणि जर्मनीसहित नव्‍याने इराणवर आर्थिक बंधने लादण्‍याचा प्रस्ताव आणण्‍याची शक्‍यता आहे. इराणच्‍या तेल व वायू उद्योगावर त्‍याचे गंभीर परिणाम होतील. तथापि, युनोच्‍या सुरक्षा मंडळाचे सदस्‍य असलेल्‍या व व्‍हेटोचा अधिकार असलेल्‍या चीन व रशिया या दोन देशांचा त्‍यास पाठिंबा मिळायची खात्री नाही.

अशावेळी इस्रायल स्‍वबळावर एकट्यानेच इराणवर हल्‍ला करण्‍याची शक्‍यता आहे. इस्रायलच्‍या अशा कारवाईस ओबामांचा विरोध आहे.

जागतिक तापमानवाढ

ऊर्जा सुधारणा हा ओबामांच्‍या कार्यक्रमपत्रिकेवरील एक महत्‍वाचा मुद्दा. जागतिक तापमानवाढीला कारण असणारे कार्बन उत्‍सर्जन अमेरिकेने कमी करण्‍यासंबंधातले विधेयक प्रतिनिधी सभागृहात कसेतरी संमत करुन घेण्‍यात ओबामा यशस्‍वी झाले. पण सिनेटमध्‍ये त्‍याचे कायद्यात रुपांतर होणे अवघड झाले आहे. कोळसा, तेल आणि उत्‍पादन उद्योगांतल्‍या हितसंबंधीयांनी ओबामांच्‍या या प्रयत्‍नाविरोधात मोर्चा उघडला आहे.

साहजिकच, या वर्षी डिसेंबरमध्‍ये कोपनहॅगेन येथे होणा-या आंतरराष्‍ट्रीय जागतिक हवामान बदल परिषदेत काही सहमती होण्‍याची शक्‍यता नाही. चीन, भारत आणि अन्‍य काही प्रदूषणात आघाडीवर असणा-या देशांनी आधीच इशारा दिला आहे की, जोवर अमेरिका आपले कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याचे आश्‍वासन पाळत नाही, तोवर ते जागतिक हवामान बदलाच्‍या करारावर सही करणार नाहीत.

अफगाणिस्‍तान

ओबामांच्‍या निवडणुकीतील प्रचाराचा एक मुद्दा इराक युद्ध संपुष्‍टात आणून अफगाणिस्‍तानवर अधिक लक्ष देणे हा होता. 21000 जादा सैन्‍यदले ओबामांनी अफगाणिस्‍तानमध्‍ये धाडली आहेत. तेथील आपल्‍या आ‍धीच्‍या सै‍न्‍यप्रमुखाची हकालपट्टी करुन त्‍या जागी नवीन प्रमुखही त्‍यांनी नेमला. पण तरीही अमेरिकन सैन्‍याची होणारी हानी वाढतच आहे. अफगाण अध्‍यक्ष हमीद करजाई यांच्‍यावर अमेरिकेचा फारसा विश्‍वास राहिलेला नाही. विशेषतः नुकत्‍याच झालेल्‍या अफगाणिस्‍तानमधील अध्‍यक्षीय निवडणुकीतील त्‍यांच्‍या कथित लबाड्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर. तालिबान्‍यांविरोधातली कारवाई लवकर संपुष्‍टात आली पाहिजे, यावर अमेरिकेत चर्चा बरीच गरम आहे. यात पाकिस्‍तानच्‍या भूमिकेमुळे आणखी अडचणी तयार झाल्‍या आहेत. पाकिस्‍तान इस्‍लामी दहशतवादाऐवजी भारतालाच आपला प्रमुख धोका मानत आहे. आणि त्‍यासाठी अफगाणिस्‍तानवरील भारताचा प्रभाव कमी करण्‍यासाठी ते तालिबान्‍यांना सहाय्य करत आहे.

आर्थिक अरिष्‍ट

आर्थिक अरिष्‍ट हा ओबामांच्‍या समोरील आजचा सर्वात मोठा प्रश्‍न. अध्‍यक्षपदाची पुढची खेप त्‍यांना मिळणार की नाही, त्‍यावर ठरणार आहे.

आर्थिक अरिष्‍टातून अमेरिका हळू हळू बाहेर पडत आहे अशी आकडेवारी येत असली तरी बेकारांच्‍या संख्‍येत वाढ होत आहे. ही बेरोजगारी 10 टक्‍क्‍यांवर गेल्‍याचा अलिकडचा आकडा आहे. यातील आफ्रिकन-अमेरिकन (अमेरिकेतले काळे) जनतेत तर ही बेकारी 15 टक्‍क्‍यांवर गेली आहे.

हे झाले अधिकृत आकडे. पण जे स्‍वतःला बेकार म्‍हणून जाहीर करत नाहीत, अशा कोट्यवधी मनुष्‍यबळाच्‍या बेकारीचे प्रमाण यात नमूद नाही.

787 बिलियन्‍स डॉलर्सचे अर्थसहाय्य ओबामांनी अरिष्‍टात सापडलेल्‍या कंपन्‍यांना दिले. ते पुरेसे नाही, अशी त्‍यांच्‍यावर टीका होत आहे. आणखी अशाच मोठ्या अर्थसहाय्याच्‍या दुस-या हप्‍त्‍याची गरज आहे, असे टीकाकारांचे म्‍हणणे आहे.

अरिष्‍टातून बाहेर निघण्‍यासाठीच्‍या ज्‍या उपाययोजना ओबामा करत आहेत, त्‍यातील एक यशस्‍वी होताना दिसते आहे. जुन्‍या कार विकून नवीन घेणा-यांसाठी रोख रकमेचे अर्थसहाय्य ओबामांनी जाहीर केले. त्‍याचा फायदा लोक घेत आहेत. त्‍यामुळे कार उत्‍पादक व विक्रेते यांच्‍या उद्योगांना रोजगार मिळाला आहे. अन्‍य उपाययोजनांनी काही परिणाम साधल्‍याचे अजून तरी दिसत नाही.

(हिंदुस्‍तान टाईम्‍स व द हिंदू या वृत्‍तपत्रांतील सप्‍टेंबर महिन्‍यातील विविध बातमीपत्रांच्‍या आधारे)

वाढती महागाई व दुष्‍काळाची छायाः रेशनव्‍यवस्‍था मजबूत करा


सरकारचे अधिकृत आकडे काहीही असले तरी, गेली दीड-दोन वर्षे किरकोळ बाजारातील महागाई गतीने वाढत आहे. महागाईच्‍या यातना कमी की काय म्‍हणून आता दुष्‍काळ समोर उभा ठाकला आहे. केंद्र व राज्‍य शासन काही उपाय करत आहे. पण हे उपाय पुरेसे व मूलभूत नाहीत, अशी टीका त्‍यांवर होत आहे. या उपायांनी सामान्‍य, गोरगरीब जनतेच्‍या वेदनांना उतार पडतो आहे, असे चित्र दिसत नाही. विरोधी पक्षांकडून काही आंदोलने झाली. तथापि, त्‍यांच्‍या आंदोलनांत मूलभूत मागण्‍या व कार्यक्रम मांडला जात नाही. सत्‍ताधा-यांना विरोध व लोकांचा असंतोष आपल्‍या राजकीय हितसंबंधांसाठी शिडात भरणे, हाच प्रमुख हेतू दिसतो. डावे पक्ष, संघटना यांच्‍याकडूनही रान उठवण्‍याच्‍या पद्धतीने आंदोलने घडवण्‍याची मनःस्थिती दिसत नाही. आता तर निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. उमेदवार, जागावाटप या घाईत सगळे आहेत. रेशन व अन्‍न अधिकाराच्‍या प्रश्‍नावर काम करणा-या काही संघटना, आघाड्या आंदोलने करत आहेत. त्‍यांच्‍याकडे नेमक्‍या मागण्‍या व कार्यक्रमही आहे. तथापि, त्‍यांची व्‍याप्‍ती व खोली अजूनही मर्यादितच आहे.

1972 च्‍या दुष्‍काळानंतर महाराष्‍ट्रात शेती, रोजगार, पाणी यांबाबत मूलभूत मांडणी व कार्यक्रम निर्माण करणारे व्‍यापक आंदोलन झाले. त्‍याचा महाराष्‍ट्राच्‍या लोकजीवनावर सखोल परिणाम झाला. हा जुना वारसा असणा-या अनेक संघटना, पक्ष, व्‍यक्‍ती, विचारवंत महाराष्‍ट्रात आज आहेत. त्‍यांनी जर ठरवले तर, या जुन्‍या इतिहासाच्‍या मार्गदर्शनातून व नव्‍या परिस्थितीच्‍या अभ्‍यासातून पुन्‍हा एकदा व्‍यापक चळवळ, योग्‍य मांडणी व कार्यक्रम पुढे येऊ शकतो.

या क्रमाला पूरक व पोषक प्रयत्‍न आपल्‍या सर्वांकडून तातडीने व्‍हायला हवेत. दुष्‍काळ व महागाई या आपत्‍तींचे संधीत रुपांतर करुन मरगळलेली चळवळ पुन्‍हा चैतन्‍यशील करणे, ज्‍याचा सुवर्ण महोत्‍सव सध्‍या साजरा होत आहे, त्‍या संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनाला अभिप्रेत असलेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या विकासाचा आराखडा मूर्त करणे या दिशेने आपण कामाला लागणे आवश्‍यक आहे.

तूर्त, महागाईबाबत अभ्‍यासक व कार्यकर्त्‍यांनी सूचवलेले काही उपाय व मागण्‍या चळवळीसाठी खाली मांडत आहेः

1. साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई करुन महागाई वाढविणा-या साठेबाजांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तूर डाळ शेतक-याकडून 20 रु.ला घेतली जाते. प्रक्रिया, वाहतूक व पुरेसा नफा धरुनही ती 40 रु. प्रति किलोच्‍या वर जाता कामा नये, असे असतानाही आज ती 100 रु.ला विकली जाते. याचा अर्थ उत्‍पादक व उपभोक्‍ता यांच्‍या मधला दलाल, साठेबाज व्‍यापारी हेच 60 रु. फस्‍त करतात. या दलालांना वठणीवर आणणे आवश्‍यक आहे.

2. महागाई घाऊक वस्‍तूंच्‍या किंमतीवर मोजण्‍याऐवजी ती सामान्‍य ग्राहक खरेदी करत असलेल्‍या वस्‍तूंच्‍या किरकोळ किंमतीवर मोजण्‍यात यावी. त्‍यामुळे महागाईच्‍या वाढीचा खरा बोध होईल.

3. ज्‍या जीवनावश्‍यक वस्‍तू महागतात त्‍या रेशनवर स्‍वस्‍तात व पुरेशा प्रमाणात दिल्‍या की गरीब व सामान्‍य माणसाचे संरक्षण होतेच शिवाय साठेबाजी करुन कृत्रिमरीत्‍या वाढवलेले बाजारभावही कमी होतात. यासाठीच सरकारने रेशनव्‍यवस्‍था सुरु केली. आज रेशनव्‍यवस्‍था मजबूत व विस्‍तृत करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी-

3.

a. सर्व गरजवंतांना रेशन व्‍यवस्‍थेत आणले पाहिजे. त्‍यासाठी शासनाने खास मोहिमा काढल्‍या पाहिजेत.

b. दारिद्र्यरेषेखालच्‍या पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठीची वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा 15000 रु. वरुन 1 लाख रुपयांपर्यंत वाढवा. याचाच अर्थ, पिवळ्या रेशनकार्डधारकांप्रमाणेच केशरी कार्डधारकांनाही निम्‍म्‍या दरातील 35 किलो धान्‍य दरमहा खात्रीने मिळाले पाहिजे.

c. गहू, तांदूळ, केरोसीन याचबरोबर डाळी, खाद्यतेल, साखर इ. महागाईचा फटका बसलेल्‍या जीवनावश्‍यक वस्‍तूंचा रेशनमध्‍ये समावेश झाला पाहिजे.

d. महाराष्‍ट्रात खाल्‍ली जाणारी व उत्‍पादित होणारी ज्‍वारी, बाजरी, नागली ही भरडधान्‍ये रेशनवर उपलब्‍ध व्‍हायला हवी. त्‍यासाठी इतर अनेक राज्‍यांप्रमाणे केंद्रसरकारकडून आपल्‍या वाट्याची सबसिडी प्रत्‍यक्ष घेऊन स्‍थानिक धान्‍यखरेदी करावयास हवी. यामुळे कोरडवाहू शेतक-यालाही किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळेल. महाराष्‍ट्र डाळींच्‍या उत्‍पादनात देशांत क्रमांक 1 वर आहे. खाद्यतेलात तो क्रमांक 2 वर आहे. कांदा उत्‍पादनात तो क्रमांक 1 वर आहे. ज्‍वारी-बाजरीच्‍या उत्‍पादनात तो क्रमांक 2 वर आहे. असे असतानाही या वस्‍तू रेशनवर राज्‍य सरकार का देत नाही, याचा जाब त्‍यास विचारलाच पाहिजे.

e. वरील बाबी करण्‍यासाठी नेहमी केंद्राकडे बोट दाखवण्‍याचे महाराष्‍ट्र सरकारने बंद केले पाहिजे. केंद्राने ठरविलेल्‍या लाभार्थ्‍यांच्‍या मर्यादेबाहेर जाऊन स्‍वतःच्‍या तिजोरीतून खर्च करुन रेशन व्‍यवस्‍था अधिक परिणामकारक करण्‍याचा प्रयत्‍न अनेक राज्‍यांनी केला आहे. उदा. छत्‍तीसगड राज्‍याने आदिवासी, दलित व स्‍त्रीप्रमुख असलेल्‍या सर्व कुटुंबांना सवलतीच्‍या रेशन योजनेत समाविष्‍ट केले आहे. त्‍यामुळे या राज्‍यातील 70 टक्‍के जनता आज 2 रु. किलो भावाने 35 किलो धान्‍य दरमहा घेत आहे. त्‍यातील अंत्‍योदय योजनेखाली येणा-यांना तर हा दर फक्‍त 1 रु. आहे. केरळमधील 11 टक्‍के जनतेला केंद्र सरकारने गरिबांच्‍या रेशनचा लाभ दिलेला आहे. तथापि, गरिबी मोजण्‍याचे स्‍वतःचे निकष लावून आपल्‍या राज्‍यातील 30 टक्‍के जनतेला केरळ गरिबांसाठीच्‍या रेशनचा लाभ देत आहे. 2 रु. किलो दराने 35 किलो धान्‍य दरमहा ते या लोकांना देत आहे. त्‍यासाठीचा खर्च अर्थात स्‍वतः सोसत आहे. आंध्र प्रदेश आपल्‍या राज्‍यातील 80 टक्‍के जनतेला 2 रु. किलो भावाने माणशी 6 किलो धान्‍य दरमहा देत आहे. तामिळनाडू तर राज्‍यातील सर्व जनतेला 1 रु. किलो दराने 16 ते 20 किलो धान्‍य देत आहे. या रीतीची पावले उचलण्‍यासाठी अनेकवार मागणी करुनही आपले फुले-शाहू-आंबेडकरांच्‍या नावांचा घोष करणारे महाराष्‍ट्र सरकार याबाबतीत अत्‍यंत उदासीन, बेपर्वा व निगरगट्टही आहे. ते स्‍वतःच्‍या खिश्‍याला हात लावायला तयार नाही. एवढेच नव्‍हे तर, केंद्राने देऊ केलेले धान्‍यही पूर्णपणे उचलण्‍याची खबरदारी ते घेत नाही. महाराष्‍ट्र सरकारला याचा जाब विचारलाच पाहिजे.

f. रेशनवरील धान्‍याच्‍या परिणामकारक वितरणासाठी नाशिक जिल्‍ह्यात यशस्‍वी झालेली घरपोच धान्‍य योजना सार्वत्रिकपणे अंमलात आणा.

4. आज केंद्राच्‍या गोदामात धान्‍य भरुन वाहू लागले आहे. ते ठेवायला जागा नाही. अशावेळी हे धान्‍य रेशनवर मोठ्या प्रमाणात आणून तसेच खुल्‍या बाजारात फ्री सेलद्वारे आणून वाढलेले दर कमी करता येतील.

5. डाळी तसेच खाद्यतेले यांची आयात करुन त्‍यांची बाजारपेठेतील उपलब्‍धता वाढवल्‍यास त्‍यांचे वाढलेले दर कमी करता येतील.

6. अधिक उत्‍पादक वाणांचे संशोधन तसेच संशोधित वाणांचे शेतक-यांपर्यंत विनाविलंब वितरण यासारख्‍या तज्ज्ञांनी केलेल्‍या शेतिविषयक सुधारणांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.

7. रोजगार हमी कायद्याप्रमाणेच अन्‍न सुरक्षा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे. ही अत्‍यंत चांगली गोष्‍ट आहे. त्‍याचे स्‍वागतच केले पाहिजे. या कायद्याचा मसुदा चर्चेसाठी सरकार जाहीर करणार आहे. या कायद्यात आजच्‍या सर्व चांगल्‍या तरतुदी कायम राहून गरीब, दुबळ्या विभागांची अन्‍नसुरक्षा राखण्‍याच्‍यादृष्‍टीने इतर अनेक पोषक तरतुदींचा समावेश झाला पाहिजे. सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना या कायद्यासंबंधी लिहिलेल्‍या पत्रातील सर्व तरतुदींचा समावेश या कायद्यात झाला पाहिजे. हा कायदा पातळ करण्‍याचे जोरदार प्रयत्‍न सध्‍या केंद्र सरकारमधील घटकांकडूनच चालू आहेत. शरद पवारांच्‍या नेतृत्‍वाखालील अन्‍न मंत्रालयाने प्रस्‍तावित केलेल्‍या मसुद्यात या कायद्याची अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संपूर्णतः राज्‍यांची व केंद्रशासित प्रदेशांची असावी, अशी सूचना आहे. याचा अर्थ, केंद्र सरकारने आपली जबाबदारी टाळण्‍याचा हा प्रकार आहे. शिवाय गरीबीरेषेखालील कुटुंबांची आजची मर्यादा गोठवावी व त्‍यांच्‍यासाठीच हे कायद्याचे संरक्षण असावे, अशीही सूचना आहे. ही सूचना अंमलात आली, तर कायदा नको असे म्‍हणण्‍याची वेळ येईल. मुंबईत आज 1 टक्‍क्‍यापेक्षा कमी लोकांना गरीबांसाठीचे पिवळे कार्ड आहे. म्‍हणजे, उरलेले 99 टक्‍के कायद्याने रेशनच्‍या बाहेर पडतील. आजचे गरीब ठरवावयाचे निकष, त्‍यांची निवड करण्‍याची पद्धती, सदोष याद्या हे लक्षात घेता ही सूचना घातकच ठरेल. कायदा गैरलागू करण्‍याच्‍या या प्रयत्‍नांना जागरुक राहून विरोध करायला हवा.

या मागण्‍या करण्‍याबरोबरच पुढील काही कार्यक्रम आपण अंगिकारले पाहिजेत. ते असेः

1. अधिकृतपणे प्रत्‍येक केशरी कार्डधारकाला 7.20 रु. प्रति किलो गहू व 9.60 रु. प्रति किलो तांदूळ असे दोन्‍ही मिळून 35 किलो धान्‍य मिळायला हवे. तथापि, त्‍यांच्‍यासाठीचा कोटा सरकार पाठवतच नव्‍हते अथवा अत्‍यल्‍प पाठवत होते. परिणामी केशरी कार्डधारकांना धान्‍य जवळपास मिळतच नव्‍हते. आता महागाईच्‍या पार्श्‍वभूमीवर आणि गोदामात प्रचंड धान्‍यसाठा असल्‍याने सप्‍टेंबरपासून 15 किलो धान्‍य, 1 लीटर पामतेल (30 रु. लीटर), तूरडाळ (55 रु. प्रति किलो), 2 किलो साखर (20 रु. प्रति‍ किलो) मिळणार आहे. पिवळ्या व अंत्‍योदय कार्डांनाही पामतेल, तूरडाळ मिळणार आहे. हे अपुरे आहे, ते पुरेसे हवे, ही मागणी करायचीच. पण, हे जे सरकारने देऊ केले आहे, त्‍याची लोकांमध्‍ये जागृती करणे, त्‍याच्‍या अंमलबजावणीचे झगडे हा आपला दैनंदिन कार्यक्रम व्‍हायला हवा. तो केल्‍याने आहे ते टिकविणे व लोकांचा रेशनव्‍यवस्‍थेत रस तयार करणे साधता येऊ शकेल. ते झाले तरच पुढच्‍या मागण्‍यांना पाठबळ तयार होईल. चळवळीने त्‍यास प्राधान्‍य देणे आवश्‍यक आहे.

2. परिषदेतील तसेच इतरही मागण्‍यांवर आपल्‍या विभागात चौकाचौकात थाळ्या वाजविणे, लाटणे मोर्चा काढणे असे महागाई विरोधी कार्यक्रम घ्‍यायला हवेत. विधानसभांच्‍या निवडणुकांचा माहौल सुरु होत आहे, हे लक्षात घेऊन सत्‍ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोन्‍ही घटकांचे लक्ष वेधण्‍याचे प्रयत्‍न करायला हवेत. तसेच निवडणुकांनंतर नवीन सत्‍ताधा-यांसमोरही हे प्रश्‍न मांडण्‍याच्‍या दृष्‍टीने परिषदांसारखे उपक्रम घ्‍यायला हवेत.

3. अन् समविचारी मंडळींना एकत्रित करुन राज्यस्तरीय व्यापक आंदोलन उभे राहते का, याची चाचपणी करायला हवी.

4. प्रस्‍तावित अन्‍न सुरक्षा विधेयकाचा मसुदा जाहीर झाल्‍यावर त्‍यावर आपण जागोजागी चर्चा संघटित करुन चांगल्‍या सूचना एकत्रित करणे गरजेचे आहे. तसेच अशा योग्‍य सूचनांसहित तो कायदा लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे, यासाठी सरकारवर दबाव आणण्‍यासाठी जनमत संघटित केले पाहिजे.

वरील मुद्द्यांबाबत विचारविनिमय करुन त्‍यात आणखी भर घालता येऊ शकेल.

- सुरेश सावंत

लाल निशाण पक्षाचे पक्षगीत

फडकत आम्‍ही उभे ठेविले

फडकत आम्‍ही उभे ठेविले, लाल निशाण हे लाल निशाण || धृ ||

कुणी म्‍हणाले, हे एकांडे

ही तर पोरे आताची

कशी प्रतिष्‍ठा लाभे यांना

आंतरराष्‍ट्रीय कीर्तीची

कष्‍टक-यांना निष्‍ठा देणे हेच आमुचे शक्तिस्‍थान || 1 ||

खुशाल वाटो मठ हा कोणा

संघटनेचे बळ पसरे

कष्‍टक-यांची नवीन शक्‍ती

महाराष्‍ट्री ती या विचरे

प्रतिगाम्‍यांना या राष्‍ट्राच्‍या होईल आता हे आव्‍हान || 2 ||

तत्त्वनिष्‍ठता आम्‍ही राखिली

शर्थ करुनी धीराने

जे जे ठावे आम्‍हास झाले

जनास ते ते शिकविणे

पदोपदी जनसंघटनेचा कृ‍तीत आणला मंत्र महान || 3 ||

दिव्‍यसंगरी वर्गलढ्याच्‍या

लेनिनवादी दृष्‍टीचे

रहस्‍य उमजो दारिद्र्याचे

तसेच त्‍याच्‍या नाशाचे

कामगार हा नेता व्‍हावा होऊनी त्‍याला वर्गज्ञान || 4 ||

वर्गलढ्याचे अखेरचे ते

भारत अजूनी घडायचे

कौरव किंवा पांडव यास्‍तव

नाही आता लढायचे

एकलव्‍य चिरवंचित घेई राज्‍य स्‍थापण्‍या धनुष्‍यबाण || 5 ||

- कॉ. सुमन कात्रे

आघाडीचे सूत्र


कम्‍युनिस्‍ट विचारप्रणाली व कम्‍युनिस्‍ट पक्ष संघटना ही समाजातील अन्‍य पुरोगामी विचारप्रणालींची व त्‍यावर आधारुन समाजकार्य करणा-या संघटनांची व व्‍यक्‍तींची स्‍पर्धक नाही. ती त्‍यांची मित्रशक्‍ती आहे. जेथे जेथे असे क्रम, मग ते समाज विभागाच्‍या रुपाने असो, संघटनेच्‍या वा संघटनेतील एखाद्या प्रवाहाच्‍या रुपाने असो, दृगोचर होऊ लागतात, तेथे तेथे ते हेरुन त्‍यांच्‍याशी त्‍यांच्‍याशी आपल्‍या स्‍वतःच्‍या विचारसरणीच्‍या, धोरणाच्‍या व वर्गनिष्‍ठेच्‍या आत्‍मविश्‍वासाने तसेच आपापल्‍या परिस्थितीत आपापल्‍या जाणीवेच्‍या पातळीप्रमाणे इतर जे पुरोगामी दिशेने धडपडत असतील त्‍यांच्‍या प्रयत्‍नांबद्दल आदरभाव बाळगून त्‍यांच्‍याशी क्रांतिकारक नम्रतेने संबंध जोडण्‍याचे आणि क्रांतिकारक शक्‍ती संघटितपणे उभ्‍या करण्‍याच्‍या महान कार्यात त्‍यांचे जे काही सहाय्य होऊ शकत असेल ते घेण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याची व त्‍याचवेळी त्‍यांच्‍या पाठीमागील समुदायांशी प्रत्‍यक्ष चळवळीचे तसेच वैचारिक संबंध बांधण्‍याचे बाबतीत कुठलाही संकोच न करण्‍याची अथवा बंधन न स्‍वीकारण्‍याची नवजीवन संघटनेची भूमिका राहिली आहे. या भूमिकेमुळेच निरनिराळ्या चळवळींतील अनेक कार्यकर्ते आज आपल्‍या पक्षात आहेत. अशा प्रकारच्‍या शक्‍तींशी मध्‍यमवर्गीय स्‍पर्धेच्‍या पद्धतीने वागण्‍याची, त्‍यांच्‍या उणिवांवर भर देऊन त्‍यांचा पाणउतारा करण्‍याची व त्‍यांचा वैचारिक संघटनात्‍मक मोड करुन अथवा आमिष देऊन त्‍यांना आपल्‍या वर्चस्‍वाखाली आणण्‍याची जी संयुक्‍त आघाडीच्‍या व्‍यवहाराला घातक ठरणारी रीत कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या पुढारी कार्यकर्त्‍यांनी रुढ केली होती, त्‍यापासून वेगळी, आंतरराष्‍ट्रीय कम्‍युनिस्‍ट चळवळीची खरीखुरी संयुक्‍त आघाडी बांधण्‍याची रीत ही कॉ. एस. कें. ची या भूमीतील कम्‍युनिस्‍ट चळवळीला खास वैयक्तिक देणगी आहे, असे म्‍हटले तर अति‍शयोक्‍ती होणार नाही. हिंदुस्‍तानसारख्‍या परतंत्र मागास देशात पुरोगामित्‍वाचा मक्‍ता फक्‍त कम्‍युनिस्‍टांकडे नाही. देशातील सर्व पुरोगामित्‍वाचे संकलन करण्‍याची जबाबदारी कम्‍युनिस्‍टांची आहे. कम्‍युनिस्‍ट विचारसरणीचे जे शास्‍त्रीयत्‍व व जी मौलिकता आहे, त्‍यामुळे सर्व पुरोगामित्‍वाचा पुढाकार कम्‍युनिस्‍ट आंदोलनाकडे येणे अपरिहार्य आहे. परं‍तु, तो त्‍यांनी आपल्‍या कार्याने व सर्वांच्‍या मान्‍यतेने मिळवला पाहिजे. संघटनात्‍मक अथवा अन्‍य क्‍लृप्‍त्‍या करुन बळकावता कामा नये. तसा तो कधीच बळकावता येत नाही. याबाबतीत घाई करुन चालत नाही. धिमेपणाने व्‍यवहार करावा लागतो, ही व्‍यावहारिक शिकवणसुद्धा व्‍यक्तिशः कॉ. एस. कें.चीच आहे. नवजीवन संघटनेच्‍या व नंतर लाल निशाण कार्यकर्त्‍यांच्‍या व्‍यवहारात इतर सर्वांच्‍या स्‍पर्धाशील व्‍यवहाराच्‍या पार्श्‍वभूमीवर उठावाने दिसणा-या पद्धती आजसुद्धा उपयुक्‍त आहेत आणि त्‍या काटेकोरपणे अवलंबल्‍या पाहिजेत. नवीन येणा-या कार्यकर्त्‍याला जुन्‍यांनी शिकविल्‍या पाहिजेत. म्‍हणून हा खास उल्‍लेख आहे.

(कॉ. यशवंत चव्‍हाण, पक्षांतर्गत विचारविनिमय, 1979, पान 69-70)

रिडालोसला लाल निशाण पक्षाचे पत्र

लाल निशाण पक्ष

श्रमिक, रॉयल क्रेस्‍ट, लो. टिळक वसाहत गल्‍ली क्र.3, दादर, मुंबई- 400014. फोनः022-24102180


11 सप्‍टेंबर 2009

प्रिय मा. रामदासजी आठवले,

निमंत्रक,

रिपब्लिकन डावी लोकशाही समिती

महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. आपल्‍या पुढाकाराने रिपब्लिकन, डाव्‍या, समाजवादी विचारसरणीच्‍या तसेच अन्‍य अनेक पक्षांची रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्‍थापन झाली आहे. समितीतले आपण सगळे जण जागावाटपाच्‍या अत्‍यंत किचकट व प्रचंड घाईच्‍या कामात सध्‍या व्‍यग्र आहात. अशा व्‍यग्रतेतून वेळ काढून आपण आमचे हे पत्र वाचाल, अशी अपेक्षा आहे.

ही समिती स्‍थापन करताना ही एकजूट केवळ विधानसभा निवडणुकांपुरती राहणार नसून त्‍यानंतरही कष्‍टकरी-दलितांच्‍या प्रश्‍नावर कार्यरत राहणार असल्‍याचे आपण जाहीर केले आहे. तसेच संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनात एकत्र असलेले आम्‍ही लोक पुन्‍हा एकत्र येऊन संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनाला अपेक्षित असलेला परंतु अपुरा राहिलेला कार्यक्रम पुढे नेणार आहोत, असेही आपण व्‍यक्‍त केले आहे. आपल्‍या या भूमिकेचे आम्‍ही मनःपूर्वक स्‍वागत करतो व निवडणुकांनंतर आपल्‍या पुढाकाराखाली होणा-या यासंबंधीच्‍या आंदोलनाचा सक्रीय भाग होण्‍याची इच्‍छाही प्रदर्शित करतो.

महाराष्‍ट्र राज्‍य निर्मितीला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईसह महाराष्‍ट्रासाठी जी संयुक्‍त महाराष्‍ट्र समिती बनविण्‍यात आली होती, त्‍यात सोशालिस्‍ट पार्टी, कम्‍युनिस्‍ट पार्टी तसेच शेड्युल्ड कास्‍ट फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष हे मुख्‍य घटक होते. कॉ. डांगे व साथी एस.एम. जोशी यांच्‍या सहकार्याच्‍या रुपाने कम्‍युनिस्‍ट व सोशालिस्‍टांची एकजूट घडविण्‍यात लाल निशाण पक्षाने कॉ. दत्‍ता देशमुखांच्‍या रुपाने महत्‍वाची भूमिका बजावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्‍यासाठी समितीतर्फे दत्‍ता देशमुख, क्रांतिसिंह नाना पाटील, एस.के. लिमये हीच मंडळी गेली होती. बाबासाहेबांनी शिष्‍टमंडळाचे प्रेमाने स्‍वागत केले आणि ते म्‍हणाले, संयुक्‍त महाराष्‍ट्राला माझा संपूर्ण पाठिंबा आहेच. आणि पुढे त्‍यांनी दत्‍ता देशमुख व नाना पाटलांचा हात हातात घेऊन, आपुलकीने पण खोचकपणे विचारले, संयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य होईल तेव्‍हा तुम्‍ही मराठे (सत्‍तेवर) याल, त्‍यावेळी माझ्या दलित जनतेशी कसे वागणार?’ दत्‍ता व नाना पाटील या दोघांनी तळमळीने उत्‍तर दिले, कधीही अंतर देणार नाही.

57 च्‍या निवडणुकीत बी.सी. कांबळे व दा.म.शिर्के या दोघांना कॉ. दत्‍ता देशमुख व कॉ. संतराम पाटील यांनी साथीला घेऊन बरोबरीची मते मिळवून विजयी होण्‍यात सहाय्य केले. समितीत जागावाटपांवरुन मतभेद सुरु झाले तेव्‍हा, प्रसंगी आम्‍हाला एकही जागा देऊ नका, पण एकजूट टिकवा, ती मोडाल, तर सर्व पडाल, असा इशारा दत्‍ता देशमुखांनी दिला होता. एकमताने लाल निशाण पक्षाच्‍या वाट्याला आलेल्‍या आठही जागा त्‍यावेळी निवडून आल्‍या. त्‍यात त्‍यावेळच्‍या संयुक्‍त मतदारसंघ पद्धतीत कांबळे व शिर्के उभे असलेल्‍या अनुक्रमे नगर व कोल्‍हापूर या जागांचा समावेश होता.

मुंबईसह संयुक्‍त महाराष्‍ट्र मिळविण्‍यात मराठी जनता यशस्‍वी झाली. दिल्‍लीहून महाराष्‍ट्राचा मंगल कलश घेऊन आलेल्‍या यशवंतराव चव्‍हाणांनी केलेल्‍या आवाहनाला मान देऊन शेतकरी कामगार पक्षाचे मातब्‍बर पुढारी शहरी, ग्रामीण नवधनिकांच्‍या वर्चस्‍वाखाली गेलेल्‍या कॉंग्रेसमध्‍ये सामील झाले. वैचारिक मतभेदांचे निमित्‍त करुन समाजवादी व कम्‍युनिस्‍ट आपापल्‍या मूळ छावण्‍यांत परतले. मुंबईसह महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेनंतरच्‍या पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत 62 साली संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचा प्रचंड पराभव झाला. महाराष्‍ट्रावर शहरी व ग्रामीण धनिकांचे वर्चस्‍व प्रस्‍थापित झाले. ते आजतागायत आहे. मुंबईवरील बडे भांडवलदार, बिल्‍डर व व्‍यापारी यांचे प्रभुत्‍व दिवसेंदिवस वाढतेच आहे. कामगार-शेतकरी एकजुटीचा प्रभाव आणि दबाव महाराष्‍ट्र सरकारच्‍या धोरणावर पाडण्‍याचे संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे उद्दिष्‍ट विफल झाले आहे. अन्‍यायाने महाराष्‍ट्राबाहेर ठेवण्‍यात आलेल्‍या बेळगाव, निपाणी, बिदर हे मराठीबहुल भाग अजूनही आपण मराठी राज्‍यात समाविष्‍ट करु शकलेलो नाही.

आम्ही लाल निशाण पक्ष गेली 20 वर्षे देशाच्‍या राजकारणाचा विचार करताना, धर्मांध झोटिंगशाही राजकारणाला विरोध करण्‍यासाठी कॉंग्रेससह सर्व सर्वधर्मसमभाव मानणा-या पक्षांच्‍या एकजुटीचे प्रवक्‍तेपण सातत्‍याने करीत आहोत. केंद्रातील संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्‍या काही धोरणाबाबत आमची तीव्र टीका असतानाही व त्‍याच्‍या विरुद्ध लोकांना निःसंकोचपणे संघटित करत असतानाही, अखिल भारतीय पातळीवर कॉंग्रेससह व्‍यापक लोकशाही आघाडी करण्‍याच्‍या धोरणात बदल करण्‍याची वेळ आली आहे, असे वाटत नाही.

मात्र महाराष्‍ट्रातील कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी सरकारचा व्‍यवहार हा असंवेदनशील, ग्रामीण व शहरी सधनांचे हितरक्षण करणारा व केंद्र सरकारने घेतलेल्‍या जनस्‍वी भूमिका व योजना अंमलात आणण्‍याबाबत दुर्लक्ष करणारा, महाराष्‍ट्राचा मोठा भाग असलेल्‍या दुष्‍काळी व कोरडवाहू शेतीकडे गुन्‍हेगारी दुर्लक्ष करणारा आहे.

अशावेळी खरे पाहता, संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे पुनरुज्‍जीवन व्‍हावे, ही काळाची गरज आहे. महाराष्‍ट्राचा कामगार वर्ग आज फारच दुर्बल झाला आहे. समितीचा मुख्‍य आधार असलेला मुंबईचा गिरणी कामगार, गिरणी मालक आणि सरकार यांनी संगनमताने नेस्‍तनाबूत केला आहे. संघटित क्षेत्रातील इतर कामगार पक्षीय संघटनात्‍मक फुटीमुळे राजकीय दृष्‍ट्या प्रभावशून्‍य बनला आहे. असंघटित क्षेत्रातील संख्‍येने अफाट वाढलेला कामगार विस्‍कळीत आहे. खेडोपाडीचा भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, आदिवासी सधनांच्‍या वर्चस्‍वाखाली आहे.

प्रत्‍येक धंद्यात एक संघटना व सर्व धंद्यातील कामगारांच्‍या वर्गीय एकजुटीची एकच एक केंद्र संघटना, तसेच प्रत्‍येक खेड्यात भूमि‍हीन शेतमजूर, गरीब शेतकरी यांच्‍या एकजुटीच्‍या संघटना व्‍हायला हव्‍यात. श्रमिकांच्‍या या संघटनांबरोबरच सामाजिक अत्‍याचारांना तोंड देणा-या आदिवासी, दलित व महिला या समाजविभागांकडे अग्रक्रमाने लक्ष द्यायला हवे. याचबरोबर आरोग्‍य, शिक्षण व अन्‍य नागरी तसेच सांस्‍कृतिक प्रश्‍न हाती घ्‍यायला हवेत. संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीने या भूमिका घेतल्‍या होत्‍या. त्‍यामुळे समितीला सामर्थ्‍य प्राप्‍त झाले होते. पण समिती विसर्जित झाली आणि त्‍या भूमिकाही उधळल्‍या गेल्‍या. या जनस्‍वी भूमिकांचा आज एकजुटीने पुरस्‍कार अत्‍यंत निकडीचा आहे. म्‍हणूनच पुरोगामी संपूर्ण संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीच्‍या रुपात पुनरुज्‍जीवन आम्‍हाला समयोचित वाटते.

निवडणुकीनंतर या विभागांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जो आंदोलनाचा कार्यक्रम ठरवावयास आपण बसाल, त्‍यावेळी आम्‍हाला आपण निमंत्रित कराल, ही अपेक्षा आहे.

आपल्‍याला मनःपूर्वक शुभेच्‍छा !

आपला भ्रातृभावपूर्वक,

(कॉ. यशवंत चव्‍हाण)

Tuesday, June 2, 2009

30 मे 2009 च्‍या लोकसत्‍तेतील राणी दुर्वे यांच्‍या लेखावर ईमेलने दिलेली प्रतिक्रिया

प्रिय राणी दुर्वे,

सप्रेम नमस्‍कार.

तुमचा 'नौतपा आणि फुआर'हा लेख ('लेख'हा शब्‍द तसा रुक्षच आहे,निसर्गचित्र, निसर्गशिल्‍प, शब्‍दशिल्‍प असे काही तरी मला म्‍हणायचे आहे) खूप आवडला. नित्‍याच्‍या वर्तमानपत्री वाचनाच्‍या 'नौतपा'नंतर अशी 'फुआर'क्वचितच चिंब करते.

तुम्‍ही उल्‍लेखिलेली मुंबईची कधीकाळची थंडी मीही लहानपणी अनुभवली आहे. 'मुंबईची संस्‍कृती सपाट व्‍यक्तिमत्‍वहीन होत गेली तसे तिथले ऋतूही व्‍यक्तिमत्‍व हरवत गेले की काय न कळे.'असे मलाही वाटते. मुंबईच्‍या बाहेर गेले की तिथल्‍या कडाक्‍याच्‍या उन्‍हाच्‍या झळा आणि गोठवणारी थंडी यांचेही विलक्षण अप्रूप, असोशी वाटते. त्‍या प्रदेशांना आपले एक खास 'व्‍यक्तित्‍व'असते, हेच बहुधा त्‍याचे कारण असावे.

अलिकडे दुर्मिळ झालेली चांगली मराठी कानावर आली, वाचायला मिळाली की अशीच 'फुआर'अनुभवास येते. तुमच्‍या भाषेचे लालित्‍य मोकळ्या माळावर अवचित गाठणा-या श्रावणसरींची आठवण देऊन गेले. विशेषतः शेवटून तिस-या परिच्‍छेदातील 'नौतपा संपेल, त्‍या दिवशी......अवघा ताप निवून जातो.'या ओळी अप्रतिम. रोमांचित करत अखेर उन्‍मनी अवस्‍था प्रदान करणा-या.

भाषेच्‍या समृद्धीसाठी इंग्रजीप्रमाणे नामांची क्रियापदे मराठीत का करु नयेत, उदा. 'ग्रंथ'वरुन 'ग्रंथणे', असे मत कुसुमाग्रजांनी व्‍यक्‍त केल्‍याचेकोठेतरी वाचले होते. तारांबळू, केकावणे, शांतवले...हे तुमचे शब्‍दप्रयोग समर्पक, अर्थवाही तसेच मराठीला श्रीमंत करणारे.

मी तसे तुमचे दोन-तीनच लेख वाचले आहेत. (अर्थात, ही माझी मर्यादा. एकूणच ललित लेखन वाचणे हा प्राधान्‍याचा भाग नसल्‍याने असेल.) तुमच्‍या इतर लेखनात अजून कितीतरी अशी सौंदर्यस्‍थळे असतील.

वातावरणातल्‍या अन् मनातल्‍याही 'नौतपा'ला काही काळ तुमची फुआर रिमझिमवून गेली. त्‍याबद्दल आपल्‍या लेखणीला धन्‍यवाद.

...अन् अर्थातच मनःपूर्वक शुभेच्‍छाही!

आपला,

सुरेश सावंत,एक वाचक

Thursday, May 28, 2009

रमाबाई कॉलनी हत्‍याकांडाचा निकाल आणि माझी अस्‍वस्‍थता



खैरलांजीच्‍या निकालापाठोपाठ रमाबाई कॉलनीतील गोळीबाराच्‍या खटल्‍याचा निकालही आश्‍वासक लागला. आंबेडकरी समुदायाच्‍या आपल्‍याला न्‍याय मिळत नाही, या वेदनेवर ही एक फुंकर होती.
रमाबाई कॉलनीत 11 जुलै 97 रोजी पोलिसांच्‍या गोळीबारात 10 माणसे हकनाक मेली. राजावाडी हॉस्पिटलमधील एका खोलीत ठेवलेली ती प्रेते आताही माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्‍यात पुरुष, स्त्रिया आणि मुलेही होती. ते दृश्‍य विलक्षण अस्‍वस्‍थ करणारे होते. त्‍या निष्‍पाप जीवांच्‍या घरच्‍यांचा टाहो, आंबेडकरी चळवळीची विकलता आणि प्रगतीलशील चळवळींची विफलता यांचा संकलित परिणाम ही अस्‍वस्‍थता गडद करत होता. एका असहाय्यतेच्‍या भयानक, खोल दरीत आपण कोसळत आहोत, अशी मनःस्थिती झाली होती. पुढे 10 वर्षांनी 29 सप्‍टेंबर 2006 सालच्‍या खैरलांजीच्‍या निर्घृण हत्‍याकांडाचा अंगावर काटा आणणारा वृत्‍तांत कळल्‍यावरही हीच अवस्‍था मी अनुभवली. सगळ्या प्रसारमाध्‍यमांत बराच काळ गाजल्‍यामुळे या दोन घटना आपल्‍या सगळ्यांच्‍या ठळकपणे लक्षात आहेत. गवई बंधूंचे डोळे काढणे, पोचीराम कांबळेला जिवंत जाळणे याही घटना अशाच गाजलेल्‍या. पण खूप वर्षांपूर्वीच्‍या. अशी प्रसिद्धी न मिळणा-या दलित अत्‍याचाराच्‍या घटना आजही घडत आहेत. त्‍यांचे वर्णन ऐकले की तीच असहाय्यतेची भावना मन व्‍यापते.

ज्‍याने गोळीबार केला त्‍या मनोहर कदम या पोलीस अधिका-याला जन्‍मठेपेची शिक्षा न्‍यायालयाने ठोठावली. तब्‍बल 12 वर्षांनी. अगदी अलिकडेपर्यंत आरोपी मनोहर कदम पोलीस सेवेत होते. ज्‍यावेळी गोळीबार झाला तेव्‍हा, भाजप-सेनेचे युतीचे सरकार होते. गृहमंत्री असलेल्‍या गोपिनाथ मुंडेंनी मनोहर कदम यांच्‍या कृतीचे त्‍यावेळी जोरदार समर्थनच केले होते. त्‍यानंतर आलेल्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या सरकारने मनोहर कदमना सेवेत कायम ठेवले. एवढेच नव्‍हे, तर बढतीही दिली. सत्‍तेच्‍या जवळ आणि विरोधात असलेल्‍या काही आंबेडकरी नेत्‍यांना रमाबाई कॉलनीतील जनतेने हत्‍याकांडानंतर आपल्‍या वस्‍तीतून धक्‍के मारुन हाकलले होते, तर उरलेले नेते जनतेच्‍या या उद्रेकाला घाबरुन तिकडे फिरकलेच नाहीत. पुढे हे नेते मधून मधून हा प्रश्‍न उच्‍चारत राहिले. पण कोणीही ठोसपणे त्‍याचा पाठपुरावा केला नाही. त्‍यांचे सत्‍ताकारणाचे नित्‍यकर्म कोठेच खोळंबले नाही. या नेत्‍यांना हाकलणारी जनताही पुढे नाराजीने, नाईलाजाने का होईना, पण याच नेत्‍यांच्‍या कळपात कोठे ना कोठे सामील होत राहिली. संघराज रुपवते, श्‍याम गायकवाड यांसारख्‍या काही मोजक्‍या मंडळींनी रमाबाईच्‍या खटल्‍याचा नियमित पाठपुरावा केला, त्‍यामुळेच खरे तर हा आश्‍वासक निकाल लागू शकला.
आज निकालानंतरही माझी अस्‍वस्‍थता कायम आहे. एक शल्‍य आत डाचत राहते आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीच्‍या संकल्‍पनेविषयी एक खुले पत्र त्‍यांच्‍या अखेरच्‍या काळात लिहायला सुरुवात केली होती. त्‍यांच्‍या महापरिनिर्वाणामुळे त्‍या पत्रात ते समग्र मांडणी करु शकले नाहीत. लोकशाहीच्‍या रक्षणासाठी सत्‍ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्‍यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची नितांत आवश्‍यकता असते, या धारणेतून रिपब्लिकन पक्षाची जुळवाजुळव करण्‍याचा त्‍यांचा मानस होता. हा पक्ष अर्थातच एकजातीय नव्‍हता, तो सर्वसमावेशक असाच असणार होता. एस.एम. जोशी, लोहिया आदिंशी तशी त्‍यांनी बोलणीही सुरु केली होती. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि ही बोलणीही तिथेच थांबली. पुढे बाबासाहेबांच्‍या अनुयायांनी रिपब्लिकन पक्ष स्‍थापन केला. स्‍थापनेनंतर लगेचच त्‍याच्‍या चिरफळ्या झाल्‍या. आंबेडकरी चळवळीच्‍या पुढच्‍या दुरुस्‍त, नादुरुस्‍त रिपब्लिकन पक्ष, पँथर, मास मुव्‍हमेंट, ऐक्‍याच्‍या प्रयोगांनंतरचा पुनरुज्‍जीवित रिपब्लिकन पक्ष या सर्व संघटनात्‍मक आकृतिबंधांचे ‘चिरफळ्या’ हे व्‍यवच्‍छेदक लक्षण बनले. बाबासाहेबांची मूळ सर्वसमावेशक संकल्‍पना कधीच हवेत उडून गेली. या सर्व संघटनात्‍मक रुपांचे म्‍होरके हे बौद्धच राहिलेत. सवर्ण सोडाच, भटक्‍या, आदिवासी, अगदी दलितांतल्‍याही इतर जातींचे कोणी नेतृत्‍वात स्‍वीकारले गेले नाही. हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच.
वर उल्‍लेख केलेल्‍या खुल्‍या पत्रात ‘संसदीय लोकशाहीच्‍या यशस्‍वीतेसाठी आवश्‍यक गोष्‍टी’ सांगताना 7 वी गोष्‍ट नोंदवली आहे- विवेकी लोकमत. या मुद्द्याच्‍या विवेचनात बाबासाहेब म्‍हणतात,
‘अन्‍याय कोणावरही होत असो, अन्‍याय दिसला रे दिसला की, जागृत होऊन उठणारी शक्‍ती म्‍हणजे समष्‍टीची सद्सद्विवेक बुद्धी। सार्वजनिक विवेक बुद्धी याचा अर्थच असा की, जिच्‍या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्‍येक माणूस, मग तो अन्‍यायाचा बळी असो अथवा नसो, अन्‍यायाच्‍या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो।’

हे लिहून आज अर्धे शतक लोटले आहे. लोकशाही ब-यापैकी स्थिरावली आहे. तिच्‍या कौतुकाच्‍या खाती अनेक गोष्‍टी जमा आहेत. तथापि, सामाजिक अत्‍याचाराबाबत, हत्‍याकांडावेळी संवेदना व्‍यक्‍त करताना निखळ, निरपेक्ष असतेच असे नाही. अत्‍याचारितांची जात, धर्म कळला की, एक अदृश्‍य पट्टा आपल्‍या संवेदनांच्‍या प्रकटीकरणाभोवती आवळला जातो. कळत किंवा नकळत. त्‍या समाजघटकांच्‍या उद्रेकांबद्दल, आंदोलनांबद्दल तर हे विशेषच होते. शिवसेनेची किंवा मनसेची तोडफोड आणि मुस्लिम किंवा आंबेडकरी समुदायाची तोडफोड यांत सर्वसामान्‍य सवर्ण माणूस एकच प्रतिक्रिया देत नाही. शिवसेनेची-मनसेची ‘तोडफोड’ ही गैर गोष्‍ट आहे, हे तो बोलतो. पण मुस्लिम आणि दलित यांच्‍या उद्रेकांविषयी तो आणखी पुढे बोलतो....‘ही जात किंवा हा धर्म असाच’. याचा अर्थ, व्‍यवहारात हा प्रत्‍येक सवर्ण दलितांच्‍या किंवा मुस्लिमांच्‍या विरोधातच उभा राहील किंवा त्‍यांना माणूस म्‍हणून मदत करणार नाही, असे नाही. त्‍याच्‍या मनावरील विकृत संस्‍कारांची जळमटे त्‍याच्‍या नकळतही अनेकदा बोलत असतात. पण ही जळमटेच अत्‍याचारितांच्‍या भोवती संरक्षणाचा कोट उभा राहण्‍यास अडथळा ठरतातही जळमटे झटकून बाबासाहेबांना अभिप्रेत ‘सार्वज‍निक विवेक’ जागृत करण्‍याचे, त्‍यायोगे लोकशाही पूर्णतः यशस्‍वी करण्‍याचे प्रयास होताना ठळकपणे दिसत नाही. म्‍हणजे तशी चळवळ दिसत नाही. जे शल्‍य मला डाचते आहे, अस्‍वस्‍थ करते आहे ते हे.
मनोहर कदमना जन्‍मठेपेची शिक्षा झाली आणि दोन विभागांतून दोन प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाल्‍या. दलित विभागातून आनंद प्रकट करुन प्रतिक्रिया आली- ‘जातियवादी नराधमाला अखेर शिक्षा झाली’. सवर्णांतून औपचारिक प्रतिक्रिया सावधपणे, पण खाजगीत ‘कदम हा व्‍यवस्‍थेचा बळी, किंवा बळीचा बकरा झाला’ असे बोलले जाऊ लागले. ‘बळीचा बकरा’ म्‍हणणा-यांमध्‍ये या खटल्‍याचे तपशील, त्‍या घटनेची तीव्रता माहीत नसलेले-विसरलेलेही अनेक जण होते. जे दलितांच्‍या अजिबात विरोधात नाहीत किंबहुना बाजूचेही आहेत.
या दोन्‍ही प्रतिक्रियांचा मला त्रास झाला. जबाबदार व वस्‍तुनिष्‍ठ प्रतिक्रिया का असू नयेत ? ...हा तसा भाबडा प्रश्‍न आहे, हे मला कळते. पण अशा प्रतिक्रियांचा दिवस लवकर यावा, ही माझी मनोमन इच्‍छा (श्रद्धा म्‍हणा हवे तर) आहे.
भाजप-सेनेच्‍या सरकारचा वरदहस्‍त, मनोहर कदम यांचे मराठा असणे या बाबी त्‍यांना दलितांच्‍या विषयी आकस असेल, असे गृहीत धरायला पूरक आहेत. पण हे मनाचा फोटो काढण्‍यासारखे झाले. प्रत्‍यक्षात मनोहर कदम यांच्‍या मनात असे काहीही नसणे, केवळ एका प्रक्षुब्‍ध जमावाला रोखताना घेतलेला चुकीचा निर्णय असेही असू शकेल. या गोळीबारानंतर कदमांना जे दोन्‍ही सरकारांनी संरक्षण दिले, त्‍याबद्दल मात्र त्‍यांचे ‘मराठा’ असणे उपयुक्‍त ठरले, असे म्‍हणण्‍यास पुष्‍कळ आधार आहे.
टँकर जाळायला जमाव येत होता, म्‍हणून गोळीबार करावा लागला, ही कथा न्‍यायालयाने खोटी ठरवली. आधी अश्रुधूर, मेगॅफोनवरुन आवाहन आणि मग गोळीबार, तोही कमरेच्‍या खाली यांपैकी काहीही न करता कदमांनी सैरावैरा गोळीबार करण्‍याचा आदेश दिला. अशारीतीने कायद्याच्‍या रक्षणकर्त्‍यानेच कायदा हातात घेतल्‍याने ही जन्‍मठेपेची सजा सुनावली गेल्‍याचे न्‍यायालयाने म्‍हटले आहे. हा निकाल देणारे न्‍यायाधीश कुलकर्णी हे ब्राम्‍हण व मदतकारक ठरलेली साक्ष देणारे मोरे हे मराठा पोलीस अधिकारी होते.
आंबेडकरी समुदायात पुन्‍हा चीड निर्माण व्‍हावी, अशा घटना पुढे घडू लागल्‍या. पोलीस महासंचालक श्री. विर्क, दंगलींना अटकाव करण्‍यासाठी मोहल्‍ला कमिट्यांचा भिवंडीत यशस्‍वी प्रयोग करणारे ज्‍येष्‍ठ पोलीस अधिकारी श्री. खोपडे यांसारख्‍या काही अधिका-यांनी मनोहर कदम हे ‘व्‍यवस्‍थेचे बळी’ आहेत, असे जाहीरपणे म्‍हटले. असे समजू की त्‍यांना तत्‍कालीन काही आतल्‍या गोष्‍टी माहीत असतील. त्‍यांच्‍या दृष्‍टीने कदम हे निरपराध असतील. पण कायदेशीर प्रक्रियेत ते त्‍यांना सहाय्य करु शकले असते. जाहीरपणे अशी प्रतिक्रिया देण्‍यातून (तेही सरकारचे अधिकारी म्‍हणून घटक असताना) आंबेडकरी समुदायाच्‍या जखमेवर मीठ चोळल्‍यासारखेच झाले. हे मुद्दाम की अभावितपणे ? ...पुन्‍हा तोच मनाचा फोटो !
मनोहर कदमांना वरच्‍या न्‍यायालयाने-उच्‍च न्‍यायालयाने जामीन दिला. एवढेच नाही, तर त्‍यांनी न मागताही त्‍यांची शिक्षा तहकूब करायचा आदेश दिला. ‘केवळ स्‍वरक्षणाचा अधिकारच नव्‍हे, तर राज्‍य राखीव पोलीस दलाच्‍या कायद्यातील कलम 11 प्रमाणे ज्‍यावेळी जीविताला धोका असेल किंवा सरकारी अथवा खाजगी मालमत्‍तेचे नुकसान होण्‍याचा संभव असेल, अशावेळी पोलीस बळाचा वापर करु शकतात, जरी त्‍यामुळे काही मृत्‍यू होण्‍याची शक्‍यता असली तरी.’....असेही उच्‍च न्‍यायालयाने जामीन देताना नोंदवले आहे. कदमांच्‍या वकिलांनी निदर्शनास आणून दिलेल्‍या आणखी काही कलमांचा आधार कबूल करुन कदमांना उच्‍च न्‍यायालयात आपली बाजू लढविण्‍याला मजबूत पाया आहे, असेही उच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे.
...मनोहर कदमांच्‍या ‘जन्‍मठेपेचे’ पुढे काय होणार, हे आता अनिश्चित झाले आहे, हे निश्चित. मात्र याचे खरे-खोटे राजकारण करणे हे पुढेही चालू राहणार.
या सगळ्यात एक मुद्दा अजिबात ऐरणीवर येत नाही. ज्‍यामुळे लोक प्रक्षोभित होऊन रस्‍त्‍यावर उतरले ती घटना विस्‍मरणात गेली आहे. बाबासाहेबांच्‍या पुतळ्याला चपलांचा हार घालून विटंबना करणारा कोण होता, हा प्रश्‍न आज अनुत्‍तरीतच आहे. विटंबना करणारा न सापडल्‍याने पोलिसांनी ती केस फाईल केली आहे. समाजात तेढ निर्माण व्‍हावी म्‍हणून जाणीवपूर्वक अशा घटना घडवणारे नेहमीप्रमाणे इथेही नामानिराळे राहण्‍यात यशस्‍वी ठरले. ‘ती कीड नष्‍ट करण्‍याचे प्रयत्‍न’ हे चळवळीचे मुख्‍य ध्‍येय या गदारोळात कुठच्‍या कुठे उडून गेले आहे. ही बाब मला अस्‍वस्‍थ करते आहे.
आंबेडकरी चळवळ कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्‍या भू‍मिहीनांच्‍या आंदोलनाचा व दलित पँथरच्‍या जाहीरनाम्‍याचा अपवाद वगळता कायम प्रतिक्रियात्‍मक आंदोलन करत राहिली. उसंत घेऊन लांब पल्‍ल्‍याची विचारपूर्वक बांधणी व कार्यक्रम तिला अंगिकारताच आला नाही. बाबासाहेबांच्‍या विचार व प्रतिमेचा तेजस्‍वी दीपस्‍तंभ समोर असतानाही हे झाले नाही. आंबेडकरी नेत्‍यांचा व्‍यक्तिवादी व्‍यवहार, अहंता, द्रष्‍टेपणाचा अभाव, संकुचित सत्‍ताकांक्षा यांच्‍या वावटळीत हा दीपस्‍तंभच झाकोळून गेला आहे. आंबेडकरी नेत्‍यांची ही सर्व वैशिष्‍ट्ये त्‍यांच्‍या अनुयायांतच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या वरील लक्षणांच्‍या विरोधात बंड करणा-यांच्‍यातही नंतर आपोआप येतात. आपला समाज सत्‍ताधारी करायचा तर केवळ 7 टक्‍के बौद्ध समाज किंवा 13 टक्‍के दलित समाज आधाराला असून पुरेसा नाही, हे या सर्वांना पूर्णपणे कळते. बाबासाहेबांच्‍या संकल्‍पनेतील रिपब्लिकन पक्ष केला तरच हे शक्‍य आहे, हे त्‍यांना ठाऊक आहे. ‘खुले पत्र’ त्‍यांना पाठ आहे. पण लांब पल्‍ल्‍याच्‍या व्‍यापक लोकशाही प्रस्‍थापनेच्‍या सर्वसमावेशक लढ्यात ‘आपले’ काय होईल, कधी होईल, हा त्‍यांना सतावणारा खरा प्रश्‍न आहे. तेवढी सबुरी धरली तर आपले आयुष्‍यच संपून जाईल. त्‍यापेक्षा व्‍यापकतेची झूल पांघरुन जातींच्‍या बेरजा करण्‍याचे ‘स्‍वाभिमानी’ (चलाख) राजकारण हा काहींना शॉर्टकर्ट वाटतो, तर काहींना जातीयवादी शक्‍तींचा निःपात करण्‍यासाठी सत्‍ताधा-यांशी सहकार्य (म्‍हणजे स्‍वतःला आमदार, खासदार किंवा मंत्रिपद मिळवणे) ही ‘ता‍त्विकता’ सोयीची वाटते.
या व्‍यवहारात कष्‍टक-यांच्‍या लढ्यात आघाडीवर राहू शकणारी आंबेडकरी तुकडी गारद होत आहे. हे केवळ आंबेडकरी नाही तर एकूण प्रगतीशील चळवळीचे प्रचंड नुकसान आहे. तथापि, प्रगतीशील चळवळीतील सवर्ण कार्यकर्त्‍यांकडून ही बाब दुरुस्‍त करण्‍याचे प्रयत्‍न त्‍या अगत्‍याने होताना दिसत नाहीत. महाराष्‍ट्रात जिथे दलितांवरच्‍या अत्‍याचाराचे प्रसंग घडतात, तिथे त्‍याच्‍या आसपासच्‍या शहरातील शिक्षित आंबेडकरी कार्यकर्ताच आवाज उठवताना दिसतो. या आंदोलनांना काही ठिकाणी सवर्ण कार्यकर्त्‍यांचा पाठिंबाही असतो. पण सवर्ण कार्यकर्त्‍यांनी किंवा त्‍यांचा सहभाग असलेल्‍या संघटनांनी या अत्‍याचाराच्‍या विरोधात पुढकाराने आवाज उठवला आहे, तो प्रश्‍न लावून धरला आहे, ज्‍या सवर्णांनी हा अत्‍याचार केला आहे, त्‍यांच्‍या विरोधात ‘पापक्षालनासाठी उपोषण’ सवर्ण कार्यकर्ते धरत आहेत, समता यात्रा काढत आहेत, असे चित्र प्रसारमाध्‍यमांतून पुढे येते आहे, असे होत नाही. असे झाले तर दलित समाज ही आमचीच मालमत्‍ता असे समजणा-या दलित नेत्‍यांना चाप लागेल तसेच व्‍यापक एकजुटीची मनापासून इच्‍छा असलेल्‍या परंतु अल्‍पसंख्‍य असलेल्‍या दलित कार्यकर्त्‍यांना ताकद मिळेल.
कष्‍टक-यांच्‍या व्‍यापक आर्थिक लढ्यातून आपोआप सांस्‍कृतिक प्रश्‍न सुटणार नाहीत. ते आनुषंगिकपणेही घेऊन चालणार नाही. ते स्‍वतंत्रपणे लढावे लागतील. आणि ते लढतो आहोत, हे दिसावेही लागेल. हे अवधान, अगत्‍य कष्‍टक-यांच्‍या लढ्यातील सवर्ण नेतृत्‍वाने दाखवणे हा संपूर्ण उपाय नसला, तरी योग्‍य दिशेने पुढे सरकण्‍याचे एक अत्‍यंत महत्‍वाचे पाऊल जरुर आहे.
ते पडले की माझ्या अस्‍वस्‍थतेलाही बहुधा उतार पडू लागेल।

- सुरेश सावंत